Monday 14 August 2017

#Once_Again_Ambedkar स्वातंत्र्याचा अन्वयार्थ : नागरी स्वातंत्र्याला धोका

#Once_Again_Ambedkar
स्वातंत्र्याचा अन्वयार्थ : नागरी स्वातंत्र्याला धोका
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

          १५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. इंग्रजांनी भारताला वसाहती राज्यातून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. गुलामीची एक राजवट संपली आणि देशाने मोकळा श्वास घेतला. निदान देशातील दगड-माती, राने-वने, नद्या-पहाडे स्वातंत्र्याने डोलू लागली. भारत नावाच्या भौगोलिक प्रदेशावरचे इंग्रजांचे मांडलिकत्व तेवढे संपले. परंतु या देशाच्या भौगोलिक सीमारेषेत राहणाऱ्या माणसांवरील सामाजिक, आर्थिक व प्रामुख्याने धार्मिक मांडलिकत्व संपले नव्हते. तरीही भौगोलिक स्वातंत्र्याचा आटापिटा करणाऱ्या धुरीनांसोबत सारा देश आनंदाने नाचू लागला होता. इंग्रजांच्या मालकीत्वातून मुक्त झाल्याचा आनंद एकीकडे होता तर दुसरीकडे त्याच स्वातंत्र्याने एका भौगोलिक प्रदेशाचे दोन तुकडे करून माणसांचे धार्मिक विभाजन केल्याचे दुःख धर्मधुरिणांना नव्हे तर ज्यांनी माणसातला माणूस ओळखला होता त्यांना होते. काहींना धार्मिक विभाजनासहीत मिळालेल्या भौगोलिक स्वातंत्र्याचा आनंद होता, तर काहींना परकीय सत्तेच्या विळख्यातून देशाची सत्ता त्यांच्या हातात राजकीय स्वातंत्र्याच्या रुपात येणार होती म्हणून आनंद होता. काहींना मात्र या स्वातंत्र्याने गोऱ्यांची सत्ता जाऊन श्वेतवर्णीयांची सत्ता येण्याचा आनंद होता. या सर्व गदारोळात मानवी स्वातंत्र्य मागे पडू पहात होते. मानवी स्वातंत्र्य नजरेआड होऊ नये व मानवी स्वातंत्र्याचा पाया रचला जावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चिंतातूर होते.  भौगौलिक स्वातंत्र्याला मानवी स्वातंत्र्यात बदलण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते. निर्माण प्रक्रियेत असलेल्या स्वतंत्र भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला मिळालेले स्वातंत्र्य मानवी नागरी स्वातंत्र्यात परावर्तीत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेतली व खऱ्या अर्थाने २६ नोव्हेंबर १९५० ला देशातल्या नागरिकांना मानवी नागरी स्वातंत्र्य बहाल केले.

आभासी स्वातंत्र्यात आणि खऱ्या स्वातंत्र्यात अंतर असते. १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेले आभासी स्वातंत्र्य २६ जानेवारी १९५० ला खऱ्या स्वातंत्र्यात विलीन झाले. भारतीय संविधान हा त्या खऱ्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा होता. तो फक्त जाहीरनामाच नव्हे तर भारतीयांनी भारतीयांशी केलेला करारनामा होता. मानवी स्वातंत्र्याचा करारनामा होता.  मानवी स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा करारनामा, नागरिकांचे स्वातंत्र्यरूपी हक्क-अधिकार सुरक्षित ठेवण्याचा करारनामा, यापुढे कुणीही मालक-गुलाम राहणार नाही याचा करारनामा, यापुढे कुणीही उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्पृश्य-अस्पृश्य राहणार नाही याचा करारनामा, यापुढे कुणीही देशी-विदेशी राहणार याही याचा करारनामा, यापुढे कुणीही मानवी स्वातंत्र्याचा आड येऊन हिंदू-मुस्लीम-शीख-इसाई-बौद्ध-जैन राहणार नाही याचा करारनामा, यापुढे आम्ही सर्व भारतीय असल्याचा तो करारनामा होता. त्यामुळे सर्व भारतीय या करारनाम्यात करारबद्ध होत होते. परंतु स्वतंत्र देशाच्या स्वतंत्र संविधानात करारबद्ध होण्यास एका टोळीचा (गट/समूह/संघटनेचा) नकार होता. ती टोळी होती “आरएसएस”ची. ती टोळी होती धार्मिक जातीवाद्यांची. ती टोळी होती मानवी स्वातंत्र्य नाकारणाऱ्या मनुवाद्यांची. ती टोळी होती आज भारताच्या शासन सत्तेवर असणाऱ्या ‘आरएसएस-भाजपा’ची. याच टोळीने आज स्वातंत्र्याचा अन्वयार्थ बदलला आहे. आणि त्यात संपूर्ण देश व संपूर्ण भारतीय होरपळले जात आहेत.

भारतासारख्या बहुधर्मीय विविधता असलेल्या देशाची सत्ता म्हणजे अनिर्बंध सत्तास्वातंत्र्य नव्हे. किंवा अमर्याद एकधर्मीय स्वातंत्र्यही नव्हे. भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना बहाल केलेले स्वातंत्र्य हे मानवी मुल्यतत्वात झिरपून मानवी प्रतिष्ठा उंचावणारे आहे. मानवी प्रतिष्ठेच्या आड येणारी प्रत्येक कृती ही स्वातंत्र्याची अवहेलना ठरते. मग ती सत्तेच्या माध्यमातून आलेली असो की सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून आलेली असो. परंतु आरएसएस-भाजपा ची सरकार सत्तेवर आल्यापासून भारतीय नागरिकांची मानवी प्रतिष्ठाच पणाला लावली गेली आहे. विशिष्ठ व्यक्ती, विशिष्ठ धर्म, विशिष्ठ संस्कृती, विशिष्ठ विचारधारा या दिशेने सुरु असलेली सत्तेची वाटचाल देशातल्या नागरिकांच्या स्वातंत्र्याला धोक्यात आणीत आहे. भारतीय संविधानाने बहाल केलेली लोकतांत्रिक स्वातंत्र्याची अवहेलना करून सामाजिक, आर्थिक व धार्मिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रभक्ती राष्ट्रवादाच्या नावाखाली अनीतिमान धर्म उपासना व जातीवाद फोफावला जातो आहे. देशाला मिळालेल्या भौगोलिक स्वातंत्र्याच्या लढाईत ज्या आरएसएस चा शून्य वाटा होता, ज्यांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य बहाल करणारे भारतीय संविधान अमान्य होते असे आरएसएस चे असंवैधानिक संघटन आपल्या भाजपा या राजकीय शाखेला मिळालेल्या शासनसत्तेच्या माध्यमातून साऱ्या विरोधकांना देशद्रोही ठरवायला निघालेले आहेत. भारतीय नागरिकांना मिळालेल्या संवैधानिक स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे.

२०१४ ला आरएसएस भाजपा ची सरकार सत्तेवर आल्यापासून भारतीयांना आपण स्वतंत्र भारतात राहतो आहोत का ? हा प्रश्न पडायला लागला आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर पहिल्यांदाच ही परिस्थिती देशातील नागरिकांवर उद्भवलेली आहे. भारतीय संविधानाने भारतीयांना दिलेली सुरक्षा व स्वातंत्र्य हद्दपार करून निव्वळ श्रद्धेवर देश चालविण्याचा पायंडा मोदीरूपाने पाडण्याचा प्रयत्न आरएसएस चा आहे. देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्याची हमी ज्या भारतीय संसदेने घेतली होती ती जणू काही धार्मिक टोळ्यांच्या हातात सोपवून नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.  संविधानिक संसदेची जागा धर्मसंसद घेऊ पाहत आहे. आज माणसांच्या प्रत्येकच दैनंदिन व्यवहार स्वातंत्र्यात सत्तेची लुडबुड सुरु झाली आहे. स्वयंपाक घरात काय शिजते इथपासून ते आम्ही काय खावे व काय खाऊ नये व पती पत्नींनी संतान प्राप्ती कशी करावी इथपर्यंत सरकार नागरिकांना नियंत्रित करीत असेल तर आम्ही स्वतंत्र देशाच्या स्वतंत्र संवैधानिक भारतात राहतो आहोत ? की एखाद्या टोळी राज्यात राहतो आहोत ? असा प्रश्न भारतीय नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे. हल्ली देशाच्या सत्तेवर विराजमान असलेली आरएसएस भाजपा सरकार देशातील नागरिकांच्या मानवी स्वातंत्र्याचेच हनन करीत नाही तर संविधानाने बहाल केलेल्या संवैधानिक स्वातंत्र्याचेही हनन करीत आहे.

एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीच्या मानवी व संवैधानिक स्वातंत्र्याचे हनन केले किंवा अडथळा निर्माण केला तर तो कायद्याने गुन्हा ठरतो व अशी व्यक्ती शिक्षेस पात्र ठरते.  इथे तर सरकार व सरकार प्रायोजित धार्मिक टोळ्या (संघटना) देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालीत आहेत. नियोजित व सूत्रबद्ध कायद्याने गुन्हा करीत आहेत. मग अश्या सत्ताधाऱ्यांना व त्यांनी पाळून ठेवलेल्या धार्मिक टोळ्यांना शिक्षा कोण देणार ? लोकशाहीत नागरी स्वातंत्र्याला अमूल्य महत्व असते. व त्या नागरिकांच्या स्वातंत्र्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही संविधानाने स्थापन झालेल्या संसदेच्या माध्यमातून सत्तेवर असणाऱ्यांची असते किंवा संविधानाने निर्माण झालेल्या न्यायपालिकेची ती जबाबदारी असते. आणि जेव्हा या दोन्ही प्रणाली (संसद व न्यायपालिका) नागरिकांच्या स्वातंत्र्याची सुरक्षा करण्यात अपयशी ठरतात तेव्हा स्वतः जनताच पुढे येऊन स्वतःच्या स्वातंत्र्याची सुरक्षा स्वतःच करण्यासाठी कायदा हातात घेते. ही परिस्थिती ज्या काळात उद्भवते त्या काळात न्यायाचे राज्य, कायद्याचे राज्य, लोकशाही, संविधान वैगैरे बाबी मागे पडून जंगलराज निर्माण होण्यास सुरवात होते. कदाचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतामध्ये तोच प्रयोग करू पाहत आहे. आणि नकळत भारतीय जनता त्याला बळी पडत आहे.

गुलामीच्या व्यवस्थेला बंड करून स्वतंत्र व्यवस्थेत परिवर्तीत करणे कठीण असते. परंतु स्वतंत्र व्यवस्थेला गुलामीच्या व्यवस्थेत बदलविणे सोपे असते. गुलामीतून स्वातंत्र्याकडे वाटचाल करतांना बंड करावा लागतो. क्वचितप्रसंगी युद्धही करावे लागते. शस्त्रही वापरावे लागते. बलिदानही द्यावे लागते. रक्तही सांडवावे लागते. माणसे गमवावी लागतात. परंतु स्वातंत्र्याला गुलामीत बदलवितांना हे सर्व न करताही गुलामी लादता येते. मानसशास्त्रीय प्रयोगातूनही स्वतंत्रतेला गुलामीत परिवर्तीत करता येते. किंवा बुद्धिभेद करूनही ते शक्य होते. इतिहासातून असो किंवा वर्तमानातून असो आपण आजूबाजुला या बदलणाऱ्या परिस्थितीचे अवलोकन करीत असतो परंतु त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही तर स्वतःच्या स्वतंत्रतेला आपणच गुलामीत नेण्यास जबाबदार ठरतो. याची अनेक दाखले इतिहासातही सापडतील व वर्तमानातही सापडतील. आज भारत अशाच एका गुलामी व्यवस्थेकडे वळण्याच्या सीमारेषेवर आहे. ज्याचे नेतृत्व भाजपा करतांना दिसत असली तरी त्याचे पडद्यामागून नेतृत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केले जात आहे. हिंदुत्व, धार्मिक आस्था, श्रद्धा, व्यक्तीश्रेष्ठत्व अश्या सारख्या धार्मिक मर्मगर्भाचा वापर करून त्यासोबतच भ्रष्टाचार, विकास (Development), स्वच्छता, रोजगार यासारख्या विलासी व तितक्याच अपूर्ण (कायमस्वरूपी कधीही पूर्णत्वास न जाणाऱ्या) संज्ञांचा वापर करून, त्याचा मोहक प्रचार व प्रसार करून जनतेच्या बौद्धिकतेला भावनिकतेतून मारल्या जाते. व पडद्यामागून काहींच्या हितासाठी, श्रेष्ठत्वासाठी, अधिपत्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी व्यवस्थेला बंधिस्त करून गुलामगिरीकडे वाटचाल सुरु केली जाते.  आज भारताची वाटचाल त्या दिशेने आहे.

अमर्याद मानवी व्यक्तिस्वातंत्र्य आणि मर्यादित नागरी स्वातंत्र्य याच्या संयोगातून भारत मागच्या ७० वर्षात सामाजिक सलोख्यात वावरतांना आम्ही पहिला. परंतु आज अचानक हा सामाजिक सलोख द्वेषामध्ये परावर्तीत झाला. गोरक्षेच्या नावाखाली फक्त मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. वंदे मातरम् च्या नावाखाली मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. जातीवर्चस्वाच्या नावाखाली दलितांवर अन्याय अत्याचार होत आहेत. निदान कायद्याच्या धाकाने का होईना आजपर्यंत भारतात कधीही कुठल्याही अन्याय अत्याचाराचे चित्रीकरण सार्वजनिक होत नव्हते. किंवा तसे करण्याची हिम्मतही कुणी करीत नव्हता. परंतु आज राजरोसपणे दररोज जातीच्या, धर्माच्या नावाने अन्याय अत्याचार होत आहेत. तेही छुप्या पद्धतीने नव्हे तर चित्रीकरण करून त्याला सार्वत्रिक करून देशातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यापर्यंत हे सर्व होत आहे. परंतु त्यांच्यावर न सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण आहे व न ही कायद्याची राज्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण येत नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही दुर्भाग्याची गोष्ट अशी की, या सर्व अन्याय अत्याचाराचे संचालन सत्तेवर असणारे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक व त्यांचे विचारधन करीत आहेत.

ज्या देशात माणूस मारला गेल्याची खंत कुणाला नाही परंतु “गाय” नावाचा प्राणी मारल्या गेल्याची खंत वाटून त्यासाठी उलट माणूसच मारला जात असेल त्या देशाला माणसांचा देश म्हणायचे का ? ज्या देशात व्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा प्राणी स्वातंत्र्य महत्वाचे आहे त्या देशाला स्वतंत्र देश म्हणायचे का ? ज्या देशात मानवाधिकारापेक्षा धार्मिक श्रद्धांना अधिक महत्व दिल्या जाते त्या देशाला संविधानिक राष्ट्र वा देश म्हणायचे का ? ज्या देशात सत्ताधारी पक्ष, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ जनतेला कमी आणि मनुवादी विचारधन बाळगणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जास्त उत्तरदायी आहे त्या देशाच्या सत्ताधाऱ्यांना आम्ही आमचे सत्ताधारी म्हणायचे का ? ज्या देशात नागरिकांच्या स्वातंत्र्याची हमी संसदेमध्ये कमी आणि ‘मन कि बात’ च्या स्टुडीओ मधून प्रचार अधिक होतो त्या देशाच्या प्रणालीला सांसदीय प्रणाली म्हणायचे का ? ज्या देशात मानवी हितापेक्षा मानवी तुष्टीकरणाची प्रक्रिया अधिक वेगाने चालविली जात असेल त्या देशात आम्ही लोकशाही आहे असे म्हणायचे का ? ज्या देशातील सत्तेची विचारधारा मानवी सुरक्षेपेक्षा प्राणी सुरक्षेला अधिक महत्व देते ती विचारधारा व ती सत्ता या देशाची आमची सत्ता म्हणायची का ? प्रश्न गंभीरच नव्हे तर गडद होत आहेत. देश मनुवादी ज्वालामुखीच्या शिखरावर उध्वस्थ होत असतांना आम्ही स्वातंत्र्याचा समारोह साजरा करायचा का ? की मिळालेल्या स्वातंत्र्याला सुरक्षित ठेवण्यासाठी मनुवादी ज्वालामुखीच्या उत्सर्जित बिंदूंना (केंद्रांना) कायमचे बंद करायचे. याचा निर्णय भारतीय नागरिकांना देशाचा ७१ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतांना घ्यावयाचा आहे.

एकीकडे अन्याय करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची वोट बॅक संघटीत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सत्ताही आहे व सत्ता असल्यामुळे अन्याय करण्यासाठी ते निर्ढावलेले आहेत. तर दुसरीकडे अन्यायग्रस्त लोकांची व्होट बॅक असंघटीत व विखूरलेली आहे. त्यामुळे सत्तेपासून ते दूर आहेत. व सत्तेपासून दूर असल्यामुळे सत्ताधारी समाजाच्या अन्याय व अत्याचाराला बळी पडून अन्यायग्रस्त ठरत आहेत. आजच्या परिस्थितीचे व समाजाचे हे भयाण वास्तव आहे. अन्यायग्रस्त समाजाला त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायापासून मुक्तता मिळवायची असेल तर संघटीततेच्या दिशेने पावले टाकावी लागतील. मानवी स्वतंत्रता मान्य करणाऱ्या व ती टिकविण्यासाठी धडपड करणाऱ्या सर्वच संस्था, संघटना, पक्ष यांना एकत्र येऊन महत्प्रयाने मिळालेले देशाचे स्वातंत्र्य जे मनुवादी टोळ्या, संस्था, संघटना, पक्षाच्या माध्यमातून उद्ध्वस्त होऊ पाहत आहे ते वाचवाचे लागणार आहे.  माणूस म्हणून मानवाधिकाराने दिलेले नैसर्गिक मानवी स्वातंत्र्य व त्यातही महत्वाचे म्हणजे एक भारतीय म्हणून संविधानाने मिळालेले हक्क व अधिकार अमानवतावादी मनुवादी टोळक्यांकडून सुरक्षित ठेवण्यासाठी संघटीत लढा उभा करावा लागेल. तेव्हाच पुढचे अनेक वर्ष आपण स्वातंत्र्य दिवसाचा आनंद साजरा करू शकू. अन्यथा येणाऱ्या नजीकच्या काळात स्वातंत्र्य दिवसाचा आनंद साजरा करण्याची संधीही गमावून बसू. हे ध्यानात ठेवावे लागेल.
¤¤¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर,Top of Form


Friday 4 August 2017

संसदेच्या प्रतिष्ठेचा बाजार होऊ नये !- #Once_Again_Ambedkar

#Once_Again_Ambedkar
संसदेच्या प्रतिष्ठेचा बाजार होऊ नये !
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायम संसदेच्या प्रतिष्ठेचा विचार केला. संसदेची प्रतिष्ठा पणाला लागू नये म्हणून कायम सावधानी बाळगली.  या देशात लोकशाही जितकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजली तितकी त्यांच्या पश्चात कुणालाही कळली नाही असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. सह्भागीत्व, सहकार्य आणि विश्वास या त्रीसुत्रीवरच लोकशाहीचा पाया उभा आहे.  सह्भागीत्व समतेशी निगडीत आहे. सहकार्य न्यायाशी निगडीत आहे. तसेच विश्वास स्वातंत्र्याशी निगडीत आहे. मात्र याची जबाबदारी संसदेची आहे. संसद सार्वभौम आहे म्हणून देश सार्वभौम आहे आणि म्हणूनच देशातील जनतेमध्ये (नागरिकांमध्ये) देशाची अंतिम सार्वभौमसत्ता निहित आहे. हे सार्वभौमत्व कुठल्या धर्मशास्त्रातून, कुठल्या वेद पुराणातून, भगवतगीतेतून, रामायण-महाभारतातून किंवा मनुस्मृतीतून आलेले नसून देशाच्या संविधानातून म्हणजेच भारतीय संविधानातून आलेले आहे.  भारतीय संविधानाने निर्माण केलेल्या याच सार्वभौमसत्तेतून लोकशाही व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली.  या सर्वांच्या केंद्रस्थानी आहे ती संसद.  इथली सार्वभौमसत्ता टिकविणे व इथली लोकशाही टिकविणे संसदेची जबाबदारी आहे. परंतु लोकशाही तेव्हाच टिकवली जाईल जेव्हा संसदेची प्रतिष्ठा जपली जाईल.  तेव्हा संसदेच्या प्रतिष्ठेला काळिमा फसला जाणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी देशातल्या प्रत्येक नागरिकांची आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य धोरणाची नीतिनिर्देशक तत्वे (Directive Principle of State Policy) न्यायालयीन कक्षेच्या बाहेर ठेवले. जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक सरकारला निर्भीडपणे ५ वर्ष राज्य करता यावी. व सरकारी ध्येयधोरणांना अडथळे येऊ नये.  कारण सरकारची ही ध्येयधोरणे संसदेतून सर्वसहमतीने येतील यावर बाबासाहेबांचा विश्वास होता.  संसदेचे सर्वोत्तमत्व त्यातून निर्धारित होईल. व देश विश्वासाच्या पायावर एकसंघ उभा होईल.  संविधाननिर्मात्यांनी पाहिलेले हे स्वप्न सर्व भारतीयांच्या हिताचे होते. त्यांच्या कल्याणाचे होते. व ते कायम ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे.
          भारतीय संविधानाने निर्माण केलेल्या मुल्यतत्वाची जपणूक करून संविधानाच्या ध्येय-उद्धीष्ठापर्यंत पोहचण्याची जबाबदारी संसदेची आहे.  परंतु संसद एक प्रतिक म्हणून संसदेच्या चार भिंतीवर ती जबाबदारी टाकून नामानिराळे होता येणार नाही.  तर संसद ज्या जिवंत जनप्रतिनिधींनी बनलेली आहे, त्या जनप्रतिनिधींची ती जबाबदारी आहे.  इथल्या लोकशाहीने संसदेला जिवंत जनप्रतीनिधींचा संघ बनविला आहे. त्यामुळे जिवंत जनप्रतिनिधींची ती सामुहिक/सांघिक जबाबदारी आहे. सत्ताधारी किंवा विपक्ष, पक्ष किंवा अपक्ष अशी विभागणीसुद्धा त्याची करता येणार नाही.  लोकसभेचे ५४५ सदस्य, राज्यसभेचे २४५ सदस्य, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती अशा सर्वांची मिळून ती सामुहिक जबाबदारी आहे.  भारतातल्या सध्याच्या १३४ करोड जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ७९२ लोकांनी देशातल्या जनतेचा संसदेवरील विश्वास कायम ठेवून, त्यांना आश्वस्थ करण्यासाठी संसदेचे प्रतिनिधित्व करायचे आहे व तिचे पावित्र्य जपायचे आहे.  जनप्रतिनिधी म्हणून उपलब्ध झालेल्या संवैधानिक सुखसुविधा उपभोगण्यासाठी व वाट्टेल तसे वागण्यासाठी संसदेचा वापर केला जाऊ शकत नाही.  या मुलभूत तत्वाचा विसर हल्लीच्या जनप्रतिनिधींना पडलाय काय ? हे विचारण्याची वेळ आलेली आहे.
२०१४ पासून भाजप/आरएसएस चे सरकार देशाच्या सत्तेवर स्थानापन्न झाले तेव्हापासून सांसदीय प्रतिकांचा बाजार मांडला गेला आहे.  भारतीय जनतेच्या अपेक्षा ज्या भारतीय संसदेकडून आहेत त्या भारतीय संसदेत हल्ली कमी निर्णय व्हायला लागलेत आणि आरएसएस च्या संघशाखेत निर्णय अधिक व्हायला लागले आहेत.  भारतीयांच्या हिताच्या प्रश्नांवर संसदेत कमी आणि ‘मन की बात’ च्या स्टुडीओ मध्ये जास्त गांभीर्य दाखविले जात आहे.  देशातल्या समस्यांवर संसदेच्या सभागृहात कमी परंतु खरेदी केलेल्या ‘मिडीयावर’ प्रायोजित चर्चा व्हायला लागल्या आहेत.  भाजप सरकारची ध्येयधोरणे संसदेत कमी मांडली जातात परंतु नरेंद्र मोदींच्या सभेत व गल्लीबोळातल्या जाहिरात फलकावर अधिक मांडली जात आहेत.  हल्ली कायदेही जनतेच्या मागणीवरून कमी आणि धार्मिक उन्मादी टोळक्यांच्या मागणीस्तव जास्त बनत चालले आहेत.  देश धर्मनिरपेक्ष संविधानाने कमी आणि हिंदुत्व मनुवादी धार्मिक परंपरेने अधिक चालविला जात आहे.  एकंदरीतच देशाच्या संसदेचे हळूहळू महत्व कमी करून संसदेला मोडीत काढण्याकडे भाजपा/आरएसएस ची वाटचाल सुरु असल्याचे जाणवते.
संसदेचे महत्व व तिची प्रतिष्ठा कमी करण्यात भाजपा/आरएसएस आघाडीवर आहे. त्यातही संघ स्वयंसेवक देशाचे प्रधानमंत्री खुद्द नरेंद्र मोदी सुद्धा आघाडीवर आहेत.  नोटाबंदीच्या निर्णयाला अपेक्षित उत्तर नरेंद्र मोदी कडे नसल्याने व विरोधकांच्या प्रश्नांना तोंड देण्याची कुवत नसल्याने नोटाबंदीच्या काळात खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एका सभेत म्हणतात, “मुझे विरोधियों द्वारा संसद मे बोलने नहीं दिया जाता ! अपनी बात को रखने नहीं दिया जाता !” तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेते, ज्यांच्याकडे भविष्यातील प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून कॉंग्रेस पार्टी आशावादी आहे, असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सुद्धा नोटाबंदी नंतरच्या काळात संसदेच्या सभागृहात चर्चा होत असतांना म्हणतात, “सत्ताधारियों द्वारा मुझे संसद में / सभाग्रह में बोलने नहीं दिया जाता !” तर काल परवाच स्वतःला दलित की बेटी, आंबेडकर की बेटी म्हणून ३ वेळा भाजपच्या पाठींब्याने उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री बनलेल्या व दलित नेत्या म्हणविणाऱ्या मायावती यांनी सुद्धा “मुझे संसद/सभाग्रह में बोलने नहीं दिया जाता !” असे म्हणून आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले.  अशा प्रकारच्या नकारात्मक प्रचारातून दिवसेंदिवस संसदेची प्रतिष्ठा ढासळू पाहत आहे.  परंतु त्याची चिंता हल्लीच्या राजकारण्यांना नाही.  संसद सदस्य म्हणून जनतेपुढे आदर्श घेऊन जाण्याऐवजी, मान-अपमान न बघता संसद सदस्य म्हणून भारतीयांचे प्रश्न संसदेसमोर मांडणे अपेक्षित असतांना संसदेतून पळ काढण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. हे भारतासाठी व तमाम भारतीयांसाठी धोक्याचेच नव्हे तर घातक सुद्धा आहे.  ही प्रवृत्ती संवैधानिक व्यवस्थेला छेद देणारी आहे.  इतकेच नव्हे तर या देशाचे संविधान व संविधानाने आलेली व्यवस्था मोडू पाहणाऱ्या भाजप/आरएसएस च्या षडयंत्राला बळ देणारी ही प्रवृत्ती आहे.
आजपर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहात नेहमीच वादळी चर्चा होत आल्यात. सत्तेवर असणाऱ्या पक्षाच्या सदस्यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न देण्याची व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचे म्हणणे सभागृहात ऐकून न घेता गोंधळ घालण्याची परंपरा नेहमीच पाहायला मिळाली.  कॉंग्रेस किंवा अन्य पक्षांपेक्षा भारतीय जनता पार्टीला सभागृहात गोंधळ घालण्याची सवयच जडलेली होती.  फरक एवढाच होता की तेव्हा भाजपा विरोधी बाकावर होती आज सत्ताधारी बाकावर आहे.  परंतु गोंधळ मात्र कायम आहे.  आज भाजपाच्या सदस्यांना संसदेत बोलण्याची गरजच नाही कारण ‘मन कि बात’ व जाहिरातीतून ते बोलत आहेत.  त्यामुळे ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ या म्हणीप्रमाणे संसदेतील चर्चा संपवून हुकुमशाहीतील थेट जनतेतली चर्चाच आज सत्तेवर असलेल्या भाजपा/आरएसएस ला करायची आहे. जिम्मेदार व जबाबदार सरकारची संवैधानिक भूमिका बदलवून हिटलरवादी प्रवृत्तिने भाजपा/आरएसएस सरकार चालवित आहे.  देशातल्या संसदेचे महत्व संपवून देश हुकुमशाहीकडे वळतो आहे हे भारतीयांनी वेळीच ओळखले पाहिजे. 
देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व भारतीय संविधान लागू करून संसदेची निर्मिती झाल्यानंतरच्या काळात काही वर्ष लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात ज्या प्रकारे चर्चा झाल्यात तो आदर्श आज राहिलेला नाही. किंवा तो जाणीवपूर्वक संपविला गेला आहे.  आरएसएस च्या स्वयंसेवकांचे प्रतिनिधित्व सांसदीय परिघात नव्हते तेव्हा देशातल्या आर्थिक, सामाजिक प्रश्नांवर होणाऱ्या संसदेतील चर्चा व आज आरएसएस च्या स्वयंसेवकांचे प्रतिनिधित्व सांसदीय परिघात येताच संसदेतील चर्चांचा बदललेला सूर या देशाचे संविधान व संविधानाने आलेली व्यवस्था आरएसएस ला मान्य नाही हेच सिद्ध करते. 
आरएसएस चे भाजपा सरकार सत्तेवर येताच देशातले सामाजिक, धार्मिक वातावरण बदलले आहे.  सामाजिक सलोख्याच्या ऐवजी यांनी सामाजिक दहशतीचे वातावरण सरकार पुरस्कृत धार्मिक संघटनांच्या माध्यमातून सुरु केले आहे.  धर्मनिरपेक्ष सत्तेच्या ऐवजी हिंदू धर्मसत्ताच यांनी आरंभली आहे.  धार्मिक सुरक्षिततेच्या जागी यांनी हिंदू व्यतिरिक्त धार्मिक असुरक्षितताच निर्माण केली.  एवढेच नाही तर हिंदूमधीलच मागासवर्गीय जो यांच्या दृष्टीने मनुस्मृतिने निर्धारित केलेला शुद्र आहे.  अश्या मागासवर्गीय ओबीसी बांधवांचे अधिकार जे भारतीय संविधानाने बहाल केले ते संपवून परत ओबीसी मागासवर्गीयांना वर्णवादी गुलाम बनविण्याकडे वाटचाल भाजपा/आरएसएस सरकारने चालविली आहे.  दलित व अल्पसंख्यांक वर्गातील लोकांवर सर्रास अन्याय-अत्याचार केले जात आहेत.  देशातील एकूण लोकसंख्येत १०० कोटीच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या या दलित-मागासवर्गीय-अल्पसंखांक वर्गावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात संसदेत आवाज उठविला जाऊ नये म्हणून भाजपा व्यतिरिक्त अन्य पक्षांच्या संसद सदस्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.  एवढेच नाही तर या वर्गाचे प्रतिनिधित्व करण्याऱ्या संसद सदस्यांची कोंडी करून त्यांच्याच माध्यमातून संसदेवरील जनतेचा विश्वास उठविण्याचे षडयंत्रही खेळले जात आहे.  त्यांच्यात निराशा, हताशा, चीड निर्माण करून पडद्यामागून आरएसएस मानसिक संमोहन शास्त्राने या देशाच्या एकसंघतेला व संवैधानिक संसदेच्या चीरेबंदीला भेगा पाडण्याचे काम केले जात आहे.
आरएसएस पुरस्कृत धार्मिक संघटनांच्या उन्मादी गुंडांकडून दलित-मागासवर्गीय-अल्पसंखांक वर्गाच्या माणसांचे काढले गेलेले रक्त हे एका भारतीयाचे आहे.  त्यांच्यावर संपूर्ण देशात होणारे अत्याचार हे भारतीयांवर होणारे अत्याचार आहेत.  व भारतीयांना न्याय देण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला आळा घालण्याची जबाबदारी संसदेची आहे. सरकारची आहे. प्रत्येक संसद सदस्यांची आहे.  त्या जबाबदारीचे निर्वहन भाजप/आरएसएस सरकार करीत नाही.  भारतीय जनतेनी आपल्या सार्वभौमसत्तेला भाजप/आरएसएस च्या हाती सोपविले ती भाजपा/आरएसएस भारतीयांच्या सार्वभौमसत्तेला संपवू पाहत आहे.  अशा परिस्थितीत दलित-मागासवर्गीय-अल्पसंख्यांक वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी संसदेवरील निष्ठा ढासळू न देता देशातील भाजपा/आरएसएस च्या सत्तेला संवैधानिक मार्गानेच तोंड देण्यासाठी सदैव तयार असले पाहिजे.
देशातल्या जनतेच्या विश्वासावर उभी झालेली व जिवंत असलेली संसद जनप्रतिनिधींच्या व सत्तेवर असणाऱ्या सरकारच्या बेताल वागण्याने एका झटक्यात मोडून काढता येणार नाही.  जनतेच्या हितासाठी, त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या विकासासाठी, एकंदरीतच त्यांच्या दररोजच्या जीवन-मरणाच्या वाटचालीसाठी देशातला प्रत्येक नागरिक संसदेकडे अपेक्षेच्या नजरेने बघतो आहे.  त्यामुळे देशातल्या जनतेच्या अपेक्षांच्या नजरांना दलित-मागासवर्ग, स्पृश्य-अस्पृश्य, सवर्ण-अवर्ण, उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, हिंदू-मुस्लीम, आतंकवादी-नक्षलवादी, प्रतिगामी-पुरोगामी, हेडगेवारवादी-आंबेडकरवादी, गांधीवादी-जिन्नावादी, मुलतत्ववादी-सुधारणावादी, उद्योगपती-मजूर/श्रमिक, श्रीमंत-गरीब असे ठरविता येणार नाही.  फक्त कुण्या एका धर्माच्या, कुण्या एका जातीच्या, कुण्या एका वर्णाच्या, कुण्या एका वर्गाच्या, कुण्या एका विचाराच्या, त्या अपेक्षा नसून त्या सर्वच भारतीयांच्या अपेक्षा आहेत.  म्हणून फक्त काहींच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यांच्या पूर्ततेसाठी संसद चालविता येणार नाही.  भारताची संसद म्हणजे काही धर्मसंसद नव्हे किंवा नाही कुठली जात पंचायत.  १३४ करोड भारतीयांनी बनविलेली ही भारतीय संसद आहे.  याचा विसर हल्लीच्या सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधकांनाही पडू नये.  निकोप लोकशाहीसाठी व सुदृढ सांसदीय कार्यप्रणालीसाठी आपली जात, धर्म, पंथ, दर्जा घराच्या चार भिंतीच्या आत सोडून संसदेच्या आवारात प्रवेश करायचा आहे.  जात, धर्मं, पंथाचे पांघरलेले बुरखाधारी वस्त्र संसदेच्या दाराबाहेर उतरवून ‘भारतीयत्वाचा’ पेहराव करूनच संसदेत प्रवेश करायचा आहे.  तेव्हाच हा देश १३४ करोड जनतेचा भारत देश म्हणून ओळखला जाईल.  अन्यथा या देशाचे १३४ करोड तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. ज्याची अपेक्षा कुठलाही भारतीय नागरिक करू शकत नाही.
भारतीय नागरिकांच्या राजकीय नैराश्येपोटी भारतीय राजकारणाची पाऊले बदललेली आहेत. जनता राजकीय सज्ञान न झाल्याने भारतीय संसदेचा बाजार मांडला जातोय.  प्रत्येक भारतीयांच्या हक्काची सनद ज्या भारतीय संविधानात लिहून ठेवली गेली त्या भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या संसदेचे महत्व कमी करून एकप्रकारचा देशद्रोहच या देशात सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून केला जात आहे. याला वेळीच ओळखून त्यावर आळा घालण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने सज्ज झाले पाहिजे तरच या देशात ‘भारतीय’ टिकून राहील अन्यथा देशाचे वर्तमान व भविष्य धोक्यात येईल.
¤¤¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर,
नागपूर.Top of Form