Monday 29 October 2012

डॉ. नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याची कायदेशीर चौकशी करण्यात यावी.




-:  प्रेसनोट  :-
डॉ. नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याची कायदेशीर चौकशी करण्यात यावी.

मा. संपादक
दै..........................
नागपूर.

विषय :- नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध

महोदय,
          दि. २५ ऑक्टोंबर २०१२ रोजी नागपूर येथे डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषण खंडाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन समारंभात डॉ. नरेंद्र जाधव यांनी "महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आंबेडकर साहित्य सुमार दर्जाचे आहे. पोत्यात कांदे बटाटे भरावे तसे साहित्य या खंडात भरण्यात आले आहे." असे वक्तव्य केले आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या या वक्तव्याचा 'भारतीय बौद्ध महासभा' नागपूर जिल्हा शाखेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.

            डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे महत्व वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या विश्वसनीय  आंबेडकरी साहित्यावर ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विखुरलेले साहित्य पुस्तक रुपात समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी केली होती. आजपर्यंत या समितीने प्रकाशित केलेल्या साहित्याला विश्वसनीय आंबेडकरी साहित्य म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. खंड २२ वगळता समितीने प्रकाशित केलेल्या साहित्याचा दर्जा विश्वसनीय असतांना डॉ. नरेंद्र जाधव त्यावर आक्षेप घेण्यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

          आंबेडकरी साहित्याला कांदे-बटाटे असे विशेषण लावून डॉ. नरेंद्र जाधव यांनी आंबेडकरी साहित्याचा, विचारांचा आणि बाबासाहेबांचाही अपमान केला आहे. लेखन व भाषण खंडातील साहित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांतून, हस्तलीखीतातून आणि मासिक-वर्तमानपत्रातून घेतले असतांना त्या साहित्याची विश्वसनीयता कमी करून स्वतःचे महत्व वाढविण्याचा अश्लाघ्य प्रकार नरेंद्र जाधव यांच्या माध्यमातून केला जात आहे. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत.

          डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या पुस्तकात त्यांनी साहित्यिक सरमिसळ केल्याची शक्यता यामुळे बळावत चालली आहे. जनतेच्या लक्षात ते येऊ नये. आणि लेखन व भाषण खंडाच्या आधारे त्यांच्यावर टीका होऊ नये. म्हणून त्यांनी सरळ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या साहित्यावर टीका केली असे दिसून येते. अन्यथा महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या साहित्याचा टीकात्मक उल्लेख करण्याचे काहीच कारण नव्हते. डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या पुस्तकात बाबासाहेबांची अनेक भाषणे लेखन व भाषण खंडातूनच घेण्यात आली आहेत. अश्या परिस्थितीत त्यांनी लेखन व भाषण खंडाचे आणि महाराष्ट्र शासनाच्या चरित्र-साधने प्रकाशन समितीचे आभार मानने अपेक्षित होते. परंतु वैचारिक जहर पसरविण्याचा प्रयत्न करणारे डॉ. नरेंद्र जाधव विश्वसनीय साहित्यालाच गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.
 
          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची विश्वसनीयता लेखन व भाषण खंडातूनच तपासता येऊ शकते हे नरेंद्र जाधव चांगल्याने ओळखून आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या खंडातून पसरविलेले वैचारिक/साहित्यिक जहर झाकण्यासाठी विश्वसनीय आंबेडकरी साहित्यावर टीका केली आहे. घरामध्ये देव दडवून ठेवणारे; आंबेडकरी परिवेशात घुमणारे नरेंद्र जाधव यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांची जाहीररित्या होळी करण्यात येईल.
 
मागण्या   :-

१)     डॉ. नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याची
त्यांनी जाहीर माफी मागावी.
२)     चरित्र-साधने प्रकाशन समितीची जाहीर माफी मागावी.
३)   विश्वसनीय साहित्यावर टीका केल्याने आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे नरेंद्र जाधव यांनी आंबेडकरी समाजाची जाहीर माफी मागावी.
४)    डॉ. नरेंद्र जाधव यांनी प्रकाशित केलेले साहित्य कुणीही विकत घेऊ नये. किंवा संदर्भ म्हणून त्यांचा वापर करू नये.
५)     डॉ. नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याची कायदेशीर चौकशी करण्यात यावी.
६)     डॉ. नरेंद्र जाधव यांच्यावर Copyright कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.

          इ. मागण्यांसह हे निवेदन प्रेस, मिडिया यांच्या माध्यमातून सरकार आणि समाजासमोर माहितीस्तव नरेंद्र जाधव यांची साहित्यिक घुसखोरी उघड करण्यासाठी पत्रकार परिषदेसमोर ठेवण्यात आले आहे.

धन्यवाद !

निवेदन कर्ते  :-
  
नाव                                                                                 सही

1.       ……………………………………………                         ……………………….
2.       ……………………………………………                         ……………………….
3.       ……………………………………………                         ……………………….
4.       ……………………………………………                         ……………………….
5.       ……………………………………………                         ……………………….
6.       ……………………………………………                         ……………………….
7.       ……………………………………………                         ……………………….
8.       ……………………………………………                         ……………………….
9.       ……………………………………………                         ……………………….
10.     ……………………………………………                         ……………………….

Friday 12 October 2012

स्वाभिमान पेरणारी आंबेडकरी चळवळ उभी करायची आहे...




स्वाभिमान पेरणारी आंबेडकरी चळवळ उभी करायची आहे...
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर
9226734091

आंबेडकरी चळवळीचा आजपर्यंतच्या वाटचालीचा गोषवारा घेतांना काही गोष्टी आजही प्रश्नार्थक वलयात सध्याच्या पिढीसमोर उभ्या आहेत. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, धम्मकारण आंबेडकरी विचारातून चाललेले आहे का ? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे धाडस करतांना स्वाभिमानी आंबेडकरी विचार नसानसांमधून प्रवाहित करण्याचे धाडस असावे लागते. यासोबतच वाढत चाललेले वैचारिक प्रदूषण हे तर आंबेडकरी चळवळीला घातक असे विष आहे. अर्ध्याअधिक समाजाच्या डोक्यात हे विष थैमान घालत आहे. त्यामुळे काही कणखर आणि प्रखर भूमिका घेऊन आंबेडकरी चळवळीची वास्तवता मांडणे गरजेचे ठरते. ही वास्तवता मांडताना केल्या गेलेल्या काही संघटनात्मक आणि मानव्यिक टीकेला विरोध समजू नये. कारण या वास्तवतेसोबतच सामाजिक, आर्थिक, राजकीय अश्या विविध पातळ्यांवरील आंबेडकरी चळवळीला दिशादर्शन जर केले गेले नाही तर ती अंधारातील चाचपड ठरेल. म्हणून आंबेडकरी चळवळीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत मार्ग आधुनिक काळाशी आणि आधुनिक पिढीशी साधर्म्य साधून सुसंगत मांडण्याचा प्रयत्न या लेखातून केला गेला आहे.    

चळवळीचे, तत्वज्ञानाचे, आंदोलनाचे ध्येय आणि उद्धिष्ठ निर्धारित असते. तेव्हाच त्या चळवळीला, तत्वज्ञानाला आणि आंदोलनाला व्यवस्थेत आपला शिरकाव करता येतो आणि व्यवस्था बळकावता येते. चळवळीची आणि तत्वज्ञानाची ध्येय व उद्धीष्ठ्पुर्ती करण्यासाठी प्रक्रियात्मक पाऊले उचलावी लागतात. ही पावले त्या चळवळीच्या आणी तत्वज्ञानाच्या अनुयायांच्या माध्यमातून उचलली जातात. हे अनुयायीच त्या प्रक्रियेचा अविभाज्य अंग बनतात. चळवळ एक प्रक्रिया बनत असेल तरच ध्येयसिद्धीच्या मार्गाने मार्गक्रमण करता येते. परंतु जर चळवळीचे आणि तत्वज्ञानाचे अनुयायी ध्येय व उद्धिष्ठ निर्धारित करण्यात अपयशी ठरले तर चळवळ पूर्णत्वास जाण्याआधीच लयास जाते. आणि तत्वज्ञान काळाच्या पडद्याआड नामशेष व्हायला लागतो.

