Sunday 29 December 2013

बाळासाहेब आंबेडकरांना आपण समजून घेणार का ?

ADV. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्यावर नेहमी अकोला जिल्ह्यापर्यंत मर्यादित राहिले असा आरोप केला जातो. अशिक्षित मंडळीसोबतच शिक्षितही हे आरोप करायला मागेपुढे पाहत नाही. त्या सर्व शिक्षित अशिक्षितांना माझे हे प्रश्न आहेत. याचे उत्तर त्यांनी स्वतःलाच विचारायचे.....

मंडल कमिशन बाळासाहेबांनी फक्त अकोला जिल्ह्यासाठी लागू करून घेतला का ? धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीच्या समकक्ष अधिकार बाळासाहेबांनी मिळवून दिले ते का फक्त अकोला जिल्ह्यातील लोकांसाठीच होते का ? संसदेतील तैलचित्र आणि भारतरत्न चा लढा फक्त अकोला साठी बाळासाहेबांनी लढला का ? विजेचे खाजगीकरण थांबवून एन्रोन ला देशातून हाकलून लावले ते अकोला साठी का ? पुण्यातील लवासा साठी लढले ते पण अकोला साठीच होते का ? संविधानाला हाथ लावू नका असे संसदेत ठणकावून सांगणारे बाळासाहेब फक्त अकोलासाठीच बोलले का ? आज OBC आरक्षण वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत ते फक्त अकोला येथील OBC साठीच आहे का ? अहो आम्ही त्यांना समजून घेण्यात चुकलो. आम्ही त्यांचा स्वीकार केला नाही. आम्ही त्यांच्याशी जुळलो नाही. तरीही हा नेता बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहून समाजासाठी लढत राहिला आणि आजही लढत आहे. समाज पाठीशी येवो अथवा न येवो बाबासाहेबांच्या सिद्धांतावर या समाजातला प्रत्येक माणसाला न्याय मिळावा यासाठी त्यांची लढाई सुरु आहे. हे आपण केव्हा समजून घेणार आहोत.
---डॉ. संदीप नंदेश्वर 

तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करा.

स्वयंकेन्द्री माणसे आणि स्वयंकेन्द्री समाज कधीच परिवर्तन घडवू शकत नाही. २१ व्या शतकाची नाडी आता वेगाने बदलाकडे वळत चालली आहे. त्यामुळे पारंपारिकतेचा त्याग हाच एकमेव पर्याय आधुनिक पिढीसमोर आहे. तर दुसरीकडे नेतृत्वाच्या भुकेचे डोहाळे लागलेले दिल्लीकडे तोंड करून ढेकर देतांना दिसून येत आहेत. दिल्लीतली मेजवानी गल्लीतल्या नेत्यांची भूक भागवेल अशी अपेक्षा असेल तर ते केवळ स्वप्नरंजन ठरेल. अजूनही दिल्लीतल्या साहेबांना गल्लीपर्यंत पोहचविणारी साधने तुमच्याकडे नाहीत हे लक्षात घ्या. आणि जे आहेत ते पोट भरण्यासाठी सर्वच नेतृत्वाची भूक लागलेल्यांना मेजवानी द्यायला निघाले आहेत. परिवर्तनवादी युवक यातून काय बोध घेतो त्यावर निर्भर आहे. शेवटी एकच सांगतो तुमचा उद्धार तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करण्यातच आहे. दिल्लीतले परिवर्तन गल्लीत पाहायला मिळतील हे २१ व्या शतकाची शपथ घेऊन सांगतो,....
---डॉ. संदीप नंदेश्वर

भारतीय लोकशाही मिडीयाधारी भांडवलशाही कडे वळत चालली आहे.

केजरीवाल च्या यशाने छोट्या छोट्या राजकीय गटाच्या फुटक्या फुसक्या नेत्यांनाही आता PM आणि CM चे स्वप्न पडायला लागतील. आणि या राजकीय दुकानदाऱ्या बंद होणार नाहीत हे या समाजासाठी घातक आहे. केजरीवाल CM बनला तो मिडियामुळे. निश्चितच त्यांनी मिळविलेले यश आणि उराशी बाळगलेले स्वप्न मोठे आणि सर्वसामान्यांना भेडसावणारे असले तरी त्यांच्या यशाच्या श्रेय शतप्रतिशत प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रोनिक मिडियाचे आहे. देशात अनेक केजरीवाल आहेत. केजरीवालपेक्षाही जास्त सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न उराशी घेऊन विकासाची ब्लु प्रिंट घेऊन आहेत. पण त्यांना व त्यांच्या ब्लू प्रिंट ला जनमानसात पोहोचविणारा मिडिया त्यांच्याकडे नाही. आणि अस्तित्वात असलेल्या मिडीयाने अश्या लोकांना पारंपारिक अस्पृश्य म्हणून सतत बाहेर ठेवले आहे. त्यामुळे केजरीवालसारखे चमत्कारिक परिवर्तन अन्य कुणी करेल अशी अपेक्षा उराशी बाळगून एकसंघ राजकीय समाजाला दुभंगू नका. आता या देशात मिडिया म्हणेल तोच CM आणि मिडिया म्हणेल तोच PM बनेल. भारतीय राजकीय व्यवस्था मिडिया संचालित झाली आहे. भारतीय लोकशाही मिडीयाधारी भांडवलशाही कडे वळत चालली आहे. हा बदल लक्षात घ्या. व त्याआधारावर पुढची राजकीय दिशा व संकल्पाची आखणी करा. त्यातच तुमचा उद्धार आहे. एकसंघ राजकीय समाज निर्माण करण्यासाठी नेतृत्वाची निवड करा. आणि तुमच्या सभोवतालचा सामाजिक कार्यकर्त्यांचा ताफा त्या खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करा.
---डॉ. संदीप नंदेश्वर

Monday 2 December 2013

स्वातंत्र्या तू गुलाम आहेस अजूनही...


स्वातंत्र्या तू गुलाम आहेस अजूनही...

मला आठवते अजूनही...मी जन्मलो तेव्हाचा तो क्षण...सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला होता...आपल्या अस्ताची घटिका मोजीत होता...तिथेच सुरु होता उद्याच्या उदयाचा पूर्वेकडील प्रवास...मी जन्मलो तेव्हा अंधार होता कि उजेड माहित नाही...परंतु डोळे उघडले तेव्हा उजेडच दिसला...देश स्वतंत्र झाला तेव्हाही सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडेच आला होता...प्रकाशात नाही तर अंधारातच स्वातंत्र्याचा जन्म झाला होता...स्वातंत्र्याने डोळे उघडले तेव्हाही उजेडच दिसला होता...देश जागा झाला तेव्हा स्वातंत्र्याचा मुक्त श्वास चहूकडे दरवळत होता...कुणी आनंद साजरा करीत होता...कुणी नियोजन करीत होता...कुणी भविष्याचे ठरवीत होता...तर कुणी तरी या स्वातंत्र्याचा विटाळ करीत होता...अगदी तसेच...जसे मी जन्मलो तेव्हा...घरातील सर्व सदस्य आनंद साजरा करीत होते...आई वडील माझ्या भविष्याचे नियोजन करीत होते...तर कुणी तरी माझे भविष्य ठरविण्यात व्यस्त होते...दुसरीकडे मात्र विटाळ म्हणून कुणीतरी बांगळ्या फोडीत होते...ते कोण होते याची जाणीव मला तेव्हा नव्हती...पण समजायला लागले...तेव्हा कळायलाही लागले...बहुतेक ज्यांनी माझा प्रवेश या भूतलावर एक स्वतंत्र मानव म्हणून व्हावा यासाठी प्रयत्न केले...तेच असावे...असेच काहीतरी माझ्या स्वातंत्र्याचे झाले...

असो...स्वातंत्र्या मला आनंद झाला तुझी गुलामी घालविली गेली...तू गुलामीतून मुक्त झाला...माझा जन्म झाला तेव्हा तू गुलाम नव्हता...स्वतंत्र देश म्हणून तो-यात मिरवीत होता...तुझ्या मुकुटावर तिरंगा मानाने डोलत होता...तोच तुझा तिरंगा लाल किल्यावर लहरतांना पाहून आजही मी स्वाभिमानाने तुझ्या तिरंग्याला...तुझ्या स्वातंत्र्याला सलामी देतो...शरीरातील धमण्याधमण्यातून रक्त उफाळून येते...भारतीय नागरिक होण्याचा गर्व वाटतो...देशासाठीचे देशप्रेम ओसंडून वाहते...तेव्हाच शरीरातील रक्तही तापू लागते...हाताची मुठ आवळू लागते...संपूर्ण शक्ती एकवटून स्वातंत्र्यावर तुटून पडण्यासाठी...

आम्ही या स्वातंत्र्याला आमचे कसे म्हणावे...मी स्वातंत्र्यात जन्मलो म्हणून कि, स्वातंत्र्याच्या नावावर स्वतंत्र गुलाम बनलो म्हणून...इथली समता कागदावर धूळ खाते...ज्यांच्या तोंडात दात नाही ते स्वातंत्र्याचे पिज्झा खाते...हाताला बळ नसणारे देश्याच्या रक्षणाचे स्तोम आणते...शक्तिशाली हात मात्र बेरोजगाराच्या दुष्टचक्रात बैलांचे कासरे घेते...जमले नाही तर हातात हलका बॉम्ब घेऊन हजारोंचे प्राण घेते...तरीही स्वातंत्र्या तुझी निद्रा भंग का होत नाही...पण आता तुला उठावे लागेल... तुझी स्वतंत्र गुलामीची निद्रा तोडावी लागेल... अन्यथा बेरोजगारीने त्रस्त झोपडपट्टी तुला गुलाम केल्या वाचून राहणार नाही...हे लक्षात घे स्वातंत्र्या...

स्वातंत्र्याच्या चिंध्या आज अंगाखांद्यावर खेळत आहेत...उघड्या नागड्या शरीरावरील गुलामिचे वळ तुझ्या चिंध्या पांघरून काय मिटणार आहेत का स्वातंत्र्या?...याचेही उत्तर मला तुझ्याकडूनच पाहिजे आहे...त्या लाल किल्ल्यावर दिमाखाने फडकणाऱ्या चक्रध्वजाला आम्ही सलाम करावा...कि पांढऱ्या कपड्यात तुझ्या भोवती पिंगा घालणाऱ्या मानवी रूपातील शैतानावर शत्र उगारायचे... सांग स्वातंत्र्या काय करायचे ?...स्वातंत्र्याच्या नावावर देशाला विकतांना यांना अभिमान वाटतो...आणि हक्क मागतांना होणाऱ्या पाशवी अत्याचारात स्वाभिमान जागतो...हि जगातली कुठल्या स्वातंत्र्याची व्याख्या आहे?... भरलेल्यांना पोटभर अन्न आणि भूकेलेल्यांवर धारदार शस्त्र...हा कुठल्या कल्याणाच्या कक्षेत येतो ?...याचे तरी उत्तर देशील का रे स्वातंत्र्या...

स्वातंत्र्या मी तुला हाताच्या कोपरापासून सलाम केला असता...बेंबीच्या देठापासून "भारतीय गणराज्याचा जय जयकार" केला असता...माझ्या माता भगिनींच्या अंगावरील कपडे शाबूत ठेवण्याची हमी जर तू दिली असती...भारत माता दाखवतांना तिरंग्याची साडी घालून धाखवता...पण त्याच तिरंग्याची शान तुझी खरी भारतीय माता भगिनी उघडी रस्त्यावर फिरतांना जगाला धाखविली जाते...तेव्हा तू महालातल्या बंधिस्त खोलीत धिंगाणाच घालत असतो ना रे...तेव्हा कुठे तोंड खुपसून लपले असतात तुझे ३६ कोटी...कि प्रणय क्रीडेत मग्न असतात तुझे ६ कोटी...सांग स्वातंत्र्या मला कुठपर्यंत सहन करायचे आम्ही हे...उघडे होऊन केव्हापर्यंत सलामी ठोकायचे तुला...?

१५ आगस्त आणि २६ जानेवारीला स्वातंत्र्याचे संगीत आबाल वृद्धांपासून सर्वांच्याच मनात देशप्रेम प्रफुल्लीत करते...पण दुसऱ्याचे दिवशी तेच देश प्रेम कुठल्या कुंटणखाण्यात विकते...शाळकरी देशाभिमानाने रोमहर्षित होतात...पण शाळेतून बाहेर पडून बेरोजगारीच्या जगात तुझ्या स्वातंत्र्यावरच हल्ले करतात...समजू नको स्वातंत्र्या तू दिमाखात जगत आहेस...अरे तू तर लाचारा पेक्षा लाचारीचे जीणे जगत आहेस...५४५ आणि २५० यांच्यातच काय ते तुला तुझे स्वातंत्र्य दिसते का रे स्वातंत्र्या...कि हेच ते ७९५ ज्या ३ % चे राजकारण करतात...तेच तुझे स्वातंत्र्य समजायचे काय ?...आग लागू दे तुझ्या अश्या स्वातंत्र्याला जी ९७ % अजूनही गुलामच समजते...

स्वातंत्र्या मी जळतो आहे...धगधगतो आहे...पेटतो आहे...अजूनही त्याच जातीवादाच्या भट्टीत...तुझी धर्मनिरपेक्षता आणि गणराज्याची हमी...तेव्हा काय या जातीवादी माजलेल्या पोशिन्द्यांची मसाज करते काय रे...? सर्व प्रश्नाचे उत्तर तुला द्यावेच लागेल स्वातंत्र्या...नाहीतर हा गुलाम तुझ्या स्वातंत्र्याला हिमालयाच्या शिखरावर नेवून सुळाची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही...हे लक्षात ठेव...

स्वातंत्र्याचे धडे तू शिक्षणातून देतो...आणि तेच शिक्षण विकून बहुजनांना गुलाम बनवितो...आता सांग पुस्तकाच्या पानापानावर छापून असलेले तुझे स्वातंत्र्य टराटरा फाडायचे का ?...स्वातंत्र्याच्या नावाने शहीद झाले असे सांगतो...आता मीच तुला विचारतो...खरच ते शहीद झाले होते कि शहीद केले गेले होते ?...परकीयांनी मातीमोल केलेल्या तुझ्या स्वाभिमानाला परत मिळविण्यासाठी आणि पुनःश्च्य तुझी मालकीवजा गुलामीला परत आणण्यासाठीच स्वातंत्र्याच्या नावावर शहीद केल्या गेले असतील...यावर आता माझा पक्का विश्वास बसत चालला आहे...काय गरज काय होती स्वातंत्र्य मिळविण्याच्या घाईची...परकीय तुला आमच्या आई बहिणींची नग्न धिंड काढू देत नव्हते म्हणून...कि...त्यांची इज्जत लुटू देत नव्हते म्हणून...तू स्वातंत्र्याची घाई केलास...

स्वातंत्र्या आज तू दुखावलास तरी चालेल पण माझ्या प्रश्नाचे समाधान तुला करावेच लागेल...जातीवाद, धर्मवाद, अघोषित ब्राम्हणी भांडवलवाद तुला जोपासायचा होता म्हणून फसवलेस का रे स्वातंत्र्या...आता तुझा मुखवटा फाटलेला आहे...वयाची ६० (साठी) गाठूनही तू पोक्त होतांना दिसून येत नाही...हे तू आखलेल्या स्वातंत्र्याच्या षडयंत्राची साक्ष देण्यास पुरेसे आहे...असे तुला नाही वाटत का रे स्वातंत्र्या...

स्वातंत्र्या तू गुलाम आहेस अजूनही...जोपर्यंत मी स्वातंत्र्याचा पाईक होत नाही तोपर्यंत...भारतीय नागरिक म्हणून जोपर्यंत तुझी ओळख तयार होत नाही...तोपर्यंत स्वातंत्र्या तू गुलामच राहणार...तू जरी समझला नाहीस तरी मी तुला गुलामच समझणार आहे...लाज वाटत असेल तर फेकून टाक तुझी जाती, धर्माची ओळख...आणि मिरव माझ्यासारखा भारतीय नागरिक म्हणून दिमाखात...मुक्त कर पंखांना स्वातंत्र्याच्या निळ्या आकाशात... तोडून टाक बंधने मस्तकावर बांधलेल्या मनूच्या कपाटाची...सुरुंग लाव त्या भंगार बनलेल्या डोक्याला...जरा वाहू दे घाण हजारो वर्षांची...छळलेल्या पापाची...कुणाच्या तरी मातेची...

मीच तुला सर्वप्रथम प्राणांतिक सलामी ठोकेन...तुझी एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी...कारण मीच सर्वप्रथम प्रण केला होता..."मी सर्वप्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय" असण्याचा...विसरू नकोस स्वातंत्र्या तुला तुझे स्वातंत्र्य टिकवून ठेवता यावे म्हणून दिवस रात्र एक करणारा...एकमात्र माझा बाप होता...त्याचाच मी लेक तुला आज हिशोब मागतो आहे...माझ्या बापाच्या त्यागाचा वाटा तुम्ही आम्हाला का मिळू दिला नाही...याचे उत्तर मला पाहिजे आहे...अरे आम्ही लायक असतांना...बुद्धिमत्तेने कुशाग्र असतांना...लढवय्या बापांची औलाद असतांना...काहीच कठीण नाही आमच्यासाठी...ते आम्ही दाखवूनही दिले आहे...पण वेळोवेळी तूच आमच्या मार्गात आडवा येत गेला...मेहनतीने मिळवत असतांनाही अस्पृश्य म्हणून हिणवत गेला...लुटत गेला...छळत गेला...आणि मी जेव्हा पेटून उठलो तेव्हा पाठीमागून वार करतांना मायेच्या गर्भात मुंडके लपवत गेला...हेच का रे तुझे स्वातंत्र्य...भेकड पणाचे...

स्पर्धेपासून लपतो कश्यासाठी...तू स्वतंत्र आहेस ना, तर मग कर ना, मुकाबला इथल्या गरिबीचा, बेरोजगारीचा, जातीय, धार्मिक अत्त्याचाराचा, आई बहिणींची इज्जत परत मिळवून देण्याचा, फासावर लटकलेल्या माझ्या बापाला तुझ्या संसदेच्या शिखरावर मानाने बसविण्याचा...जमत नसेल ना तर स्वातंत्र्याचे सोंग सोडून दे...अथवा स्वातंत्र्याचा शिलेदार म्हणून तोऱ्यात मिरविणे बंद कर...मी अजूनही तय्यार आहे...इथल्या प्रत्येकाला भारतीय नागरिक म्हणून जगण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी...

तुला सांगतो स्वातंत्र्या मुठ्भरांचे स्वातंत्र्य तळहातावर घेऊन तू जास्त दिवस टिकू शकणार नाहीस...त्याऐवजी लोकस्वातंत्र्याचा आस्वाद घ्यायला तय्यार हो...इथे प्रत्येकच माणूस ५००० हजाराचे कर्ज घेऊन जन्मतो आहे...मी जन्मलो तेव्हा ही कर्ज घेऊनच जन्मलो...हे सांगतांना तुला शरम कशी वाटत नाही...जगाला दिमाखाने सांगतो आम्ही भारतीय कर्जातच पैदा होतो आणि कर्जातच मरतो...मात्र स्वातंत्र्या बघ तुझ्या याच देशात दर दिवशी पैदा होणारा देव लखपती, करोडपती होऊनच जन्म घेतो...जगही तुझ्याकडे पाठ फिरवून शिव्या हासडतो...श्रीमंत देवांच्या स्वतंत्र भारत देश्यातील गरीबीचे धिंडवडे काढतो...स्वातंत्र्या कुठे लोपला रे तुझा स्वाभिमान...भिकारड्याच्या जगात तुझी इज्जत अशी देवालयाच्या शिखरावर का टांगतो आहे...दर दिवशी दानाच्या नावाखाली एक एक माणसाला फासावर का लटकवतो आहे...

स्वातंत्र्या आता तुझे हे भूलभूलय्याचे स्वातंत्र्यही हिरावले जाणार आहे...माझे प्रश्न तर सोड आता देशच लुटला जाणार आहे... तुझ्या संविधानावर, संसदेवर हल्ले जोमाने सुरु झाले आहे... अण्णा, बाबा, साधू तुझ्याच बळावर, तुझ्याच पाठींब्यावर तुझ्या डोक्यावर थुइथुइ नाचणार आहे... आणि मी माझ्या उघड्या डोळ्याने स्वतंत्र भारतीय म्हणून स्वतंत्र भारताच्या गुलामीचा नंगा नाच पाहणार आहे...काय करू स्वातंत्र्या शेवटी मीही लाचार आहे...पण मला ही तूच लाचार बनविले आहे हे विसरू नको...अन्यथा तुझ्या स्वातंत्र्यावर डोळा ठेवणा-यांच्या छाताडावर बसून तुझी इज्जत गमावू दिली नसती...पण तू मला तशी संधीच दिली नाही रे स्वातंत्र्या...तरीही माझ्यावर अन्याय करीत गेलास...मलाच छळत गेलास...मलाच लुटत गेलास...तरीही तुझ्या संरक्षणासाठी मीच धावून येत आहे...मीच तुटत आहे...तुझ्या स्वातंत्र्याच्या अबाधीततेसाठी मीच लढत आहे...मात्र ज्यांनी तुझ्या स्वातंत्र्याचा अविरत लाभ घेतला...तुला भिकारी करून मालदार बनले...तू ज्यांना मुक्तहस्ते लुटवून दिलास...आज तेच तुझ्या अस्तित्वाचे दुश्मन झाले आहेत...आज तेच तुझ्या जीवावर उठले आहेत...मी मात्र आजही स्वातंत्र्याचा प्रवाही झेंडा डौलाने फडकवितच आहे...तुला ठेच न लागू देता...तुझा मान न ढळू देता...पूर्ण सन्मानाने तुला सलामी ठोकीत आहे...याच आशेत कि माझ्या प्रश्नाने तू आतातरी भानावर येशील...स्वातंत्र्याच्या शिखरावरून माझ्या गावातल्या वस्तीत येशील ...झोपडपट्टीतल्या प्रत्येकाच्या अंगणात फडकशील...गरिबांच्या झोपडीवरच दिमाखाने फडकशील...त्यांनाही जरा स्वतंत्र भारताचे भारतीय नागरिक बनण्याचा मान देशील...तेव्हाच मी तुला माझी सलामी ठोकणार आहे... स्वाभिमानाने "जन गण मन" चा जयघोष करणार आहे..."वंदे मातरम" म्हणून माझे प्राणही तुझ्या हिमालयाच्या शिखरावर तुझ्या रक्षणासाठी अगदी सज्ज ठेवणार आहे...आणि सा-या जगाला ओरडून सांगणार आहे..."भारतीय गणराज्याचा विजय असो"...
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५

अखंड भारत का नारा लगाना जरुरी है !


नरेन्द्र मोदी ने कश्मीर की एक सभा में संबोधित करते हुए "कलम 370 और उसे निरस्त करने की बात कही !" जिस पर देश-विदेश में मानो आतंकी जंग छिड़ गयी है ! काग्रेस खुद को बचाने में जुटी है तो बीजेपी देश को दहलाना चाहती है ! क्या कलम 370 पर चर्चा करने का यह सही समय है ? क्या आतंक से एकजुट होकर लड़ने के बजाय कश्मीर को राजनितिक जंग का मैदान बनाना कितना सही है ?

पंडित जवाहरलाल नेहरू की कश्मीर के प्रति रही भूमिका को उछालकर नरेन्द्र मोदी पंतप्रधान बनाने के लिए पैरो में घुंगरू बांध कर नाच रहा है तो दूसरी तरफ कांग्रेस मोदी को डफली बजाकर नचा रही है !

आज अंतरराष्ट्रिय समुदाय नाटो की तरफ से आतंकवाद के खिलाफ खलीता बनाया जा रहा है तो दूसरी तरफ पाकिस्तान/तालिबान और अफगानिस्थान की तरफ से आतंकवाद की पृष्ठभूमि को भारत की सीमा तक खीचा जा रहा है ! ऐसे वक्त कश्मीर का स्वायत्तता का मुद्दा उछालकर अंतर्गत राजनितिक और सुरक्षा व्यवस्था को खतरे में लाने की घिनोनी हरकत ये राजनेता कर रहे है ! जिसका परिणाम काफी भयंकर होने वाला है !

भारत और पाकिस्तान का निर्माण जिस वक्त हो रहा था उसी वक्त कश्मीर का मुद्दा सुलझाने के लिए डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा कुछ सुझाव दिए गए थे ! वो इस प्रकार थे !
१. मुस्लिम समुदाय की संख्या कश्मीर के जिस क्षेत्र में जादा है वह हिस्सा पाकिस्तान को दिया जाए !
---आज यही मुस्लिम बहुल इलाखा आतंकियों को पनाह दे रहा है !
२. हिन्दू बहुल कश्मीर का इलाखा भारत की सीमा में समाविष्ट किया जाये !
--- आज कश्मीर में इन्ही हिन्दू-मुस्लिमो में तनाव की स्थिति बार बार पैदा होती है !
३. कश्मीर का लेह लद्दाख जैसा हिस्सा जहा बुद्धिस्ट, हिन्दू और मुस्लिम समुदाय एकसाथ रहता है वह हिस्सा जनमत के द्वारा उसका निर्णय लिया जाये ! और उसे भारत में लिए जाये !
इसतरह जनमत के माध्यम से कश्मीर के तिन राज्य भी बन सकते थे ! और कश्मीर से लेकर आतंक की हर समस्या को सुलझाया जा सकता था ! जिसके तरफ कभी ध्यान ही नहीं दिया गया !

आज उसी की राजनीती कर नेहरू - पटेल के किस्से सुनाकर देश को आतंक की दहलीज पर छोड़ा जा रहा है ! देश की जनता ने इसके ऊपर बड़ी गंभीरता से सोच कर आतंक की राजनीती करने वाले के हौसलों को तोड़ना चाहिए ! और फिर एक बार जनता के द्वारा अखंड भारत का नारा लगाना जरुरी है ! शांति, चमन, और भाईचारे से कश्मीर का हल निकलना जरुरी है लेकीन आज नहीं !
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर.

Sunday 24 November 2013

“दलित पाँथर” कालची आणि आजची : “दलित पाँथर”च्या त्रिकालाबाधीत्वाची मीमांसा

“दलित पाँथर कालची आणि आजची : “दलित पाँथर”च्या त्रिकालाबाधीत्वाची मीमांसा
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
मो. नं. 8793397275, 9226734091

            “दलित पाँथर” १९७० च्या दशकात भारतात उदयास आलेले एक वादळी संघटन. आंबेडकरी विचारांची झालर पांघरून आंबेडकरी चळवळीचा चेहरा बनू पाहणारे हे संघटन. दलित अन्याय अत्याचाराच्या प्रतिकाराचा एकमेव जिवंत चेहरा “दलित पाँथर”ने निर्माण केला. ‘आंबेडकरी चळवळ हेच या संघटनेचे उर्जास्थान आणि आंबेडकरी विचार हेच या संघटनेच्या धमन्यांमधून वाहणारे रक्त’ असा सामाजिक विश्वास निर्माण होईपर्यंत मजल मारणारे “दलित पाँथर” हे संघटन होते. म्हणून तेव्हाचा आणि आजचा तरुण देखील “दलित पाँथर”कडे त्याच आशेने बघतो आहे. इतकी सामर्थ्यशाली उर्जासंपन्न “दलित पाँथर” उदयास आली आणि कालौघात लुप्तही झाली. तरीही या संघटनेचे आकर्षण आजच्या युवापिढीसमोर टिकून आहे. आजही हे संघटन पुन्हा उदयास यावे. ती उर्जा पुन्हा समाजातील तरुणांमध्ये संचारावी. शोषित समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे संरक्षण कवच म्हणून पुन्हा “दलित पाँथर” उभी राहावी. अशी इच्छा या आंबेडकरी नवतरुणांची आहे. हेच तेवढे यश या संघटनेचे होते आणि आहे. पण काही अनुत्तरीत प्रश्नांना उत्तरे देण्यात आजही हे संघटन यशस्वी ठरले नाही. आजही अनेक प्रश्न “दलित पाँथर”च्या अस्तित्वावरच उभे होतात. त्याचे उत्तर शोधल्याशिवाय, उत्तर मिळविल्याशिवाय आजच्या आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांना मार्ग सापडणार नाही. त्याचीच ही मीमांसा...
            १९५६ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समग्र शोषित-वंचित-दलित समाजाची चळवळ उत्तुंग शिखरावर होती. हजारो वर्षे ज्या समाजावर अन्याय करण्यात आले; ज्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले; त्या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सवर्णांच्या बरोबरीने आणण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समर्थपणे पेलून धरली. एवढेच नाही तर या समाजाला जगण्याचा संपूर्ण न्याय संविधानातून मिळवून दिला. पारंपारिक जोखडातून मुक्त करून मानवी विकासाच्या समग्र दिशा मोकळ्या करून दिल्या. हे सर्व करीत असतांना डॉ. बाबासाहेबांनी चळवळीची दुसरी बाजू पण तितक्याच ताकदीने सांभाळली. देशाचे पारतंत्र्य संपवून एका नव्या स्वयंपूर्ण व स्वतंत्र व्यवस्थेत अखिल भारतीय समाजाला घेऊन जातांना अनेक खाचखडग्यातून जावे लागणार होते. बळाच्या व शक्तीच्या जोरावर नाही तर कायद्याच्या नैतिक सामर्थ्यावर हा देश स्वयंभू उभा करायचा होता. एक नवी व्यवस्था सर्व समाजाच्या नैतिक आचरणात उतरवायची होती. त्यासाठी त्यांनी संपूर्ण समाजाला भारतीयत्वात बांधून घेतले. जात, धर्म, पंथ, वर्ण याच्या पुढे जाऊन आम्ही फक्त भारतीय. “आम्ही प्रथमःही भारतीय आणी अंतीमःही भारतीय” या एका सूत्रात भिन्न जाती, धर्म, पंथ आणि वर्णाच्या लोकांना आणि समाजाला बांधून घेतले. सर्व भारतीयांचे कल्याण, देशाचे भवितव्य आणि देशाचा विकासाची सूत्रे या व्यवस्थेला बहाल केली. ही बाबासाहेबांच्या चळवळीची दुसरी बाजू लक्षात घेतल्याशिवाय आंबेडकरोत्तर चळवळीची मीमांसा करता येणार नाही.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरचा कालखंड दलित-पिडीत-शोषित-वंचित समाजासाठी भारावलेला कालखंड होता. संवैधानिक कायद्याने बंधनमुक्त केलेल्या सामाजिक व्यवस्थेत स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नातून प्राप्त झालेले हक्क अधिकार टिकवून ठेवायचे होते. मिळालेल्या न्यायाची अवहेलना होऊ नये याकडे लक्ष ठेउन सामाजिक विकासाचे उद्धिस्ट गाठायचे होते. सोबतच ज्या प्रस्थापितांनी आजपर्यंत अन्याय केले त्या अन्यायातून बाहेर पडून त्यांच्याशी सामाजिक सलोखा निर्माण करायचा होता. कारण तेच ध्येय डॉ. बाबासाहेबांचे होते. समाज अन्यायमुक्त, धर्म व जातीबंधने मुक्त करायचा होता. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारकार्यांनी लाभान्वित झालेल्या प्रत्येकाच्या खांद्यावर एकसंघ समाज व सामाजिक सलोखा निर्माण करायची जबाबदारी होती. त्याचे नेतृत्व ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत प्रत्यक्ष काम केले त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या वैश्विक क्रांतीमुळे आणि दलित-पिडीत-शोषित-वंचित समाजात निर्माण केलेल्या चेतनेमुळे त्यांच्या पश्च्यातही चळवळ गतिमान होऊ लागली होती. तर दुसरीकडे कायद्याने मिळवून दिलेले हक्क व अधिकार आणि न्यायाची व्यवस्था बाल्यावस्थेत कुचकारून टाकण्याचे षड्यंत्र प्रस्थापितांकडून आखले जात होते. कारण ही नवी समतामुलक समाजव्यवस्था निर्माण करणारा निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या समाजात उरले नव्हते. त्यामुळे या व्यवस्थेला बाल्यावस्थेतच कुचकारने प्रस्थापितांना सोपे होते. समतामुलक समाजव्यवस्था निर्माण होणे म्हणजे प्रस्थापितांचे अस्तित्व संपणे. हे त्यांना होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे दलित-पिडीत-शोषित-वंचित समाजावरचे अन्याय अत्याचार पुन्हा वाढले. बाबासाहेबांसोबत वाढलेली पिढी त्याचा खंबीरपणे प्रतिकार करीत होती. १९६५ ते ७० पर्यंत हा संघर्ष सुरु होता. याच दरम्यानच्या काळात बाबासाहेबांच्या प्रेरणेने आणि विचाराने प्रभावित होऊन शिक्षित पिढी नव्या व्यवस्थेत आपला शिरकाव करू पाहत होती. या पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अथक परिश्रमानंतरही समाजावर होणारे अन्याय अत्याचार असह्य करीत होते. त्यांच्यात विद्रोह निर्माण करीत होते. वैचारिक परीवर्तनासोबतच भावनिक विद्रोह त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. संपूर्ण ताकदीनिशी विषमतावादी अन्याय अत्याचारी व्यवस्थेवर तुटून पडण्याचा, अन्याय अत्याचार करणाऱ्यावर तुटून पडण्याची संपूर्ण तयारी मनात खदखदत होती. दुसरीकडे १९७० पर्यंत बाबासाहेबांच्या संपर्कात वाढलेली पिढी राजकीय धृवीकरणाची शिकार झाली होती. राजकीय स्वार्थाने नेत्यांचे ध्रुवीकरण होत असतांना समाजाचेही ध्रुवीकरण होऊ लागले होते. त्यामुळे त्यांचे समाजावरील सुरक्षा कवच डगमगू लागले होते. अश्या या कफल्लक परिस्थितीत नवशिक्षित आंबेडकरी तरुणांतील विद्रोह सामाजिक सुरक्षेच्या रूपाने बाहेर पडला. आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी वैचारिक तरुणांच्या मनातील विद्रोहाने १९७२ ला “दलित पाँथर” उदयास आली.
दादासाहेब गायकवाड, भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर, राजाभाऊ खोब्रागडे, एन. शिवराज, एल. एन. हरदास, हरिदास आवळे, बी पी मौर्य, आर डी भंडारी यांच्यासारख्या खंद्या नेतृत्वधारी कार्यकर्त्याच्या बळावर बाबासाहेबांचा संकल्पित “रिपब्लिकन पक्ष” भारतीय राजकारणाच्या पटलावर आला. अल्पावधीतच या पक्षाने नेत्रदीपक कामगिरी सुद्धा केली. १९६५ पर्यंत हा पक्ष भारतीय राजकारणात सर्वात प्रभावी विरोधी पक्ष म्हणून नावारूपास आला. कॉंग्रेस ने हा धोका ओळखून रिपब्लिकन पक्षाला फोडले. सर्वप्रथम बी पी मौर्य आणि आर डी भंडारी हे कॉंग्रेसवासी झाले. रिपब्लिकन पक्षाच्या एकतेला खिंडार पडली. नागपुरातून हरिदास आवळे पक्षाच्या विरोधात गेले. राजाभाऊ खोब्रागडे आणि दादासाहेब गायकवाड यांच्यात वादाची ठिणगी पडली. आणि १९६९ पर्यंत रिपब्लिकन पक्षाचे ध्रुवीकरण होत गेले. नेत्यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांचे ध्रुवीकरण झाले. आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे समाजाचे ध्रुवीकरण होत गेले.
आंबेडकरी चळवळ राजकीय दृष्ट्या संपुष्टात येण्याच्या मार्गावर लागली होती. त्यामुळे नेत्यांनी चळवळीचे राजकीयत्व संपुष्टात येऊ नये म्हणून कॉंग्रेसशी हातमिळवणी सुरु केली. समझोत्याचे राजकारण सुरु झाले. राजकीय प्रस्त टिकवून ठेवण्यासाठी चळवळीच्या सामाजिक व राजकीय भवितव्याचा विसर पडत गेला. नेत्यांची समाजावरील पकड कमकुवत होऊ लागली. या सर्व गदारोळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक भारतीयत्वाच्या विचाराला बाजूला सारून अखिल भारतीय आंबेडकरी चळवळ विशिष्ट समाजापुरती मर्यादित होण्यास सुरवात झाली. एकंदरीतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे ध्रुवीकरण होऊ लागले. नेतृत्वातील स्पर्धा या सर्व परिस्थितीला पोषक वातावरण निर्माण करीत गेली. या पार्श्वभूमीवर उदयास आलेल्या “दलित पाँथर” ने राजकीय नेतृत्वाची समाजावरील पकड कमी होत असतांना तरुणांमध्ये एक चेतना निर्माण केली. व समाजाचा विश्वास संपादित करण्यापर्यंत मजल मारली.
ज. वि. पवार, राजा ढाले, नामदेव ढसाळ, बबन लव्हात्रे, अविनाश महातेकर, वसंत मोरे आणि भागवत जाधव अश्या आंबेडकरी विचारांनी झपाटलेल्या नवशिक्षित तरुणांनी “दलित पाँथर”च्या नावाने समाजाला सुरक्षा कवच प्रदान करण्याचे काम केले. पुढे अनेक तरुण पाँथरशी जुळू लागले. जहाल विचार व कृतीतून अन्यायावर कुठलीही भीडमुर्वत न करता तुटून पडण्याची वृत्ती हे “दलित पाँथर” चे वैशिष्ट तरुणांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या वलयाभोवती फिरणारे त्यांचे लेखन आणि समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रदर्शित होणारी जहाल प्रवृत्ती सरकारला व समाजव्यवस्थेला अंकुश लावणारी होती. त्यामुळे अल्पावधीतच “दलित पाँथर” गावोगावी, खेडोपाडी, शहराशहरात पोहचू लागली.
रात्ररात्रभर रंगणारे चर्चांचे फड, तात्कालीन व्यवस्थेच्या अन्यायकारी धोरणांवर होणारी चर्चा, त्यातून कागदावर लेखणीच्या रुपात उमटणारे प्रखर जहरी लिखाण; अन्यायग्रस्त भागात हातात लाठ्या काठ्या आणि मशाली घेऊन होणारी जागली, पुरेशी साधने उपलब्ध नसतांनाही अगदी अल्पावधीत अन्यायग्रस्त कुटुंबाला पोहचणारी मदत; या सर्व कारणांनी “दलित पाँथर” समाजात सर्वदूर पोहोचली. सामाजिक जिव्हाळा या संघटनेला मिळाला. पण तो जिव्हाळा टिकवून ठेवण्यात “दलित पाँथर” यशस्वी झाली नाही.
सर्वप्रथम विरोधकांनी “दलित पाँथर”च्या संस्थापक सदस्यांना राजकीय आमिषाला बळी पाडले. आपसाआपसातील मतभेद वाढविण्यात आले. मार्क्सवादी कि आंबेडकरवादी ? अश्या प्रश्नार्थक वलयात वैचारिक वित्तुष्ट निर्माण करण्यात आले. परकियांसोबतच स्वकीयांच्या विरोधाचा मोर्चा “दलित पाँथर”कडे वळविण्यात आला. आणि त्यात आघाडीवर होते ते “बामसेफ” या नावाने पुण्यातून उदयास आलेले संघटन. या संघटनेच्या पडद्याआड ‘कांशीराम’ ने “दलित पाँथर”च्या आणि नेत्यांच्या विरोधात उभी केलेली बदनामीची नीती महत्वाची मानली गेली पाहिजे. “दलित पाँथर” च्या सदस्यांना “पुरुष वेश्याव्यवसाय करणारे” म्हणण्यापर्यंत कांशीराम ने मजल मारली. शिक्षित व नौकरीपेशा पत्करलेली आणि मवाळ भूमिका घेणारी मंडळी सहजच कांशीराम ने उभ्या केलेल्या षडयंत्रकारी नीतीला बळी पडली. त्यामुळे समाजातील हा वर्ग “दलित पाँथर” पासून तुटून कांशीराम व तत्सम बामसेफ च्या मागे गेला. १९७२ ते “दलित पाँथर” च्या फुटीपर्यंत बामसेफ ने “दलित पाँथर” व त्यातील समाविष्ट नेत्यांना बदनाम करण्याचा एकमेव कृतिकार्यक्रम राबविला होता.
एकीकडे भैयासाहेब आंबेडकर ‘भारतीय बौद्ध महासभे’चा धम्माचा गाडा एकहाती चालवीत होते. त्यात दुफळी निर्माण करण्यासाठी १९७२ च्या काळातच रजनीश, ओशो, गोयंका, त्रैलोक्य संघ धार्मिक विघटनासाठी उभा केला गेला. तरीही भैय्यासाहेबांनी तो लढा एकहाती पेलून धरला. पण राजकीय, सामाजिक दुफळीची परिस्थिती धम्मकार्याला पूरक परिस्थिती निर्माण होऊ देत नव्हती. तर दुसरीकडे “दलित पाँथर” च्या क्रांतिकारी विचार व कृतीकार्यक्रमामुळे समाजातला मवाळवादी गट बामसेफ च्या कच्छपी लागला होता. तर तिसरीकडे राजकीय दुफळी स्वअस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत होती. एकंदरीतच आंबेडकरी चळवळीचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे, त्यांच्या विचारांचे ध्रुवीकरण होत होते. आणि आंबेडकरी चळवळ विशिष्ट समुदायापर्यंत मर्यादित होण्यास सुरवात झाली. ती आजतागायत सुरूच आहे. अजूनही समाजाचे, चळवळीचे, विचारांचे ध्रुवीकरण थांबलेले नाही. याचा विचार करणे आज गरजेचे आहे.
आंबेडकरी चळवळीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समग्र कृतिकार्यक्रम राबविलाच गेला नाही. आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने १९७० च्या दशकातील परिस्थिती अतिशय भयावह अशीच होती. चळवळीच्या उमेदीच्या काळातच चळवळीला ग्रहण लागले गेले होते. याच काळात १९७२ ला उदयास आलेले बामसेफ असो, धार्मिक प्रदूषण पसरविणारे रजनीश, ओशो, गोयंका, त्रैलोक्य संघ असो किंवा राजकीय स्तरावर seat or no seat we are with congress म्हणणारी रिपब्लिकन पक्षाची मानसिकता असो या पार्श्वभूमीवर “दलित पाँथर”चा अभ्यास केला तर तो काळ “दलित पाँथर” साठी पोषक नव्हताच. “दलित पाँथर” चा उद्देश प्रामाणिक असला तरी सामाजिक संघटनात्मक स्पर्धा आणि विरोध “दलित पाँथर”ला लयाला नेण्यास कारणीभूत ठरला.
आंबेडकरी चळवळीत “दलित पाँथर”च्या रूपाने आलेले नवे स्थित्यंतर तत्कालीन समाजाला सुखावणारे असले तरी भविष्यकालीन चळवळीच्या दृष्टीने घातकच ठरले. राजकीय सत्तास्पर्धेत नेतृत्वहीन झालेल्या समाजाला “दलित पाँथर”ने क्रांतिकारी रूप दिले. समग्र आंबेडकरी विचारांना दुर्लक्षून उभे केले गेलेले हे क्रांतिकारी रूप आंबेडकरी विचार परिघाच्या बाहेर जाणारे होते. “दलित पाँथर” मध्ये समाविष्ट असणाऱ्यांची मार्क्सवादी विचारांची असणारी जवळीक समग्र आंबेडकरी विचारांसाठी धोकादायकच होती. फक्त दलित-शोषित-पिडीत-वंचित समाजावर होणाऱ्या अत्याचारावर जहाल विचार व कृतीतून लक्ष केंद्रित केल्याने आंबेडकरी चळवळीचेच ध्रुवीकरण होत गेले. इतर समाज आंबेडकरी चळवळीकडे आकृष्ट झाला नाही. शेवटी “दलित पाँथर”ला सुद्धा सामाजिक व चळवळीच्या ध्रुवीकरणाचे हे पातक आपल्या माथ्यावर मारून घ्यावेच लागेल.
“दलित पाँथर” ने ज्याप्रकारे अन्याय अत्याचारावर आपले लक्ष केंद्रित केले त्याचप्रकारे समग्र चळवळीकडे लक्ष केंद्रित केले असते तर कदाचित चळवळीला वेगळी दिशा “दलित पाँथर”च्या माध्यमातून देता आली असती. १९७२ ते १९७६ अश्या चार वर्षाचाच कालखंड तेवढा “दलित पाँथर”चा सांगितला जातो. पण नंतरही “दलित पाँथर” टिकून होती. पण उर्जा संपलेल्या अवस्थेत. ध्येय गमावलेल्या अवस्थेत. संघटन टिकवून ठेवण्याच्या नावाने “दलित पाँथर” आजही दिसते. पण १९७२ ची “दलित पाँथर” केव्हाचीच संपली. आता तिचे पुनरुज्जीवन करावे कि करू नये ? यासाठी वर्तमान परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे. अन्यथा १९७० च्या दशकात फसलेली आंबेडकरी चळवळ २०१३ नंतरच्या दशकात फसण्याचा धोका संभवतो आहे. ज्यामुळे सामाजिक भविष्य धोक्यात येऊ शकते. आज चळवळीला आलेली मरगळ झटकून नव्या परिघात चळवळीला नव्या वातावरणाशी पूरक करावे लागणार आहे.
आज २०१० नंतरच्या दशकात प्रतिक्रांती व्यवस्थेवर हावी झालेली आहे. प्रतीक्रांतीला उलथून लावणारी परिवर्तनवादी चळवळ मागे पडत चालली आहे. परिवर्तनवादी विचारांचा आवाका मर्यादित स्वरूप धारण करीत चालला आहे. आंबेडकरी चळवळीने परिवर्तनवादी चळवळीचे नेतृत्व करायला पाहिजे. ते होतांना दिसून येत नाही. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित वर्गापर्यंत त्यातही फक्त महार वर्गापर्यंत सीमित होऊ लागले आहेत. आंबेडकरी चळवळ स्वत्वात फसलेली आहे. त्यातून बाहेर पडून समग्र आंबेडकरी विचारांच्या बळावर आंबेडकरी चळवळीला अखिल भारतीय स्वरूप धारण करायचे असेल तर चळवळीने भूतकाळात केलेले ध्रुवीकरण थांबवावे लागेल. भूतकाळात चळवळीसमोर उभ्या केल्या गेलेल्या मर्यादेच्या भिंती तोडाव्या लागतील. मर्यादिततेतून बाहेर पडून समग्रतेची कास धरावी लागेल.
अलीकडे चळवळीत येऊ पाहणारा तरुण क्रांतीची भाषा बोलतो आहे. “दलित पाँथर”चा आदर्श घेऊ पाहतो आहे. पण धृविकरणात उद्ध्वस्त झालेली चळवळ तिथेच थांबवायची नसेल तर खरच आज “दलित पाँथर”ची आवश्यकता आहे का ? याचा विचार व्हावा. अन्यायाचा प्रतिकार करणे एवढेच एक उद्धिस्ट चळवळीसमोर ठेवायचे कि अन्यायविरहित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे ? हे गांभीर्यपूर्वक ओळखणे गरजेचे आहे. व्यवस्था निर्मितीसाठी मर्यादिततेच्या भिंती तोडाव्या लागतात. त्या प्रक्रियेचे स्वागत करायचे कि चळवळ आहे त्या परिस्थितीतच ठेऊन प्रवाहासोबत पुढे जायचे ? चळवळीसोबत पुढे जायचे ? कि चळवळीला पुढे न्यायचे ? या प्रश्नांचा विचार करावा लागेल.
अपरिहार्यपणे का असेना पण आज आंबेडकरी विचारांची या व्यवस्थेला गरज आहे. विस्कटलेली कृषीव्यवस्था, लयाला गेलेली अर्थव्यवस्था, बोकाळलेला प्रशासकीय भ्रष्टाचार, भरकटलेले राजकारण या सर्व परिस्थितीत देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. पण आंबेडकरी चळवळीचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे चळवळीला योग्य ती उर्जा मिळत नाही. आंबेडकरी चळवळ आवर्तात सापडलेली आहे. “दलित पाँथर” सारखे एखादे संघटन आंबेडकरी चळवळीला यातून बाहेर काढू शकेल का ? की यापेक्षा वेगळा विचार करावा लागेल ? याचे उत्तर चळवळीला शोधायचे आहे.
दलित-शोषित-पिडीत-वंचित समाजावर होणारे अन्याय कमी झालेले नाहीत. हे वास्तव आहे. कारण सामाजिक मानसिकता घडविण्यात ही व्यवस्था अपयशी ठरली आहे. आणि जोपर्यंत सामाजिक परिवर्तन मानसिक परिवर्तनापर्यंत घडून येत नाही. तोपर्यंत सामाजिक अन्याय पूर्णतः कमी होतील असे कुठलाही तत्ववेत्ता व भविष्यवेत्ता सांगू शकणार नाही. असे असले तरी अन्याय अत्याचाराची पूर्वीची अवस्था आज राहिलेली नाही. आज सामाजिक अन्यायाची धार बोथड झालेली आहे. अपवादात्मक उदाहरणे सोडली तर संवैधानिक कायद्याची व्यवस्था अन्यायावर वचक ठेऊन आहे. आंबेडकरी चळवळीला आणी या चळवळीतील कार्यकर्त्यांना गरज आहे ती कायदेशीर संवैधानिक मार्गाचा वापर करून अन्यायमुक्त भारत निर्माण करण्याची. आंबेडकरी चळवळ बदललेल्या अर्थव्यवस्थेत समदुःखी लोकांपर्यंत पोहचविण्याची. महागाई आणि वाढत असेलेली आर्थिक विषमता दलित-पिडीत-शोषित-वंचित समाजासाठी घातक ठरत आहे. अश्या परिस्थितीत समग्र आंबेडकरी विचार चळवळीच्या माध्यमातून व्यवस्थेत उतरविण्याचे ध्येय आता आंबेडकरी चळवळीने उराशी बाळगले पाहिजे.
आंबेडकरी चळवळ वैश्विक मूल्यावर उभी आहे. आंबेडकरी विचार बुद्धाच्या वैश्विक विचारांच्या प्रस्थापनेसाठी आग्रही आहेत. अन्याय अत्याचाराच्या क्रिया-प्रतिक्रियेतून बाहेर पडून आंबेडकरी चळवळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अर्थनीतीला, राजनीतीला, प्रशासन नीतीला, आंतरराष्ट्रीय नीतीला उराशी बाळगावे लागेल. व त्याच आधारावर चळवळीची पुढील दिशा व आंदोलने निर्धारित करावी लागेल. “दलित पाँथर” आधुनिक काळात आंबेडकरी चळवळीच्या उभारणीसाठी पर्याप्त नाही. बामसेफ, बीएसपी ने प्रदूषित केलेल्या आंबेडकरी विचारांना व त्यातून झालेल्या ध्रुवीकरणाला थांबवून चळवळ संघटीत करावी लागेल. त्यासाठी आंबेडकरी चळवळीला दलित चळवळीची ओळख पुसून काढून अखिल भारतीय पटलावर आंबेडकरी चळवळ घेऊन जावी लागणार आहे. कारण आंबेडकरी विचार हे फक्त दलित चळवळीपर्यंत सीमित करता येणारे नाहीत. आंबेडकरी विचारांचे स्वरूप व्यापक आहे.
आज आंबेडकरी समाज विघटीत आहे. संस्था/संघटनांचे मायाजाल सामाजिक ध्रुवीकरणाला बळ देत आहे. राजकीय पटलावर होणारी नामुष्कीजनक पीछेहाट आणि आंबेडकरी नेत्यांचे समाजद्रोही निर्णय आंबेडकरी चळवळीला मागे खेचत आहे. अश्या परिस्थितीत नव्याने चळवळीत येऊ पाहणाऱ्या तरुणांना आंबेडकरी चळवळीला इप्सित ध्येयापर्यंत घेऊन जायचे असेल तर क्रांतिकारी विचारांबरोबरच राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक पटलावर आंबेडकरी विचारांना अभिप्रेत उभारणी करावी लागणार आहे. त्यासाठी समाज संघटीत करावा लागणार आहे. “दलित पाँथर”सारखे संघटन उभे करून समाज संघटीत होणार नाही. “दलित पाँथर” आता कालबाह्य झालेले आहे. सामाजिक व्यवस्था झपाट्याने चंगळवादाकडे वळते आहे. जाती, धर्म, संस्कृतीच्या बाहेर पडून नव्या सामाजिक वातावरणाची उभारणी नवी पिढी करू पाहते आहे. त्या पिढीसमोर आंबेडकरी विचार व चळवळ हा पर्याय उभा करायचा असेल तर आंबेडकरी चळवळीला समाज संघटीत करण्यासाठी समाजासमोर एक नेतृत्व उभे करावे लागणार आहे. नेतृत्वाची कास धरून राजकीय, सामाजिक, आर्थिक व धार्मिक स्तरावर सामाजिक एकोपा उभा करावा लागणार आहे.
सत्तालोलुपता ही आंबेडकरी नेतृत्वाच्या आजूबाजूला लागलेली कीड आहे. आंबेडकरी चळवळ अश्या सत्तालोलुप नेतृत्वामुळे खिळखिळी झाली आहे. गरज आहे राजकीय सत्तेच्या मागे धावण्यापेक्षा सामाजिक सत्ता प्रस्थापित करण्याची. जग झपाट्याने बदलत आहे. अश्या परिस्थितीत जहाल विचार उराशी बाळगून आंबेडकरी समाजाला व कार्यकर्त्यांना आपले ध्येय साध्य करता येणार नाही. ध्येयपूर्तीसाठी छोटी मोठी आंदोलने करून आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करण्याच्या प्रवृत्तीतून उभे झालेले बहु-नेतृत्वाचे पीक संपुष्टात आणावे लागणार आहे. वैचारिक, स्वाभिमानी आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या नेत्याची निवड करावी लागणार आहे. त्या नेत्याच्या पाठीशी समाज उभा होणे गरजेचे आहे. नव्या नव्या संघटना कितीही उभ्या झाल्या तरी आता आंबेडकरी चळवळीचे पुनरुज्जीवन होणार नाही. पर्याय आहे तो हाच कि प्रस्थापित नेत्यांमधूनच एक नेता निवडून चळवळ त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली उभी करावी लागेल. तेव्हाच आंबेडकरी चळवळीला गतवैभव व आंबेडकरी विचारांना इप्सित ध्येय साध्य करता येईल.


