Saturday 25 August 2018

वंचित बहुजन आघाडी : आंबेडकरी चळवळीचा नवा अध्याय


#Once_Again_Ambedkar
वंचित बहुजन आघाडी
आंबेडकरी चळवळीचा नवा अध्याय
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

भारत देश म्हणून स्वतंत्र झाला. संविधानांच्या माध्यमातून संचालित झाला. कायद्याचे राज्य म्हणून प्रसिद्धीस आला. असमान मानवी वातावरणात समानतेचा संवाहक झाला. विविधतेत एकतेचा प्रतिपादक झाला. भारतीयत्व व धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कर्ता बनला. संविधान अधिनियमित मानवतेचा शिल्पकार बनला. हे अधिलिखित जरी गौरवशाली वाटत असले तरी या अधिलीखीताला वास्तवात उतरविण्यात व्यवस्थेपासून सत्ताधाऱ्यापर्यंत सारेच अपयशी ठरले. हे अपयश कार्यप्रवणतेचे होते असे म्हणता येत नाही. हे अपयश जाणीवपूर्वक कृतीप्रवणतेला बाधित करून पुढे आलेले आहे. ज्यामुळे देशात आज वंचितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. स्वतंत्र भारताचे, स्वतंत्र भारतीय व्यवस्थेचे, सार्वभौम लोकशाहीचे लाभार्थी हे फक्त समाजातले काहीच बनू शकले. अजूनही मोठा वर्ग आज या संपूर्ण प्रक्रियेचा लाभार्थी होण्यापासून वंचित आहे. देशातली साधन, संपत्ती, संसाधने विशिष्ट वर्गाच्या हाती एकवटून राजकीय श्रेष्ठीजनांचा नवा वर्ग आज वंचितांना गिळकृत करू पाहत आहे. या नव्या राजकीय श्रेष्ठीजनांच्या हातून इथला वंचित वर्ग गिळंकृत होण्याआधी आंबेडकरी चळवळीने ‘वंचित बहुजन आघाडी’ च्या रूपाने नवा अध्याय सुरु केला आहे. ज्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर करीत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा आंबेडकरी चळवळीतला हा नवा अध्याय वर्तमान पिढीने समजून घेतला पाहिजे.
१९५० नंतरच्या अधिलिखित भारताचा आराखडा १८० अंशावर बदलणारा होता. एका नवीन भारताची निर्मिती करणारा होता. एका नवीन भारतीय समाजाची निर्मिती करणारा होता. हा नवीन भारत एक नवी ओळख निर्माण करणारा होता. एका मानवी उद्देश्श पूर्ततेसाठी भूतकाळ (१९५० पर्यंतचा) व वर्तमानकाळ (१९५० नंतरचा) ही दोन नवी किनारे निर्माण करणारा होता. संविधानाचे पात्र या दोन किनाऱ्यांच्या मधून सातत्याने मानव्यतेचे बिजारोपण करतांना देशाच्या भूतकाळाला वर्तमानात शिरकाव न करू देण्यासाठी सज्ज असतांना आज अचानक दोन्ही किनारे विलीन होतांना दिसून येत आहे. देशाचे वर्तमान भूतकाळात डोकावत आहे. भारत वर्तमानातून थेट भूतकाळात शिरकाव करीत आहे. भूतकाळ व वर्तमानकाळ यांच्या मधोमध असलेले भारताचे संविधान अस्तित्वहीन होऊ पाहत आहे. उद्देश्शपुर्ती होण्याआधीच संविधानिक प्रवाह आपले अस्तित्व संपवीत असेल तर वर्तमान कधीच जिवंत राहू शकत नाही. वर्तमानाला वाचवायची जबाबदारी आपली सर्वांची आहे. वंचिततेला संपवून देशाचे संचित उभे करण्याची वेळ आली असतांना मनुवादी मानसिकता देशाला विळखा घालून उभी आहे. हा मनुवादी विळखा तोडून वंचितांची वंचितता संपविण्यासाठी आम्ही सारे सज्ज असलो पाहिजे.
