Monday 2 December 2013

स्वातंत्र्या तू गुलाम आहेस अजूनही...


स्वातंत्र्या तू गुलाम आहेस अजूनही...

मला आठवते अजूनही...मी जन्मलो तेव्हाचा तो क्षण...सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला होता...आपल्या अस्ताची घटिका मोजीत होता...तिथेच सुरु होता उद्याच्या उदयाचा पूर्वेकडील प्रवास...मी जन्मलो तेव्हा अंधार होता कि उजेड माहित नाही...परंतु डोळे उघडले तेव्हा उजेडच दिसला...देश स्वतंत्र झाला तेव्हाही सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडेच आला होता...प्रकाशात नाही तर अंधारातच स्वातंत्र्याचा जन्म झाला होता...स्वातंत्र्याने डोळे उघडले तेव्हाही उजेडच दिसला होता...देश जागा झाला तेव्हा स्वातंत्र्याचा मुक्त श्वास चहूकडे दरवळत होता...कुणी आनंद साजरा करीत होता...कुणी नियोजन करीत होता...कुणी भविष्याचे ठरवीत होता...तर कुणी तरी या स्वातंत्र्याचा विटाळ करीत होता...अगदी तसेच...जसे मी जन्मलो तेव्हा...घरातील सर्व सदस्य आनंद साजरा करीत होते...आई वडील माझ्या भविष्याचे नियोजन करीत होते...तर कुणी तरी माझे भविष्य ठरविण्यात व्यस्त होते...दुसरीकडे मात्र विटाळ म्हणून कुणीतरी बांगळ्या फोडीत होते...ते कोण होते याची जाणीव मला तेव्हा नव्हती...पण समजायला लागले...तेव्हा कळायलाही लागले...बहुतेक ज्यांनी माझा प्रवेश या भूतलावर एक स्वतंत्र मानव म्हणून व्हावा यासाठी प्रयत्न केले...तेच असावे...असेच काहीतरी माझ्या स्वातंत्र्याचे झाले...

असो...स्वातंत्र्या मला आनंद झाला तुझी गुलामी घालविली गेली...तू गुलामीतून मुक्त झाला...माझा जन्म झाला तेव्हा तू गुलाम नव्हता...स्वतंत्र देश म्हणून तो-यात मिरवीत होता...तुझ्या मुकुटावर तिरंगा मानाने डोलत होता...तोच तुझा तिरंगा लाल किल्यावर लहरतांना पाहून आजही मी स्वाभिमानाने तुझ्या तिरंग्याला...तुझ्या स्वातंत्र्याला सलामी देतो...शरीरातील धमण्याधमण्यातून रक्त उफाळून येते...भारतीय नागरिक होण्याचा गर्व वाटतो...देशासाठीचे देशप्रेम ओसंडून वाहते...तेव्हाच शरीरातील रक्तही तापू लागते...हाताची मुठ आवळू लागते...संपूर्ण शक्ती एकवटून स्वातंत्र्यावर तुटून पडण्यासाठी...

आम्ही या स्वातंत्र्याला आमचे कसे म्हणावे...मी स्वातंत्र्यात जन्मलो म्हणून कि, स्वातंत्र्याच्या नावावर स्वतंत्र गुलाम बनलो म्हणून...इथली समता कागदावर धूळ खाते...ज्यांच्या तोंडात दात नाही ते स्वातंत्र्याचे पिज्झा खाते...हाताला बळ नसणारे देश्याच्या रक्षणाचे स्तोम आणते...शक्तिशाली हात मात्र बेरोजगाराच्या दुष्टचक्रात बैलांचे कासरे घेते...जमले नाही तर हातात हलका बॉम्ब घेऊन हजारोंचे प्राण घेते...तरीही स्वातंत्र्या तुझी निद्रा भंग का होत नाही...पण आता तुला उठावे लागेल... तुझी स्वतंत्र गुलामीची निद्रा तोडावी लागेल... अन्यथा बेरोजगारीने त्रस्त झोपडपट्टी तुला गुलाम केल्या वाचून राहणार नाही...हे लक्षात घे स्वातंत्र्या...