आंबेडकरी चळवळ आणि तत्वज्ञानाचे ध्येय आणि उद्धिष्ठ निर्धारित करण्यात आंबेडकरी अनुयायांनी गफलत केल्याने आज चळवळीत दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे तत्वज्ञानाला चाकोरीच्या बाहेर पडता येत नाही. आंबेडकरी तत्वज्ञानाच्या अनुयायांनीच आंबेडकरी चळवळीचा मार्ग कठीण करून टाकला आहे. हे सर्व चळवळीचे, तत्वज्ञानाचे आणि आंदोलनाचे निश्चित असे ध्येय व उद्धिष्ट निर्धारित न केल्यामुळे झाले आहे. काहींनी आंबेडकरी चळवळीचे ध्येय व उद्धिष्ट सत्ताप्राप्ती असे निर्धारित केले. तर काहींनी बौद्धमय भारत निर्धारित केले. काहींनी राजकीय तर काहींनी धार्मिक. असेच ध्येय व उद्धिष्ट निर्धारित केल्याने आंबेडकरी चळवळ मानव्याला माणूसपण बहाल करण्यात यशस्वी झाली कि नाही ? हा वादातीत मुद्दा बनला आहे. परंतु मानवाला मानवाचे अधिकार बहाल करून मानव्यप्राप्तीसाठी लढणारी आंबेडकरी चळवळ आणि समतेच्या पायावर उभे असणारे बुद्ध-आंबेडकरी तत्वज्ञान मागे पडत आहे. आंबेडकरी चळवळ आणि तत्वज्ञानातील ध्येय आणि उद्धीष्टातील हे अंतर्गत द्वंद्व सोडवून एक ध्येय एक उद्धिष्ट निर्धारित करून वाटचाल करणे आज क्रमप्राप्त बनले आहे.

आंबेडकरी अनुयायांना तुकड्या तुकड्यात विश्लेषण करण्याची सवय पडली आहे. कारण बाबासाहेब आणि बुद्धांना तुकड्यातुकड्यात वाटून दिले आहे. त्यामुळे आजकाल स्टेजवर बाबासाहेब आणि बुद्धांना जागा राहत नाही. आणि असली तरी कुठल्या कोपऱ्यात ठेवले आहेत ? हे शोधावे लागते.  आंबेडकरी चळवळीdMs मी समग्र बघतो.  तुकड्यात बघत नाही.  सामाजीकतेकडून होणारी व्यक्तीपुजक भक्तीपुजा स्वार्थ आणि खंडातच विचार करते. माझ्या बापाची चळवळ (आंबेडकरी चळवळ) ही निर्मितीच्या काळातच वैश्विक होती. त्यामुळे मला खंडप्राय विचार येत नाही. मला ती चळवळ सदैव वैश्विक दिसत आली आहे. आणि यापुढेही वैश्विकच दिसत राहणार.

कार्यकर्त्यांमध्ये जाज्वल्य स्वाभिमान पेरणारा नेता आज आंबेडकरी चळवळीला हवा आहे. परंतु याउलटच सर्व आघाड्या उघडल्या गेल्या आहेत. आज कार्यकर्ता ही संकल्पनाच धुळीस मिळाली आहे. जे आहेत ते पेड वर्कर. कुठे शोधता तुम्ही कार्यकर्ते आणि नेते...इथे तर स्वार्थ आणि भौतिक सुखाने हपापलेपण आले आहे. राजकारण आणि राजकीय कार्यकर्ते यांचा नेमका अर्थ लावता न आल्यामुळे नैतिक राजकारणाची उभारणी होऊ शकली नाही. त्यामुळे संघटना आणि संस्था मोडकळीस निघाल्या.

बलिदानाच्या बळावर आम्ही कार्यकर्ते उभारू शकणार नाही. पण पोटाच्या भाकरीसाठी गोळा केलेली कार्यकर्ते कधीच राजकीय बांधणी करू शकत नाही. विचारांच्या आणि स्वाभिमानाच्या बळावर सोबत आलेली कार्यकर्ते मात्र परिवर्तनाचे शिलेदार नक्कीच ठरू शकतात. कदाचित आम्हाला याचाच विसर पडला असावा म्हणूनच फक्त मूक (विचार, बुद्धी, तर्क नसलेले) कार्यकर्ते गोळा करून पाठीमागची संख्या वाढविण्यात आम्ही धन्य मानले. आणि प्रसंगी याच कार्यकर्त्यांना विकून सत्तेच्या खुर्चीचे बुड झिझविले. संख्यावाढ हि ब्राम्हणी विचारांच्या संस्था संघटनांना नको आहे. त्यांना जाज्वल्य कट्टर असा विचारवाद पाहिजे. आम्हाला मात्र कुणीही चालते. या रे माझ्या मागल्या म्हणून आम्ही किती दिवस स्वतःसोबत समाजाचा आत्मघात करून घेणार आहोत ? याचा विचार आता आपण करायचा आहे.

विचार पेरण्याच्या नावाखाली कैडर मधून संघर्षाची धार कमी केली गेली. विपश्यनेनी त्यात आणखी भर घालून कार्यकर्त्यांना मानसिक गुलाम आणि मानसिक असंतुलित बनविले. त्यामुळे संघर्षात उतरणारे फार कमी कार्यकर्ते राहिलेले आहेत. बाकीचे सर्व कार्यकर्ते कॅडर बनून चार भिंतीच्या आतच गोळा होतात. तर काही भाषण ऐकायला गर्दी करतात. रस्त्यावर उतरणारे खरे कार्यकर्ते जर असते, तर आज मानसिक असंतुलन बिघडवीणा-यांच्या दुकानदा-या बंद पडून राजकीय मोट बांधता आली असती. मैदानात लढाईत शूर बनून लढणा-यांची औलाद आता चार भिंतीच्या आतील कॅडर च्या गप्पा मारायला लागल्या आहेत. त्याही परिपूर्ण स्वप्नरंजनात. वास्तवात काहीच नाही. विचारांचे कॅडर चालविणारे धड झोपतही नाही आणि धड शांतही होत नाही. सतत स्वप्नात जगतात २०३४ च्या, तर कुणी २०१४ च्या, तर कुणी २०१९ च्या, तर कुणी त्या बुड झिजाविना-या खुर्चीच्या. माझा विरोध त्यांच्या मंथनाला नाही. माझा विरोध त्यांनी कार्यकर्त्यांमधील रक्त थंड करण्याला आहे. मी आजही सलाम करतो त्या माझ्या कार्यकर्त्यांना जे विचारांच्या बळावर रस्त्यावर उतरतात. आणि भिंतीच्या पल्याड बसणा-यांच्या थोबाडीत हाणून समाजावर अन्याय करणा-यांना जाहीर फासावर लटकवतात. आणी विजयी मुद्रेने मान उंचावून घरी परततात. समाधानाचा उसासा घेऊन, चटणी भाकर खाऊन, उद्याच्या लढाईसाठी सज्ज होतात. सलाम आहे माझ्या कार्यकर्त्या मित्रा तुझ्यातल्या लढाऊ बाण्याला...तुझ्यातल्या विचाराला...तुझ्या रक्तालाच माझा सलाम आहे.

समाजातील आजूबाजूच्या वातावरणात घडणा-या घटना घडामोडी लक्षात घेतांना कधी, कुठे आणि केव्हा कुठल्या प्रतिक्रिया समाजातून उमटायला पाहिजे ? हे आता आंबेडकरी समाजाने शिकले पाहिजे. उठसूट कुठेही प्रखर होणे हे कधीच चळवळीला पोषक नाही. प्रखर व्हायचेच आहे तर आपल्याच माणसांवर व्हा ! जे म्हणतात की "बाबासाहेबांनी एकट्यानेच काही केले नाही." "बाबासाहेबांनी स्वतःची कुठलीही चळवळ केली नाही." आणि हे सर्व कुणाच्या तोंडून ऐकायला येते जे बामसेफ आणि बीएसपी चे कार्यकर्ते आहेत. अश्या भेसळ वैचारिक रोग्यांना (कॅडरना) कुठल्या तुरुंगात डांबायचे हे पण ठरवा. कुणी इतरांनी बाबासाहेब आणि त्यांच्या चळवळीविषयी काहीही बोलू नये अशी भूमिका घेणारे आम्ही कार्यकर्ते आता यांच्याबद्दल कुठल्या प्रतिक्रिया देणार आहोत. राजकीय शहाणपण अजून आमच्यात आलेले नाही.  म्हणून कुठेलेही राजकारण आम्हाला पचनी पडत नाही.  किंवा राजकीय प्रत्युत्तर कसे द्यायचे हे अवगत झालेले नाही. आणि म्हणूनच बामसेफ / बीएसपी चे पिल्ले बाबासाहेबांवर बोट ठेऊन सतरा (१७) बापांचा उदोउदो करायला निघालेले आहेत. ज्या बाबासाहेबांना सारा जग ओळखतो त्या बाबासाहेबांना टोळक्यांच्या नेत्यांच्या रांगेत बसवून अपमान करतात.  आणि बहुजनांचा (वैचारिक कुंटणखाण्याचा) धंदा करतात.  खरे तर यांना रोकण्यासाठी आम्ही प्रतिक्रियावादी व्ह्यायला पाहिजे. पण ते न करता आम्ही इतरांच्या राजकारणाला अंगावर घेऊन आमची राजकीय प्रत आणखीच खालावत चाललो आहोत. जरा विचार करा.

आंबेडकरी चळवळीची खरी अडचण आंबेडकरी माणसेच झालेली आहेत. जी विभूतीपुजेने विभागली गेली आहे. ज्यांना मानसिक आणि वैचारिक गुलाम बनविण्यात आले आहे. त्यामुळे प्रतीआक्रमणे आपली चाल अगदी वेगाने चालत आहे. विचार, निष्ठा, स्वाभिमान आणि तत्वनिष्ठ जीवनप्रणाली राहिलेली नाही. जी आहे ती आर्थिक बाजारपेठेत वावरणारी सूचकांक निदर्शक आहे. त्यामुळे कुणाचे पायपोस कुणाच्या पायात राहिलेले नाही. आज समाजाला गरज आहे ध्येयवेड्या तरुणांची जे या आर्थिक बाजारपेठेत स्वतःच्या आयुष्याची माती न करता समाजासाठी चळवळीसाठी स्वतःला झोकून देतील. जे समाजात वाढत जाणा-या बेरोजगारांच्या जथ्यांसाठी उभारणी करून देतील.

बुजगावण्याची कितीही सोंगे घेऊन आम्ही आंबेडकरी शिवारात घुसलेली हैदोसखोरांची जमात हाकलून लावण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येणार नाही. अशी अनेक बुजगावणे आंबेडकरी शिवारात आलेत...शिवार रक्षणाची हमी देऊन स्वतःच लुटारू बनून हैदोस घालू लागलीत. आता या बुजगावन्यांच्या तोंडावर झाकलेली पट्टी उतरवायची असेल तर आम्ही आमचा खरा आंबेडकरी पोशाख परिधान करणे गरजेचे आहे. आणि हे परिधान आंबेडकरी विचार (लेखन आणि भाषण खंडातून) वाचल्याशिवाय शिवता येणार नाही. त्यासाठी आम्हाला आमचा खरा आंबेडकरी चेहरा तयारच करावा लागणार आहे. म्हणून नवआंबेडकरवाद्यांना एकच आव्हान आहे की, आंबेडकरी चळवळ आणि विचार समजून घेण्यासाठी शुद्ध आणि खरे आंबेडकरी विचार / साहित्य / लेखन वाचणे (लेखन आणि भाषण खंडातून) गरजेचे होईल.

आंबेडकरी चळवळीला समजून घेतांना आमची काहीतरी गल्लत होत आहे. आणि आजपर्यंत ती झाली आहे. त्यामुळे या चळवळीला निश्चित असा मार्ग पकडता आला नाही. किंवा त्या मार्गावर संचलित होता आले नाही. राजकारण हेच अंतिम ध्येय गृहीत पकडून आम्ही मार्गक्रमण करू शकत नाही. आणि तसा उद्देश घेऊन आम्ही चळवळीला मार्गक्रमित केले तर समाज विनाकारण भरडला जातो. हे आतापर्यंतच्या वाटचालीवरून अनुभवायला आले आहे. आंबेडकरी चळवळीचे अंतिम ध्येय हे सत्ता होऊच शकत नाही. शिवाय ज्या तत्वज्ञानावर ही चळवळ उभी आहे त्या तत्वज्ञानाचा सत्तेशी तिळमात्र संबंध येत नाही. जेव्हा जेव्हा आंबेडकरी चळवळीला राजकारणाच्या ध्येय आणि उद्धीष्ठात गोवल्या गेले तेव्हा तेव्हा समाजात दुफळी माजली. फाटाफूट घडून आली. आपल्याच समाजबांधवांमध्ये वितुष्ठ निर्माण झाले. अगदी पराकोटीच्या टोकाला जाण्याइतपत...

बहिष्कृत समाजाचा प्रश्न हा सामाजिक आहे तितकाच तो मानव्यिक आहे. आर्थिकता हे त्याच्या पायथ्याशी असले तरी समाजातला उच्चनीच भाव या समाजाला छळतो आहे. त्यामुळे सामाजिक ध्येय घेऊन मानवी कल्याणासाठी लढा उभारणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. हे आंबेडकरी चळवळीचे सूत्र आम्ही अंगीकारणे कधीही लाभदायकच ठरेल. कायद्याने मिळेल तेवढे घेऊन समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सत्ता असो अथवा नसो कल्याणकारी जगणे हेच आमचे मुलभूत अधिकार आहे. आणि तशी परिस्थिती निर्माण करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. आज भारतीय समाजात प्रत्येकच समाजाजवळ सत्ता आहे. असे कुणीही व्यवस्थावादी माणूस म्हणू शकणार नाही. सत्ता आणि व्यवस्थेचा अभ्यास करणारे अभ्यासकही आमच्या मताशी सहमती दर्शवतील. व्यवस्थेतील "सह्भागीत्व" आणि "सत्ता" या दोहोंत मोठी तफावत आहे. सहभागीत्वाची संकल्पना ही लोकशाहीला बळकटी प्रदान करते. तर "सत्ता" ही संकल्पना हुकुमशाहीला, अराजकतेला आमंत्रण देते. आंबेडकरी समूहाने आतातरी याचा नीट विचार करणे आत्यंतिक गरजेचे आहे.

आज ज्या समस्यांना आंबेडकरी समूहाला सामोरे जावे लागत आहे. त्या समस्या इतर समाजाला भेडसावतांना दिसत नाही. कारण इतर समाजाने व्यवस्थेतील सहभागीत्वाला महत्व दिले. आणि तत्कालीन आंबेडकरवादी (मुळात आंबेडकरी नसलेले) नेत्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाची स्वप्ने बघितली. त्याला बळी पडून काही आंबेडकरी नेत्यांनीसुद्धा मंत्रिपद आणि तत्सम खुर्चीचे स्वप्न उराशी बाळगले. त्यांच्या या कृतीने समाजाची व चळवळीची वाताहत होत आहे. हे त्यांच्या कधी लक्षातच आले नाही. १९८० च्या दशकानंतर मानवी कल्याणासाठी लढणारी आंबेडकरी चळवळ "सत्ता" संकल्पनेभोवतीच मर्यादित झाली. आंबेडकरी चळवळीने आपला मोर्चा "सत्तेकडे" वळविल्याने समाज सर्वच पातळ्यांवर माघारू लागला. यावर सद्सदविवेक बुद्धीने चिंतन आणि मनन होणे आज गरजेचे आहे.

समाज एकसंघ राहील; नेते संघटीत राहीतील अश्या परिस्थितीत मानवी कल्याणाची निदान समाधानकारक पातळी गाठता आली तरी सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहचता येईल. याचा विचारच कधी झाला नाही. सर्व गणिते व्यक्तिगत मान-सन्मान आणि सत्तेच्या लालसेनेच मांडल्या गेले. त्यामुळे सामाजिक समीकरणे कधी सोडवलीच गेली नाही. आज एक आशेचा किरण दिसतो आहे. निदान या "सत्तावादी" स्वप्नवलयातून काही उच्चशिक्षित तरुण बाहेर पडू लागली आहेत. आणि चळवळीच्या मुळाशी असणा-या तत्वज्ञानाच्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. अश्या या आंबेडकरी नवतरुण पिढीने तरी आंबेडकरी चळवळीतील मानवी कल्याणाचे ध्येय उराशी बाळगून असले पाहिजे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या चळवळीच्या अंगांना बळकटी प्रदान करण्यासाठी काम केले पाहिजे. आणि तद्सोबतच अलीकडे आलेल्या धम्मातील प्रदूषणाला दूर करून बुद्ध तत्वज्ञानाला आंबेडकरी परिप्रेक्षातून पुर्नगठीत केले पाहिजे.

सत्ता ही तत्कालिक असते. ती कायम हातात राहील हे जगातल्या कुठल्याही समूहासाठी शक्य नाही. परंतु एकदा सत्ता हातून गेली की माणूस सत्तेशिवाय जगू शकत नाही. सत्तेच्या ऐश्वर्यासाठी नेते अश्लाघ्य, तत्वशून्य, स्वाभिमानशून्य तडजोडी करायला लागतात. आणि वेळप्रसंगी समाजाच्या अधोगतीला कारणीभूत ठरतात. पण मानवी कल्याण हे चिरंतन असते. समाजाच्या हिताचे असते. मानव्यिक विकासाला पूरक असते. या सर्व घटना घडामोडीचा अनुभव आंबेडकरी चळवळीने घेतला आहे. या सर्व अनुभव संपन्नतेच्या बळावरच आम्हाला सद्यकालीन आंबेडकरी चळवळीची आचारसंहिता बनवावी लागणार आहे. हे आम्ही करू शकलो तर उद्याचा चळवळीचा चेहरा वेगळा असणार आहे. आंबेडकरी चळवळीतील ध्येय आणि उद्धिष्टांची पूर्ती नव नेतृत्वाच्या बळावर होणार आहे. यात तिळमात्र शंका नाही.