वंचितता संपण्याआधीच भारतीय संविधानरुपी वंचितता संपविण्याचा संविधानिक स्त्रोत्र संपविला जात आहे. हा स्त्रोत संपवू न देण्याची जबाबदारी आता वंचितांची आहे. यासाठी वंचितांच्या लढ्याचे नेतृत्व ज्या आंबेडकरी चळवळीने केले त्याच चळवळीच्या खांद्यावर परत एकदा वंचितांच्या लढ्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. ही जबाबदारी ओळखून आज प्रकाश आंबेडकरांनी ‘वंचित बहुजन आघाडी’ निर्माण करून एका नव्या आंदोलनाची सुरवात केली आहे. जी वर्तमानाला भूतकाळात नेण्यापासून परावृत्त करू शकते. देशाचा भूतकाळ सर्वांना अवगत आहे. व आज देशातला कुठलाही सुज्ञ नागरिक भूतकाळाची कल्पनादेखील वर्तमानात करू शकत नाही. परंतु आजचे सत्तेवर असलेले सत्ताधारी देशाला भूतकाळात लोटण्यासाठी कटिबद्ध पाहून मानव्यता हादरलेली आहे. वंचितांना पायदळी तुडवून; मानवी संवेदनांचा बाजार मांडून; मानवी नरसंहाराचा जल्लोष करणारी उन्मादी शक्ती देशात फोफावत आहे. आज देशातला वंचित वर्ग भयग्रस्त व्हावा. त्याने सत्तेविरुद्ध बंड पुकारू नये. यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर सत्तेच्या मार्फत केला जात आहे. अशा परिस्थितीत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात उभी झालेली वंचित बहुजन आघाडी देशातल्या वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज या वंचित बहुजन आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय ज्यामुळे मनुवादी सत्तेविरुद्धचा लढा अधिक तीव्र होतोय.
भूतकाळातले लाभार्थीच वर्तमानाचेही लाभार्थी राहत असतील तर वंचितांनी वंचितच राहायचे का ? असा प्रश्न पडतो. या प्रश्नाच्या शोधात भूतकाळातले व वर्तमानाचे लाभार्थी वंचितांना संधी देतील असे चित्र मागच्या ७० वर्षात दिसले नाही. आज तर तसे चित्र दिसण्याची अपेक्षाही संपत चालली आहे. तेव्हा आता वंचीतांनीच आपली वंचीतता संपविण्यासाठी कटिबद्ध होऊन लढले पाहिजे. सत्तेचा लाभार्थी वर्ग वंचितांना न्याय देईल, समान संधी देईल या अपेक्षेतून बाहेर पडून कुणावरही विसंबून न राहता वंचितांचीच एक वाज्रमुठ बांधावी लागणे गरजेचेच होते. ‘वंचित बहुजन आघाडी’ने ती गरज पूर्ण केली आहे. कुठल्याही सत्तेच्या लाभार्थ्याला हाताशी न घेता सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय दृष्ट्या वंचितांनी स्वतःच्याच हातात स्वतःच्या लढ्याचे नेतृत्व घेतले आहे.
लाभार्थी विरुद्ध वंचित असा हा थेट संघर्ष आहे. जातीय आधारावर, धार्मिक आधारावर, आर्थिक आधारावर, सहभागीत्वतेच्या आधारावर, सामाजिक आधारावर, राजकीय आधारावर, मानव्यतेच्या आधारावर असलेल्या वंचितांची ही आघाडी आहे. वर उल्लेखित आधारावर ज्याला छळले जाते; ज्याला डावलल्या जाते; ज्याच्यावर अन्याय-अत्याचार केला जातो; ज्याची विटंबना केली जाते; त्या सर्वच मानव, जात, धर्म व समूहांचा सहभाग या ‘वंचित बहुजन आघाडी’त करण्यात आलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ‘शोषितांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली पाहिजे तेव्हा तो बंड करून उठेल.’ आज वंचितांच्या बाबतीत तेच घडले आहे. सत्ताधाऱ्यांकडून फसवणूक झाल्याची जाणीव त्यांना झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या माध्यमातून त्यांच्यावर वारंवार अन्याय केला याची जाणीव झाली आहे. विकासाच्या नावाने वंचितांना लुबाळून भांडवली व्यवस्था निर्माण केली गेली. वंचितांच्या योजना कागदावर दाखवून उद्योगपत्यांचे कर्ज माफ केले गेले. इथल्या वंचितांमधला शेतकरी, भूमिहीन देशोधडीला लागला. कर्जाचे डोंगर उभे करून आत्महत्या करू लागला. कर्ज न घेता इथला शेतकरी जगाला पाहिजे याचा विचार या सत्ताधाऱ्यांनी कधी केलाच नाही. त्यामुळे या देशातल्या वंचितांमधला मोठा घटक असलेला शेतकरी आधुनिक भारताच्या मुख्य प्रवाहात येउच शकला नाही. याउलट भूमिहीन होऊन बेरोजगार बनला. तो वंचित शेतकरी आजच्या लढाईत उतरून ‘वंचित बहुजन आघाडी’चा घटक बनला आहे.
