Thursday 11 October 2012

धम्मक्रांती काटेरी कुंपणात अडकली...?



धम्मक्रांती काटेरी कुंपणात अडकली...?
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
९२२६७३४०९१ 

अशोक विजयादशमी धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मक्रांतीच्या संदर्भात आढावा घेणे गरजेचे होते. त्यांच्या महापरीनिर्वानानंतर बुद्ध धम्मावर झालेल्या धार्मिक प्रतीक्रांतीवाद्यांच्या आक्रमणाचा आणि बुद्ध धम्माच्या वाटचालीचा आढावा घेतांना काही उणीवा ह्या बुद्ध आंबेडकरी अनुयायांकडून राहिलेल्या आहेत त्याचा उहापोह या लेखात करण्यात आलेला आहे. या लेखात केलेले विश्लेषण हे प्राथमिक स्तरावरील असून धम्मक्रांतीला मारक तत्वांचा उहापोह करून धम्मक्रांतीला अभिप्रेत विश्लेषण या लेखात करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 


क्रांतीचा एक नारा आम्हीही दिला. क्रांतीचा सूर्य तळपतांना “याची देहा याची डोळा” आम्ही बघितला. क्रांतीची नवी पहाट १४ ऑक्टोंबर १९५६ ला जेव्हा उजाडली तेव्हा इथल्या प्रत्येक शोषित-पिडीत-वंचित समाजाचा नवा जन्म झाला. श्वेतक्रांतीच्या श्वेतपुत्रांनी नागपूरची दीक्षाभूमी प्रफुल्लीत झाली होती. चहूकडे एकाच निनाद गाजत होता. ‘आज मी हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या जन्मकैदेतून मुक्त झालो.’ स्वातंत्र्याचा मुक्त आस्वाद घेण्यास आसुसलेला प्रत्येक देह त्या महामानवांना नमन करत होता. माणूस म्हणून ओळख देणा-या तथागत बुद्धाला आणि जातीच्या गटारगंगेतून काढून माणूसपण बहाल करणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रत्येकजन शरण जात होता. प्रत्येकाच्या मुखात एकच प्रतिज्ञा होती, “बुद्धं शरणं गच्छामि ! धम्मं शरणं गच्छामि ! संघम शरणं गच्छामि !”. जगाच्या इतिहासात सोनेरी अक्षराने कोरली गेलेली; २५०० वर्षानंतर प्रवर्तित झालेली धम्मदीक्षा क्रांती…धम्मचक्रप्रवर्तन क्रांती… 
शेवटचा बुद्ध राजा बृहदत्तापर्यंत असलेला बुद्ध भारत नंतरच्या काळात वैदिक आणि मुस्लिमांच्या आक्रमणाने लयाला गेला होता. अनेक प्रदूषणे धम्मात आली होती. भिक्षूंच्या कत्तलीपासून तर बौद्ध विहाराच्या उध्वस्त करण्याच्या इतिहासापर्यंत अनेक आक्रमणे बौद्ध धम्मावर झालेली होती. परंतु बुद्धाची तत्वे ही कायम होती. बुद्ध कायम होता. जरी तो वैदिकांनी विष्णूच्या अवताररुपात टिकवून ठेवला असला तरी तथागत बुद्धाचे अस्तित्व कायम टिकून होते. तत्व व धम्मातील प्रदूषणे बाहेर काढली गेली तर धम्मचक्र पुन्हा या धर्तीवर गतिमान करता येईल. आणि जगाला बुद्धाकडेच वळावे लागेल. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण विश्वास होता. विषमतावादी तत्व अंगी बाळगून असणा-या जगातील अन्य तत्त्वज्ञानापेक्षा समतावादी तत्व वास्तवात आणणारे तथागत बुद्धाचे तत्वज्ञान कधीही या जगाला अपरिहार्यच राहील. असा निश्चय करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि आपल्या सोबत लाखो अनुयायांना बुद्धाच्या समतावादाकडे वळविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेने एका क्षणात हजारो वर्षांची हिंदूंची विषमतावादी जातीची उतरंड धराशाही झाली. जातीने लादलेली मानवी गुलामगिरी ठोकरली गेली. धार्मिक उन्मादाने माजविलेली विषमता नाकारली गेली. जातीची उच्च-नीच कर्मकांडे मोडीत निघाली. गुलामीच्या बेड्या तळातळा तुटू लागल्या. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेची मानवी शृंखला ‘आम्ही सर्व समान आहोत’ चा उद्घोष करू लागली होती. जातीच्या पायथ्याशी बांधलेला ब्राम्हणी श्रेष्ठत्वाचा इमला कोसळू लागला होता. जातीय श्रेष्ठतेची ओळख पुसली जाणार या भीतीपोटी बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेला तात्कालिक विरोध केला गेला. आणि ही विरोधाची भूमिका आजतागायत सुरूच आहे. कुठल्याही परिस्थितीत ही धम्मक्रांती हाणून पाडायची असा निश्चय केलेली प्रतीक्रांतीवादी, जातीवादी व्यवस्था आणि माणसांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर धम्मदीक्षेसमोर काटेरी कुंपण रोवणे सुरु केले. आणि ते आजतागायत सुरु आहे. धम्मदीक्षेला काटेरी कुंपणात कुणी कुणी अडविले आणि त्यातून बाहेर पडण्याची तयारी असतांना धम्मदीक्षेची वाट कुणी अडवून धरली याचा गोषवारा घेणे गरजेचे आहे असे वाटते.
