Wednesday 18 July 2012

बौद्ध संघर्ष समिती

आंबेडकरी चळवळीत नव्याने काम करणा-यांनी आता एक नवीनच शक्कल काढली आहे. म्हणे "बुद्धिझम आतापर्यंत का भारतात पसरू शकला नाही तर याचे कारण आहे कि, आम्ही फक्त घटना चालवीत आलो. बुद्धिझम पसरविला नाही." आता या विद्वानांना कौन सांगेल कि भारतीय संविधान म्हणजेच यांची घटना आणि बुद्धिझम वेगळा आहे का ? अजून काय म्हणतात कि "घटना आणि धर्म जर लोकांसमोर ठेवला तर लोक धर्माची मागणी करतील. घटनेची नाही." वाचून आणि असे ऐकूनही संताप येतो. एकीकडे बाबासाहेब भारतीय संविधान आणि बुद्धिझम यात तफावत करीत नाही. आणि हे बघा विद्वान ! ज्या बुद्धिझमवर आधारित देशाचे संविधान बाबासाहेबांनी बनविले त्यालाच आता हे लोक असे बोलायला लागले आहेत. आणि म्हणतात काय तर आम्ही पुण्यात पाली आणि बुद्धिझम साठी एक इंस्टीट्युट काढले आहे. आणि आता आम्ही या देशात बुद्धिझम पुन्हा रुजविणार आहोत. संविधानाला सोडून. पुण्यातील बौद्ध संघर्ष समिती नावाचे हे पीलांटू आहे. आणि यांचे कार्यकर्ते आता असे बोलू लागले आहेत. आम्ही संविधानासोबतच बुद्धिझम ला पसरविण्याचे काम केले आहे. परंतु काही मनुवादी लोकांनी (रजनीश/ओशो/गोयंका/टीबीएमएस) बुद्धिझम ला दुषित केले आहे. त्यामुळे भारत बुद्धमय करण्याच्या बाबासाहेबांच्या स्वप्नाला तडा गेला आहे. हे यांना कुणी तरी सांगावे. एकीकडे घटना सोडून बुद्धिझम पसरविला पाहिजे म्हणणारे आणि दुसरीकडे भारत मुक्ती म्हणणारे यांच्यात मला कुठेही तफावत दिसत नाही. दोन्ही कडे भारतीय संविधानाला नाकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. जे अण्णा/केजरीवाल/आरएसएस/भाजप करीत आहेत तेच यांना पण पाहिजे आहे असे दिसते. सांगा यांच्यात काही भेद करता येईल का ?

टीप :- यावर कुणाला काही तक्रार असल्यास ९२२६७३४०९१ या नंबर वर संपर्क करावा. किंवा ३०१, सत्यम हाईट, गणेश धाम, हुडकेश्वर रोड, नागपूर-३४ या पत्त्यावर प्रत्यक्ष संपर्क करावा...
"सम्यक जय भीम"
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. 

वैयक्तिक कर्तबगारी

"वैयक्तिक कर्तबगारी हि आदरणीय असते, पण पुष्कळ वेळा ती अनुकरणीय नसते ; व म्हणूनच वैयक्तिक कर्तबगारी व सामुदायिक कर्तबगारी यांच्यात तुलना करता सामुदायिक कर्तबगारी शेकडो पटींनी श्रेयस्कर ठरते. वैयक्तिक कर्तबगारी आकाशएवढी उंच असली तरी साधारण उंचीच्या सामुदायिक कर्तबगारीच्या पासंगालाही ती पुरणार नाही." (अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. १ फेब्रुवारी १९२९, खंड - २० - पान न. ३५) बाबासाहेबांवर होणा-या टीकेला उत्तर देण्यासाठी हा लेख तेव्हाच्या बहिष्कृत भारतात सामादाकांनी लिहिला होता. अतिशय बोध घ्यावी अशी काही वाक्य मी इथे दिलेली आहेत. कारण आज इथे मात्र वैयक्तिक कर्तबगारीने रान माजविले आहे. प्रत्येकाला मी किती श्रेष्ठ आणि समाजाचा उद्धारक हे सिद्ध करायचे आहे. ज्यांनी साधा दगडही कधी फोडला नाही त्यांनी समाजाचे आम्हीच उद्धारक म्हणून बुद्धिभेद केला आहे. आणि मेंढरांची जमत त्याला बळी पडून वैयक्तिक कर्तबगारीचा उदोउदो करीत सुटले आहे. १९७२ नंतर ज्यांनी समाजासाठी त्याग केला ते आज समाजापासून तुटले आहेत. आणि ज्यांनी समाजाला विकून (जाती जोडो आणि वैचारिक आंदोलनाच्या नावाखाली) स्वतःची पोळी भाजून घेतली. ते आता महापुरुषांच्या रांगेत बसू लागली आहेत. सायकल वरून फिरायची लायकी नसणारे, बुद्धीने दिवाळखोर असणारे मोर्चाचे, आणि काळ्या मण्याची गाटी घालायची लायकी नव्हती ते हि-याचे दागिने घालणारे आज कुठे आहेत. आणि जे समाजासाठी झटले, लढले, मेले, आणि आताही तडपत आहेत ते कुठे राहिले ? हे सर्व आम्ही मेंढरांची जमात बनल्यामुळे झाले आहे. जर आम्ही वैयक्तिक आणि सामुदायिक कर्तबगारी ओळखली असती तर आज हि परिस्थिती पाहायला मिळाली नसती. (राजकारण आणि सत्ता सोडून बोलावे एवढी विनंती)

टीप :- यावर कुणाला काही तक्रार असल्यास ९२२६७३४०९१ या नंबर वर संपर्क करावा. किंवा ३०१, सत्यम हाईट, गणेश धाम, हुडकेश्वर रोड, नागपूर-३४ या पत्त्यावर प्रत्यक्ष संपर्क करावा...
"सम्यक जय भीम"
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. 

Tuesday 17 July 2012

धम्माला सत्तेची गरज काय ?

धम्माला सत्तेची गरज काय ?

१९४५ द्वितीय जागतिक महायुद्धानंतर जगातील बहुतांश देशांनी लोकशाही, संसदीय व्यवस्था आणि कायद्याचे राज्य स्वीकारले. वसाहतवादी, धार्मिक आणि राजेशाही जवळपास संपुष्टात आली. भारताने तर संसदीय व्यवस्था, लोकशाही आणि कायद्याचे राज्य संविधानाच्या माध्यमातून स्वीकारून जगासमोर एक आदर्श निर्माण केला. यासोबतच धर्माला मिळणारा राजाश्रय संपुष्टात येऊन धार्मिक स्वतंत्राचा व्यक्तीशः अधिकार प्राप्त झाला. जगात आता कुठेही कुठल्याही धर्माला राजाश्रय प्राप्त नाही. (काही इस्लामिक राज्य वगळता) बहुसंख्य आणि अल्पसंख्य अशी धार्मिक लोकसंख्येच्या आधारावर विभागणी करण्यात आली. परंतु राज्याचा कुठलाही एक धर्म म्हणून स्वीकारला गेला नाही. खुद्द पाकिस्थानातही हिंदू आणि इतरही धर्माचे लोक राहत असल्याने त्यांना निव्वळ इस्लाम धर्माचा जागतिक पुरस्कार करता येत नाही. आधुनिक काळात राजसत्ता आणि धर्म या भिन्न आहेत. परंतु भारतात आजही हिंदू धर्माचा पुरस्कार केला जातो. संविधानातून नव्हे तर हिंदू कट्टरपंथीयांच्या माध्यमातून. मग पाकिस्तानात जर इस्लाम चा पुरस्कार केला गेला तर इथल्या हिंदूंच्या पोटात आगडोंब का उठते हे कळायला मार्ग नाही. याचाच अर्थ इथले कट्टरपंथीय लोकशाही आणि संविधान मान्य करीत नाही. कायद्याचे राज्य मान्य करीत नाही. हेच सिद्ध होत आहे. आणि तसा उल्लेख हिंदू कट्टरपंथीयांकडून वारंवार जाहीररित्या केला गेला आहे. 