आज आम्ही राजकीय पातळीवर कितीही कमकुवत वाटत असलो तरी आम्ही समाजाची राजकीय उंची वाढविण्यात यशस्वी झालेलो आहोत. सत्ता असली काय आणि नसली काय परंतु सत्तेवरचे नियंत्रण आम्ही मिळविलेले आहे. भूमिहीनांचा सत्याग्रह असो, आणीबाणीच्या काळात घेतलेले निर्णय असो, स्वाभिमानाला धरून उभारलेले भावनिक आंदोलन असो, मंडळ कमिशन साठी पुकारलेला लढा असो की संविधानातील कल्याणकारी तत्वे टिकवून ठेवण्यासाठी विविध काळात निर्माण केलेला सामाजिक दबाव असो, आमच्या वाढलेल्या राजकीय उंचीचेच प्रतिक आहे. कुठलीही राजकीय समीकरणे आम्हाला वगळून मांडली जात नाही.  यात आमचा राजकीय विजय आहे.  असे आम्हाला वाटते. कुठलेही राजकीय निर्णय आम्हाला लक्षात घेतल्याशिवाय घेतले जात नाही.  हे आमच्या राजकीय सजगतेचे प्रतिक आहे.

प्रश्न हा आहे की, फक्त सत्ता आपल्याकडे नाही.  किंवा ती आपल्याकडे यावी म्हणून आम्ही आणखी किती दिवस समाजाचा स्वाभिमान गमावणार आहोत. कारण जगतांना सत्तेची वाट पाहता येत नाही. तर दैनंदिन जीवनातल्या गरजा भागविण्यासाठी आर्थिक स्त्रोतांच्या शोधात बाहेर पडावेच लागते. आणि ज्या परिस्थितीत ही सर्व आर्थिक स्त्रोते प्रस्थापितांच्या हातात आहेत; तोपर्यंत आम्ही दैनंदिन जीवनात स्वाभिमानाला धाब्यावर बसवूनच गरजापुर्तीचा प्रयत्न करणार आहोत ? आधुनिक काळात आंबेडकरी समाजात / आंबेडकरी चळवळीत काम करणा-या लोकांनी निदान याचा विचार तरी करणे गरजेचे आहे. 

यासोबतच आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ती ही की आम्हाला राजकीय प्रगल्भता स्वतःमध्ये आणावी लागणार आहे. आम्ही प्रगल्भतेचे राजकारण करणे केव्हा शिकणार आहोत ? की प्रतिक्रियावादी राजकारण करून स्वतःचे राजकारण दुबळे करणार आहोत ? कुणी काहीही बोलले तरी आमचा निषेध मात्र ठरलेला असतो. पण जरा गांभीर्याने विचार केला तर त्यातून आपले राजकारण पोरके होते. समाजात आंबेडकरी राजकारणाविषयीच्या ज्या प्रतिक्रिया उमटतात त्या आमच्या अगदी विरुद्ध बाजूने जातात. राजकीय पटलावरून विचारांची, मुद्द्यांची पळवापळवी नित्याचीच ठरते. विचारांचे आणि नैतिकतेचे राजकारण करणा-यांनी अश्या पळवापळवी ला फार काही गांभीर्याने घ्यायचे नसते. आणि त्याला गांभीर्याने घ्यायचेच झाले तर राजकारणात तितक्याच ताकतीची शक्ती निर्माण करून प्रत्युत्तर देण्यासाठी शक्तीप्रदर्शन करावे लागते. आम्ही ते शक्तीप्रदर्शन करण्याची ताकत निर्माण करण्यात आपला वेळ घालविला पाहिजे. इथे तर झोपडीला छत उरलेले नाही. आणि अशा परिस्थितीत आम्ही प्रतिक्रियावादी राजकारण करायला गेलो, तर आम्ही स्वतःच तोंडघशी पळू. आणि ज्यांनी विचारांची, मुद्द्यांची पळवापळवी केली ते राजकीय हिरो बनतील. आम्हाला आता राजकीय शहाणपण शिकले पाहिजे. अन्यथा आतापर्यंत झालेली आपली राजकीय पीछेहाट यानंतर राजकीय अस्ताकडे घेऊन जाणारी असेल.

हे सर्व जर तात्त्विक आणि तार्कीकदृष्ट्या समजून घेऊन त्या दिशेने मार्गक्रमण करायला लागलो तर निश्चितच आज आमची वाढलेली राजकीय उंची सत्तेत परिवर्तीत व्हायला वेळ लागणार नाही. आंबेडकरी चळवळीचे शिलेदार म्हणविणा-यांनी सत्तेची अनेक प्रयोग करून बघितले आहेत. हाताळून बघितले आहेत. परंतु शेवटी व्यक्तिगत उंची गाठण्याच्या पलीकडे या सत्तावादी राजकारणाची मजल पोहचू शकली नाही.  समाजाची उंची दिवसेंदिवस खुजी होत चालली आहे. नव्या आव्हानांना पेलण्यात आमची शक्ती इतकी खर्च होत आहे की आम्ही योग्य तो मार्गच पकडू शकलेलो नाही. त्यामुळे राजकारण की समाजकारण की अर्थकारण हे ठरविण्यातच गुरफटलो गेलो आहोत. ही कोंडी हा समाज जितक्या अल्पावधीत फोडून काढेल तितक्या लवकर या समाजाला आपले भविष्य सुकर करता येईल. आणि ही कोंडी आर्थिक संपन्नतेशिवाय फुटू शकणार नाही असे आमचे निर्भीड मत आहे.

आज सद्यकालीन स्थितीत आंबेडकरी समाजाचा प्रश्न राजकीय वाटत असला तरी तो पूर्णार्थाने खरा नाही. आम्ही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्तरावर पिछाडलेले आहोत. हेच वास्तव आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाचा आजचा प्रश्न हा सामाजिक आणि आर्थिक असाच आहे. अगदी तसाच जसा बाबासाहेबांच्या काळात होता. फरक इतकाच आहे की सामाजिक चटके तीव्र नसले तरी स्वरूप बदलून अर्थ-सामाजिक (Socio - Economic) बनले आहेत. संविधानाने निर्माण केलेल्या कायदेपुरक समतावादी व्यवस्थेने आम्हाला आमची ओळख प्राप्त झाली. त्यामुळे आर्थिक विवंचनेत या समाजाला पाडून पुनश्च्य तीच पेशवाईच्या व्यवस्थेला प्राचारण केले जात आहे. कार्ल मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे ‘इतिहासात मानवी गुलामीच्या अवस्थेला आर्थिकता कारणीभूत ठरली.’ अगदी हाच धागा अलीकडे मनुवादी विचारसरणीने पकडलेला आहे. समाजाचे आर्थिक खच्चीकरण करून सामाजिक गुलामगिरीची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. 

आंबेडकरी समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. असे जर कुणी म्हणत असेल तर ते निव्वळ धाडसाचे होईल. अश्या लोकांना मला विचारावेसे वाटते की, फेब्रुवारी १९२८ च्या बहिष्कृत भारताच्या अंकात लिहिल्याप्रमाणे, "व्यक्तिगत उंची वाढली म्हणून समाजाची उंची वाढली हे म्हणणे धाडसाचे आहे तितकेच ते अप्रस्तुतही आहे. व्यक्तिगत उंची वाढली म्हणजे समाजाची उंची वाढत नाही. समाजाची उंची ही बहुसंख्यांकाच्या कल्याणाशी निगडीत असते. आणि एकदा का सामाजिक उंची गाठता आली की व्यक्तिगत उंची गाठायला वेळ लागत नाही." हे मांडायचे प्रयोजन इतकेच की, आजही समाज लाचार आहे. आजही समाज आर्थिक बाबतीत प्रस्थापितांवर निर्भर आहे. आणि ही निर्भरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आणि एकदा का निर्भरता वाढत गेली तर स्वाभिमान नावाचा मर्दानी बाणा कुठेतरी लुप्त होतांना दिसून येतो. भौतिक साधनांसाठी, नौकरीसाठी, परिवारासाठी इ. अनेक परिस्थितीत. आणि हे वास्तव आज समाजात अस्तित्वात असल्यामुळेच प्रतीक्रांतीवाद्यांनी आंबेडकरी समाजात शिरकाव करून दुफळी माजवलेली आहे.