…१…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मचक्रप्रवर्तनाने जातीची विषमता नष्ट होऊन हिंदुव्यवस्था मोडकळीस निघाली होती. त्यामुळे धम्मदीक्षेची वाट अडवून धरण्याचे काम सर्वप्रथम इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेने केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय हेतूने हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अशी टीका करू लागले. कुठल्याही परिस्थितीत बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेला नैतिक पाठबळ लाभू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेने केले. त्यासाठी वेगवेगळ्या वेशातील माणसे बुद्ध धम्मात जाणीवपूर्वक पाठविले गेले. रजनीश ओशो, गोयंका, प्राणायमी रामदेव ही त्याचीच उदाहरणे आहेत. बुद्ध धम्मातील माणसे व शोषित-पिडीत-वंचित समाज यांच्या नादी लागला गेला. मोठ्या शिताफीने या बहुरुप्यांनी वेळोवेळी बुद्धाचे नामस्मरण केले. ज्यामुळे भोळी-भाबडी माणसे बुद्ध विचार, बुद्ध शिकवण, बुद्धांची पद्धती म्हणून अश्या हवशी अजगरांच्या गळाला लागली. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित धम्मक्रांतीचा रथ थांबविला गेला.
पोटाची खडगी भरण्यासाठी अहोरात्र झटून काबाळकष्ट करणा-या माणसाला विचार व तत्वज्ञान प्राशन करायला फक्त भावनिक आधार घ्यावा लागतो. त्याची श्रद्धा ही त्याच्या स्वातंत्र्यासाठी, त्याच्या अधिकारासाठी लढणा-या महामानवांप्रती अतूट असते. त्यामुळे अश्या महामानवांचे नाव घेऊन सर्वसामान्य लोकांना फसविण्यात आले. धम्मक्रांतीचा खरा संदेश सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचू नये याची खबरदारी घेतल्या गेली. कुठल्याही परिस्थितीत बौद्ध धम्म वाढू नये म्हणून वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे प्रयत्न केले गेले. प्रतीक्रांतीची पाऊले ओळखून आंबेडकरी रणनीती आखली जायला पाहिजे होती ती आखली गेली नाही. त्यामुळे प्रतीक्रांतीवादी, ब्राम्हणवादी व्यवस्थेने बौद्ध धम्मातील तत्वांना, विचारांना आणि एकूणच तत्वज्ञानात विष पेरण्याचे काम केले.
“बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. बुद्ध तत्वज्ञानातील प्रमुख तत्वे वैदिक धर्मग्रंथातून घेतली गेली आहेत. बुद्ध हा वास्तुशांतीचा एक भाग ???” अशा प्रकारे बुद्धाला अवतारी बनवून बौद्ध धम्माचे हिंदुत्वीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. आंबेडकरी परिप्रेक्षातून बौद्ध धम्म समजून घेणा-यांनी अश्या अवतारी हिंदुत्वीकरणाचा विरोध केला. परंतु हा विरोध काहींपुरताच मर्यादित राहिला. आंबेडकरी परीप्रेक्षातील बुद्ध समाजाचा कणा व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही. त्यामुळे पाश्चात्य आणि अवतारी बुद्धाला समाजातल्या मोठ्या घटकाने स्वीकारणे सुरु केले. “बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला आहे त्यामुळे आम्ही तो स्वीकारतो.” एवढीच त्या स्वीकारामागाची भूमिका राहिली. खरा बुद्ध आणि प्रदूषित बुद्ध यातील फरक जो बाबासाहेबांनी मांडला तो समाजापर्यंत पोहोचलाच नाही. जाणीवपूर्वक तो पोहचू दिला नाही. देवरूपी पाश्च्यात्य बुद्धिझम चा प्रचार आणि प्रसार भारतात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्याला इथल्या अवतारी बुद्ध बनवू पाहणा-या ब्राम्हणी व्यवस्थेचे पाठबळ मिळाले. आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा रथ थांबविला गेला.
…2…
आज धम्मक्रांतीवर आक्रमण करण्यासाठी वैदिक संस्कृतीची घुसळण बौद्ध धम्मात केली जात आहे. विपश्यना हे त्यातलेच बांडगुळ आज बुद्धिस्ट लोकांच्या मनावर बिंबविले जात आहे. आणि त्या माध्यमातून विज्ञानवादी बुद्ध तत्वज्ञानाला अध्यात्माची जोड दिली जात आहे. ज्या अध्यात्माच्या विरोधात बुद्धांनी संघर्ष केला तेच अध्यात्म बौद्धांच्या मानगुटीवर बसवून बौद्धांच्याच हाताने बुद्ध धम्मक्रांती संपविण्याचा कट विपश्यनेच्या माधमातून आखण्यात आलेला आहे. आणि बुद्ध आंबेडकरी समाज त्याला बळी मोठ्या प्रमाणात बळी पडू लागला आहे. सत्यनारायण गोयंका हा आर एस एस चा हस्तक आज बुद्ध आंबेडकरी समूहाच्या डोक्यावर विपश्यनेच्या माध्यमातून थैमान घालून नाचू लागला आहे. सत्य आणि असत्य याचा उलगडा होऊ न देणारी मोहिनी विपश्यनेच्या माध्यमातून गोयंका बुद्ध आंबेडकरी समाजावर लादीत आहे.