हे सर्व कट्टरपंथीय धार्मिक संप्रदायाकडून होते हे मान्य करता येईल. परंतु भारतात बौद्ध धम्माचे पुरस्कर्ते म्हणवून घेणारे काही बहुरूपी (मुळात ते बुद्धिस्ट नसल्यामुळे बहुरूपी) बामसेफ, बीएसपी आणि एम्बस चे विद्वान बौद्ध धम्माला इतिहासाचे दुषणे देत राजाश्रय मिळवून देण्याच्या वल्गना करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची ही प्रताडणा आहे. सत्ता प्राप्त केल्याशिवाय बौद्ध धम्माला राजाश्रय मिळणार नाही आणि बौद्ध धम्म फलद्रूप होणार नाही अशी या विद्वानांची मांडणी किती हास्यास्पद वाटते ! सत्ता मिळाल्यावरच बौद्ध धम्माचा स्वीकार करणार असे म्हणणारे मादक विद्वान नेते आणि त्यांचे मेंढपाळ कार्यकर्ते नेमक्या कुठल्या धर्माकडे वाटचाल करीत आहेत ? हे तरी आता आधुनिक पिढीने समजून घ्यावे. सत्तेसाठी धम्माचा स्वीकार केला जात नाही ही बाब बौद्ध धम्मासाठी अतिशय लांच्छनास्पद आहे. 

धम्म हा जीवनमार्ग आहे. तो जीवनमार्ग न स्वीकारता राजकारणासाठी धम्माला वेठीस धरणे म्हणजे देशद्रोहच नाही तर समाजद्रोह सुद्धा आहे. आम्ही धम्मानुसार वागतो. धम्म चालवितो. मात्र धम्माचा स्वीकार करीत नाही. हिंदू धर्माला शिव्या देतो. पण त्याच हिंदू धर्मात राहून. ही कुठली राजनीती आहे. हे आता तरुण पिढीने ओळखणे गरजेचे आहे. अश्या वल्गना जेव्हा या विचारवंतांकडून ऐकायला येतात. तेव्हा हा समाज आणखी किती काळ फसविला जाणार आहे. बौद्ध धम्माला आलेली ही या बहुरूपी सत्तावाद्यांकडून आलेली ग्लानी आम्ही केव्हा दूर करणार आहोत. किती दिवस ताटकळत राहायचे.? धम्माच्या नावाने यांचे राजकारण किती दिवस सहन करायचे ? धम्माच्या नावाने राजकारण करणा-या देशद्रोही समाजद्रोह्यांना आम्ही केव्हा उघडे पाडणार आहोत ? यांना केव्हा धडा शिकविणार आहोत ? बर्मा, मलेशिया, थायलंड, चीन, जपान इ. देशांमध्ये बौद्ध धम्माला राजाश्रय नाही तरी तिथे बौद्ध धम्म फलद्रूप होतो आहे. भारतातच या विद्वान नेत्यांना सत्तेची धम्मासाठी काय गरज आहे ?

सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हालाच द्यावी लागणार आहेत....

"सम्यक जय भीम"

---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.  

सामाजिक न्यायाचा सरकारी गर्भपात.



सामाजिक न्यायाचा सरकारी गर्भपात.
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर, 9226734091
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय संविधान सभेतील २६ नोव्हेंबर १९४९ चे भाषण आज पुन्हा तंतोतंत खरे उतरू लागले आहे. संविधान सभेतील त्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "आज आम्ही राजकीय स्वातंत्र्यात एक स्वतंत्र राज्य म्हणून पाऊल ठेवीत आहोत. परंतु अद्यापही समाजातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेची खाई मोठी आहे. सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचा बळी देऊन आम्ही राजकीय स्वातंत्र्य मिळविले आहे. परंतु जोपर्यंत समाजात सामाजिक आणि आर्थिक विषमता कायम आहे. तोपर्यंत या राजकीय स्वातंत्र्याचा संपूर्ण उपभोग आम्हाला घेता येणार नाही.  समाजातली सामाजिक आणि आर्थिक विषमतेची दरी जेव्हा कमी होईल तेव्हाच या राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल. अन्यथा समाजातील व्याप्त असणारी हीच विषमता संविधानातून प्राप्त झालेली राजकीय व्यवस्था मोडीत काढेल. बेचिराख करेल. अश्या परिस्थितीत सामाजिक आणि आर्थिक विषमता या संविधान सभेने निर्माण केलेल्या संविधानाच्या माध्यमातून शक्य तितक्या लवकर कमी करणे आमचे आद्य कर्त्यव्य आहे. तेव्हाच या राजकीय व्यवस्थेला वैभव प्राप्त होईल."
सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी सामाजिक न्यायाची संकल्पना भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आली. भारतीय संविधानाने पर्यायाने भारतीय राज्यव्यवस्थेने सामाजिक न्यायाचे तत्व स्वीकारले. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत त्याला समाविष्ट करण्यात आले. तशी हमी देशातील जनतेला बहाल केली आहे. सर्व नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. कुणीही सामाजिक आणि आर्थिक न्यायापासून वंचित राहू नये. याची दक्षताही संविधानकारांनी घेतलेली होती. शक्य तितक्या लवकर सामाजिक न्यायाची प्रस्थापना समाजात करण्याची जबाबदारी हे संविधान चालविणा-यांची होती. याबाबत सूचना करतांना बाबासाहेब म्हणतात, "संविधान सभेने संविधान तयार करून राज्याच्या कल्याणाचा दस्ताऐवज नागरिकांना बहाल केला आहे. अतिशय परिश्रमातून निर्माण केलेले हे संविधान कितीही चांगले असले तरी त्याचे यशापयश ते संविधान चालविणा-यांवर अवलंबून राहणार आहे. अन्यथा महत्प्रयासाने उभारलेला संविधानिक लोकशाहीचा हा डोलारा कोलमडून पडेल." आणि आज नेमकी तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. संविधानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांनी सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला केराची टोपली दाखविल्यामुळे संविधानाचा हा डोलारा आज कोलमडून पडण्याच्या मार्गावर आलेला आहे. ज्यामुळे सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेची संकल्पना संवैधानिक कागदोपत्री धूळ खात पडलेली आहे.

भारतीय समाजातील व्याप्त जातीप्रथा आणि विषमतेने मानवी विकास खुंटविला होता. साधन संपत्तीपासून तर हक्क व अधिकार एका विशिष्ट समाजाच्या हातात एकवटलेले होते. ज्यामुळे बहुसंख्य समाज दारिद्र्याच्या खाईत लोटला गेला होता. संविधानाने त्या बहुसंख्य समाजाला समान दर्जा बहाल केला. आणि या समाजाच्या हजारो वर्षाच्या दारिद्र्याला नष्ट करण्यासाठी काही विशेष तरतुदी केल्या गेल्या. हिंदू धर्मातल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेने शुद्र आणि अतिशूद्र गणल्या गेलेल्या पिडीत बहुसंख्य समूहाला इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती व जनजाती अश्या वर्गात विभागण्यात आले. आणि या वर्गाच्या उत्थानासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित केल्या जाव्यात अशी तरतूद केली गेली. पण ही सर्व संविधानिक तरतूद धाब्यावर बसवून इथल्या राज्यकर्त्यांनी राज्यकारभार चालविलेला दिसून येतो आहे. ज्यामुळे अनुसूचित जाती-जनजाती आणि इतर मागास प्रवर्ग या समूहाचा सामाजिक व आर्थिक उत्थान अद्यापही होऊ शकलेला नाही.

सामाजिक न्यायाची संकल्पना तशी व्यापक स्वरुपाची आहे. देशातील सर्व नागरिक सामाजिक न्यायाच्या परीक्षेत्रामध्ये येतात. परंतु भारतीय समाजाच्या जातीवादी व्यवस्थेत सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला 'बहुसंख्यकांचे हित' या अवधारणेत बसविण्यात आले आहे. या समाजाचे हजारो वर्षांचे दारिद्र्य घालविता यावे व त्यासाठी साधन संसाधनांची पूर्तता शासनाच्या माध्यमातून केली जावी यासाठी सरकारला कटिबद्ध करण्यात आले. आरक्षण, विविध विकासाच्या योजना, सबसिडी इ. साधन संसाधनांची पूर्तता करण्याच्याच अटी आहेत. विकासाच्या अत्युच्च टोकावर पोहोचलेला समूह आणि विकासाच्या अगदी तळागाळात रुतून पडलेला समूह एका समान व्यवस्थेत समान वाटचाल करीत असतील तर दोन्ही समूह समान पातळीवर कधीच येऊ शकणार नाही. मग अश्या परिस्थितीत विकासाच्या अगदी तळागाळात रुतून पडलेल्या समूहाला विकासाच्या अत्युच्च टोकावर असलेल्या समाजाच्या बरोबरीने आणण्यासाठी काही वाढीव तरतुदी भारतीय संविधानाने करून दिल्या. मानवी विकासाच्या आणि मानवाधिकाराच्या कक्षेतच या अटींची आणि तरतुदींची मांडणी करण्यात आलेली आहे. परंतु या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला सुरवातीपासूनच विरोध दर्शविला गेला. ज्यामुळे त्या विशेष तरतुदींची योग्य अंमलबजावणी बुरसटलेल्या मानसिकतेतून करण्यात आल्याने सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकला नाही.

अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्या प्रमाणे अल्पावधीत सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जाणे गरजेचे होते. परंतु संविधानाच्या अंमलबजावणीनंतर यासाठी काही विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. ज्या काही थोड्याथोडक्या योजना करण्यात आल्या त्या कधी समाजापर्यंत पोहचू दिल्या गेल्या नाही. या समाजाच्या आर्थिक विकासाचा ब्याकलौग नेहमी वाढतच राहिला. परंतु तो पैसा या समाजाच्या उत्थानासाठी कधी वापरलाच गेला नाही. अनुसूचित जाती-जनजातीच्या विकासाचा निधी शासकीय आणि प्रशासकीय उदासीनतेचा बळी ठरला. आरक्षणाचा लाभ घेऊन या समूहाने आपला सामाजिक व आर्थिक विकास करून घेतला. पण त्यात सरकारचे विशेष काही प्रयत्न होते असे नाही. मुळात ज्या कायमस्वरूपी विकासाच्या योजना सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणे गरजेचे होते त्या योजना राबविल्याच गेल्या नाही. फक्त कागदोपत्री योजनांची मांडणी करून शून्य खर्चावरच या योजना विरगळून पडल्या. असे असतांनाही आज काही उच्चभ्रू आणि जातीवादी मंडळींकडून संवैधानिक आरक्षण, तरतुदी, सबसिडी थांबविण्याच्या वल्गना केल्या जातात. हेच या भारतीय समाजाचे दुर्भाग्य होय.

राजकारणासाठी या समूहाचा सदैव बळी दिला गेला. मतांचे राजकारण करून सत्तेची भूक भागविण्यापर्यंतच अनुसूचित जाती-जनजाती व इतर मागास प्रवर्गाच्या योजना मर्यादित झाल्या. मात्र कधीच या समूहाच्या सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी कायमस्वरूपी योजनांची आखणी करण्यात आली नाही. जातीचे राजकारण करून उलट जातीय विद्वेषाचे राज्य या समूहाला बहाल करण्यात आलेले आहे. तात्पुरते व थातुरमातुर आयोग, समित्या, योजना, तरतुदी, अहवाल, कायदे तयार करण्यात आले. निवडणुकींच्या काळात त्याच्याच बळावर मतांचे राजकारण केल्या गेले. आणि सत्तेच्या खुर्चीवर ती सर्व आश्वासने गळून पडली.
भारतीय संविधानाने इथल्या अनुसूचित जाती - जमाती आणि इतर मागास प्रवर्गाला काही सवलती जरी बहाल केल्या असल्या, तरी आज देशातील साधन संसाधनांची मालकी ही ज्या समूहाच्या मालकीची आहेत. तो समूह या सवलतींचा लाभ या वर्गाला कधीच घेऊ देत नाही. मात्र समतेचा कित्ता मिरवून संविधानातील आरक्षण आणि सवलती बंद करण्यासाठी पुढे येतात. आज अनुसूचित जाती - जमाती आणि इतर मागास प्रवर्ग साधनहीन समूह म्हणून जगत आहे. शासन स्तरावर या समूहाच्या विकासासाठी आखण्यात येणा-या योजनांकडे पाठ फिरविली जात असेल तर संविधानकारांचे सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट करण्याचे स्वप्न कसे पूर्ण करता येईल. बहुसंख्य समाज आजही स्वतंत्र राष्ट्रात सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य गमावून बसलेला आहे. त्यांच्या या स्थितीला जबाबदार या देशातली सरकार आहे. ज्यांच्या ज्यांच्या हातात सत्ता आली, ज्यांनी ज्यांनी सत्तेची फळे चाखली आहेत. ते सर्वच याला जबाबदार आहेत.