आज गरज आहे ती आर्थिक उत्पन्नाची स्तोते समाजाच्या हातात देण्याची. निर्माण करण्याची. त्यासाठी प्रयत्न करण्याची. व्यक्तिगत आणि सामाजिक स्वाभिमान टिकवून ठेवायचा असेल तर या आर्थिक घटकांची नितांत गरज आहे. त्यामुळे आता आम्ही समाजाच्या आर्थिक संपन्नतेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याशिवाय समाज स्वबळावर उभा राहू शकणार नाही. आणि जोपर्यंत समाज स्वबळावर उभा होत नाही तोपर्यंत व्यक्तीचे सामाजिक, सांस्कृतिक बलस्थान बळकट होणार नाहीत. हा समाज जगाच्या पातळीवरील अत्युच्च समाज आहे ज्या समाजाला बुद्ध धम्माचे अधिष्ठान लाभलेले आहे. त्यामुळे हे सर्व करायला आम्हाला फार काही वेळ द्यावा लागेल असे नाही. गरज आहे ती बुद्ध तत्वज्ञानातील मानव्यिक तत्वांना सामाजिक परिप्रेक्षात उतरविण्याची आणि अंगीकारण्याची.

तरुणांचा असा एक वर्ग आहे जो आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीपासून अलिप्त आहे. तो आर्थिक व्यवहाराच्या जगात घर आणि नौकरीमध्ये व्यस्त झालेला आहे. ज्याला वाटते की आता कुठे समाजात भेदाभेद आहे. जो स्वतःला सुरक्षित समझतो आहे. जो चळवळीतील आंदोलनाला निरर्थक संबोधतो आहे. जो चळवळीपासून दूर जातो आहे. जो रोजगाराच्या विवंचनेत, आर्थिक परिस्थितीच्या विवंचनेत विचार व चळवळीसोबत जुळत नाही. अश्या तरुण वर्गाला सोबत घेण्यासाठी काही आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्त्रोतांची निर्मिती करण्याची जबाबदारी आपली आहे. या चळवळीतील काहींच्या हातात सद्यस्थितीत ब-यापैकी साधन संसाधने एकवटली आहेत. या संसाधनांचा वापर उद्याच्या पिढीसाठी स्त्रोतांची निर्मिती करण्यासाठी करावा लागणार आहे. तेव्हाच या चळवळीत हा तरुण वर्ग स्वतःला सुरक्षित समजेल. समाजाची एकजूट त्यातून साध्य होईल. अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी ही या चळवळीत काम करणा-या तरुण-सुशिक्षित-विचारवंत-आर्थिक संपन्नता मिळविलेल्या लोकांची आहे. त्यांची एकजूट झाली तर समाजाला एकत्र करायला वेळ लागणार नाही.

यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या संदर्भाने पसरविण्यात येत असलेले आंबेडकरी विचार ख-या अर्थाने आंबेडकरी चळवळीसाठी धोक्याचे ठरले आहे. भाषणातून लोकांनी सांगितलेले बाबासाहेब समाजाने प्रमाण मानले असल्याने खरे बाबासाहेब मांडणा-यांना त्रास होणार आहे. तो त्रास घेण्याची तयारी जर काहींनी आपल्या खांद्यावर घेतली तर दुकानदा-या चालविण्यासाठी आणि आपापसात फाटाफूट पाडण्यासाठी थाटण्यात आलेले संघटनरुपी दुकाने बंद होतील. आणि एक नवीन प्रवाह या चळवळीसाठी तयार करता येईल. अभ्यासू, तरुण आणि तात्त्विक विचारांची बैठक असणारी माणसे एकत्र करून आंबेडकरी चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. काहीच्या भावनिक आंदोलनाला बळी पडलेला तरुण वर्गाला त्या भावनिक संमोहनातून बाहेर काढावे लागणार आहे. आंबेडकरी चळवळीतील तरुणांची कल्पनाशक्ती आणि तार्किक बुद्धी वेठीस धरण्यात आली आहे. त्यामुळे या तरुणांना योग्य काय आणि अयोग्य काय हे आंबेडकरी विचारांच्या आधारे तपासून पाहताच येत नाही. त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या तरुण वर्गाचा विश्वास संपादन करावे लागणार आहे. कधी प्रखर होऊन तर कधी सौम्य मार्गाने. कारण यांनी स्वतः कधी बाबासाहेबाच्या विचारांचे वाचन केलेले नाही. पण कॅडर च्या माध्यमातून ऐकलेल्या बाबासाहेबांना यांनी इतके प्रचलित केले की जणू यांच्या मुखातूनच बाबासाहेब बोलत आहेत. हा प्रतीक्रांतीचा पहिला मजलाच आम्हाला उडवावा लागणार आहे. बाकीचे मजले असेच धराशाही होतील.

आंबेडकरी चळवळीत आमच्या काही जबाबदा-या आहेत. विचार आत्मसात करीत असतांना त्याची सत्यासत्यता पळताळून  पाहणे. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्त्रोतांचे बळकटीकरण करणे.  आधुनिक संसाधनांचा वापर कसा करता येईल याचे प्रशिक्षण घेणे व देणे. सोबतच ही आधुनिक संसाधने आपल्या हातात घेता येतील असा प्रयत्न करणे. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून सरकारी योजना बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचविणे. शासकीय अनुदानाचा वापर करून समाजाचे आर्थिक सबलीकरण करता यावे यासाठी समाजाला मार्गदर्शन करणे.  वाढत चाललेली राजकीय उदासीनता घालविण्यासाठी राजकीय प्रशिक्षण संस्था किंवा तत्सम प्रयत्न करणे.  धम्मातील वाढती प्रदूषणे आणि प्रतीक्रांतीची छुपी आक्रमणे याच्या जाळ्यात हा समाज मोठ्या प्रमाणात अडकला आहे. त्याला त्यातून बाहेर काढून त्यांच्यात प्रतीक्रांतीची पाऊले ओळखण्याची कुवत निर्माण करण्यासाठी आंबेडकरी विचारातील महत्वाची आचारसंहिता समाजापर्यंत पोहोचविणे. निदान इतक्या काही गोष्टी जरी आम्हाला प्राथमिक स्तरावर करता  आल्या तर निश्चितच सद्यकालीन परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. म्हणून आज समाजात स्वाभिमान पेरणारी आंबेडकरी चळवळ हवी आहे. स्वबळावर व्यवस्था उभारणी करण्यासाठी कणखर आणि प्रामाणिकपणे आंबेडकरी विचारातून बुद्ध तत्वज्ञानाला समाजात रुजवावे लागणार आहे. "अत्त दीप भवं !" सामाजिक जीवनात अंगीकारण्याची वेळ आली आहे. आणि त्यासाठीच आता समाजात स्वाभिमान पेरणारी आंबेडकरी चळवळ उभी करायची आहे. हे लक्षात घ्यावे लागेल.
-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर
9226734091

Thursday 11 October 2012

धम्मक्रांती काटेरी कुंपणात अडकली...?



धम्मक्रांती काटेरी कुंपणात अडकली...?
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
९२२६७३४०९१ 

अशोक विजयादशमी धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मक्रांतीच्या संदर्भात आढावा घेणे गरजेचे होते. त्यांच्या महापरीनिर्वानानंतर बुद्ध धम्मावर झालेल्या धार्मिक प्रतीक्रांतीवाद्यांच्या आक्रमणाचा आणि बुद्ध धम्माच्या वाटचालीचा आढावा घेतांना काही उणीवा ह्या बुद्ध आंबेडकरी अनुयायांकडून राहिलेल्या आहेत त्याचा उहापोह या लेखात करण्यात आलेला आहे. या लेखात केलेले विश्लेषण हे प्राथमिक स्तरावरील असून धम्मक्रांतीला मारक तत्वांचा उहापोह करून धम्मक्रांतीला अभिप्रेत विश्लेषण या लेखात करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 


क्रांतीचा एक नारा आम्हीही दिला. क्रांतीचा सूर्य तळपतांना “याची देहा याची डोळा” आम्ही बघितला. क्रांतीची नवी पहाट १४ ऑक्टोंबर १९५६ ला जेव्हा उजाडली तेव्हा इथल्या प्रत्येक शोषित-पिडीत-वंचित समाजाचा नवा जन्म झाला. श्वेतक्रांतीच्या श्वेतपुत्रांनी नागपूरची दीक्षाभूमी प्रफुल्लीत झाली होती. चहूकडे एकाच निनाद गाजत होता. ‘आज मी हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या जन्मकैदेतून मुक्त झालो.’ स्वातंत्र्याचा मुक्त आस्वाद घेण्यास आसुसलेला प्रत्येक देह त्या महामानवांना नमन करत होता. माणूस म्हणून ओळख देणा-या तथागत बुद्धाला आणि जातीच्या गटारगंगेतून काढून माणूसपण बहाल करणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रत्येकजन शरण जात होता. प्रत्येकाच्या मुखात एकच प्रतिज्ञा होती, “बुद्धं शरणं गच्छामि ! धम्मं शरणं गच्छामि ! संघम शरणं गच्छामि !”. जगाच्या इतिहासात सोनेरी अक्षराने कोरली गेलेली; २५०० वर्षानंतर प्रवर्तित झालेली धम्मदीक्षा क्रांती…धम्मचक्रप्रवर्तन क्रांती… 
शेवटचा बुद्ध राजा बृहदत्तापर्यंत असलेला बुद्ध भारत नंतरच्या काळात वैदिक आणि मुस्लिमांच्या आक्रमणाने लयाला गेला होता. अनेक प्रदूषणे धम्मात आली होती. भिक्षूंच्या कत्तलीपासून तर बौद्ध विहाराच्या उध्वस्त करण्याच्या इतिहासापर्यंत अनेक आक्रमणे बौद्ध धम्मावर झालेली होती. परंतु बुद्धाची तत्वे ही कायम होती. बुद्ध कायम होता. जरी तो वैदिकांनी विष्णूच्या अवताररुपात टिकवून ठेवला असला तरी तथागत बुद्धाचे अस्तित्व कायम टिकून होते. तत्व व धम्मातील प्रदूषणे बाहेर काढली गेली तर धम्मचक्र पुन्हा या धर्तीवर गतिमान करता येईल. आणि जगाला बुद्धाकडेच वळावे लागेल. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण विश्वास होता. विषमतावादी तत्व अंगी बाळगून असणा-या जगातील अन्य तत्त्वज्ञानापेक्षा समतावादी तत्व वास्तवात आणणारे तथागत बुद्धाचे तत्वज्ञान कधीही या जगाला अपरिहार्यच राहील. असा निश्चय करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि आपल्या सोबत लाखो अनुयायांना बुद्धाच्या समतावादाकडे वळविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेने एका क्षणात हजारो वर्षांची हिंदूंची विषमतावादी जातीची उतरंड धराशाही झाली. जातीने लादलेली मानवी गुलामगिरी ठोकरली गेली. धार्मिक उन्मादाने माजविलेली विषमता नाकारली गेली. जातीची उच्च-नीच कर्मकांडे मोडीत निघाली. गुलामीच्या बेड्या तळातळा तुटू लागल्या. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेची मानवी शृंखला ‘आम्ही सर्व समान आहोत’ चा उद्घोष करू लागली होती. जातीच्या पायथ्याशी बांधलेला ब्राम्हणी श्रेष्ठत्वाचा इमला कोसळू लागला होता. जातीय श्रेष्ठतेची ओळख पुसली जाणार या भीतीपोटी बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेला तात्कालिक विरोध केला गेला. आणि ही विरोधाची भूमिका आजतागायत सुरूच आहे. कुठल्याही परिस्थितीत ही धम्मक्रांती हाणून पाडायची असा निश्चय केलेली प्रतीक्रांतीवादी, जातीवादी व्यवस्था आणि माणसांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर धम्मदीक्षेसमोर काटेरी कुंपण रोवणे सुरु केले. आणि ते आजतागायत सुरु आहे. धम्मदीक्षेला काटेरी कुंपणात कुणी कुणी अडविले आणि त्यातून बाहेर पडण्याची तयारी असतांना धम्मदीक्षेची वाट कुणी अडवून धरली याचा गोषवारा घेणे गरजेचे आहे असे वाटते.
…१…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मचक्रप्रवर्तनाने जातीची विषमता नष्ट होऊन हिंदुव्यवस्था मोडकळीस निघाली होती. त्यामुळे धम्मदीक्षेची वाट अडवून धरण्याचे काम सर्वप्रथम इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेने केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय हेतूने हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अशी टीका करू लागले. कुठल्याही परिस्थितीत बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेला नैतिक पाठबळ लाभू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेने केले. त्यासाठी वेगवेगळ्या वेशातील माणसे बुद्ध धम्मात जाणीवपूर्वक पाठविले गेले. रजनीश ओशो, गोयंका, प्राणायमी रामदेव ही त्याचीच उदाहरणे आहेत. बुद्ध धम्मातील माणसे व शोषित-पिडीत-वंचित समाज यांच्या नादी लागला गेला. मोठ्या शिताफीने या बहुरुप्यांनी वेळोवेळी बुद्धाचे नामस्मरण केले. ज्यामुळे भोळी-भाबडी माणसे बुद्ध विचार, बुद्ध शिकवण, बुद्धांची पद्धती म्हणून अश्या हवशी अजगरांच्या गळाला लागली. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित धम्मक्रांतीचा रथ थांबविला गेला.
पोटाची खडगी भरण्यासाठी अहोरात्र झटून काबाळकष्ट करणा-या माणसाला विचार व तत्वज्ञान प्राशन करायला फक्त भावनिक आधार घ्यावा लागतो. त्याची श्रद्धा ही त्याच्या स्वातंत्र्यासाठी, त्याच्या अधिकारासाठी लढणा-या महामानवांप्रती अतूट असते. त्यामुळे अश्या महामानवांचे नाव घेऊन सर्वसामान्य लोकांना फसविण्यात आले. धम्मक्रांतीचा खरा संदेश सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचू नये याची खबरदारी घेतल्या गेली. कुठल्याही परिस्थितीत बौद्ध धम्म वाढू नये म्हणून वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे प्रयत्न केले गेले. प्रतीक्रांतीची पाऊले ओळखून आंबेडकरी रणनीती आखली जायला पाहिजे होती ती आखली गेली नाही. त्यामुळे प्रतीक्रांतीवादी, ब्राम्हणवादी व्यवस्थेने बौद्ध धम्मातील तत्वांना, विचारांना आणि एकूणच तत्वज्ञानात विष पेरण्याचे काम केले.
“बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. बुद्ध तत्वज्ञानातील प्रमुख तत्वे वैदिक धर्मग्रंथातून घेतली गेली आहेत. बुद्ध हा वास्तुशांतीचा एक भाग ???” अशा प्रकारे बुद्धाला अवतारी बनवून बौद्ध धम्माचे हिंदुत्वीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. आंबेडकरी परिप्रेक्षातून बौद्ध धम्म समजून घेणा-यांनी अश्या अवतारी हिंदुत्वीकरणाचा विरोध केला. परंतु हा विरोध काहींपुरताच मर्यादित राहिला. आंबेडकरी परीप्रेक्षातील बुद्ध समाजाचा कणा व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही. त्यामुळे पाश्चात्य आणि अवतारी बुद्धाला समाजातल्या मोठ्या घटकाने स्वीकारणे सुरु केले. “बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला आहे त्यामुळे आम्ही तो स्वीकारतो.” एवढीच त्या स्वीकारामागाची भूमिका राहिली. खरा बुद्ध आणि प्रदूषित बुद्ध यातील फरक जो बाबासाहेबांनी मांडला तो समाजापर्यंत पोहोचलाच नाही. जाणीवपूर्वक तो पोहचू दिला नाही. देवरूपी पाश्च्यात्य बुद्धिझम चा प्रचार आणि प्रसार भारतात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्याला इथल्या अवतारी बुद्ध बनवू पाहणा-या ब्राम्हणी व्यवस्थेचे पाठबळ मिळाले. आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा रथ थांबविला गेला.