ध्यान, साधना, आत्मा, परमात्मा, समाधी, विपश्यना ह्या सर्व बाबी मानवी बुद्धीला खुजे बनवून मानवी सामाजिक विकासाला खंडित करणा-या आहेत. बुद्धाचा आणि विपश्यनेचा कुठलाही संबंध नसतांना तो संबंध दाखविला जाने म्हणजे धम्मक्रांतीला रोखणेच होय. शोषित-पिडीत-वंचित समाज आज त्याच्या हक्क व अधिकारासाठी बुद्ध तत्वाच्या आधारे आंबेडकरी विचारातून क्रांती करू पाहत आहे. या क्रांतीला थांबविण्यासाठी मानसिक रोग वाढविणारे विपश्यना केंद्र उभे केले जात आहे. बुद्ध विहारे आज विपश्यनेच्या जाळ्यात अडकविण्यात आले आहेत. ही मोठी प्रतिक्रांती आज धम्मक्रांतीवर मात करून समाजाला क्रांतिकारी विचारापासून दूर नेत आहे. भारत बौद्धमय करण्याच्या मार्गातला हा अडथळा दूर करणे आज गरजेचे आहे. अन्यथा बुद्ध तत्वज्ञानाला विपश्यना संपविण्याच्या मार्गापर्यंत पोहचली आहे. महापरित्रणपाठ, पुनर्जन्म, अध्यात्म, शांती अश्या प्रकारच्या भूलथापा मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. विपश्यनेचे हे विषारी झाड मुळापासून संपविल्याशिवाय धम्मक्रांती गतिमान होणार नाही.
…3…
धम्मक्रांतीचे मारक म्हणून आज आणखी एका गोष्टीकडे बघितल्या जाऊ शकते ते म्हणजे आज अस्तित्वात असलेल भिख्खू संघ होय. रंगून च्या भाषणात बाबासाहेबांनी धम्म प्रचार आणि प्रसारासाठी भूख्खुंना प्रशिक्षित करण्याची गरज बोलून दाखविली होती. त्यासाठी एक प्रशिक्षण संस्था उभारण्याचा त्यांचा मानस होता. परंतू धम्मदीक्षेनंतर अल्पावधीत त्यांचे महापरिनिर्वान झाल्याने त्यांचा तो मानस पूर्ण होऊ शकला नाही. व आजतागायत तो पूर्ण झाला नाही. मध्यंतरीच्या काळात “भारतीय बौद्ध महासभा” या एकमेव बाबासाहेबांनी स्वतःच्या अधिपत्याखाली ठेवलेल्या संस्थेने प्रयत्न केला परंतु धम्मातील इतर प्रदूषित धम्म संघटना, पाश्चात्य धम्म संघटना आणि त्यांच्या भिख्खू संघामुळे भारतीय बौद्ध महासभेचे प्रयत्न असफल ठरले. ज्यामुळे आज प्रशिक्षित भिख्खू नसल्याने खरा बुद्ध समाजातल्या घराघरात पोहचू शकला नाही. धम्मक्रांतीच्या अपयशाच्या संदर्भाने ही गोष्ट फार महत्वाची ठरली आहे.
आज बौद्ध भिख्खू धम्म प्रचारक कमी आणि धार्मिक उन्मादक जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भिक्षु या धम्मप्रचाराच्या नैतिक श्रद्धेचा आज व्यवसाय बनला आहे. आजचा भन्ते हा व्यावसायिक प्रचारक बनला आहे. भन्ते राहुल बोधी, भन्ते ज्ञानजोती सारखे उन्मादक भन्ते बुद्ध तत्वज्ञानाला नकळतपणे संपविण्याच्या मार्गावर चाललेले आहेत. एका दिवसात ४० ते ५० घरी चाललेला परित्रणपाठाचा व्यवसाय कुठल्या बुद्ध धम्माच्या तत्वात बसतो हे कळायला मार्ग उरलेला नाही. हिंदूंच्या सत्य साईबाबा प्रमाणे काही भन्ते बौद्धांच्या घरी दर्शन द्यायला जाऊ लागले आहेत. आज भन्ते स्वतःला देवरूपी बनवीत चाललेले आहेत. आणि हा सर्व प्रकार नागपूरच्या क्रांतीभूमीत सुरु आहे हे त्याहून अधिक खेदाची बाब म्हणावी लागेल.
बौद्ध धम्मात भिख्खुंना मानाचे/सन्मानाचे स्थान आहे. एक धम्मप्रसारक आणि प्रचारक म्हणून समाजासाठी ते वंदनीय आहेत. परंतु हेच भिख्खू जेव्हा आज मठाधीश (विहाराधीश) व्हायला लागले आहेत. तेव्हा धम्माला ग्लानी येणे सहज शक्य आहे. भिख्खुंच्या प्रशिक्षणाअभावी हे सर्व होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्धांना अभिप्रेत भिख्खुंची व्याख्या करतांना म्हणतात, ‘पूजापाठ आणि गाथा म्हणणे हे भिख्खुंचे काम नाही. एका ठिकाणी स्थिरावून (विहारात) विहाराला देवालयाचे रूप आणणारा भिख्खू नाही. तर भिख्खू तो जो समाजाच्या प्रश्नांवर विचार करतो, समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास करतो. सामाजिक वातावरणाचा आढावा घेऊन त्याचा मानवी समाजावर होणा-या ब-यावाईट परिणामाची शहानिशा करतो. आजूबाजूच्या घटना-घडामोडींवर लक्ष ठेऊन असतो. आणि त्यासंबंधाने समाजाला सतत मार्गदर्शन करीत असतो. समाजाला दिशा देण्याचे काम भिख्खुंचे आहे.’
एकंदरीत सामाजिक समस्याचा मानवी जीवनावर होणा-या परिणामाला ओळखून सामाजिक जीवन सुखमय करण्यासाठी प्रयत्नरत असणारा अभ्यासू, चिंतन, मनन करून उपाय सुचविणारा अभ्यासक म्हणजे भिक्खू. ही व्याख्या आज अस्तित्वात असणा-या किती भिख्खूंनी त्याच्या जीवनचर्येत अंगिकारली आहे ? यावरच प्रश्नचिन्ह असल्याने धम्मक्रांती अपेक्षित ध्येयापर्यंत पोहचू शकलेली नाही. बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिप्रेत भिख्खू संघ निर्माण करण्याची गरज आहे. आज अस्तित्वात असणा-या भिख्खू संघांनी आणि भिख्खूंनी जर हे ध्यानात घेतले तर बौद्ध धम्मावर येणारी प्रतीक्रांतीची आक्रमणे सहज परतवून लावता येतील. आणि धम्मक्रांतीला गतिमान करता येईल.
…4…
धम्मक्रांतीला वेठीस धरण्यासाठी राजकारण हे सुद्धा जबाबदार ठरले आहे. १९५६ नंतर उदयास आलेल्या आंबेडकरोत्तर राजकारणाने धम्मक्रांतीला वेठीस धरले. बाबासाहेबांना अभिप्रेत धम्मक्रांती आणि राजकारण सम पातळीवर केले जाणे आवश्यक होते. परंतु काही अपरिहार्य कारणाने ते होऊ शकले नाही. धम्मक्रांती राजकारणाच्या वावटळीमुळे एकाकी पडली. ज्यामुळे आंबेडकरी राजकारणही यशस्वी होऊ शकले नाही आणि धम्मक्रांतीपण यशस्वी होऊ शकली नाही. रंगूनच्या प्रसिद्ध भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘मी बुद्ध धम्मातून घेतलेले समता तत्व हे राजकीय आहे. राज्यातील सर्व मानवमात्रांना समानतेने वागणूक देऊन सर्व नागरिक समान आहेत. हा न्यायप्रणीत बंधुभाव समाजात रुजविला जाणे गरजेचे आहे.’ हा संदेश आंबेडकरी राजकारणाला बुद्ध धम्माला सोबत घेऊन वाटचाल करणारा होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले ? की झाले ? यापेक्षा ते होऊ शकले नाही. ही खेदाची बाब म्हणावी लागेल. ज्यामुळे अपेक्षित धम्मक्रांतीला चालना मिळू शकली नाही.
काहींनी तर राजकारणासाठी धम्माचा भावनिक वापर केला. बाबासाहेबांची अपेक्षित धम्मक्रांती “भारत बौद्धमय” करण्याची समाजात प्रचलित होती. या सामाजिक भावनाविवशतेला बामसेफ, बीएसपी ने राजकीय आयाम चढविला. समाजाला बुद्ध धम्माकडे आकृष्ट करण्याऐवजी राजकारणाकडे आकृष्ट केले गेले. “सत्ता आल्यावर धम्मक्रांती करू !” अश्या प्रकारच्या वल्गना करून सम्राट अशोकाच्या धम्मक्रांतीचा भावनिक आधार घेतला गेला. त्यामुळे सम्राट अशोकाचा खरा धम्मइतिहास मागे पडत गेला. आणि समाज या हवशी राजकारण्यांच्या पाठीशी बांधला गेला. आधी राजकारण, आधी सत्ता नंतर धम्मकारण, धम्मक्रांती, धम्मप्रवर्तन ही फसवी नीती समाजावर लादली गेली. आणि धम्मक्रांतीला ताटकळत ठेवण्यात आले. बाबासाहेबानंतर उल्लेखनीय धम्मक्रांती होऊच शकली नाही. तश्या अपेक्षा, तशी स्वप्ने मात्र समाजाला धाखाविली गेली. परंतु ते प्रत्यक्षात कधी उतरलेच नाही. उलट तोच धम्मक्रांतीला मोडीत काढण्यासाठी आखण्यात आलेला षड्यंत्राचा भाग होता हे आता सिद्ध झाले आहे.
धम्मक्रांतीला मोडीत काढणा-या राजकारणाचा अनुभव मागील ५६ वर्षाच्या काळात आला असतांना सुद्धा आजही धम्माचेच राजकारण केले जाते यापेक्षा या चळवळीचे दुसरे दुर्भाग्य होऊ शकत नाही. धम्म स्वीकारणे म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही बुद्ध तत्वज्ञानाची चतुर्सुत्री स्वीकारणे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या बुद्ध तत्वज्ञानातील चतुर्सुत्रीवर आधारित व्यवस्था निर्माण करणे हे राजकारणाचे उद्धिष्ट असतांना देखील ते न स्वीकारता राजकारण केले गेले आणि केले जात आहे. आणि सत्ता आल्यानंतरच धम्माचा स्वीकार अशी घोषणा म्हणजे शुद्ध बुद्धिभेद आहे. अध्यापही राजकारणासाठी धम्माचा उहापोह करणा-यांनी कधीही बुद्ध धम्माचा स्वीकार केला नाही. सत्ता आली. सत्ता उपभोगली. बुद्ध आणी बाबासाहेबांच्या नावावर समाजाचे आर्थिक शोषण केले. परंतु धम्माचा स्वीकार मात्र केला गेला नाही.  हे या चळवळीसाठी धोकादायक आहे. धम्मक्रांतीला ते मारक आहे.
   …5…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील ज्या भूमीवर (दीक्षाभूमीवर) बौद्ध धम्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांसोबत घेतली त्याच भूमीवर आज काहींनी आपले साम्राज्य निर्माण केले आहे. दीक्षाभूमी ही जागतिक क्रांतिभूमी आहे. या क्रांतीभूमिला ‘दीक्षाभूमी स्मारक समिती’ नावाचे शापित विकायला निघाले आहेत. क्रांतिभूमी दीक्षाभूमी ही आज राजकारणाचा बळी ठरलेली आहे. ‘दीक्षाभूमी स्मारक समिती’ नावाने केले जाणारे राजकारण आज बुद्ध आणि आंबेडकरी अनुयायांसाठी अतिशय क्लेशदायक आहे. देश विदेशातील लाखो करोडो बुद्ध आंबेडकरी अनुयायी अशोक विजयादशमीला या भूमीला नमन करून जातात. त्या लाखो करोडो बुद्ध आंबेडकरी अनुयायांनी या दीक्षाभूमीवरून जो संदेश घेऊन जायला पाहिजे तो अध्यापही त्यांना मिळू शकला नाही. अशोक विजयादशमीला आज दिवसेंदिवस यात्रेचे आणि जत्रेचे स्वरूप यायला लागले आहे. दरवर्षी होणा-या ‘दीक्षाभूमी स्मारक समिती’ च्या राजकीय कार्यक्रमात येणारी प्रतीक्रांतीवादी पाहुणे, नेते आणि राजकारणी कुठला संदेश या लाखो करोडो अनुयायांना देतात ? याचा दीक्षाभूमी स्मारक समितीने (गवई-फुलझेले) महोदयांनी केलेला दिसत नाही. आज धम्मक्रांतीची हीच क्रांतिभूमी दीक्षाभूमी प्रतीक्रांतीवाद्यांच्या काटेरी कुंपणाने बंधिस्त केली गेली आहे.
दीक्षाभूमीवर होणा-या महत्वपूर्ण अश्या धम्मदीक्षा सोहळ्याच्या कार्यक्रमात सर्व बुद्धिस्ट देशातील राष्ट्राध्यक्षांना व गणमान्य लोकांना बोलाविले जाने अपेक्षित आहे. तसेच जगातील विद्वतापूर्ण बौद्ध भिक्खू या कार्यक्रमात आमंत्रित करून त्यांच्याकडून जागतिक बुद्ध धम्माची वाटचाल याविषयी लाखो करोड लोकांना संदेश दिला जाने अपेक्षित आहे. तेव्हाच ही धम्मक्रांती आपले निश्चित ध्येय गाठू शकेल. परंतु असे न होता अगदी याउलट सर्व घडामोडी घडून येत आहेत. आर एस एस आणि भाजप शी संबंधित नेत्यांना बोलावून हिंदू प्रतीक्रातीवाद्यांकडून बुद्ध आंबेडकरी अनुयायांना संदेश दिला जातो हे कितपत योग्य आहे याचा विचार आता निदान समाजाने करावा. दीक्षाभूमीवरील क्रांती आणि हिंदू प्रतीक्रांतीवादी यांचा काय संबंध ? विरोधकांच्या हातात आयती कोलीत देऊन दीक्षाभूमी स्मारक समिती कुठल्या क्रांतीचा सोहळा साजरा करीत आहे ? या प्रश्नाच्या उत्तरात धम्मदीक्षेचे काटेरी कुंपण लक्षात घेण्यासारखे आहे. 
दीक्षाभूमीचे पावित्र्य आज दिसून येत नाही. आजघडीला दीक्षाभूमीवर चालना-या महाविद्यालयाच्या तारुण्य उन्माद वातावरणाने क्रांतीभूमिला घेरलेले आहे. दीक्षाभूमीची शांतता भंग झाली आहे. ही दीक्षाभूमी आज जागतिक क्रांतिभूमी कमी आणि महाविद्यालयाचे सायकल स्टैंड अधिक बनली आहे. दिवसेंदिवस या भूमीवर होणारे अवैध बांधकाम आणि त्यात होणारा आर्थिक व्यवहार धम्मक्रांतीला संपवीत चालला आहे. बाबासाहेबांनी याच भूमीवरून दिलेला शुद्ध बुद्ध विसरून दीक्षाभूमी स्मारक समिती प्रतीक्रांतीवादी बुद्ध याठिकाणी प्रस्थापित करू पाहत आहे. आणि बुद्ध परिवेश घेऊन धम्मक्रांती संपवू पाहणा-या प्रतीक्रांतीवाद्यांचा शिरकाव आज दीक्षाभूमीवर राजरोसपणे होऊ लागला आहे. बाबासाहेबांनी केलेल्या धम्मक्रांतीला घातक अशी कृती आज ‘दीक्षाभूमी स्मारक समिती’ च्या माध्यमातून केली जात आहे. आणि आंबेडकरी जनता निमुटपणे असहाय होऊन उघड्या डोळ्याने पाहत आहे.
अश्या विविध मार्गाने काटेरी कुंपणात अडकलेली धम्मदीक्षा/धम्मक्रांती आम्हाला सर्व मानव्यासाठी मुक्त करावी लागणार आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत बुद्ध आणि त्यांचा धम्म समाजात, व्यवहारात रुजवावा लागणार आहे. अनेक बाजूंनी होणारे आक्रमण परतवून लावून जागतिक पटलावर सुवर्णाक्षराने लिहिल्या गेलेल्या क्रांतीला आपल्या इप्सित ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी प्राणपणाने लढावे लागणार आहे. आतापर्यंत बुद्ध धम्मावर आणि धम्मक्रांतीवर पडलेली प्रतीक्रांतीची विषारी पाऊले उपटून फेकावी लागणार आहेत. बाबासाहेबांना अभिप्रेत शुद्ध बुद्ध जोपर्यंत आम्ही समाजापर्यंत पोहचवीत नाही तोपर्यंत धम्मचक्र गतिमान करता येणार नाही.