 ---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

Wednesday 20 November 2013

भारत अजूनही आंबेडकरवादी व्यवस्थेच्या प्रतीक्षेत...

भारत अजूनही आंबेडकरवादी व्यवस्थेच्या प्रतीक्षेत...
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
भ्रमणध्वनी क्र. 8793397275, 9226734091

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व्यक्तिमत्व ते विचार असा प्रवास प्रत्येक भारतीयांसाठी परिचयाचा आहे. ‘भारतीय घटनेचे शिल्पकार ही त्यांना २५ नोव्हेंबर १९४९ ला संविधानसभेसमोर मिळालेली उपाधी’1 ते अगदी उशिराने का होईना परंतु १९९० ला त्यांना बहाल करण्यात आलेला मरणोत्तर “भारतरत्न”2 हा सर्वोच्च सन्मान सर्व भारतीयांसाठी परिचयाचाच आहे. सोबतच भारतातील सामाजिक-आर्थिक-राजकीय-धार्मिक बंधनांनी ग्रसित असलेल्या “करोडो शोषित-पिडीत जनतेचे ते भूत-वर्तमान-भविष्याचे कैवारी” म्हणून मिळालेली सामाजिक महानतेची उपाधी प्राप्त झाली आहे. “आम्ही प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय”3 असा जाज्वल्य राष्ट्राभिमान, राष्ट्रभक्ती आणि उत्तुंग राष्ट्रवाद जोपासणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरतात. लोकशाही व्यवस्थेचा फक्त पुरस्कार न करता संविधानाच्या माध्यमातून आणि जनतेच्या मानसिकतेतून देशात लोकशाही व्यवस्था रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जितके सामाजिक क्रांतीचे होते तितकेच ते राजकीय, आर्थिक, धार्मिक अश्या विविध पातळ्यांवर बदलासाठीचे होते. व्यक्तीविकासाच्या मानसिकतेपासून ते सामाजिक प्रक्रियेच्या परिशिलनापर्यंत झेप घेणारे त्यांचे विचार या व्यवस्थेच्या तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी इथल्या भारतीयांचीच नव्हे तर या व्यवस्थेची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय विचार, राजकीय विचार, प्रशासकीय विचार, व्यवस्थात्मक विचार इ. चा भारतीय व्यवस्थेच्या परिप्रेक्षात आढावा घेणे गरजेचे आहे. कारण या व्यवस्थेने संविधान स्वीकारले पण अजूनही आंबेडकरी व्यवस्था स्वीकारलेली नाही. त्याचाच हा आलेख...
            २५ नोव्हेंबर १९४९ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेला भारताचे संविधान सुपूर्द करतांना केलेल्या भाषणात म्हणतात कि, “संविधान कितीही चांगले असले तरी ते चालविणारी माणसे चांगली नसेल तर संविधान अपयशी ठरेल. तसेच संविधान कितीही वाईट असले तरी ते चालविणारी माणसे चांगली असली तर संविधान यशस्वी ठरेल.”4 अगदी हीच भविष्यवाणी आज भारतीय संविधानाच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरतांना दिसून येते. जगासाठी भारतीय संविधान यशस्वी ठरत असले आणि त्या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कितीही श्रेष्ठ वाटत असले तरी भारत व्यवस्थात्मक दृष्टीने अपयशी ठरला हे निर्विवाद सत्य आहे. कॉंग्रेस च्या ध्येयधोरणांचा सदैव विरोध करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला एकपक्षीय हुकुमशाहीपासून वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या महापरिनिर्वाणापासून ते आजतागायत या देशाने कॉंग्रेस ची एकपक्षीय घराणेशाहीची हुकुमशाही उपभोगली हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. याचे एकमात्र कारण कॉंग्रेस ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून येणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवस्थेची उभारणी होऊ दिली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रस्थापित समाजाचा होणारा विरोध हेही त्याचे दुसरे कारण ठरले. ज्यामुळे आजतागायत भारतात आंबेडकरी व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही.
            समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता आणि एकसंघ राष्ट्रनिर्मिती ही आंबेडकरी व्यवस्थेची मुख्य सूत्रे संविधानात अंतर्भूत असली तरी ते वास्तवात प्रकर्षाने उतरू शकली नाही. ‘स्वातंत्र्य, माणुसकी, समान हक्क मिळतील तेच स्वराज्य’5 आणि ‘साम्राज्यशाही, भांडवलदारी, जमीनदारशाही यांच्या दडपणातून राष्ट्राला मुक्त करणे हेच संपूर्ण स्वातंत्र्य’6 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते. परंतु आजच्या स्वराज्यात स्वातंत्र्य, माणुसकी, समान हक्क नाकारले जातात. हेच निदर्शनास येते. OBC आरक्षणाच्या विरोधात उभे झालेले सुशिक्षितांचे आंदोलन असो कि देशांतर्गत स्त्रियांवर होणाऱ्या अत्त्याचारात झालेली वाढ असो. सत्ताधारी आणि व्यवस्था स्वराज्याची मानसिकता समाजात रुजविण्यात अयशस्वी झाली याचेच हे द्योतक आहे. १९९० नंतर LPG (उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण) च्या रुपात या देशात आलेले साम्राज्यशाही, भांडवलदारी चे विदेशी रूप या देशाला अजूनही संपूर्ण स्वातंत्र्य मिळालेले नाही हे सिद्ध करते. देशांतर्गत लागू करण्यात आलेल्या खाउजा धोरणाने कामगार, शेतकरी, श्रमिकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले नाही. मात्र श्रीमंत-गरीब यांच्यातील आर्थिक तफावत वाढविण्यास मदत केली. ज्याचा परिणाम आज २० वर्षाच्या काळात महागाईच्या रुपात देशासमोर उभा झालेला आहे. “राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी चाललेली काँग्रेसप्रणीत धडपड फसवी आहे. जोपर्यंत सामाजिक-आर्थिक स्वातंत्र्य-समानता प्राप्त होत नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याला व समानतेला अर्थ प्राप्त होणार नाही.”7 हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाकिताचे वास्तव आजच्या समाजव्यवस्थेत दिसून येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगार, शेतकरी, श्रमिक हितैषी धोरण अभिप्रेत होते. तसे धोरण न आखता श्रीमंत भांडवलदारधार्जिणे धोरण बनविण्यात सत्ताधारी आपले इतिकर्तव्य समजत गेले. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला (संविधानातून प्राप्त झालेली संवैधानिक अधिकार वगळता) या व्यवस्थेची धोरणे आणि प्रशासन कधीच आपलेसे करू शकले नाही. भ्रष्टाचार आणि त्यातून निर्माण झालेला जनआक्रोश हे त्याचेच द्योतक आहे. सत्ताधारी भांडवलदार, कारखानदारांचे बाहुले बनले तर प्रशासक सर्वसामान्य माणसांचे शोषक बनले. अनेक संवैधानिक योजना व कायदे कागदावरच राहिले. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची तसदी प्रशासकांनी आणि नौकरदार वर्गांनी घेतली नाही. याचा प्रतिलाभ संविधानविरोधकांनी घेऊन अन्ना हजारे व टीम ला पुढे करून संविधान निरस्त करण्यापर्यंत मजल मारली.
या व्यवस्थेने म्हणण्यापेक्षा व्यवस्था ज्यांच्या हाती स्थिरावली त्या सत्ताधाऱ्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा फक्त मताच्या राजकारणासाठी वापर केला. व्यवस्थेच्या निर्मितीसाठी व सामाजिक परिवर्तनासाठी त्याचा वापरच केला गेला नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त झाला. भूमिहीन शेतमजूर गरिबीच्या खाईत लोटला गेला. स्त्री अत्याचाराची शिकार झाली. नवशिक्षित बेरोजगार देशासमोरील गंभीर समस्या बनला. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली. आणि एकूणच व्यवस्था अपयशाच्या उत्तुंग शिखराला पोहचली आहे अशी देशांतर्गत मानसिकता घडविण्याची संधी विरोधकांना मिळाली.
‘इथली शेती आणि इथला शेतकरी जोपर्यंत बळकट होणार नाही तोपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेला विकासाकडे मार्गक्रमित होता येणार नाही. त्यासाठी दामोदर खोरे प्रकल्प, भाक्रानांगल प्रकल्प आणि कोसी धरण सारखे महात्वाकांशी प्रकल्प उभे राहावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केले. यासोबतच नद्या जोडो प्रकल्प भारताने हाती घ्यावा. ज्यामुळे विजेचा प्रश्न सोडविता येईल. शेतीसाठी लागणाऱ्या सिंचनाचा प्रश्न सोडविता येईल. व सोबतच देशांतर्गत जलवाहतुकीला चालना देऊन शेती, कारखानदारी व शहरे जोडता येईल. हा उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी डोळ्यासमोर ठेवला होता.’8  तेव्हा ते प्रकल्प शक्य होते. परंतु या राष्ट्रहिताच्या महत्वाकांक्षी उद्देशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या गेले. सन २००० मध्ये अटल बिहारी बाजपेयी च्या नेतृत्वाखालील NDA सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नद्या जोडो प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. परंतु वाढते शहरीकरण, कारखानदारी आणि प्रकल्पासाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चाची कारणे देऊन सरकारला हा प्रकल्प गुंडाळावा लागला. आज देश शेतीसाठी लागणाऱ्या सिंचनाच्या व्यवस्थेसाठी चिंताग्रस्त आहे. वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या नैसर्गिक साधनांच्या अभावी भारनियमनातून देश जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नाकारण्यातून इतक्या भयंकर स्वरुपातील समस्येला देशाला तोंड द्यावे लागेल. असे कुणालाही तेव्हा वाटले नसेल. पण आज तीच वास्तवता आहे.
“राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.”9 हे बाबासाहेबांचे म्हणणे आजच्या प्रत्येकच राजकीय पक्षांना लागू होते आहे. आज प्रत्येकच पक्ष देशापेक्षा स्वतःच्या तत्वप्रणालीला मोठे मानत आहे. भाजपा हिंदुत्वाच्या तत्वप्रणालीला तर कॉंग्रेस गांधीवादी रामराज्याच्या तत्वप्रणालीला सोडायला तयार नाही. तिकडे मार्क्सवादी पक्ष मार्क्सच्या परंपरागत द्वंद्वाच्या तत्वप्रणालीतून बाहेर पडायला तयार नाहीत. राष्ट्रीय पक्षांचा हा नाकर्तेपणा प्रादेशिक पक्षांना बळ देत आहे. ज्यांच्याकडे स्वतःची कुठली तत्वप्रणाली नाही आणि राष्ट्रीय भावना नाही. त्यामुळे आज भारतात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. स्वतःच्या तत्वप्रणालीच्या पुढे जाऊन राष्ट्रहिताची भावना आज कुठल्या पक्षाजवळ नाही. आणि हीच भीती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होती.
हिंदू कोड बिल पारित होऊ नये यासाठी आंदोलने उभी करून स्त्रियांच्या अधिकारांना नाकारण्यात आले. ज्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन सरकारच्या भूमिकेची आणि सामाजिक आंदोलनाची पोलखोल केली. आणि सामाजिक समतेच्या तत्वांशी तडजोड न करता राजकीय पदापासून दूर झाले. तेव्हा त्यांना झालेला विरोध लक्षात घेतला असता हिंदू समाजव्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उभी होती हे समजून घ्यायला उशीर लागणार नाही. परंतु याच व्यवस्थेने आणि समाजाने त्यांच्या पश्च्यात त्याच हिंदू कोड बिलात समाविष्ट असणाऱ्या तत्वांना स्त्री अधिकाराचे गोंडस नाव देऊन टप्प्याटप्प्याने पारित केले. खरे तर ती वर्तमान व्यवस्थेची गरज होती. परंतु त्याचसोबत तो आंबेडकरी विचारांचा विजय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा तो विजय होता. आज हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, स्त्रियांचे नौकरीतील आरक्षण, राजकीय आरक्षण हे सर्व हिंदू कोड बिलाचीच फलश्रुती आहे. त्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच द्यावे लागेल. भारतीय समाजाला आणि या व्यवस्थेला आंबेडकरी विचारांवर निर्भर होऊन व्यवस्था परिवर्तन करणे भाग आहे. हेच यावरून सिद्ध होते.
अलीकडेच २०१३ च्या अर्थसंकल्पात केली गेलेली १० टक्के अधिकाराची तरतूद असो कि आज वास्तवात असलेले progressive taxation चे model असो सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५२ च्या पहिल्या अर्थसंकल्पात समाविष्ट करावे यासाठी निवेदन दिले होते. पण तेव्हा ते नाकारण्यात आले. आज एकंदर अर्थव्यवस्था डबघाईला आली असतांना १९५२ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविलेले taxation प्रणालीतील महत्वपूर्ण तत्व मान्य केले जातात. पण तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून ते आलेले आहे हे म्हणण्याची शक्ती सत्ताधाऱ्यामध्ये नाही. आंबेडकरी विचार पेलून धरण्याची ताकत इथल्या सत्ताधाऱ्यामध्ये नाही. ही या देशाची शोकांतिका आहे. आंबेडकरी विचारांशिवाय देश प्रगती करू शकत नाही. त्यामुळे “उशिराने सुचलेले शहाणपण” या म्हणीप्रमाणे आंबेडकरी विचार व्यवस्थेसाठी स्वीकारले जातात पण डॉ. आंबेडकरांचे नाव न घेता.
आज जागतिक स्तरावर मार्क्सवाद, लेनिनवाद स्वीकारून चीन, जपान, सोव्हिएत रशिया, कंबोडिया, जर्मनी, रोमानिया, व्हिएतनाम सारखे देश प्रगतीपथावर आहेत. कारण या देशांनी मार्क्स च्या विचारांना व्यवस्थात्मक दृष्टीकोनातून स्वीकारले आहे. पण भारतात मार्क्स पेक्षा २ पावले पुढे जाऊन राज्य समाजवादाची मांडणी करणारे प्रगल्भ राष्ट्रवादी विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात असतांना त्या विचारांना व्यवस्थात्मक दृष्टीकोनातून स्वीकारले न गेल्याने भारत विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो दूर खितपत पडलेला आहे. या देशाला मुलतत्ववादाने पछाडले आहे. हा मुलतत्ववाद देशाच्या प्रगतीमध्ये अडथडा आहे हे लक्षात घेऊनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला भारतीयत्वाची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या देशांतर्गत अखंडतेची संवैधानिक पावती दिली आहे. परंतु हा आंबेडकरी विचार परिघाबाहेर ठेऊन धार्मिक सामंतशाही, धार्मिक साम्राज्यवाद जोपासणाऱ्या प्रवृत्तीने आंबेडकरी व्यवस्था या देशात येऊ दिली नाही. ज्यामुळे हा देश संविधानिक सुरक्षा लाभली असतांनाही अस्थैर्याच्या प्रक्रियेतून जातो आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे विचार एका विशिष्ठ परिघात जाणून घेता येत नाही. कारण त्यांनी मांडलेले विचार हे समग्र देशाच्या कल्याणाचे आहे. त्याला मानवतावादी विचारांची जोड आहे. मागासवर्गीय व अल्पसंख्यांक वर्गाच्या उत्थानासाठी state and minorities या निवेदनात संविधान सभेसमोर केलेल्या मागण्या या देशाच्या भवितव्यासाठी महत्वपूर्ण होत्या. त्यामुळेच त्याला या देशाचे mini constitution of india असे म्हणता येईल.10 त्यातील काही तत्व स्वीकारली गेली तर काही नाकारण्यात आली. परंतु कालांतराने वर्तमानाच्या रेट्याने आणि सामाजिक परिस्थितीने नाकारलेल्या विचार तत्वांना देखील मान्य करावे लागले. हेच आंबेडकरी विचारांचे बलस्थान आहे.
आज नवीन राज्यांच्या निर्मितीसाठी केंद्र-राज्य संबंधात तणावाची परिस्थिती आहे. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील वाद सोडविला जात नाही. ज्या वादाचा निपटारा करण्यासाठी सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३८ च्या मुंबई असेम्ब्ली मधेच केलेल्या होत्या.11 आज तोच प्रश्न महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या सीमेवरील बेळगाव च्या संबंधाने पुढे येतो आहे.  राष्ट्राच्या लष्करी संरक्षणासाठी हैद्राबाद ही देशाची दुसरी राजधानी असावी अशी मागणी त्यांनी thoughts on linguistic states यात केलेली आहे.12,13 यासोबतच स्वतंत्र विदर्भ राज्य असावे अशीही मागणी त्यात होती.14 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य निर्मितीसाठी state and minorities आणि thoughts on linguistic states यात सुचविलेल्या सूचना व तत्व लक्षात घेतले गेले असते तर दक्षिण भारतात तेलंगणा आणि महाराष्ट्रात विदर्भ पेटला नसता. हैद्राबाद ही देशाची दुसरी राजधानी बनविली गेली असती तर उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय हा देशांतर्गत अदृश्य कलह हद्दपार होऊन भारतीयत्व रुजविता आले असते. आणि उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय वाद संपविता आला असता. पर्यायाने प्रशासकीय यंत्रणा भक्कम होऊन देशाच्या प्रगतीच्या वाटा मुक्त करता आल्या असत्या. प्रादेशिक वाद संपुष्टात आणता आला असता.
            एकंदरीतच आंबेडकरी विचार संवैधानिक स्वरुपात स्वीकारला गेला असला तरी व्यवस्थेत परावर्तीत करण्यात या व्यवस्थेला अपयश आलेले आहे. आंबेडकरी विचारातील राष्ट्रहिताचा वैचारिक गाभा या देशाने कधी स्वीकारलाच नाही. त्यामुळे आंबेडकरी व्यवस्थात्मक दृष्टीकोन दुर्लक्षित राहिला. आज देशांतर्गत आर्थिक आणि राजकीय अस्थैर्याच्या परिस्थितीतही आंबेडकरी विचार देशाला स्थैर्याकडे नेऊ शकते. असे असतांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत त्यांना नाकारण्याची प्रवृत्ती त्यांच्या पश्च्यातही त्यांच्या विचारांच्या संबंधाने टिकून आहे. हे या देशाचे दुर्भाग्य आहे. आंबेडकरी तत्व विचारांचा स्वीकार हाच एकमेव पर्याय आज भारतीय व्यवस्थेसमोर उभा आहे. तो तुकड्यात विभागून न स्वीकारता समग्र व्यवस्थेतून स्वीकारला गेल्यास संवैधानिक अंमलबजावणीसोबतच आंबेडकरी विचार व्यवस्थेचा भाग बनेल. आणि देशाला प्रगतीपथावर येण्यास मदत होईल.