स्वातंत्र्याच्या चिंध्या आज अंगाखांद्यावर खेळत आहेत...उघड्या नागड्या शरीरावरील गुलामिचे वळ तुझ्या चिंध्या पांघरून काय मिटणार आहेत का स्वातंत्र्या?...याचेही उत्तर मला तुझ्याकडूनच पाहिजे आहे...त्या लाल किल्ल्यावर दिमाखाने फडकणाऱ्या चक्रध्वजाला आम्ही सलाम करावा...कि पांढऱ्या कपड्यात तुझ्या भोवती पिंगा घालणाऱ्या मानवी रूपातील शैतानावर शत्र उगारायचे... सांग स्वातंत्र्या काय करायचे ?...स्वातंत्र्याच्या नावावर देशाला विकतांना यांना अभिमान वाटतो...आणि हक्क मागतांना होणाऱ्या पाशवी अत्याचारात स्वाभिमान जागतो...हि जगातली कुठल्या स्वातंत्र्याची व्याख्या आहे?... भरलेल्यांना पोटभर अन्न आणि भूकेलेल्यांवर धारदार शस्त्र...हा कुठल्या कल्याणाच्या कक्षेत येतो ?...याचे तरी उत्तर देशील का रे स्वातंत्र्या...

स्वातंत्र्या मी तुला हाताच्या कोपरापासून सलाम केला असता...बेंबीच्या देठापासून "भारतीय गणराज्याचा जय जयकार" केला असता...माझ्या माता भगिनींच्या अंगावरील कपडे शाबूत ठेवण्याची हमी जर तू दिली असती...भारत माता दाखवतांना तिरंग्याची साडी घालून धाखवता...पण त्याच तिरंग्याची शान तुझी खरी भारतीय माता भगिनी उघडी रस्त्यावर फिरतांना जगाला धाखविली जाते...तेव्हा तू महालातल्या बंधिस्त खोलीत धिंगाणाच घालत असतो ना रे...तेव्हा कुठे तोंड खुपसून लपले असतात तुझे ३६ कोटी...कि प्रणय क्रीडेत मग्न असतात तुझे ६ कोटी...सांग स्वातंत्र्या मला कुठपर्यंत सहन करायचे आम्ही हे...उघडे होऊन केव्हापर्यंत सलामी ठोकायचे तुला...?

१५ आगस्त आणि २६ जानेवारीला स्वातंत्र्याचे संगीत आबाल वृद्धांपासून सर्वांच्याच मनात देशप्रेम प्रफुल्लीत करते...पण दुसऱ्याचे दिवशी तेच देश प्रेम कुठल्या कुंटणखाण्यात विकते...शाळकरी देशाभिमानाने रोमहर्षित होतात...पण शाळेतून बाहेर पडून बेरोजगारीच्या जगात तुझ्या स्वातंत्र्यावरच हल्ले करतात...समजू नको स्वातंत्र्या तू दिमाखात जगत आहेस...अरे तू तर लाचारा पेक्षा लाचारीचे जीणे जगत आहेस...५४५ आणि २५० यांच्यातच काय ते तुला तुझे स्वातंत्र्य दिसते का रे स्वातंत्र्या...कि हेच ते ७९५ ज्या ३ % चे राजकारण करतात...तेच तुझे स्वातंत्र्य समजायचे काय ?...आग लागू दे तुझ्या अश्या स्वातंत्र्याला जी ९७ % अजूनही गुलामच समजते...

स्वातंत्र्या मी जळतो आहे...धगधगतो आहे...पेटतो आहे...अजूनही त्याच जातीवादाच्या भट्टीत...तुझी धर्मनिरपेक्षता आणि गणराज्याची हमी...तेव्हा काय या जातीवादी माजलेल्या पोशिन्द्यांची मसाज करते काय रे...? सर्व प्रश्नाचे उत्तर तुला द्यावेच लागेल स्वातंत्र्या...नाहीतर हा गुलाम तुझ्या स्वातंत्र्याला हिमालयाच्या शिखरावर नेवून सुळाची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही...हे लक्षात ठेव...

स्वातंत्र्याचे धडे तू शिक्षणातून देतो...आणि तेच शिक्षण विकून बहुजनांना गुलाम बनवितो...आता सांग पुस्तकाच्या पानापानावर छापून असलेले तुझे स्वातंत्र्य टराटरा फाडायचे का ?...स्वातंत्र्याच्या नावाने शहीद झाले असे सांगतो...आता मीच तुला विचारतो...खरच ते शहीद झाले होते कि शहीद केले गेले होते ?...परकीयांनी मातीमोल केलेल्या तुझ्या स्वाभिमानाला परत मिळविण्यासाठी आणि पुनःश्च्य तुझी मालकीवजा गुलामीला परत आणण्यासाठीच स्वातंत्र्याच्या नावावर शहीद केल्या गेले असतील...यावर आता माझा पक्का विश्वास बसत चालला आहे...काय गरज काय होती स्वातंत्र्य मिळविण्याच्या घाईची...परकीय तुला आमच्या आई बहिणींची नग्न धिंड काढू देत नव्हते म्हणून...कि...त्यांची इज्जत लुटू देत नव्हते म्हणून...तू स्वातंत्र्याची घाई केलास...

स्वातंत्र्या आज तू दुखावलास तरी चालेल पण माझ्या प्रश्नाचे समाधान तुला करावेच लागेल...जातीवाद, धर्मवाद, अघोषित ब्राम्हणी भांडवलवाद तुला जोपासायचा होता म्हणून फसवलेस का रे स्वातंत्र्या...आता तुझा मुखवटा फाटलेला आहे...वयाची ६० (साठी) गाठूनही तू पोक्त होतांना दिसून येत नाही...हे तू आखलेल्या स्वातंत्र्याच्या षडयंत्राची साक्ष देण्यास पुरेसे आहे...असे तुला नाही वाटत का रे स्वातंत्र्या...

स्वातंत्र्या तू गुलाम आहेस अजूनही...जोपर्यंत मी स्वातंत्र्याचा पाईक होत नाही तोपर्यंत...भारतीय नागरिक म्हणून जोपर्यंत तुझी ओळख तयार होत नाही...तोपर्यंत स्वातंत्र्या तू गुलामच राहणार...तू जरी समझला नाहीस तरी मी तुला गुलामच समझणार आहे...लाज वाटत असेल तर फेकून टाक तुझी जाती, धर्माची ओळख...आणि मिरव माझ्यासारखा भारतीय नागरिक म्हणून दिमाखात...मुक्त कर पंखांना स्वातंत्र्याच्या निळ्या आकाशात... तोडून टाक बंधने मस्तकावर बांधलेल्या मनूच्या कपाटाची...सुरुंग लाव त्या भंगार बनलेल्या डोक्याला...जरा वाहू दे घाण हजारो वर्षांची...छळलेल्या पापाची...कुणाच्या तरी मातेची...

मीच तुला सर्वप्रथम प्राणांतिक सलामी ठोकेन...तुझी एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी...कारण मीच सर्वप्रथम प्रण केला होता..."मी सर्वप्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय" असण्याचा...विसरू नकोस स्वातंत्र्या तुला तुझे स्वातंत्र्य टिकवून ठेवता यावे म्हणून दिवस रात्र एक करणारा...एकमात्र माझा बाप होता...त्याचाच मी लेक तुला आज हिशोब मागतो आहे...माझ्या बापाच्या त्यागाचा वाटा तुम्ही आम्हाला का मिळू दिला नाही...याचे उत्तर मला पाहिजे आहे...अरे आम्ही लायक असतांना...बुद्धिमत्तेने कुशाग्र असतांना...लढवय्या बापांची औलाद असतांना...काहीच कठीण नाही आमच्यासाठी...ते आम्ही दाखवूनही दिले आहे...पण वेळोवेळी तूच आमच्या मार्गात आडवा येत गेला...मेहनतीने मिळवत असतांनाही अस्पृश्य म्हणून हिणवत गेला...लुटत गेला...छळत गेला...आणि मी जेव्हा पेटून उठलो तेव्हा पाठीमागून वार करतांना मायेच्या गर्भात मुंडके लपवत गेला...हेच का रे तुझे स्वातंत्र्य...भेकड पणाचे...

स्पर्धेपासून लपतो कश्यासाठी...तू स्वतंत्र आहेस ना, तर मग कर ना, मुकाबला इथल्या गरिबीचा, बेरोजगारीचा, जातीय, धार्मिक अत्त्याचाराचा, आई बहिणींची इज्जत परत मिळवून देण्याचा, फासावर लटकलेल्या माझ्या बापाला तुझ्या संसदेच्या शिखरावर मानाने बसविण्याचा...जमत नसेल ना तर स्वातंत्र्याचे सोंग सोडून दे...अथवा स्वातंत्र्याचा शिलेदार म्हणून तोऱ्यात मिरविणे बंद कर...मी अजूनही तय्यार आहे...इथल्या प्रत्येकाला भारतीय नागरिक म्हणून जगण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी...

तुला सांगतो स्वातंत्र्या मुठ्भरांचे स्वातंत्र्य तळहातावर घेऊन तू जास्त दिवस टिकू शकणार नाहीस...त्याऐवजी लोकस्वातंत्र्याचा आस्वाद घ्यायला तय्यार हो...इथे प्रत्येकच माणूस ५००० हजाराचे कर्ज घेऊन जन्मतो आहे...मी जन्मलो तेव्हा ही कर्ज घेऊनच जन्मलो...हे सांगतांना तुला शरम कशी वाटत नाही...जगाला दिमाखाने सांगतो आम्ही भारतीय कर्जातच पैदा होतो आणि कर्जातच मरतो...मात्र स्वातंत्र्या बघ तुझ्या याच देशात दर दिवशी पैदा होणारा देव लखपती, करोडपती होऊनच जन्म घेतो...जगही तुझ्याकडे पाठ फिरवून शिव्या हासडतो...श्रीमंत देवांच्या स्वतंत्र भारत देश्यातील गरीबीचे धिंडवडे काढतो...स्वातंत्र्या कुठे लोपला रे तुझा स्वाभिमान...भिकारड्याच्या जगात तुझी इज्जत अशी देवालयाच्या शिखरावर का टांगतो आहे...दर दिवशी दानाच्या नावाखाली एक एक माणसाला फासावर का लटकवतो आहे...

स्वातंत्र्या आता तुझे हे भूलभूलय्याचे स्वातंत्र्यही हिरावले जाणार आहे...माझे प्रश्न तर सोड आता देशच लुटला जाणार आहे... तुझ्या संविधानावर, संसदेवर हल्ले जोमाने सुरु झाले आहे... अण्णा, बाबा, साधू तुझ्याच बळावर, तुझ्याच पाठींब्यावर तुझ्या डोक्यावर थुइथुइ नाचणार आहे... आणि मी माझ्या उघड्या डोळ्याने स्वतंत्र भारतीय म्हणून स्वतंत्र भारताच्या गुलामीचा नंगा नाच पाहणार आहे...काय करू स्वातंत्र्या शेवटी मीही लाचार आहे...पण मला ही तूच लाचार बनविले आहे हे विसरू नको...अन्यथा तुझ्या स्वातंत्र्यावर डोळा ठेवणा-यांच्या छाताडावर बसून तुझी इज्जत गमावू दिली नसती...पण तू मला तशी संधीच दिली नाही रे स्वातंत्र्या...तरीही माझ्यावर अन्याय करीत गेलास...मलाच छळत गेलास...मलाच लुटत गेलास...तरीही तुझ्या संरक्षणासाठी मीच धावून येत आहे...मीच तुटत आहे...तुझ्या स्वातंत्र्याच्या अबाधीततेसाठी मीच लढत आहे...मात्र ज्यांनी तुझ्या स्वातंत्र्याचा अविरत लाभ घेतला...तुला भिकारी करून मालदार बनले...तू ज्यांना मुक्तहस्ते लुटवून दिलास...आज तेच तुझ्या अस्तित्वाचे दुश्मन झाले आहेत...आज तेच तुझ्या जीवावर उठले आहेत...मी मात्र आजही स्वातंत्र्याचा प्रवाही झेंडा डौलाने फडकवितच आहे...तुला ठेच न लागू देता...तुझा मान न ढळू देता...पूर्ण सन्मानाने तुला सलामी ठोकीत आहे...याच आशेत कि माझ्या प्रश्नाने तू आतातरी भानावर येशील...स्वातंत्र्याच्या शिखरावरून माझ्या गावातल्या वस्तीत येशील ...झोपडपट्टीतल्या प्रत्येकाच्या अंगणात फडकशील...गरिबांच्या झोपडीवरच दिमाखाने फडकशील...त्यांनाही जरा स्वतंत्र भारताचे भारतीय नागरिक बनण्याचा मान देशील...तेव्हाच मी तुला माझी सलामी ठोकणार आहे... स्वाभिमानाने "जन गण मन" चा जयघोष करणार आहे..."वंदे मातरम" म्हणून माझे प्राणही तुझ्या हिमालयाच्या शिखरावर तुझ्या रक्षणासाठी अगदी सज्ज ठेवणार आहे...आणि सा-या जगाला ओरडून सांगणार आहे..."भारतीय गणराज्याचा विजय असो"...
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५

No comments:

Post a Comment