*************

7 comments:

  1. संदीप नंदेश्वर छान लिहलेत . लेख वाचून मला काय वाटले ते आपली परवानगी गृहीत धरून पुढे लिहतो . बौद्ध धर्म बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना स्वीकारायला सांगितले व त्यांनी तो स्वीकारलाही . हे त्या काळच्या परिस्थितीला अनुसरून योग्यच होते . बाबासाहेब हे द्रष्टे पुरुष होते . पण पुढे न्व्बुध्ध लोकांनी त्या प्न्थानुसार साधना केली नाही किंवा करण्याचा प्रयत्नही केला नाही , अर्थात याला सन्माननीय अपवाद आहेत . इस्लाम सोडून प्रत्येक पंथात (जैन ,शीख , बौद्ध ) वेगवेगळ्या मार्गाने साधना सांगितली आहे . ती न करता फक्त बाबासाहेबांचे नाव वापरून पुतळे उभे करणे , रस्ता रोको , जयंती व या सर्व गोष्टीतून निर्माण होणारा समूह वापरून निवडणुका लढवून सत्तेसाठी चमचेगिरी करणे हेच सुरु झाले . बौध्द मुला मुलींना BE , ME करण्यासाठी होस्टेल व खास सुविधांचे निर्माण समाजाच्या कुठल्या नेत्याने केले ? नुसते ब्राह्मणवादी व्यवस्था म्हणून नावे ठेवून भागणार नाही . बौध्द धर्मानुसार साधना करून न्व्बुद्धातील किती जण संत पातळीला पोचले ? असे झाले असते तर आज कित्येक तथाकथित ब्राह्मण अशा संतांचे शिष्य दिसले असते . दलाई लामांचे उदाहरण समोर आहेच . मोकळ्या मनानी विचार करा कि चळवळीतील किती लोकांनी आंबेडकरांचे पूर्ण साहित्य वाचलेले असते ? फाळणी च्या वेळचे त्या विषयावरील बाबासाहेबांचे विचार कधी जयंतीच्या वेळेस ध्वनी क्षेपकावरून का ऐकवले जात नाहीत ? लोकसंख्येची अदलाबदल करा म्हणून फाळणीच्या वेळेस त्यांनी गांधींना सांगितले होते हे सत्यच आहे न ?

