Friday 31 August 2012

राजकीय उंची सत्तेत परिवर्तीत व्हायला वेळ लागणार नाही.

राजकीय उंची सत्तेत परिवर्तीत व्हायला वेळ लागणार नाही.

आज सद्यकालीन स्थितीत आंबेडकरी समाजाचा प्रश्न राजकीय वाटत असला तरी तो पूर्णार्थाने खरा नाही. आम्ही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्तरावर पिछाडलेले आहोत. हेच वास्तव आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाचा आजचा प्रश्न हा सामाजिक आणि आर्थिक असाच आहे. अगदी तसाच जसा बाबासाहेबांच्या काळात होता. फरक इतकाच आहे की सामाजिक चटके तीव्र नसले तरी स्वरूप बदलून अर्थ-सामाजिक (Sociao - Economic) बनले आहेत. संविधानाने निर्माण केलेल्या कायदेपुरक समतावादी व्यवस्थेने आम्हाला आमची ओळख प्राप्त झाली. त्यामुळे आर्थिक विवंचनेत या समाजाला पाडून पुनश्च्य तीच पेशवाईच्या व्यवस्थेला प्राचारण केले जात आहे.

कार्ल मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे इतिहासात मानवी गुलामीच्या अवस्थेला आर्थिकता कारणीभूत ठरली. अगदी हाच धागा अलीकडे मनुवादी विचारसरणीने पकडलेला आहे. समाजाचे आर्थिक खच्चीकरण करून सामाजिक गुलामगिरीची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. आंबेडकरी समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे असे जर कुणी म्हणत असेल तर ते निव्वळ धाडसाचे होईल. अश्या लोकांना मला विचारावेसे वाटते की, फेब्रुवारी १९२८ च्या बहिष्कृत भारताच्या अंकात लिहिल्याप्रमाणे, "व्यक्तिगत उंची वाढली म्हणून समाजाची उंची वाढली हे म्हणणे धाडसाचे आहे तितकेच ते अप्रस्तुतही आहे. व्यक्तिगत उंची वाढली म्हणजे समाजाची उंची वाढत नाही. समाजाची उंची ही बहुसंख्यांकाच्या कल्याणाशी निगडीत असते. आणि एकदा का सामाजिक उंची गाठता आली की व्यक्तिगत उंची गाठायला वेळ लागत नाही." हे मांडायचे प्रयोजन इतकेच की, आजही समाज लाचार आहे. आजही समाज आर्थिक बाबतीत प्रस्थापितांवर निर्भर आहे. आणि ही निर्भरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आणि एकदा का निर्भरता वाढत गेली तर स्वाभिमान नावाचा मर्दानी बाणा कुठेतरी लुप्त होतांना दिसून येतो. भौतिक साधनांसाठी, नौकरीसाठी, परिवारासाठी इ. अनेक परिस्थितीत. आणि हे वास्तव आज समाजात अस्तित्वात असल्यामुळेच प्रतीक्रांतीवाद्यांनी आंबेडकरी समाजात शिरकाव करून दुफळी माजवलेली आहे. 

आज आम्ही राजकीय पातळीवर कितीही कमकुवत वाटत असलो तरी आम्ही समाजाची राजकीय उंची वाढविण्यात यशस्वी झालेलो आहोत. सत्ता असली काय आणि नसली काय परंतु सत्तेवरचे नियंत्रण आम्ही मिळविलेले आहे. भूमिहीनांचा सत्याग्रह असो, आणीबाणीच्या काळात घेतलेले निर्णय असो, स्वाभिमानाला धरून उभारलेले भावनिक आंदोलन असो, मंडळ कमिशन साठी पुकारलेला लढा असो की संविधानातील कल्याणकारी तत्वे टिकवून ठेवण्यासाठी विविध काळात निर्माण केलेला सामाजिक दबाव असो, आमच्या वाढलेल्या राजकीय उंचीचेच प्रतिक आहे. कुठलीही राजकीय समीकरणे आम्हाला वगळून मंडळी जात नाही यात आमचा राजकीय विजय आहे. असे आम्हाला वाटते. कुठलेही राजकीय निर्णय आम्हाला लक्षात घेतल्याशिवाय घेतले जात नाही. हे आमच्या राजकीय सजगतेचे प्रतिक आहे. 

प्रश्न हा आहे की, फक्त सत्ता आपल्याकडे नाही किंवा ती आपल्याकडे यावी म्हणून आम्ही आणखी किती दिवस समाजाचा स्वाभिमान गमावणार आहोत. कारण जगतांना सत्तेची वाट पाहता येत नाही. तर दैनंदिन जीवनातल्या गरजा भागविण्यासाठी आर्थिक स्त्रोतांच्या शोधात बाहेर पडावेच लागते. आणि ज्या परिस्थितीत ही सर्व आर्थिक स्त्रोते प्रस्थापितांच्या हातात आहेत तोपर्यंत आम्ही दैनंदिन जीवनात स्वाभिमानाला धाब्यावर बसवूनच गरजापुर्तीचा प्रयत्न करणार आहोत. निदान याचा विचार तरी आधुनिक काळात आंबेडकरी समाजात / आंबेडकरी चळवळीत काम करणा-या लोकांनी विचार करणे गरजेचे आहे. 

आज गरज आहे ती आर्थिक उत्पन्नाची स्तोते
समाजाच्या हातात देण्याची. निर्माण करण्याची. त्यासाठी प्रयत्न करण्याची. व्यक्तिगत आणि सामाजिक स्वाभिमान टिकवून ठेवायचा असेल तर या आर्थिक घटकांची नितांत गरज आहे. त्यामुळे आता आम्ही समाजाच्या आर्थिक संपन्नतेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याशिवाय समाज स्वबळावर उभा राहू शकणार नाही. आणि जोपर्यंत समाज स्वबळावर उभा होत नाही तोपर्यंत व्यक्तीचे सामाजिक, सांस्कृतिक बलस्थान बळकट होणार नाहीत. हा समाज जगाच्या पातळीवरील अत्युच्च समाज आहे ज्या समाजाला बुद्ध धम्माचे अधिष्ठान लाभलेले आहे. त्यामुळे हे सर्व करायला आम्हाला फार काही वेळ द्यावा लागेल असे नाही. गरज आहे ती बुद्ध तत्वज्ञानातील मानव्यिक तत्वांना सामाजिक परिप्रेक्षात उतरविण्याची आणि अंगीकारण्याची. 

हे सर्व जर तात्त्विक आणि तार्कीतदृष्ट्या समजून घेऊन त्या दिशेने मार्गक्रमण करायला लागलो तर निश्चितच आज आमची वाढलेली राजकीय उंची सत्तेत परिवर्तीत व्हायला वेळ लागणार नाही. आंबेडकरी चळवळीचे शिलेदार म्हणविना-यांनी सत्तेची अनेक प्रयोग करून बघितले आहेत. हाताळून बघितले आहेत. परंतु शेवटी व्यक्तिगत उंची गाठण्याच्या पलीकडे या सत्तावादी राजकारणाची मजल पोहचू शकली नाही. समाजाची उंची दिवसेंदिवस खुजी होत चालली आहे. नव्या आव्हानांना पेलण्यात आमची शक्ती इतकी खर्च होत आहे की आम्ही योग्य तो मार्गच पकडू शकलेलो नाही. त्यामुळे राजकारण की समाजकारण की अर्थकारण हे ठरविण्यातच गुरफटलो गेलो आहोत. ही कोंडी हा समाज जितक्या अल्पावधीत फोडून काढेल तितक्या लवकर या समाजाला आपले भविष्य सुकर करता येईल. आणि ही कोंडी आर्थिक संपन्नतेशिवाय फुटू शकणार नाही असे आमचे निर्भीड मत आहे. 
  
----डॉ. संदीप नंदेश्वर

No comments:

Post a Comment