…2…
आज धम्मक्रांतीवर आक्रमण करण्यासाठी वैदिक संस्कृतीची घुसळण बौद्ध धम्मात केली जात आहे. विपश्यना हे त्यातलेच बांडगुळ आज बुद्धिस्ट लोकांच्या मनावर बिंबविले जात आहे. आणि त्या माध्यमातून विज्ञानवादी बुद्ध तत्वज्ञानाला अध्यात्माची जोड दिली जात आहे. ज्या अध्यात्माच्या विरोधात बुद्धांनी संघर्ष केला तेच अध्यात्म बौद्धांच्या मानगुटीवर बसवून बौद्धांच्याच हाताने बुद्ध धम्मक्रांती संपविण्याचा कट विपश्यनेच्या माधमातून आखण्यात आलेला आहे. आणि बुद्ध आंबेडकरी समाज त्याला बळी मोठ्या प्रमाणात बळी पडू लागला आहे. सत्यनारायण गोयंका हा आर एस एस चा हस्तक आज बुद्ध आंबेडकरी समूहाच्या डोक्यावर विपश्यनेच्या माध्यमातून थैमान घालून नाचू लागला आहे. सत्य आणि असत्य याचा उलगडा होऊ न देणारी मोहिनी विपश्यनेच्या माध्यमातून गोयंका बुद्ध आंबेडकरी समाजावर लादीत आहे.
ध्यान, साधना, आत्मा, परमात्मा, समाधी, विपश्यना ह्या सर्व बाबी मानवी बुद्धीला खुजे बनवून मानवी सामाजिक विकासाला खंडित करणा-या आहेत. बुद्धाचा आणि विपश्यनेचा कुठलाही संबंध नसतांना तो संबंध दाखविला जाने म्हणजे धम्मक्रांतीला रोखणेच होय. शोषित-पिडीत-वंचित समाज आज त्याच्या हक्क व अधिकारासाठी बुद्ध तत्वाच्या आधारे आंबेडकरी विचारातून क्रांती करू पाहत आहे. या क्रांतीला थांबविण्यासाठी मानसिक रोग वाढविणारे विपश्यना केंद्र उभे केले जात आहे. बुद्ध विहारे आज विपश्यनेच्या जाळ्यात अडकविण्यात आले आहेत. ही मोठी प्रतिक्रांती आज धम्मक्रांतीवर मात करून समाजाला क्रांतिकारी विचारापासून दूर नेत आहे. भारत बौद्धमय करण्याच्या मार्गातला हा अडथळा दूर करणे आज गरजेचे आहे. अन्यथा बुद्ध तत्वज्ञानाला विपश्यना संपविण्याच्या मार्गापर्यंत पोहचली आहे. महापरित्रणपाठ, पुनर्जन्म, अध्यात्म, शांती अश्या प्रकारच्या भूलथापा मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. विपश्यनेचे हे विषारी झाड मुळापासून संपविल्याशिवाय धम्मक्रांती गतिमान होणार नाही.
…3…
धम्मक्रांतीचे मारक म्हणून आज आणखी एका गोष्टीकडे बघितल्या जाऊ शकते ते म्हणजे आज अस्तित्वात असलेल भिख्खू संघ होय. रंगून च्या भाषणात बाबासाहेबांनी धम्म प्रचार आणि प्रसारासाठी भूख्खुंना प्रशिक्षित करण्याची गरज बोलून दाखविली होती. त्यासाठी एक प्रशिक्षण संस्था उभारण्याचा त्यांचा मानस होता. परंतू धम्मदीक्षेनंतर अल्पावधीत त्यांचे महापरिनिर्वान झाल्याने त्यांचा तो मानस पूर्ण होऊ शकला नाही. व आजतागायत तो पूर्ण झाला नाही. मध्यंतरीच्या काळात “भारतीय बौद्ध महासभा” या एकमेव बाबासाहेबांनी स्वतःच्या अधिपत्याखाली ठेवलेल्या संस्थेने प्रयत्न केला परंतु धम्मातील इतर प्रदूषित धम्म संघटना, पाश्चात्य धम्म संघटना आणि त्यांच्या भिख्खू संघामुळे भारतीय बौद्ध महासभेचे प्रयत्न असफल ठरले. ज्यामुळे आज प्रशिक्षित भिख्खू नसल्याने खरा बुद्ध समाजातल्या घराघरात पोहचू शकला नाही. धम्मक्रांतीच्या अपयशाच्या संदर्भाने ही गोष्ट फार महत्वाची ठरली आहे.
आज बौद्ध भिख्खू धम्म प्रचारक कमी आणि धार्मिक उन्मादक जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भिक्षु या धम्मप्रचाराच्या नैतिक श्रद्धेचा आज व्यवसाय बनला आहे. आजचा भन्ते हा व्यावसायिक प्रचारक बनला आहे. भन्ते राहुल बोधी, भन्ते ज्ञानजोती सारखे उन्मादक भन्ते बुद्ध तत्वज्ञानाला नकळतपणे संपविण्याच्या मार्गावर चाललेले आहेत. एका दिवसात ४० ते ५० घरी चाललेला परित्रणपाठाचा व्यवसाय कुठल्या बुद्ध धम्माच्या तत्वात बसतो हे कळायला मार्ग उरलेला नाही. हिंदूंच्या सत्य साईबाबा प्रमाणे काही भन्ते बौद्धांच्या घरी दर्शन द्यायला जाऊ लागले आहेत. आज भन्ते स्वतःला देवरूपी बनवीत चाललेले आहेत. आणि हा सर्व प्रकार नागपूरच्या क्रांतीभूमीत सुरु आहे हे त्याहून अधिक खेदाची बाब म्हणावी लागेल.
बौद्ध धम्मात भिख्खुंना मानाचे/सन्मानाचे स्थान आहे. एक धम्मप्रसारक आणि प्रचारक म्हणून समाजासाठी ते वंदनीय आहेत. परंतु हेच भिख्खू जेव्हा आज मठाधीश (विहाराधीश) व्हायला लागले आहेत. तेव्हा धम्माला ग्लानी येणे सहज शक्य आहे. भिख्खुंच्या प्रशिक्षणाअभावी हे सर्व होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्धांना अभिप्रेत भिख्खुंची व्याख्या करतांना म्हणतात, ‘पूजापाठ आणि गाथा म्हणणे हे भिख्खुंचे काम नाही. एका ठिकाणी स्थिरावून (विहारात) विहाराला देवालयाचे रूप आणणारा भिख्खू नाही. तर भिख्खू तो जो समाजाच्या प्रश्नांवर विचार करतो, समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास करतो. सामाजिक वातावरणाचा आढावा घेऊन त्याचा मानवी समाजावर होणा-या ब-यावाईट परिणामाची शहानिशा करतो. आजूबाजूच्या घटना-घडामोडींवर लक्ष ठेऊन असतो. आणि त्यासंबंधाने समाजाला सतत मार्गदर्शन करीत असतो. समाजाला दिशा देण्याचे काम भिख्खुंचे आहे.’
एकंदरीत सामाजिक समस्याचा मानवी जीवनावर होणा-या परिणामाला ओळखून सामाजिक जीवन सुखमय करण्यासाठी प्रयत्नरत असणारा अभ्यासू, चिंतन, मनन करून उपाय सुचविणारा अभ्यासक म्हणजे भिक्खू. ही व्याख्या आज अस्तित्वात असणा-या किती भिख्खूंनी त्याच्या जीवनचर्येत अंगिकारली आहे ? यावरच प्रश्नचिन्ह असल्याने धम्मक्रांती अपेक्षित ध्येयापर्यंत पोहचू शकलेली नाही. बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिप्रेत भिख्खू संघ निर्माण करण्याची गरज आहे. आज अस्तित्वात असणा-या भिख्खू संघांनी आणि भिख्खूंनी जर हे ध्यानात घेतले तर बौद्ध धम्मावर येणारी प्रतीक्रांतीची आक्रमणे सहज परतवून लावता येतील. आणि धम्मक्रांतीला गतिमान करता येईल.
…4…
धम्मक्रांतीला वेठीस धरण्यासाठी राजकारण हे सुद्धा जबाबदार ठरले आहे. १९५६ नंतर उदयास आलेल्या आंबेडकरोत्तर राजकारणाने धम्मक्रांतीला वेठीस धरले. बाबासाहेबांना अभिप्रेत धम्मक्रांती आणि राजकारण सम पातळीवर केले जाणे आवश्यक होते. परंतु काही अपरिहार्य कारणाने ते होऊ शकले नाही. धम्मक्रांती राजकारणाच्या वावटळीमुळे एकाकी पडली. ज्यामुळे आंबेडकरी राजकारणही यशस्वी होऊ शकले नाही आणि धम्मक्रांतीपण यशस्वी होऊ शकली नाही. रंगूनच्या प्रसिद्ध भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘मी बुद्ध धम्मातून घेतलेले समता तत्व हे राजकीय आहे. राज्यातील सर्व मानवमात्रांना समानतेने वागणूक देऊन सर्व नागरिक समान आहेत. हा न्यायप्रणीत बंधुभाव समाजात रुजविला जाणे गरजेचे आहे.’ हा संदेश आंबेडकरी राजकारणाला बुद्ध धम्माला सोबत घेऊन वाटचाल करणारा होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले ? की झाले ? यापेक्षा ते होऊ शकले नाही. ही खेदाची बाब म्हणावी लागेल. ज्यामुळे अपेक्षित धम्मक्रांतीला चालना मिळू शकली नाही.
काहींनी तर राजकारणासाठी धम्माचा भावनिक वापर केला. बाबासाहेबांची अपेक्षित धम्मक्रांती “भारत बौद्धमय” करण्याची समाजात प्रचलित होती. या सामाजिक भावनाविवशतेला बामसेफ, बीएसपी ने राजकीय आयाम चढविला. समाजाला बुद्ध धम्माकडे आकृष्ट करण्याऐवजी राजकारणाकडे आकृष्ट केले गेले. “सत्ता आल्यावर धम्मक्रांती करू !” अश्या प्रकारच्या वल्गना करून सम्राट अशोकाच्या धम्मक्रांतीचा भावनिक आधार घेतला गेला. त्यामुळे सम्राट अशोकाचा खरा धम्मइतिहास मागे पडत गेला. आणि समाज या हवशी राजकारण्यांच्या पाठीशी बांधला गेला. आधी राजकारण, आधी सत्ता नंतर धम्मकारण, धम्मक्रांती, धम्मप्रवर्तन ही फसवी नीती समाजावर लादली गेली. आणि धम्मक्रांतीला ताटकळत ठेवण्यात आले. बाबासाहेबानंतर उल्लेखनीय धम्मक्रांती होऊच शकली नाही. तश्या अपेक्षा, तशी स्वप्ने मात्र समाजाला धाखाविली गेली. परंतु ते प्रत्यक्षात कधी उतरलेच नाही. उलट तोच धम्मक्रांतीला मोडीत काढण्यासाठी आखण्यात आलेला षड्यंत्राचा भाग होता हे आता सिद्ध झाले आहे.
धम्मक्रांतीला मोडीत काढणा-या राजकारणाचा अनुभव मागील ५६ वर्षाच्या काळात आला असतांना सुद्धा आजही धम्माचेच राजकारण केले जाते यापेक्षा या चळवळीचे दुसरे दुर्भाग्य होऊ शकत नाही. धम्म स्वीकारणे म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही बुद्ध तत्वज्ञानाची चतुर्सुत्री स्वीकारणे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या बुद्ध तत्वज्ञानातील चतुर्सुत्रीवर आधारित व्यवस्था निर्माण करणे हे राजकारणाचे उद्धिष्ट असतांना देखील ते न स्वीकारता राजकारण केले गेले आणि केले जात आहे. आणि सत्ता आल्यानंतरच धम्माचा स्वीकार अशी घोषणा म्हणजे शुद्ध बुद्धिभेद आहे. अध्यापही राजकारणासाठी धम्माचा उहापोह करणा-यांनी कधीही बुद्ध धम्माचा स्वीकार केला नाही. सत्ता आली. सत्ता उपभोगली. बुद्ध आणी बाबासाहेबांच्या नावावर समाजाचे आर्थिक शोषण केले. परंतु धम्माचा स्वीकार मात्र केला गेला नाही.  हे या चळवळीसाठी धोकादायक आहे. धम्मक्रांतीला ते मारक आहे.
   …5…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील ज्या भूमीवर (दीक्षाभूमीवर) बौद्ध धम्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांसोबत घेतली त्याच भूमीवर आज काहींनी आपले साम्राज्य निर्माण केले आहे. दीक्षाभूमी ही जागतिक क्रांतिभूमी आहे. या क्रांतीभूमिला ‘दीक्षाभूमी स्मारक समिती’ नावाचे शापित विकायला निघाले आहेत. क्रांतिभूमी दीक्षाभूमी ही आज राजकारणाचा बळी ठरलेली आहे. ‘दीक्षाभूमी स्मारक समिती’ नावाने केले जाणारे राजकारण आज बुद्ध आणि आंबेडकरी अनुयायांसाठी अतिशय क्लेशदायक आहे. देश विदेशातील लाखो करोडो बुद्ध आंबेडकरी अनुयायी अशोक विजयादशमीला या भूमीला नमन करून जातात. त्या लाखो करोडो बुद्ध आंबेडकरी अनुयायांनी या दीक्षाभूमीवरून जो संदेश घेऊन जायला पाहिजे तो अध्यापही त्यांना मिळू शकला नाही. अशोक विजयादशमीला आज दिवसेंदिवस यात्रेचे आणि जत्रेचे स्वरूप यायला लागले आहे. दरवर्षी होणा-या ‘दीक्षाभूमी स्मारक समिती’ च्या राजकीय कार्यक्रमात येणारी प्रतीक्रांतीवादी पाहुणे, नेते आणि राजकारणी कुठला संदेश या लाखो करोडो अनुयायांना देतात ? याचा दीक्षाभूमी स्मारक समितीने (गवई-फुलझेले) महोदयांनी केलेला दिसत नाही. आज धम्मक्रांतीची हीच क्रांतिभूमी दीक्षाभूमी प्रतीक्रांतीवाद्यांच्या काटेरी कुंपणाने बंधिस्त केली गेली आहे.
दीक्षाभूमीवर होणा-या महत्वपूर्ण अश्या धम्मदीक्षा सोहळ्याच्या कार्यक्रमात सर्व बुद्धिस्ट देशातील राष्ट्राध्यक्षांना व गणमान्य लोकांना बोलाविले जाने अपेक्षित आहे. तसेच जगातील विद्वतापूर्ण बौद्ध भिक्खू या कार्यक्रमात आमंत्रित करून त्यांच्याकडून जागतिक बुद्ध धम्माची वाटचाल याविषयी लाखो करोड लोकांना संदेश दिला जाने अपेक्षित आहे. तेव्हाच ही धम्मक्रांती आपले निश्चित ध्येय गाठू शकेल. परंतु असे न होता अगदी याउलट सर्व घडामोडी घडून येत आहेत. आर एस एस आणि भाजप शी संबंधित नेत्यांना बोलावून हिंदू प्रतीक्रातीवाद्यांकडून बुद्ध आंबेडकरी अनुयायांना संदेश दिला जातो हे कितपत योग्य आहे याचा विचार आता निदान समाजाने करावा. दीक्षाभूमीवरील क्रांती आणि हिंदू प्रतीक्रांतीवादी यांचा काय संबंध ? विरोधकांच्या हातात आयती कोलीत देऊन दीक्षाभूमी स्मारक समिती कुठल्या क्रांतीचा सोहळा साजरा करीत आहे ? या प्रश्नाच्या उत्तरात धम्मदीक्षेचे काटेरी कुंपण लक्षात घेण्यासारखे आहे. 
दीक्षाभूमीचे पावित्र्य आज दिसून येत नाही. आजघडीला दीक्षाभूमीवर चालना-या महाविद्यालयाच्या तारुण्य उन्माद वातावरणाने क्रांतीभूमिला घेरलेले आहे. दीक्षाभूमीची शांतता भंग झाली आहे. ही दीक्षाभूमी आज जागतिक क्रांतिभूमी कमी आणि महाविद्यालयाचे सायकल स्टैंड अधिक बनली आहे. दिवसेंदिवस या भूमीवर होणारे अवैध बांधकाम आणि त्यात होणारा आर्थिक व्यवहार धम्मक्रांतीला संपवीत चालला आहे. बाबासाहेबांनी याच भूमीवरून दिलेला शुद्ध बुद्ध विसरून दीक्षाभूमी स्मारक समिती प्रतीक्रांतीवादी बुद्ध याठिकाणी प्रस्थापित करू पाहत आहे. आणि बुद्ध परिवेश घेऊन धम्मक्रांती संपवू पाहणा-या प्रतीक्रांतीवाद्यांचा शिरकाव आज दीक्षाभूमीवर राजरोसपणे होऊ लागला आहे. बाबासाहेबांनी केलेल्या धम्मक्रांतीला घातक अशी कृती आज ‘दीक्षाभूमी स्मारक समिती’ च्या माध्यमातून केली जात आहे. आणि आंबेडकरी जनता निमुटपणे असहाय होऊन उघड्या डोळ्याने पाहत आहे.
अश्या विविध मार्गाने काटेरी कुंपणात अडकलेली धम्मदीक्षा/धम्मक्रांती आम्हाला सर्व मानव्यासाठी मुक्त करावी लागणार आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत बुद्ध आणि त्यांचा धम्म समाजात, व्यवहारात रुजवावा लागणार आहे. अनेक बाजूंनी होणारे आक्रमण परतवून लावून जागतिक पटलावर सुवर्णाक्षराने लिहिल्या गेलेल्या क्रांतीला आपल्या इप्सित ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी प्राणपणाने लढावे लागणार आहे. आतापर्यंत बुद्ध धम्मावर आणि धम्मक्रांतीवर पडलेली प्रतीक्रांतीची विषारी पाऊले उपटून फेकावी लागणार आहेत. बाबासाहेबांना अभिप्रेत शुद्ध बुद्ध जोपर्यंत आम्ही समाजापर्यंत पोहचवीत नाही तोपर्यंत धम्मचक्र गतिमान करता येणार नाही.

*************