 संदर्भ :-

१.      Dr. Babasaheb Ambedkar Writing and Speeches vol – 13, page no. 1161 - 1219
३.      Dr. Babasaheb Ambedkar Writting and Speeches Vol-18, Part-II, Page no. 137
४.      Dr. Babasaheb Ambedkar Writing and Speeches vol – 13, page no. 1210
५.      Dr. Babasaheb Ambedkar Writting and Speeches Vol-18, Part-II, Page no. 238
६.      Dr. Babasaheb Ambedkar Writting and Speeches Vol-18, Part-II, Page no. 261
७.      Dr. Babasaheb Ambedkar Writting and Speeches Vol-18, Part-III
८.      डॉ. सुखदेव थोरात, “जलसिंचनावरील डॉ. आंबेडकरांचे योगदान”, सुगावा प्रकाशन, पुणे.
९.      Dr. Babasaheb Ambedkar Writting and Speeches Vol-18, Part-III, page no. 156
१०.  Dr. Babasaheb Ambedkar Writting and Speeches Vol-1 page no. 381
११.  Dr. Babasaheb Ambedkar Writting and Speeches Vol-18, Part-II, page no. 135
१२.  Dr. Babasaheb Ambedkar Writting and Speeches Vol-1 page no. XXVI
१३.  Dr. Babasaheb Ambedkar Writting and Speeches Vol-18, Part-III, page no. 406

१४.  Dr. Babasaheb Ambedkar Writting and Speeches Vol-1 page no. 141

Friday 27 September 2013

शाळा महाविद्यालयातील संस्थाचालकांचा शिष्यवृत्ती भ्रष्टाचार (घोटाळा) व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण

-: प्रेसनोट :-
दी. २७ सप्टेंबर २०१३

विषय :- शाळा महाविद्यालयातील संस्थाचालकांचा शिष्यवृत्ती भ्रष्टाचार (घोटाळा) व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण

महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन शिष्यवृत्ती चा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज online व प्रत्यक्ष महाविद्यालयात स्वीकारले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मध्ये होणारे संस्थाचालकांचे घोटाळे व विद्यार्थ्याच्या हक्काच्या शिष्यवृत्तीचे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शिष्यवृत्ती अर्ज online भरण्याची सक्ती केली आहे.
शिष्यवृत्तीच्या लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळा महाविद्यालयांनी प्रवेश फी घेऊ नये असा कायदा व नियम असतांना देखील शाळा महाविद्यालये त्यांच्याकडून प्रवेश फी आकारीत आहेत. पहिल्यांदा इथेच कायद्याचे सर्रास उल्लंघन संस्थाचालकांकडून केले जात आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश फी भरली आहे त्या विद्यार्थ्यांनी online शिष्यवृत्ती अर्ज भरतांना तसा उल्लेख आवर्जून करावा. जेणेकरून ती भरलेली रक्कम त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात परत केली जाते.
शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याऱ्या सर्वच OBC, SC, ST, NT, VJ, MINORITY च्या विद्यार्थ्यांना प्रवेश फी त्यांच्या बँक खात्यात परत केली जाते. हे लक्षात घ्यावे. तशी विद्यार्त्यांमध्ये जागृती करावी. परंतु हल्ली संस्थाचालक ज्या विद्यार्थ्यांनी online अर्जात प्रवेश फी भरल्याचा उल्लेख करीत आहेत त्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारले जात नाहीत. व त्यांना प्रवेश फी न भरल्याची नोंद करून आणण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे प्रवेश फी ची रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळण्याऐवजी संस्थाचालकांच्या खिश्यात चालली आहे.
कुठलीही प्रवेश फी न आकारता शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा असा नियम असतांना संस्थाचालक सर्रास विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी आकारून आर्थिक शोषण करीत आहेत. तरी शासनाचे याकडे कुठलेही लक्ष नाही. शिवाय समाजकल्याण विभागामार्फत अश्या संस्था व संस्थाचालकांवर कुठलीही कार्यवाही केली जात नाही. ज्यामुळे हल्ली शाळा महाविद्यालये शिक्षणाच्या आदान प्रदानाचे पवित्र स्थळ राहिले नसून विद्यार्थ्यांच्या आर्थिक व मानसिक शोषणाचे अड्डे बनलेले आहेत. ज्याची मोठी झळ आर्थिक कमकुवत वर्गातील विद्यार्थ्यांना सोसावी लागत आहे.
प्रवेश फी विद्यार्थ्यांकडून स्वीकारूनही शिष्यवृत्ती अर्जात तसा उल्लेख न करण्याचा फतवाच शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी काढला आहे. ज्यामुळे प्रवेशाची सर्व रक्कम सरळ शाळा, महाविद्यालयाच्या खात्यातून संस्थाचालकांच्या खिश्यात घातली जात आहे. यात दरवर्षी करोडो-अब्जो रुपयाचा घोटाळा होत असतांना सरकार व समाजकल्याण खात्याचे उघड्या डोळ्याने दुर्लक्ष केले जात आहे.
त्यामुळे जी शाळा महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश फी चा उल्लेख शिष्यवृत्ती अर्जात करण्यास मनाई करीत आहेत अश्या शाळा महाविद्यालय व संस्थाचालकांची तक्रार भारिप बहुजन महासंघाच्या कार्याकर्त्यांजवळ करावी. किंवा डॉ. संदीप नंदेश्वर यांच्याशी प्रत्यक्ष 8793397275 या क्रमांकावर संपर्क करावा. 
१-     शाळा महाविद्यालयांनी चालविलेला मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा हा आर्थिक छळ त्वरित बंद करावा. व सर्व शाळा महाविद्यालयातील शिष्यवृत्ती फार्म ची परत तपासणी करून प्रवेश फी चा उल्लेख केलेल्या शिष्यवृत्ती फार्म लाच महाविद्यालयाने स्वीकारावे.
२-     महाविद्यालयात ज्या कर्मचार्यांकडून प्रवेश फी चा उल्लेख केलेले शिष्यवृत्ती फार्म स्वीकारले जात नाही अश्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी खटले व Atrocity कायद्याअंतर्गत खटले दाखल करावेत.
३-     शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी आकारू नये.
४-     ज्या शाळा महाविद्यालयात शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी आकारली जाते त्यांच्या शिष्यवृत्ती खात्याची कायदेशीर चौकशी करावी. या चौकशीत करोडो-अब्जो रुपयाचा शिष्यवृत्तीचा आर्थिक घोटाळा समोर येईल. अश्या शाळा महाविद्यालयाचे संलग्नीकरण आणि मान्यता काढून घेण्यात यावी.
५-     मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे होणारे मानसिक व आर्थिक शोषण थांबविण्यासाठी शासनाने व समाजकल्याण विभागाने त्वरित पाऊले उचलावीत.
वरील उल्लेखित शिष्यवृत्तीतील भ्रष्टाचार व त्यातून होणारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण थांबविण्यासाठी भारिप बहुजन महासंघातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची दखल शासन व संबंधित समाजकल्याण विभागाने लवकरात लवकर घ्यावी.

आपला
डॉ. संदीप नंदेश्वर

सामाजिक कार्यकर्ता, नागपूर.