    ReplyDelete
  2. हल्ली ब्राह्मण समाजाची अवस्था पुढील गोष्टीतील मांजराप्रमाणे झालेली आहे आणि मुले म्हणजे आंबेडकरवादी , ब्रीग्रेद वाले , अनिस व मिडिया ( निखील वागळे). ब्राह्मण हे १ soft टार्गेट आहे . स्वतःच्या अपयशाला ब्राह्मणाला कारणीभूत ठरवून दोष दिला तर विरोधाची चिंताच नाही हे उघड आहे .------- एका गावामध्ये मुले मोकळ्या माळावर खेळत होती. त्यातली मस्तवाल होती त्यांचा आडदांडपणा चालू होता तर बिचारी शांत मुले आपल्या कुवतीप्रमाणे साधेच काही खेळत होती. इतक्यात कुठून तरी एक बारकेसे मांजर तिकडे पोरांच्या घोळक्यात आले. पोरांच्या धावपळीत फ़सले आणि त्याला निसटावे कसे तेच कळेना. तेव्हा गोंधळलेल्या मुलांप्रमाणेच मांजराचीही तारांबळ उडाली. मग त्यातल्या एका मस्तीखोर मुलाला कुरापत सुचली. त्याने आपल्यासारख्याच इतर आडदांड मुलांना एक कल्पना सांगितली. गोल फ़ेर धरून उभे रहा आणि नेम धरून त्या मांजरावर दगड मारायचा. बघू कोणाचा नेम सरस आहे ते. सर्वांनाच त्यात मौज वाटली आणि सगळे फ़ेर धरून मांजरावर दगडधोंड्यांचा वर्षाव करू लागले. बिचारे ते इवले मांजर त्या मुलांच्या तावडीतून सुटायला सैरावैरा पळू लागले. पण पळणार तरी किती आणि कुठे? ज्या दिशेने पळायचे, त्या बाजूच्या पोराने जवळून मारलेला दगड त्याला अधिक जोरात दुखापत करत होता. जेवढी त्या मांजराची तारांबळ उडत होती, तेवढा या पोरांना जोश चढत होता. शेवटी अशी वेळ आली, की धावण्याचे पळण्याचे त्राण अंगी उरले नाही आणि मांजर एकाच जागी थबकून केविलवाणे इकडेतिकडे बघू लागले. इतक्यात त्याच्या दिशेने आलेला दगड त्याच्या असा वर्मी बसला, की तिथेच कोसळून ते मांजर गतप्राण झाले. मग अकस्मात दगडफ़ेक थांबली.

    ReplyDelete
  3. आपल्या अडचणी किंवा अपयशाचे खापर अशी मंडळी दुसर्‍या कोणाच्या तरी डोक्यावर फ़ोडताना दिसतील. स्वत:चे अपयश किंवा नाकर्तेपणा लपवण्यासाठी तिरस्कार व द्वेष हा सर्वात सुरक्षित व सोपा आडोसा असतो. तेवढेच नाही तर अशा पराभूत मनोवृत्तीचा जमाव गोळा करायला, त्याचा भरपुर उपयोग होतो. म्हणूनच ज्यांच्याकडे आपण भयभित होऊन बघत आहात ती म्डळी स्वत:च भयगंडाने पछाडलेली आहेत हे आधी ओळखा.

    ReplyDelete
  4. येथे ज्यू च्या जागी ब्राह्मण आहेत ----हिटलर किंवा त्याची ज्य़ु जमातीच्या द्वेषावर उभी राहिलेली नाझी चळवळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. ज्यू जमात संपवणे हे त्याचे उद्दीष्ट अजिबात नव्हते. एकदा हिटलरला त्याबद्दल विचारण्यात आले, की ज्य़ु जमातीचा संपुर्ण नि:पात करण्यात यावा असेच तुझे मत आहे का? त्यावर त्याने दिलेले मत डोळ्यात अंजन घालणारे आहे. तो म्हणाला, ‘ छे छे, ज्य़ु नावाचा कुणी अस्तित्वात नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्य़ु नसेल तर काल्पनिक ज्य़ु तरी हवाच. चळवळ उभी करायची तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल, असा कोणीतरी हाडामासाचा, खराखुरा शत्रू आवश्यक असतो. असा शत्रू नसेल तर लोकंना चिथावता येत नाही. केवळ अमुर्त कल्पना पुढे करून ही गोष्ट साध्य होत नाही.’ हिटलरचे हे बोल आजच्या आपल्या देशातील चार वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या वर्तनाशी तपासून बघा. मग तुमच्या लक्षात येईल, की त्यांच्यापाशी कुठलाही विधायक कार्यक्रम नाही की विवेकबुद्धीला स्थान नाही