आज देशातले अनुसूचित जाती, जनजाती, अल्पसंख्याक या नियोजित वंचित वर्गासोबतच इतर मागासवर्गीय (ओबिसी) मधील अनियोजित वंचित वर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. ज्या वर्गाला नियोजित वंचित वर्गाचा दर्जा तर नाही मात्र राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे या वर्गावर अनियोजित वंचीतता लादण्यात आली. या वर्गाकडे सातत्याने डोळेझाक करण्यात आली. ज्यामुळे या वर्गाचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय विकासच झाला नाही. हा वर्ग सातत्याने इतरांवर विसंबून राहिला. उच्चजातीय नेतृत्व स्वीकारून स्वतःला कमकुवत बनवीत राहिला. स्वतःचे नेतृत्व उभे करण्यात अपयशी ठरला. जे काही थोडेथोडके नेतृत्व उभे झाले ते प्रस्थापितांच्या हातातील बाहुले बनून या वर्गाच्या वंचिततेच सौदा करून मोकळे झाले. याच कारणाने वर्गीय पक्षसंघटना आणि उच्चजातीय पक्ष नेतृत्वाने ओबिसी मधील या वंचित वर्गाला योग्य ते प्रतिनिधित्व देण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. उलट मतदार म्हणून जातीय व धार्मिक भावनिकता वापरून या वर्गाच्या तोंडाला कायम पाने पुसण्याचेच काम केले गेले. ओबिसी मधील वंचित वर्ग मतदारांची बाजारपेठ म्हणून वापरली गेली. त्यांच्या प्रत्यक्ष परिस्थितीत सुधारणा करून या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्नच कधी केला गेला नाही. ही खदखद या वर्गामध्ये कायम आहे. आणखी काही दिवस हा वर्ग असाच वंचीततेत खितपत पडला तर स्वतःचे अस्तित्व संपवून बसेल. देशाच्या सामाजिक व राजकीय पटलावरून कायमचा संपून जाईल.  
आंबेडकरी चळवळ कायम या देशातली वंचीतता संपविण्यासाठी कटिबद्ध राहिली. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने उभारत राहिली. या देशातला कुठलाही माणूस वंचित राहू नये यासाठी झटत राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या मानव कल्याणाच्या विचारावर सर्व वंचितांसाठी लढत राहिली. या सर्व लढ्यात १९८४ नंतरच्या काळात प्रकाश आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. मंडळ कमिशन च्या लढ्यापासून ते शेतकऱ्यांच्या लढ्यापर्यंत प्रकाश आंबेडकर यांनी ओबिसी मधल्या वंचितांचे लढे उभारत राहिले. इतर वंचित समूहाला सोबत घेऊन ओबिसीमध्यल्या वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायम त्यांनी आपल्या राजकीय आशा अपेक्षांचा बळी दिला आहे. राजकीय सत्ता, संधी व सांसदीय पदांचा त्याग केला. अकोला जिल्ह्याचा मागील 35 वर्षाचा राजकीय इतिहास त्याची साक्ष आहे. या जिल्ह्यातील ओबिसी वर्गातील वंचित समूह आज सामाजिक व राजकीय पटलावर दिसून येतो. त्याचे प्रथम श्रेय प्रकाश आंबेडकर यांच्या दूरदृष्टीतून उभे केलेल्या लढ्याचे आहे. ज्या वर्गाला कधीही सामाजिक व राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधीच दिली गेली नाही त्या वर्गाला प्रकाश आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊन त्यांच्या माध्यमातून ओबिसी वर्गातील वंचितता दूर करण्यात मोठे यश मिळविले आहे. ज्यामुळे या वर्गातील वैचारिक साचलेपणा दूर होऊन आज हा वर्ग मुख्य प्रवाहात येऊन बहुजन महापुरुषांच्या विचारांवर समाज निर्मिती करण्यासाठी सज्ज झाला आहे.
आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर इतर मागासवर्गीय (ओबिसी) मधील वंचितता वाढत असतांना प्रकाश आंबेडकर यांनी काही सामाजिक नेतृत्वांना सोबत घेऊन ‘वंचित बहुजन आघाडी’ निर्माण केली. आंबेडकरी चळवळीसमोर एक नवा अध्याय निर्माण केला. स्वतःसाठी लढतांना इतर वंचितांच्या प्रश्नांना हात घालण्याची दूरदृष्टी आंबेडकरी चळवळी समोर ठेवली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ‘वंचित बहुजन आघाडी’च्या माध्यमातून पुढे टाकलेले पाऊल आंबेडकरी चळवळीची व्यापकता वाढविणारे आहे. ज्याला ज्याला व्यवस्थेने नाकारले आहे; जो जो मुख्य प्रवाहात येण्यापासून अलिप्त राहिलेला आहे; जो जो सामाजिक अन्यायाचा बळी पडलेला आहे; जो वर्ग, समूह, व्यक्ती धार्मिक आधारावर दर्जाहीन ठरविला गेला आहे; अशी प्रत्येकच व्यक्ती, वर्ग, समूह या देशात वंचित राहिलेला आहे. या वंचित मानव समूहाचा लढा उभा करण्यासाठी व राजकीय व्यवस्थाच वंचित माणसांच्या हाती आणण्यासाठी आम्ही सर्व तयार असलो पाहिजे. आज ‘वंचित बहुजन आघाडी’ने महाराष्ट्रात प्रस्थापित अन्यायकारी राजकीय सत्तेविरोधात रणशिंग फुंकले असले तरी त्याचे लोन संपूर्ण देशात पसरायला लागले आहेत. उद्याच्या सामाजिक व राजकीय परिवर्तनाची ही नांदी आहे. ‘अन्याय होऊ देणार नाही व अन्याय सहन करणार नाही.’ या ब्रिदवाक्यावर आज वंचित समूह सामुर्ण देशभर दंड थोपटून उभा राहतो आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वंचितांच्या लढ्यासाठी कायम आग्रही होते. वंचितांसाठी लढे उभे करण्यात ज्यांनी आपले आयुष्य वेचले त्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा अनुयायी असलेल्या वर्गावर मोठी जबाबदारी आलेली आहे. सामाजिक व राजकीय पटलावर ‘वंचित बहुजन आघाडी’चा नवा अध्याय सुरु केला गेला असतांना या आघाडीचा एक भाग बनून प्रस्थापित अन्यायकारी मानसिकतेचा समूळ नायनाट करण्यासाठी या आघाडीत सामील व्हावे लागेल. प्रत्येकच कृती आराखड्याला राजकीय लाभ / तोट्याच्या मापदंडात न तोलता देशात व राज्यात होणाऱ्या समूह परिवर्तनाच्या आंदोलनात उतरावे लागणार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात ही वंचितांची आघाडी काम करीत असतांना आंबेडकरी चळवळीला त्याचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. ही ‘वंचित बहुजन आघाडी’ उद्याची राजकीय सत्ता समीकरणे बदलविणारी असणार आहे. सोबतच वंचित समूहाला प्रतिनिधित्वाची संधी बहाल करून देशाच्या संविधानाच्या सुचारू संचलनात आपले योगदान देणारे आहे. मनुवादी गिधाडांच्या तावडीतून भारतीय संविधानाला वाचवायचे आहे. वंचितता संपविणारे भारतीय संविधानरुपी दस्ताऐवज टिकवून ठेवायचे आहे. त्यासाठी देशातील तमाम बहुजन, वंचित, मागास समूहाने या आघाडीचे शिलेदार होण्यासाठी पुढे आले पाहिजे. तेव्हाच देशात नव्याने उत्पन्न होणारा वंचित समूह आपले वर्तमान व भविष्य वाचवू शकणार आहे. जोपर्यंत या वंचित समूहाची वंचितता संपत नाही, तोपर्यंत हा देश विकासाच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकत नाही. त्यामुळे आपली वंचितता संपविण्यासाठी आपणच पुढे आले पाहिजे. सामाजिक व राजकीय प्रतिनिधित्व स्वबळावर हिसकावून घेण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे. वंचित समूहाला प्रतिनिधित्व बहाल करणाऱ्यांना हाताशी घेऊन व वंचित समूहाच्या प्रतिनिधित्वाला नाकारणाऱ्या मानसिकता, पक्ष, संघटना यांच्या विरोधात ‘वंचित बहुजन आघाडी’चा नवा अध्याय देशाच्या पटलावर पुढे आलेला आहे. हा नवा अध्याय येणाऱ्या काळात देशातील सामाजिक व राजकीय वातावरणाला ढवळून काढून देशात परिवर्तन घडवून आणेल एवढे मात्र निश्चित.
                                                                  adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment