Monday 27 February 2012

पराभवाची नैतिक जबाबदारी समाजाची


पराभवाची नैतिक जबाबदारी समाजाची
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.  ८७९३३९७२७५

महाराष्ट्रात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदा आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका झाल्या आहेत. कुणाला किती ? का ? आणि कश्या ? जागा मिळाल्या याची गोळाबेरीज करण्यात सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांची नेते मंडळी व्यस्त झाली आहे. कुणाचे कमी झाले, कुणाचे वाढले, कोण कुणासोबत गेला याचा हिशोब करता करता सत्तेसाठीची जुळवाजुळव सुरु झाली. हे सर्व करतांना काहींनी जुने संबंध नाकारून, कुठे जवळ घेऊन, कुठे लिलाव करून, तर कुठे पळवून लावून, तर काहींनी काहीही झाले तरी आम्ही सोबतच अशी भूमिका घेऊन सत्तेचे समीकरण जुळविण्यात आले. काही ठिकाणी ते जुळविले जात आहे. यात सर्वसामान्य मतदारांना कुठेच विचारात घेतले जात नाही. सामाजिक अभिवृत्तीला बाजूला सारून सारेच राजकीय पक्ष सत्तेचे मालक होऊ पाहत आहेत. जनतेने दिलेला कल हा त्यांच्या निवडीचा कल होता, की पैशाचा कल होता. की आणखी कुठल्या समीकरणाचा कल होता हे सप्रमाण लोकशाहीमध्ये सिद्ध होऊ शकणार नाही. परंतु अंदाज घेतला गेला तर निश्चितच लक्षात येऊ शकते.
सकस आणि सर्वसमावेशक लोकशाही व्यवस्थेची कल्पना संविधानकारांनी केली होती. ती फक्त कल्पनाच नव्हती तर संविधानरूपी दस्ताऐवज हे त्याचे वास्तववादी चित्रण/आराखडा होय. या आराखड्याला वास्तवात उतरविण्याची किमया या गणराज्याच्या ६२ वर्षात होऊ शकली नाही आणि आता ज्यांच्या हातात ही सत्ता पुन्हा एकदा विसावली जाणार आहे ते राजकीय पक्ष या आराखड्याला वास्तवात उतरविण्यासाठी किती प्रयत्नशील आहेत. याचा विचार भारतीय जनतेने करायला पाहिजे होता. परंतु या सर्व निवडणुकांमध्ये सर्वसामान्य मतदारानेही तो विचार केला असे दिसून येत नाही.
भारतीय लोकशाहीत वर्तमानातील पक्ष, राजकीय नेते मंडळी आणि कार्यकर्ते कुठल्या निकषावर काम करीत आहेत हे भारतीय नागरिकांना चांगल्याने अवगत आहे. त्यामुळेच लोकशाहीवर आणि वर्तमान व्यवस्थेवर बोटे मोडणारी माणसे गल्लीबोळात निर्माण होतांना दिसून येत आहेत. प्रतिगामी माणसे व समाज यांच्याकडून ते होणारही हे निर्विवाद सत्य आहे. कारण त्यांना ही माणसे बदलायची नाहीत. कारण यांचेच भांडवल त्यांना पुढे कामी पडणारे आहे. त्यांना ही व्यवस्थाच बदलायची आहे. आणि ही व्यवस्था बदलून पुन्हा एकदा याच वर्तमानातील राजकीय लुटारुंच्या माध्यमातून त्यांचेच भांडवल करून शोषित-पिडीत-मागास समाजाला वेठीस धरायचे आहे. संविधान बदलायचे आहे. जो या वर्तमानातील लुटारूंना वेळोवेळी रोखू पाहतो आहे. शोषित-पिडीत-मागास वर्गाला न्याय देण्यासाठी यांना बाध्य करतो आहे. ज्यामुळे यांची जातीवादी ध्येयधोरणे पूर्ण होऊ शकत नाही. मतदानाच्या पेट्या कुणाच्या बाजूने फुटल्या ? याचे या वर्गाला काहीही देणेघेणे नाही. कारण भारतात परिवर्तनवाद्यांच्या हातात सत्ता येणार नाही यावर यांचा विश्वास आहे. त्यामुळे कुणीही आला तरी तो यांचाच शिपाई असेल, यांचाच भाऊ असेल. आणि यांच्याच इशा-यावर नाचणारा माकड असेल. मतदार यापासून किती धडा घेणार? परिवर्तनवादी यापासून काय शिकणार ? व त्या आधारावर आपली पुढली राजकीय वाटचाल आणि ध्येयधोरणे हा परिवर्तनवादी वर्ग कशी ठरवणार ? यावर पुढल्या सत्तावादी निकालाचा कल ठरणार आहे.
भारतात परिवर्तनवाद्यांचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष, मार्क्सवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्याकडे बघितल्या जाते. आजतागायत रिपब्लिकन पक्षाच्या हातात सत्ता आली नाही. काही राज्य वगळता मार्क्सवादी पक्ष आपला राजकीय प्रभाव इतर राज्यांवर पाडू शकला नाही. समाजवादी पक्षांनी काही तुरळक उदाहरण सोडले तर सत्तेसाठी वारंवार आपली भूमिका बदलत गेले. मात्र केंद्रीय सत्तेच्या परिघात कधी येऊ शकले नाही. हे वास्तव स्वीकारतांनाच आपल्याला हे लक्षात येईल की कधी सत्तेच्या परिघात तर कधी सत्तेच्या परिघाबाहेर राहून या सर्व परिवर्तनवादी पक्षांनी आपले नियंत्रण सत्तावाद्यांवरून जराही कमी होऊ दिले नाही. भारतीय संविधान अंमलात आल्यानंतरच्या ६० वर्षात शोषित-पिडीत-मागास वर्गाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक रचनेत जो काही थोडाफार आमुलाग्र परिवर्तन झालेला दिसतो ते या परिवर्तनवादी पक्षांच्या नियंत्रणामुळेच दिसून येतो. पण आज तर दिवसेंदिवस परिवर्तनवाद्यांचे नियंत्रणही कमी होऊ लागले आहे. या पक्षांच्या हातात सत्ता तर आली नाही परंतु विरोधी पक्षाची भूमिकाही आता यांच्या हातातून निसटतांना पाहून भारतीय लोकशाही धोक्यात येत आहे. असे निर्विवाद दिसून येते. कारण यानंतरची सत्ता ही तर ज्यांच्या हातात होती त्यांच्याकडेच राहील परंतु नियंत्रणाची, विरोधी पक्षांची भूमिकाही त्यांच्याच पदरात पडल्याने "चोर चोर मौसेरे भाई" अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि मग शोषित-पिडीत-मागास समाजाच्या उत्थानाचा मार्ग बंद झाल्याशिवाय राहणार नाही. संविधानाने निर्धारित केलेली कल्याणकारी राज्याची संकल्पना यांच्या विषारी बहुपाश्यात चुरगाळली जाऊन सर्वसामान्य बहुजन वर्गाला मातीमोल करण्याचा जातीवादी, धर्माधिष्ठित राजकीय पक्षांचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा होईल.
रिपब्लिकन पक्ष, मार्क्सवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्याकडून जश्या अपेक्षा केल्या गेल्या त्या सर्व अपेक्षांवर आता पाणी फिरले आहे. संविधान निर्मितीनतरच्या काही वर्षानंतरच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या मार्क्सवादी, समाजवादी व समविचारी पक्ष संघटनांना रिपब्लिक सिद्धांताच्या आधारावर "भारतीय रिपब्लिकन पक्ष" या राजकीय पक्षाची निर्मिती करण्याचा संकल्प केला होता. तो त्यांच्या हयातीत पूर्ण झाला असता तर आजची देशाची परिस्थिती काही वेगळी दिसून आली असती. आजचे राजकीय चित्र काही वेगळे असते. परंतु जे झाले नाही त्यावर आता विचार करून काहीही लाभ होणार नाही. आजच्या वास्तवाला स्वीकारून भविष्याची वाट निर्धारित करता येईल का ? याचाच विचार आता व्हायला पाहिजे. आणि आजचे वास्तव असे आहे की, मार्क्सवादी पक्ष आपले विचार, सिद्धांत आणि कृती यांची योग्य सांगड घालण्यात अपयशी ठरले आहेत. वेळोवेळी बदलणारी राजकीय भूमिका ही मार्क्सवाद्यांच्या मूळावर बसली. तशीच राजकीय लाचारी ही रिपब्लिकन पक्षाच्या लयालाही कारणीभूत ठरली. समाजवादी पक्षांनी तर ते समाजवादी आहेत की भांडवलवादी आहेत, की जातीवादी, धर्मवादी आहेत हेच इथल्या समाजाला कळू दिले नाही. त्यामुळे समाजवादाचा धिंगाणा कधीच एका वाटेने चालला नाही.