अस्पृश्यता निर्मुलनार्थ उपाययोजना सुचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ९ फेब्रुवारी १९७३ ला विधान परिषदेचे अध्यक्ष वी.स.पागे यांच्या अध्यक्षतेखाली पागे समिती नेमण्यात आली. या समितीने १९७५ साली आपला अहवाल सदर केला. १९७६ साली विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या अहवालावर चर्चा झाली. सर्वपक्षीय सदस्यांनी या अहवालाला पाठींबा दर्शवून अहवालातील शिफारशी उत्कृष्ट असल्याचा अभिप्राय दिला. तसेच अहवालाची तंतोतंत व त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे असे ठरविले. त्यानुसार २१ जून १९७९ ला शासनाने अहवालातील शिफारशींना मान्यता दिली.

शासनाने पागे समितीचा अहवाल स्वीकृत करीत असतांना अनुसूचित जातींना अर्थसंकल्पातील १५ टक्के भाग राखून ठेवण्याची शिफारस मान्य केली. अर्थसंकल्पातील हा १५ % टक्के भाग योग्य रीतीने खर्च करता यावा व त्यासाठी विविध योजना आखता याव्या यासाठी एक स्वतंत्र कायदा तयार करून त्या कायद्यात अनुसूचित जातींना दिल्या जाणा-या निरनिराळ्या सुविधा, सवलत व हक्क यांचा समावेश करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला. या कायद्याचे उल्लंघन करणा-यांना शिक्षेची तरतूद केली गेली.

२१ जून १९७९ च्या पागे समितीच्या शिफारशी शासनाने मान्य केल्या होत्या. दोन्ही सभागृहाने त्या मान्य करून त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्याचाही निर्णय घेतला होता. परंतु अद्यापही पागे समितीच्या शिफारशी आणि घेण्यात आलेले निर्णय राज्य शासनाने काटेकोर अंमलबजावणीत आणलेले नाहीत. ज्यामुळे या समूहाच्या विकासाचा मार्ग अवरुद्ध झाला आहे. शासन पागे समितीच्या शिफारशी आणि घेतलेले निर्णय धाब्यावर बसवून अनुसूचित जाती समूहाची थट्टा करीत आहे. ही शासनाची उदासीनता किती भयावह आहे हे याठिकाणी दिलेल्या आराखड्यावरून दिसून येते. 
अ.क्र.
वर्ष
वार्षिक बजेट
मिळायला पाहिजे (१५ %)
मिळालेला निधी
(कोटी रु.)
मिळालेले (%)
खर्च  निधी
(कोटी रु.)
उरलेला निधी
(कोटी रु.)
1
1999-2000
12161.66
 1824.249
640
5.26  %
423.24
216.76
2
2000-2001


551

422.20
128.80
3
2001-2002


742.50

263.56
478.94
4
2002-2003


715

284
431
5
2003-2004


751.30

332.85
418.45
6
2004-2005


655.98

416.05
239.93
7
2005-2006


1122

1056.40
65.60
8
2006-2007


1592

1494.72
97.28
9
2007-2008


2060

1870
190
10
2008-2009


2332.80

2213
119.80
11
2009-2010
115990.67
 17398.6
2652
2.29 % 
2243.94
408.06
12
2010-2011


3867.10

2893.22
973.88




17682

13913.18
3768.50

पागे समितीने केलेल्या शिफारशीनुसार १५ % टक्के वार्षिक निधी हा अनुसूचित जाती व जमाती च्या कल्याणासाठी राखीव ठेवण्याची तरतूद मान्य करून देखील मागील १०-१२ वर्षात १५ टक्के निधी कधी प्राप्तच झाला नाही. ४ ते ५ टक्के निधी देऊनही त्या निधीचा पूर्ण वापर केला गेला नाही. आणि आजही हा निधी हजारो कोटीच्या घरात परत जात आहे. यावरून सरकार अनुसूचित जाती - जमाती आणि इतर मागास प्रवार्गांच्या कल्याणासाठी किती गंभीर आहे ?  हे दिसून येते. मुळात या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे प्रतीनिधीसुद्धा अद्यापही याविषयी का बोलत नाही ? किंवा हा निधी पूर्ण १५ % प्राप्त व्हावा यासाठी सरकारला मजबूर का करीत नाही ? की या समाजाचे प्रतिनिधित्वच आज राज्याच्या विधिमंडळामध्ये राहिलेले नाही ? त्यामुळेच सरकार याविषयावर गांभीर्य दाखवीत नाही. असे अनेक प्रश्न आज उद्भवू लागले आहेत. समाजानेच याचे उत्तर आपल्या प्रतिनिधींना मागितले पाहिजे. 

ज्याप्रमाणे मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी मोठ्या संघर्षातून या समाजाला जावे लागले होते. संविधानप्रेमी, आंबेडकरी समूह, परिवर्तनवादी चळवळीतील संस्था संघटना, रिपब्लिकन पक्ष आणि व्ही.पी.सिंग यांच्या प्रयत्नातून आणि लढ्यातून शेवटी मंडळ आयोग लागू करण्यात आला. त्यासाठी मोठे लढे उभारावे लागले. तशीच काहीशी परिस्थिती पागे समितीच्या शिफारशींसाठी या समाजाला लढावी लागणार आहे. मागास व अविकसित समाजाच्या कल्याणासाठी शासनाने गठीत केलेल्या विविध समित्यांच्या शिफारशी त्वरित मान्य करून त्यांची काटेकोर व नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला लढावे लागणार आहे. हा समाज आरक्षण व सवलती इतक्यापर्यतच मर्यादित राहून चालणार नाही. तर वार्षिक अंदाजपत्रकातील आपला निश्चित वाट प्राप्त केल्याशिवाय या समाजाच्या कल्याणाच्या वाटा मोकळ्या करता येणार नाही. म्हणून पागे समितीने सुचविलेले वार्षिक अंदाजपत्रकातील १५ % टक्के निधी चा वाटा आम्हाला मिळालाच पाहिजे यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

या देशातला बहुसंख्य समाज भारतीय संविधानामुळे स्वतःला सुरक्षित समजून घेत आहे. परंतु याच संविधानातील मुलभूत तरतुदींची पूर्तता शासनाच्या माध्यमातून होत नाही. तेव्हा मात्र या समूहाची सुरक्षितता धोक्यात आहे. या वर्गाच्या उत्थानाच्या सर्व योजना शासनदरबारी गिळंकृत केल्या जातात. अश्या परिस्थितीत आम्ही संविधानाचे कितीही गोडवे गात बसलो, तरी प्रत्यक्ष परिवर्तन या समाजात घडून येणार नाही. आम्ही सामाजिक शक्ती गमावून बसलो आहोत. त्यामुळे सरकार समाजाच्या हिताच्या धोरणांकडे दुर्लक्ष करते. सरकारला आमच्या कल्याणाची धोरणे काटेकोर राबविण्यासाठी कटिबद्ध करायचे असेल, तर आमची सामाजिक शक्ती व एकोपा दाखवावा लागेल. इतकेच नाही तर या समाजातल्या सुशिक्षित आणि बुद्धीजीवी लोकांना शासनाच्या धोरणांकडे लक्ष ठेवत राहावे लागेल. त्याची माहिती समाजाला देत राहावी लागेल. त्याविषयीची जाणीव जागृती करून शासनाला वेठीस धरावे लागेल. तेव्हाच या समाजाचा उद्धार होऊ शकेल. शासकीय योजना आणि या समाजाच्या विकासाचा निधीपूर्ण वाटा परिपूर्णपणे मिळविता येईल. अन्यथा पागे समिती असो की अन्य कुठलेही आयोग व त्यांच्या शिफारशी तश्याच धूळ खात पडल्या राहतील. आणि अश्या योजना व शिफारशींच्या माध्यमातून समाजाला मिळणा-या सामाजिक न्यायाचा सरकारी गर्भपात वारंवार घडून येईल. परंतु या समाजाला नवीन जीवन कधीच बहाल केले जाणार नाही.
ôôôôôôô
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर, 9226734091