    ReplyDelete
  5. Vaibhav
    tumhi pratikriya dilya tyabaddal tumache sarvpratham aabhar !

    atishay vyapak aani vaicharik pratikriya dili tyabaddal dhanyawad !

    tumachya ya pratikriyetil kahi bhag, kahi mate wagalata anya matanshi w vicharanshi mi sahmat aahe...

    be continue to read and write ur opinion...

    Yours,
    Dr. Sandeep nandeshwar

    ReplyDelete
  6. नांदेड, २७ ऑक्टोबर - विजयादशमीच्या दिवशी नांदेडच्या देगलूर येथे धर्मांध मुसलमानांनी धम्मचक्र प्रवर्तनदिन मिरवणूक आणि दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणूक या दोन मिरवणुकांवर दगडफेक केली.
    १. देगलूर शहरातील रमाईनगर परिसरात दसर्‍याच्या दिवशी पंचशील ध्वज लावण्याच्या कारणावरून धर्मांध मुसलमानांनी वाद घातला.
    २. सायंकाळी धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त सिद्धार्थनगर परिसरातून निघालेली मिरवणूक येथील मशिदीजवळ आल्यावर धर्मांध मुसलमानांनी मिरवणुकीवर अचानक दगडफेक चालू केली.
    ३. नगरसेवक मिरामोईद्दीन जाकेर गौस यांच्यासह त्याच्या समर्थकांनी केलेल्या या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षक दिलीप कांबळे आणि अन्य १२ जण घायाळ
    ४. याच वेळी दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणूक तेथे पोहोचली असता धर्मांध मुसलमानांनी तिच्यावरही दगडफेक केली.

    ReplyDelete
  7. `दलित-मुस्लिम भाई-भाई' ही घोषणा किती खरी ? किती खोटी ?
    सर्वच पक्षातील मुस्लिम आघाड्या `दलित-मुस्लिम भाई-भाई'चा गाजावाजा करत आहेत-युती दाखवत आहेत. मौलाना आझादांच्या शेजारी डॉ. आंबेडकरांचा फोटो लावत आहेत -नि एकीकडे दलित उमेदवारास निवडून द्यावे लागते म्हणून तक्रारही करत आहेत. असे मुस्लिमांचे परस्परविरोधी आणि दुटप्पीपणाचे धोरण आहे.
    तेव्हा दलित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी याबाबत जागृत व्हावे. मुसलमानांना हिंदूच्या विरोधात थेट मतदानात जिंकता येत नाही, म्हणूनच ‘हिंदू दलितांची' मते फोडण्यासाठी ते `दलित-मुस्लिम भाई-भाई'ची घोषणा करीत आहेत. स्वतःचे राजकीय बस्तान बसेपर्यंतच ते हिरवे व निळे झेंडे शेजारी लावणार आहेत. नंतर नाही.
    खालील काही गोष्टींचा दलित नेत्यांनी शांत डोक्याने विचार करावा -
    १. इस्लाम धर्माचा जाणीवपूर्वक अभ्यास करूनच बाबासाहेबांनी मुस्लिम धर्मांतर नाकारले. या विषयीची स्वतः बाबासाहेबांनी मांडलेली कारणमीमांसा दलित नेत्यांनी अभ्यासावी.
    २. दलित-मुस्लिम बंधुत्व जर एवढे होते, तर ज्या वेळी अफगाणिस्तानमध्ये बौद्धमूर्ती तोफा लावून फोडत होते, तेव्हा किती मुस्लिम रस्त्यावर आले ? जसे डेन्मार्कमध्ये पैगंबरांचे कार्टुन काढल्यावर आले होते ! ... मुस्लिम मौलवींनी त्या मूर्तीभंजनाविरुद्ध एक तरी फतवा काढला आहे का? उलट `जय भीम' म्हणणे गैरइस्लामिक आहे असा फतवा काढण्यात आला. (क्रमशः)
    (लेखक : श्री. समीर दरेकर (भ्र.क्र. : ९९२२१३१८८९ प्रकाशक : अभिनव निर्माण प्रकाशन, पुणे, पृष्ठ : २१२ मूल्य : (ना नफा ना तोटा या तत्त्वावर केवळ जनजागृतीसाठी ५० रुपये))

    ReplyDelete