रिपब्लिकन पक्षाकडून केल्या गेलेल्या अवास्तव अपेक्षा, घरच्याच दुष्मनांनी केलेले हमले आणि दूरदर्शी नेतृत्वाचा अभाव यामुळे सामाजिक आंदोलनात अग्रेसर असतांना सुद्धा रिपब्लिकन पक्ष भारतीय राजकारणात अस्पृश्य म्हणूनच गणल्या गेला. त्यामुळे या पक्षाची जी वाताहत झाली ती सर्वांना माहित आहे. राजकीय लाचारीचा कळस झाला असतांना देखील या पक्षांच्या नेत्यांचा स्वाभिमान उंचावला जाऊ नये, त्यांचा स्वाभिमान जागा होऊ नये हे मोठे आश्चर्याचे आहे. असे असतांनासुद्धा हे सर्व परिवर्तनवादी, पुरोगामी पक्ष आपली संघटीत शक्ती एकत्र करून नव्या राजकीय परिवर्तनाची सुरवात न करता स्वगृही बेगण्या लावण्याचेच काम करीत आहेत. या पक्षांकडून बहुजन समाजाला अनेक अपेक्षा आहेत. पण वाट आहे ती फक्त या परिवर्तनवादी पक्षांमधून येणा-या एखाद्या चक्रवर्ती नेत्याची. जो या सर्व समान दुव्यांना एकत्र करून बहुजनांच्या, भारतीय नागरिकांच्या कल्याणाचा संविधानरुपी दस्ताऐवज आपल्या समर्थ खांद्यावर पेलून धरेल. तसे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाजवळ आहे. परंतु डोळसपणे हे परिवर्तनवादी पक्ष आणि समाज त्या नेतृत्वाला का स्वीकारत नाही हे न उकलणारे कोडेच आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर महाराष्ट्रात मार्क्सवादी आणि समाजवादी पक्षांचा कुठलाही प्रभाव नाही. परंतु रिपब्लिकन पक्ष इथल्या मातीत रुजला आहे. तो इथल्या जनमानसात विसावला आहे. परंतु गटबाजी, फाटाफूट आणि नेतृत्व संघर्षाने रिपब्लिकन पक्ष स्वतःच स्वतःच्या अंतयात्रेत सामील होतांना दिसून येतो. या पक्षाची वारंवार होणारी पीछेहाट महाराष्ट्रातील पुरोगामी, परिवर्तनवादी समाजासाठी चिंतेची बाब ठरला आहे. अनेक प्रयत्न, अनेक प्रयोग, अनेक वाटा सर्व काही करून या पक्षाच्या पदरी फक्त आणि फक्त निराश्याच हाती येते. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे ४ मुख्य गट आहेत असे म्हणता येईल. दादासाहेब गवई यांच्या नेतृत्वात असणारा गट आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्याकडे असणारा रिपब्लिकन गट आता शेवटचे झटके घेत आहे. मग उरतात ते रामदास आठवले याच्या नेतृत्वात काम करणारा जो सध्या शिवसेना-भाजपा महायुतीच्या तबेल्याला बांधला गेला आहे. त्या तबेल्यात चारा मिळाला काय आणि नाही मिळाला काय रामदास आठवलेला तो तबेला सोडून जाण्याची परवानगी जणू मातोश्रीवरूनच घ्यावी लागेल. असे चित्र निर्माण झाले आहे. महायुतीचा फार्स उभा करून सत्तेची स्वप्न बघणारा आठवले गट मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये १ जागा घेऊन तोंडघशी पडतो तरी राज्यसभेच्या तिकीट खिडकीवर पहिल्या रांगेत उभे राहता यावे म्हणून आठवले त्या खिडकीवर आतापासून उभे झाले आहेत. राजकीय लाचारीचा इतका किळसवाना प्रयोग समाजाच्या आणि कार्यकर्त्यांच्या कसा पचनी पडतो ? ते त्यांच्या कार्यकर्त्यांनाचा विचारावे लागेल. कारण याचे उत्तर बहुतेक त्यांच्याकडेच असावे.
मग उरतो तो फक्त एक गट जो भारिप-बहुजन महासंघाच्या नावाने प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर या दूरदर्शी, अभ्यासू नेतृत्वाच्या हातात परिवर्तनवादी आणि बहुजन वर्गाच्या अस्तित्वासाठी स्वाभिमानाची लढाई लढून दिवसेंदिवस यश संपादन करीत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात बाळासाहेबांच्या नेतृत्वातील भारिप-बहुजन महासंघाला यश संपादन करता आले. अनेक ठिकाणी सत्तेवर विराजमान होता आले. परंतु या पक्षाला एक अभिशाप लागलेला आहे. परिवर्तनवादी आणि आंबेडकरी समाज अजूनही या पक्षाकडे आशाळभूत नजरेने न बघता वारंवार दुर्लक्षित करीत आहे. इथल्या सत्तावाद्यांनी या पक्षाविषयी आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाविषयी आखलेल्या षडयंत्राला समाज बळी पडत आहे. आणि त्यामुळेच बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्षाला खिंडार पडत आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका व महानगरपालिका यांच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी घवघवीत यश संपादन करून देखील कुठल्याही प्रसिद्धी माध्यमांमधून भारिप बहुजन महासंघाची चर्चा होत नाही. मात्र १ जागा जिंकून आणणारे आठवले आणि बसपा प्रसिद्धी माध्यमांच्या नजरेच्या आड जात नाही. यावरून हे सिद्ध होते की आठवले किंवा बसपा हे इथल्या सत्तावाद्यांसाठी, जातीवाद्यांसाठी, धर्मवाद्यांसाठी धोक्याचे नाहीत. भविष्यकाळात सत्तावाद्यांची सत्ता हिसकावून लावण्याची ताकत भारिप-बहुजन महासंघ आणि बाळासाहेब यांच्याकडे आहे. आणि त्यामुळे त्यांना व त्यांच्या पक्षाला प्रसिद्धी मध्यमापासून दूर ठेऊन समाजापासून दूर सारण्याचा प्रयत्न गेल्या कित्त्येक वर्षापासून सुरु आहे. महाराष्ट्रात भारिप बहुजन महासंघाचे बसपा पेक्षा जास्त उमेदवार निवडून आले असले तरी महाराष्ट्रात आता जणू बसपाची सत्ता येणार अश्या तो-यात प्रसिद्धीमाध्यमे वावरू लागली आहेत. त्यामुळे बसपा चे कार्यकर्ते सुद्धा त्याच आविर्भावात स्वतःची पाट थोपटून घेत आहेत. वास्तव मात्र वेगळेच आहे.
या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वाटचालीकडे समाजाचे लक्ष लागून होते. परंतु रिपब्लिकन पक्षातील नेतृत्वसंघर्ष आणि सत्तेसाठीची लाचारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याने समाजाची निराशाच झाली. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी आणि आंबेडकरवादी समाजाने प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पर्याय नसल्याने बसपा कडे वळले गेले. नागपूर महानगर पालिकेत बसपा ला 12 जागा निवडून आणता आल्या.  हे बसपाची शक्ती वाढल्यामुळे किंवा महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजाने बसपला स्वीकारले आहे यामुळे नव्हे तर प्रस्थापितांना झिडकारून रिपाईच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी समाजाने केलेल्या दुहेरी रणनीतीचा भाग आहे. समाज रिपब्लिकन पक्षाविषयी अजूनही आशादायी आहे. समाज वाट पाहत आहे. नेतृत्वाची, स्वाभिमानी पर्यायाची. समाजाने आखलेल्या रणनितीतून समाज बाहेर पडण्याआधी समाजासमोर आता रिपाई चा एकमेव पर्याय इथल्या नवतरुणांनी ठेवला पाहिजे. भारिप बहुजन महासंघ आणि बाळासाहेब हा एकमेव पर्याय आंबेडकरी समाजासमोर आणि परिवर्तनवादी बहुजन समाजासमोर उभा राहू शकतो. नागपूर महानगर पालिकेत भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला गेला असता. तर बसपला नागपूर मध्ये 12 उमेदवार निवडून आणता आले नसते. भारिप बहुजन महासंघाला पूर्व विदर्भात आणि मुळात नागपूर मध्ये योग्य पदाधिकारी न लाभल्याने इथे बाळासाहेबांना आपले पाय रोवता आले नाही. अन्यथा नागपूर हाच भारिप बहुजन महासंघाचा बालेकिल्ला बनविता आला असता.
काळ कधीच थांबत नसतो. प्रत्येक प्रश्नाला उत्तरही काळच देत असतो. भारतातील राजकीय परिस्थिती या समाजाला खास करून शोषित-पिडीत-मागास समाजाला कुठल्या दिशेने घेऊन जाते,  हे परिवर्तनवादी आणि रिपब्लिकन पक्षांच्या भविष्यकालीन वाटचालीवर निर्भर राहणार आहे. आजपर्यंत नेतृत्व संघर्षाने समाज विभाजित झाला त्यामुळे आमची राजकीय संघटीत शक्ती अबाधित राहू शकली नाही. त्यासाठी नेत्यांच्या एक्याचेही प्रयोग अनेकदा करण्यात आले. थोड्याफार प्रमाणात ते यशस्वी होऊन पुन्हा निराशाच पदरी पडली आहे. त्यामुळे आता दुभंगलेला समाज, विघटीत झालेला, विभाजित झालेला समाज एकत्र, एकसंघ करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नेतृत्वांना बाजूला सारून पुन्हा समाजाला एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत एकसंघ करण्याची वेळ आली आहे. रिपब्लिकन सिद्धांताला धरून राजकीय निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आणि ही जबाबदारी इथल्या आंबेडकरी तरुणांची आहे. या समाजातल्या सुशिक्षित तरुणांची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आणि स्थापलेला एकमेव पर्याय समाजाला देऊन समाज त्या पर्यायाच्या पाठीशी उभे करण्याची जबाबदारी आता तरुणांची आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अश्या प्रत्येकच क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हक्काचे घर दिले आहे. त्या सर्व संस्था संघटनांना समाज रेट्याने एकत्र आणून समाजाची नव्याने वाटचाल सुरु करावी लागणार आहे. पराभूतांची विजयी मिरवणूक काढण्यापेक्षा पराभवाची नैतिक जबाबदारी समाजाने घेऊन उद्याच्या विजयाची मुहुर्तमेढ आजच्या सामाजिक एकत्रीकरणाच्या निर्णयातून करावी लागणार आहे.

डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.  ८७९३३९७२७५ 

Saturday 18 February 2012

रिपब्लिकन जनता ऐक्य संदेश स्कूटर रैली (दीक्षाभूमि से चैत्यभूमि) दि. १४-०४-२०१२

रिपब्लिकन जनता ऐक्य संदेश स्कूटर रैली  (दीक्षाभूमि से चैत्यभूमि)
दि. १४-०४-२०१२

भारत का हर नागरिक खुद को रिपब्लिकन कहने में गर्व महसूस करना चाहिए था ! लेकिन आज इससे विपरीत परिस्थितिया देखने को मिलाती है ! डॉ. बाबासाहब आंबेडकर जी ने रिपब्लिक सिंद्धांत पर चलने वाले राजनितिक पार्टीका सपना देखा था ! आंबेडकरवादियोने इस सपने को साकार करने की कोशिश भी की लेकिन समाज संघटित न होने के कारन नेताओ पर नियंत्रण नहीं रह सका ! आज तो रिपब्लिकन ये नाम सिर्फ और सिर्फ आंबेडकरवादियों के लिए लिया जाता है ! इसलिए समाज को संघटित कर आंबेडकरी आन्दोलन को एक सही दिशा में चलने के लिए आंबेडकरी समाज के युवा वर्ग को साथ लेकर पुरे महाराष्ट्र में दि. १४ एप्रिल २०१२ से "रिपब्लिकन जनता ऐक्य संदेश स्कूटर रैली  (दीक्षाभूमि से चैत्यभूमि)" का आयोजन किया गया है ! आप सभी से विनती है की आप सभी इस कार्य में तन, मन, धन से समर्पित होकर हमारे समाज के भविष्य को सुरक्षित करने में अपना योगदान दे !

रिपब्लिकन जनता ऐक्य संदेश स्कूटर रैली  (दीक्षाभूमि से चैत्यभूमि) के
धेय्य और उद्दिष्ट
१.    भारतीय संविधान के बारे में भारतीय समाज में जागरूकता बढ़ाना !
२.    आंबेडकरी समाज का ऐक्य बनाना !
३.   मागासवर्गीय/ अनुसूचित जाती/जनजाति/ अल्पसंख्यांक समुदाय के लोगो को उनके हक़ और अधिकार के बारे में जागरूक करना !
४.   आंबेडकरी युवा वर्ग को संघटीत करना और रिपब्लिकन पार्टी की संघटित नीव रखना. लेकिन उसके पहले विघटित हुए समाज को इकट्ठा करना !
५.   देश की राजनीतिक व्यवस्था और अभी की अवस्था के बारे में लोगो में जागरुकता बढाना !
६.   डॉ. बाबासाहाब आंबेडकर के संकल्प के अनुसार "मै प्रथम भारतीय, और अंत में भी भारतीय" यह संकल्प समाज में प्रचारित और प्रसारित करना !
7.  आंबेडकरी समाज में सामाजिक, आर्थिक, राजनितिक, सांकृतिक और शैक्षणिक ढांचे की नीव रखना !
८.  बेरोजगार आंबेडकरी युवा वर्ग के लिये व्यावसायिक तौर पर मौलिक ढाचे की नीव रखना !

इन सभी धेय्य और उद्दिष्ट को लेकर यह संदेश रैली महाराष्ट्र के सभी तहसील, नगर और जिल्हो से गुजरेगी. इस रैली का समापन मुंबई में चैत्यभूमि पर होगा !

सूचना :- इस मौलिक कार्य में आप जिस किसी प्रकार से सहयोग करना चाहते है वो कर सकते है ! आपके सुझाव भी आमंत्रित है ! इस रैली को सफल बनाने के लिए हर एक सदस्य के सुझाये गए उपायों पर अमल किया जायेगा ! धेय्य और उद्धिष्ट में भी बदलाव किया जा सकता है ! 

लोकशाही विश्वविद्यालयातील अनुतीर्ण विद्यार्थी


लोकशाही विश्वविद्यालयातील अनुतीर्ण विद्यार्थी
----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

व्यवस्थेच्या परिघातून जातांना प्रत्येकालाच अग्निदिव्याचा सामना करावा लागतो. यश किंवा अपयश याशिवाय दुसरे कुठलेही निकाल त्यातून मिळत नाही. भारतीय व्यवस्थेच्या संदर्भाने बोलायचे म्हटले तर मात्र यशापयशाच्या पातळ्या विरघडून पडतात. कारण एकीकडे व्यवस्था यशस्वी ठरली असा जागतिक अनुमान लावला जातो तर दुसरीकडे स्वकियांकडून व्यवस्थाच कोलमडली आहे अशी आगडोंब ठोकली जात आहे. प्रश्न काहीही असो उत्तर एकाच आणि अनेक उत्तरांचा एकाच प्रश्न अशी विचित्र परिस्थिती आज देशांतर्गत हालचालींवरून दिसून येत आहे. संविधानाच्या रूपाने देशांतर्गत व्यवस्थेला नावारूपास आलेला अभ्यासक्रम बहाल करण्यात आला असला तरीही भारतीय लोकशाहीच्या विश्वविद्यापिठातून कल्याणकारी लोकशाहीचा अभ्यासक्रम चालविला जात नाही हि खरी या देशाची शोकांतिका आहे.
                                                                               
माणूस मोठा व्हावा. माणसांचे कल्याण व्हावे. माणूस म्हणून माणसांची ओळख निर्माण व्हावी. प्रत्येकाला न्याय मिळावा. प्रत्येकाचा सन्मान व्हावा. संधी पासून कुणीही अलिप्त राहू नये. या ध्येय आणि उद्धीष्टांना अनुसरून उभी झालेली भारतीय लोकशाही या विश्वविद्यालयातील अनुतीर्ण विद्यार्थ्यांनी मोडीत काढली आहे. व्यवस्थेचे यशापयश हे ती व्यवस्था चालविण-यांवर अवलंबून असते. व्यवस्थेवर नाही. हे साधे सोपे सूत्र अवगत असतांनाही आम्ही वारंवार लोकशाही विश्वविद्यालयाच्या कल्याणकारी अभ्यासक्रमात अनुतीर्ण का होत आहोत ? याचा शोध आता प्रत्येकाने घ्यायचा आहे.

भारतीय लोकशाही ख-या अर्थाने एक विश्वविद्यालय आहे. परंतु हे विश्वविद्यालय ज्यांच्या माध्यमातून चालविले जाते ते कर्मचारीरूपी भ्रष्टाचारी वर्ग आणि निर्णय निर्धारण प्रक्रियेत सहभागी असणारे उमेदवाररुपी राजकारणाचे ठेकेदार आणि या ठेकेदारांना निविदा काढून निवडून देणारे निवड समितीरुपी भारतीय नागरिक हे कुठल्या आधारावर निवड करत आहेत. याचा गोषवारा घेणे आवश्यक ठरले आहे. जातीचा निकस हा तर यांच्या विषारी रक्ताचाच नमुना आहे. एडस सारखा महाभयंकर विषारी रोग जरी यांच्या रक्तात असला तरी उमेदवार हा जातीचा आहे म्हणून त्याला पहिली पसंती दिली जाईल. इतकी कुबुद्धी भारतीय नागरिकांमध्ये जीवाणू पसरावे तशी यांच्या रक्तातून झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीच्या विश्वविद्यालयात फक्त काही नवे वगळली तर ९९ % विद्यार्थी अनुतीर्णच झालेली आहेत. इथे पास होण्यासाठी वशिला दिला जातो. जात आणि धर्म हा पहिला हप्ता असतो पण ऐन निवडीच्या दिवशी खोके पोहचविले जातात. खोके देणारा देतो घेणारा घेतो. मग खोके देणारा पुढील ५ वर्ष खोके जमा करतो आणि घेणारा गप्प बसतो. इथे शिक्षण, योग्यता, कार्यक्षमता कशाचाच निकष लागत नाही. त्यामुळे अडाणी विद्यार्थी कल्याणकारी अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत प्रवेश करतात आणि होत्याचे नव्हते करून टाकतात.

भारतीय लोकशाहीच्या विश्वविद्यालयात आजपर्यंत प्रत्येकच (अपवाद वगळून) अनुतीर्ण होत आला आहे. असे का होते ? संविधानाच्या रूपातील अभ्यासक्रम पेलविला जात नाही की तो अभ्यासक्रम समजून घेऊन अग्निपरीक्षा देण्याची कुवत आमच्या उमेदवार विद्यार्थ्यांमध्ये नाही. जातीच्या आणि खोक्याच्या निकषाने यांनी यांची कुवतच घालवून टाकली आहे. पण त्यासोबतच मताच्या बीजगणितात आम्ही आमचे सर्व विषय गमावून बसलेलो आहोत. मतांच्या बीजगणितापेक्षा कल्याणाचे भूगोल, संधीचे समाजशास्त्र, समानतेचे भाषाशास्त्र आणि विकासाचा इतिहास आम्ही जास्त लक्षात घेणे गरजेचे होते. परंतु या विषयांकडे इथल्या नागरिकांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे आमचे उमेदवाररुपी विद्यार्थी या विषयापासून वंचितच राहिले आणि मतांच्या बीजगणितात सरस ठरले. त्यामुळे महत्वाचे विषय मागे पडत जाऊन त्यात संपूर्ण समाजच भरडत गेला.

राजकीय पक्षाचे वारूळ आज इतके फोफावत चालले आहे की त्यामुळे लोकशाहीचे शिक्षण घेतले नाही तरी चालेल, संविधानाचे अभ्यासक्रम पूर्ण केले नाही तरी चालेल, मात्र पैसा, जात आणि धर्म या तीन पदव्या ज्यांच्या जवळ आहेत तोच खरा लोकशाही विश्वविद्यालयाचा उमेदवार अशी जणू परंपराच आम्ही निर्माण करून टाकली आहे. भारतीय सामाजिक परिस्थिती आणि एकंदर सामाजिक वातावरण लक्षात घेतले तर ही परंपरा कितपत योग्य आहे ? याचा शोध आणि बोध घेतला जाऊ शकतो. राजकीय पक्षांचे हे बुजगावणे या व्यवस्थेला गिळंकृत करतील अशी पुसटशी कल्पनासुद्धा संविधानकारांनी केली नसावी. स्वतंत्र, स्वयंभू, सर्वसंपन्न, सर्वमान्य, सर्वश्रुत, सार्वकालिक संविधानाची मांडणी करतांना जगातील लोकशाही व्यवस्थांचे हे नंदनवन व्हावे अशी स्वप्ने संविधानकरांनी पाहीली होती. परंतु लोकशाही व्यवस्थेचे हे विश्वविद्यालय अनुतीर्णांचे कारखाने आम्ही कसे बनविले ? याचा विचार करण्याची गरज आता भारतीय नागरिकांवर येऊन पडलेली आहे.

भारतीय लोकशाही विश्वविद्यालयाचे यश टिकवून ठेवण्याची जबाबदारी जशी इथल्या कर्मचा-यांची आणि सत्ताधा-यांची होती तशीच हे कर्मचारी आणि सत्ताधा-यांची निवड करणा-या इथल्या जनतेची सुद्धा होती. कारण आम्हीच त्यांची निवड केली होती. फक्त या अनाडी आणि अनुतीर्ण सत्ताधा-यांना दोष देऊन चालणार नाही तर अपयशाची नैतिक जबाबदारी ही आम्हाला सुद्धा घ्यावी लागणार आहे. "दाताने ओठ चावला गेला तर दोष कुणाला द्यायचा "? तो दोष आमचा आहे. तो दोष आमच्यात नसलेल्या कुवतीचा आहे. तो दोष आम्ही केलेल्या कृतीचा आहे. तो दोष आमच्यामधल्या अज्ञानाचा आहे. आमच्यामध्ये निवड क्षमता नाही याचा तो दोष आहे. अन्यथा या विश्वविद्यालयातील उमेदवाररुपी प्रत्येकच विद्यार्थी जगाचा आदर्श बनला असता. मागील 60-70 वर्षात काय मिळविले ? आणि काय गमाविले ? याचा मागोवा घेण्यात व्यस्त राहून भविष्याला ताटकळत उभे ठेवण्यात वर्तमानासोबत भविष्यालाही आम्ही संपविणार आहोत. आता गरज आहे की आम्ही आमचे उमेदवार कुठल्या प्रक्रियेद्वारे निवडतो ? कुठल्या निकषावर आम्ही त्यांची निवड करतो ? भारतीय नागरिक म्हणून भारतीय लोकशाही विश्वविद्यालयातील उमेदवार निवड समितीचा सदस्य अशी भूमिका बजावतांना आम्ही कुठली भूमिका घेता आणि कुठले निर्णय घेतो त्यावर आपल्या लोकशाही विश्वविद्यालयाचे भविष्य निर्धारित होणार आहे.

भारतीय लोकशाही विश्वविद्यालयात प्रवेश करून राष्ट्रपती, पंतप्रधान पदाची स्वप्ने बघणारे हजारो लाखो विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देतात. काही उत्तीर्ण होतात तर काही अनुतीर्ण परंतु नैतिक सत्तेच्या परिपाठात सारेच नापास ! कारण निवडीच्या कसोट्या पूर्ण करणारा कधी आम्ही निवडला नाही आणि कुठल्याच कसोटीत न बसणारा  आम्ही कधी निवडीपासून दूर ठेवला नाही. त्यामुळे कुवत असणारा कमकुवत तर झालाच पण त्यासोबत कुवत नसणा-याने आम्हालाही कमकुवत बनवून टाकले आहे. ही परिस्थिती बदलावी लागणार आहे. आमच्या निवडीचे निर्णय आम्हालाच बदलावे लागणार आहे. "Power corrupt man but absolute power corrupt system" हे आम्हाला चांगल्याने अवगत आहे. त्यामुळेच आम्ही  बंदराच्या हातात कोलीत देऊन आम्ही स्वतःच्या पार्श्वभागावर आग लावून घेतली आहे. म्हणून जळतो कोण ? आणि जळतो कोण ? हे सांगण्याचे धाडसही आमच्यात राहिलेले नाही. त्यापेक्षा Resposibility makes the Acountability and Acountability makes the society याला आम्ही का महत्व देत नाही. आमचे विद्यार्थी हे उत्तरदायी का नाहीत ? याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
 
आज दिवसागणिक भारतीय लोकशाही विश्वविद्यालयाचे वर्गरूपी राजकीय पक्ष निर्माण होत आहेत. बंदरांची पिलावळ रानमेवा सोडून शहरी सुखामेवा खाण्यासाठी इकडून तिकडे वारंवार कोलांडउड्या मारीत आहेत. सत्ता माणसाला भ्रष्ट करते परंतु निरंकुश सत्ता व्यवस्थेला भ्रष्ट करते. आम्ही काहींच्या हातात अशीच निरंकुश सत्ता सोपविल्याने संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट बनली. राजकीय शहाणपण आणि राजकीय समज यांच्या अभावाने भारतीय समाज पुरता पोखरला गेला आहे. भारतीय संविधानाने दिलेली लोकशाही आणि त्यासाठी करावे लागणारे राजकारण यांची सांगड घालतांना कुठेतरी भारतीय समाज अयशस्वी ठरत आहे. समाजशील राजकारण आणि सत्ताकेंद्री, सत्ताप्रभावी राजकारण यांची योग्य सांगड आणि मांडणी करण्यात सध्याच्या संविधानाच्या अभ्यासकापासून तर राजकारणाच्या सारीपाटाचे  मोहरे चालविणा-या राजकारण्यांपर्यंत सारेच अनुतीर्ण झाले आहेत.

फक्त सत्तावादी राजकारण या समीकरणातून बाहेर पडून सहभागीत्वाचे राजकारण, समाजशील राजकारणाची संकल्पना तळागाळातल्या समाजापर्यंत, माणसांपर्यंत कशी रुजविता येईल याच विचा अजूनही समाजासमोर मांडला जात नाही. तो मांडला गेला पाहिजे. संविधानाने मतदानाचा हक्क दिला म्हणून तो बजावायचा किंवा सत्तेच्या मोहमालेत कुणाला तरी सारथी करून त्या बळावर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायचे ही राजकीय गलथानपणाची मांडणी दूर सारून निवडणुका व त्याचे राजकारण याकडे बघण्याची दृष्टी जोपर्यंत भारतीय माणसाला लागत नाही तोपर्यंत भारतीय लोकशाहीचे हे विश्वविद्यालय आपल्या अंतिम उद्दिष्ठापर्यंत पोहचू शकणार नाही.  भारतीय नागरिक म्हणून आपले हक्क बजावतांना आम्ही कुठल्या आधारावर आपला प्रतिनिधी निवडतो हे सर्वश्रुत आहे. या सर्वश्रुत प्रक्रियेला जोपर्यंत आम्ही बदलणार नाही तोपर्यंत आमच्या लोकशाही विश्वविद्यालयातील उमेदवार (विद्यार्थी) उत्तीर्ण होण्याच्या सीमारेषेपर्यंत पोहचू शकणार नाही. निवडून येणे म्हणजे उत्तीर्ण होणे. किंवा सत्तेवर येणे म्हणजे सीमारेषा ओलांडणे होत नाही. म्हणून वेळ आपली आहे. वेळ आपल्याच हातात आहे. आणि उद्याचा काळही आपल्याच हातात राहणार आहे. निर्भर आहे की आपण वर्तमानात काय निर्णय घेणार आहोत आणि भविष्याचे मार्ग कसे निश्चित करणार आहोत. लोकशाही विश्वविद्यालयातील उमेदवारांचे (विद्यार्थ्यांचे) भवितव्य त्यावरच निर्भर राहणार आहे.
 
----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१
 






Thursday 16 February 2012

तू आलीस तेव्हा...............

तू आलीस तेव्हा...............

सूर्य मावळतांना तू आलीस तेव्हा
परिक्रमा थांबून दिशा बदलून गेल्या
मावळतीचा सूर्य अचानक उगवायला निघाला
चटके देणारी उन्ह कोवळी वाटायला लागली
तू आलीस तेव्हा...............

पक्षांची किलबिल क्षणात शांत झाली
कोंबड्यांची बांग गाव जागवू लागली
गावातली हलचल रस्त्यावर येऊ लागली
जणू तुझ्या स्वागतासाठी गावाची कूस भरू लागली
तू आलीस तेव्हा...............

गायीचे वासरू ममतेसाठी पळू लागले
तुला पाहून गायीचा पान्हाही दाटू लागला
गावाच्या शिवारावर नगारा वाजू लागला
मुक्काम पोस्ट आता हेच म्हणू लागला
तू आलीस तेव्हा...............
----डॉ. संदीप 

Sunday 12 February 2012

रिपब्लिक नावाचा राजकीय बोधिवृक्ष…


रिपब्लिक नावाचा राजकीय बोधिवृक्ष…
---डॉ. संदीप नंदेश्वर.

अविचाराने विचार संपतात पण विचाराने विचार प्रगल्भ होतात. वैचारिक आंदोलनाच्या नावाने अविचाराने काही संस्था संघटनांनी अन्य (ओबीसी) समाजापर्यंत विचार पोहविणे गरजेचे आहे असे सांगून विचारात संभ्रम निर्माण केला. आणि आजही काही संस्था संघटना अश्याच प्रकारची बतावणी करून अविचाराने विचार संपविण्याच्या प्रयत्नात आहे. काहींनी तर स्वतःला विकून आपली दुकाने(राजकीय पक्ष) मांडली. काहींची दुकाने चालली आणि काहींची बंद पडली. तर काहींना ग्राहक भेटत नाही अशी अवस्था निर्माण झाली. ज्यांची दुकाने (राजकीय पक्ष) चालली त्यांनी तर स्वतःला विचारांचा कारखानाच बनवून टाकला. ग्राहकांची वर्गवारी करून त्यांना खुश करण्यासाठी विचारांचे वेगवेगळे विकावू साहित्य आणि विचारांचे जन्मदाते निर्माण केले. असे म्हणा कि त्यांचे नामकरण यांनीच केले. आणि ज्यांची दुकाने (राजकीय पक्ष) चालली नाही त्यांनी आपल्या जुन्याच वस्तू (एकच विचार) वेगवेगळ्या बाजारात नेऊन भाव वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही प्रकारची दुकाने आणि दुकानदार विचारांना अपेक्षित कृती कार्यक्रम देऊ न शकल्याने सामाजिक आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेत अयशस्वी ठरलेत.

ज्यांची दुकाने (राजकीय पक्ष) चालली त्यांनी तर ज्या विचारांवर आपली दुकान थाटली आहे अशी बतावणी केली होती ते विचार बाजूला सारून सत्तेच्या सारीपाटात नवनव्या वस्तू वाटाव्या तसे नवनव्या विचारांचा धंदा करू लागले. हे विचार मांडणारे (पोखरून काढलेले) तर यांच्यासाठी भांडवलच बनले. निदान ज्यांचे दुकान चालले नाही त्यांनी तरी "जुने ते सोने" म्हणून एकाच विचारांना धरून राहिले. जरी त्यांचे बाजार बदलत राहिले असले तरी. म्हणून त्यांचे धन्यवादच मानावे लागतील. पण धन्यवाद मानून त्यांना मोकळे सोडता येणार नाही तर आता त्यांच्या अंगावरची गेंड्याची साल सोलून आपल्या विचारांना साजेशी दुकान सजवून, थाटामाटाने बदललेल्या बजारात उतरावे लागणार आहे.
  
विचारांच्या शुद्ध कृतीकार्यक्रमातून विचारांना जे बळ प्राप्त होते ते बळ ज्यांनी वैचारिक आंदोलने चालवली आणि नंतर त्याचीच दुकाने बनविली त्यांच्या वैचारिक आंदोलनाला कधीच आले नाही. कुठलेही विचार तोपर्यंतच दीर्घायुषी ठरत नाही जोपर्यंत त्या विचारांना साजेशी आणि पूरक वैचारिक कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात येत नाही. मात्र यांच्या अविचारी वैचारिक आंदोलनात वेळ वाया गेला. शक्ती वाया गेली. पैसा वाया गेला. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ३ ते ४ पिढ्या वाया गेल्या. चक्क बरबाद झाल्या. तरीही आश्चर्य हे आहे कि आजच्या आधुनिक जगातल्या काही पिढ्यासुद्धा त्याच अविचारी वैचारिक आंदोलनात बरबाद होऊ पाहत आहेत. आणखी किती बरबाद व्हायचे आणि किती बरबाद करायचे ? हा प्रश्न तुमच्या आमच्यावर येऊन पडला आहे. निव्वळ विचार पेरून परिवर्तन होईल कि त्यासाठी काही कृती कार्यक्रमाची आखणी करावी लागेल ? निव्वळ विचार पेरून, विचार सांगून भूक भागेल का ? विचार जगण्याचा आधार जरी असला तरी सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या विचारांच्या आधारावर जीवनाच्या दैनंदिन गरजा भागविणारी साधने उपलब्ध झाली पाहिजे. निदान सर्वसामान्य माणसांपर्यंत ती साधने पोहचविण्याची यंत्रणा तरी उभी झाली पाहिजे. आणि त्यासाठीच कृती कार्यक्रमाची आखणी होणे गरजेचे आहे.

आधुनिक पिढी विचारांच्या कृती कार्यक्रमावर कितपत अंमलबजावणी करते त्यावरच आंबेडकरी विचाराची घरेलू बाजारपेठ निर्भर राहणार आहे. कारण परदेशी बाजारपेठेत आंबेडकरी विचार अनमोल आहेत. हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. अमेरिका, इंग्लंड सारख्या विकसित देश्यात आंबेडकरी विचार विद्यापीठीय स्तरावरून शिकले आणि शिकविले जातात. यापेक्षा दुसरा पुरावा त्यासाठी द्यावा लागू नये. आम्हाला आमची विस्कटलेली घरेलू बाजारपेठ सावरावी लागणार आहे. थाटलेली आपापली दुकाने बंद पाडून त्याऐवजी शॉपिंग माल उभे करावे लागणार आहे. जिथे आंबेडकरी विचारांना, आंबेडकरी विचारांच्या कारखान्यात तयार होणारे वेगवेगळे प्रोडक्ट अगदी सहजरीत्या ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता येईल. जग बदललेले आहे. पिढी बदलली आहे. यंत्रणा बदलली आहे. प्रक्रिया बदलली आहे. वेळ बदलला. काळ बदलला. मात्र परिस्थिती आणि गरज जशीच्या तशीच आहे. याच परिस्थितीच्या आणि गरजेच्या पोटी आंबेडकरी विचारांचा ग्राहक प्रोडक्ट मिळविण्यासाठी भटकत आहे. कधी या दुकानात तर कधी त्या दुकानात.

इथे फक्त ग्राहकच भटकत नाही तर आंबेडकरी विचारांची दुकान चालविणारेसुद्धा भटकत आहेत. कधी या बाजारपेठेत तर कधी त्या बाजारपेठेत. त्यांची ही पायपीट मुलभूत आहे. त्याला ती करावीच लागणार आहे. कारण आंबेडकरी विचारांच्या प्रोडक्ट शिवाय तो जगूच शकत नाही. याला त्याची लाचारी म्हणायची ? की ती त्याची निकड ? त्यापेक्षा आंबेडकरी विचारांचे शॉपिंग माल का उभारले जात नाही.

अगदी अवकळा आलेल्या दुकानासारखी परिस्थिती झालेली आहे. अशी टीका मी करणार नाही आणि तशी टीका करण्याचा अधिकार तुम्हालाही नाही. इतकेच काय कुणालाच नाही. दुकान कसे चालवायचे, ते कसे सुशोभित करायचे हा व्यक्तिगत मुद्दा असू शकतो. परंतु आंबेडकरी विचार जिथेही आहेत तिथे मात्र परिवर्तन आहे. तिथे विकास आहे. तिथे जीवनाच्या संघर्षावर मात करण्याची ताकत आहे. नव्या उमेदीने अपयशाला पायदळी तुडवून नव्या यशाच्या शिखरावर चढण्याची जिद्द आहे. नवी वाट आहे. नवी पहाट आहे. नवा सूर्य आहे. नवा प्रकाश आहे. जीवनाचा यशस्वी मार्ग म्हणजे आंबेडकरी विचार आहे. इथे फार निराश होण्यासारखी परिस्थिती नाही. उमेदीने थकून जाऊन पायात बेड्या अडकविण्याची वेळ नाही. हात बांधून यशाकडे पाठ फिरविण्याची वेळ नाही. वेळ आहे ती पायात जखडलेल्या बेड्या तोडून टाकण्याची. वेळ आहे हाताला सैल करून यशाला कवटाळण्याची. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीला आपल्या बाजूने वाकविण्याची. अंगातल्या बळापेक्षा तुमच्या शिर्षभागावरील मेंदूत साठवून ठेवलेल्या आंबेडकरी विचारांना कृतीत उतरविण्याची. सर्वसामान्य, दीनदुबळ्या, गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी एक विकासवेल फुलविण्याची. पालन पोषण करून ठरविलेल्या आराखड्यात उपलब्ध साधने आणि संसाधनाचा वापर करून मानवी कल्याणाचा बगीचा फुलविण्याची.

आंबेडकरी विचार इथल्या बाजारपेठेच्या नेहमीच शिर्षस्थानावर राहिलेले आहेत. आंबेडकरी विचारांचे भांडवलदार, दलाल आणि व्यापारीसुद्धा नेहमीच वरचढ ठरले आहेत. कारण या विचारांचे ग्राहक (गरजू , उपभोक्ते, समाज) इतके आहेत की कितीही दुकाने उघडली (राजकीय पक्ष), कितीही व्यापारी आले (नेते), कितीही दलाल आले (कार्यकर्ते), कितीही भांडवलदार आले (राष्ट्रीय नेते), कितीही बाजारपेठा (व्यवस्था) नव्याने उघडल्या तरी आंबेडकरी विचारांची मागणी कमी होणार नाही. आणि पुरवठाही कमी होणार नाही. उलट जसाजसा काळ बदलत जाईल, वेळ बदलत जाईल, समस्या बदलत जातील तसतशी आंबेडकरी विचारांची मागणीही वाढत जाईल. हेच आंबेडकरी विचारांचे सामर्थ्य आहे. कारण हे विचार बुद्धाच्या मजबूत पायावर (base) उभे आहेत.

भांडवलदार, व्यापारी आणि दलाल यांच्यातल्या स्पर्धेने सर्वसामान्य आंबेडकरी विचारांचा उपभोक्ता हवालदिल झाला आहे. त्यात काहींनी तर कहरच केला आहे. आम्ही सांगतो तेच आंबेडकरी विचार. आम्ही करतो तेच समाजकार्य. आम्ही करतो तीच कल्याणकारी आंदोलने. आणि आम्ही करतो तेच यशस्वी राजकारण. विचार असले काय आणि नसले काय ? त्याचे या लोकांना काहीही देणेघेणे नाही. सत्ता असली की सर्व सोयी सुविधा विकत घेता येतील. माणसांच्या भावनिक व वैचारिक गरजा भागविता येतील. सत्तेने धम्म गतिमान होईल. माफ करा यांच्या डोक्यात धम्म कधीच येत नाही. यांचा धर्म सत्तेशिवाय गतीमानच होत नाही. बरे सत्ता मिळाली तरी ती त्यांना अमर्याद सत्ता हवी आहे. थोड्याश्या सत्तेने यांचे भागत नाही. बाजारात मंदी भरल्याशिवाय जसे भाव उतरत नाही. तसेच अवास्तव, अमर्याद सत्ता मिळाल्याशिवाय यांना धर्म आठवतच नाही आणि आठवणार नाही. इतकेच नाही तर आंबेडकरी विचारांच्या आधारावर कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे भरण पोषणाचे  टानिक बुद्धाच्या धम्माला यांना मुळात अन्गीकारायचे नाही. यांना बुद्ध आणि बाबासाहेबांच्या नावाने आपली दुकानदारी चालवायची आहे. भांडवल तयार करायचे आहे. बाजार्पेठेचेसुद्धा काही नियम असतात. सिद्धांत असतात. तत्व असतात. परंतु यांच्या राजकारणाचे कुठलेही तत्व नाही. सिद्धांत नाही. आणि नियमही नाही. कारण यांना राजकारणाच्या नावाने सत्तेसाठी सर्वसामान्न्यांना धारेवर धरून विचारांसाठी ताटकळत ठेवायचे आहे.

आंबेडकरी विचार जे देश्याच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रभागी आहेत. जे विचार अंगीकारण्यासाठी व्यवस्था आतुरलेल्या आहेत. आधुनिक जगाची मांडणी करतांना ज्यांना आंबेडकरी विचारांना किनारा (overtake) करता येत नाही. नवनिर्मितीच्या, मानवी कल्याणाच्या योजना आंबेडकरी परीदृश्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्याच आंबेडकरी विचारांची स्वगृही होणारी घुसमट आणि स्वगृही आंबेडकरी विचारांची दिवसेंदिवस घसरत जाणारी किंमत आधुनिक पिढीला कशी पाहवली जात आहे ? हाच माझ्या पिढीचा प्रश्न आहे ? आंबेडकरी विचारांचा आम्ही आणखी किती बाजार करणार आहोत ? आणखी किती बाजार मांडणार आहोत ? विचारांसाठी आंबेडकरी माणसांना आणखी किती पायपीट करायला लावणार आहोत ? एकच आंबेडकरी विचार आम्ही आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भावात आणखी किती विक्रीला मांडणार आहोत ? गारद झालेल्या पिढीकडून या प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा नाही परंतु माझ्या पिढीच्या, यापुढे आंबेडकरी विचार ज्यांच्या खांद्यावर विसावणार आहे. त्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागणार आहे.

इथे चिंता आंबेडकरी विचारांना विक्रीस काढणा-या भांडवलदार, व्यापारी, दलाल यांची नाही. चिंता आहे ती आंबेडकरी विचार प्रमाण मानणा-या माणसांची, आंबेडकरी राजकारणाच्या वाताहतीत हवालदिल झालेल्या ख-या भारतीय नागरिकांची, रिपब्लिक नावाच्या बिग बाजाराची, आणि रिपब्लिकन नावाच्या ग्राहकाची. आम्ही आजही आमची एकच दुकान (शॉपिंग माल) रिपब्लिक नावाने का बनवू शकत नाही ? रिपब्लिकन म्हणून खरे भारतीय असण्याचा स्वाभिमान जागृत करून आंबेडकरी विचारांच्या सर्व स्वगृही बाजारपेठा बंद पडण्यासाठी ताळेबंद, हरताळ का पुकारला जात नाही ? दर ५ वर्षांनी ग्रामपंचायत पासून तर दिल्लीच्या तख्तासाठी आठवडी बाजार भरतो तेव्हा रिपब्लिक नावाचा ग्राहक वेगवेगळ्या दुकानात (राजकीय पक्षात) आंबेडकरी विचार मिळेल, न्यायाचा, कल्याणाचा मार्ग मिळेल. या आशेने ओढला जात असतो. त्या रिपब्लिकन ग्राहकाने आता कुठल्याही एका रिपब्लिकन दुकानाकडे (राजकीय पक्षाकडे) वळण्याची गरज आहे.

एकच व्यापारी, एकच वस्तू, एकच सिद्धांत आणि एकच विचार जेव्हा बाजारपेठेत असतो तेव्हा ग्राहक कुठे इतरत्र भटकत नाही. स्पर्धेचा तिथे अभाव असतो. या बाजार नियमाप्रमाणे आंबेडकरी विचार आम्ही का पुरवीत नाही. इथे कुठल्याही अनुषंगाने वस्तूच्या बाजारपेठेचा नियम लावला जाणार नाही व तसा प्रयत्न मी करणार नाही आणि तुम्हीही करू नका ! आंबेडकरी विचारांच्या कल्याणकारी नितीनियमासाठी आम्ही आता एकत्र येणे काळाची गरज आहे. रिपब्लिक नावाचा राजकीय बोधिवृक्ष आम्ही फुलाविणार आहोत की नाही ? या प्रश्नाच्या उत्तरावरच उद्याच्या बाजारपेठेतील आंबेडकरी विचारांची मागणी, पुरवठा अवलंबून  राहणार आहे. माझ्या पिढीच्या, आधुनिक जगाशी नाळ ठेऊन जागतिक स्पर्धेचा सामना करणा-यांच्या आंबेडकरी कृती कार्यक्रमावर उद्याचे भवितव्य ठरणार आहे. सध्या महाराष्ट्रात महानगरपालिका आणि काही राज्याच्या विधिमंडळाच्या बाजारपेठा तुमची खरेदी विक्री करायला सज्ज झालेल्या आहेत. तुम्ही विकणार आहात की स्वाभिमानाने रिपब्लिक बोधीवृक्ष्याच्या छत्रछायेखाली विसावणार आहात यावर आंबेडकरी माणसांचा उद्याचा दर ठरणार आहे. आता  विचार तुम्हाला करायचा आहे.
 
---डॉ. संदीप नंदेश्वर.