Sunday 12 August 2012

धम्माचे राजकारण चळवळीला घातक



धम्माचे राजकारण चळवळीला घातक
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

१९४५ द्वितीय जागतिक महायुद्धानंतर जगातील बहुतांश देशांनी लोकशाही, संसदीय व्यवस्था आणि कायद्याचे राज्य स्वीकारले. वसाहतवादी, धार्मिक आणि राजेशाही जवळपास संपुष्टात आली. भारताने तर संसदीय व्यवस्था, लोकशाही आणि कायद्याचे राज्य संविधानाच्या माध्यमातून स्वीकारून जगासमोर एक आदर्श निर्माण केला. यासोबतच धर्माला मिळणारा राजाश्रय संपुष्टात येऊन धार्मिक स्वतंत्राचा व्यक्तीशः अधिकार प्राप्त झाला. जगात आता कुठेही कुठल्याही धर्माला राजाश्रय प्राप्त नाही. (काही इस्लामिक राज्य वगळता) बहुसंख्य आणि अल्पसंख्य अशी धार्मिक लोकसंख्येच्या आधारावर विभागणी करण्यात आली. परंतु राज्याचा कुठलाही एक धर्म म्हणून स्वीकारला गेला नाही. खुद्द पाकिस्थानातही हिंदू आणि इतरही धर्माचे लोक राहत असल्याने त्यांना निव्वळ इस्लाम धर्माचा जागतिक पुरस्कार करता येत नाही. आधुनिक काळात राजसत्ता आणि धर्म या भिन्न आहेत. परंतु भारतात आजही हिंदू धर्माचा पुरस्कार केला जातो. संविधानातून नव्हे तर हिंदू कट्टरपंथीयांच्या माध्यमातून. मग पाकिस्तानात जर इस्लाम चा पुरस्कार केला गेला तर इथल्या हिंदूंच्या पोटात आगडोंब का उठते हे कळायला मार्ग नाही. याचाच अर्थ इथले कट्टरपंथीय लोकशाही आणि संविधान मान्य करीत नाही. कायद्याचे राज्य मान्य करीत नाही. हेच सिद्ध होत आहे. आणि तसा उल्लेख हिंदू कट्टरपंथीयांकडून वारंवार जाहीररित्या केला गेला आहे.

हे सर्व कट्टरपंथीय धार्मिक संप्रदायाकडून होते हे मान्य करता येईल. परंतु भारतात बौद्ध धम्माचे पुरस्कर्ते म्हणवून घेणारे काही बहुरूपी (मुळात ते बुद्धिस्ट नसल्यामुळे बहुरूपी) बामसेफ, बीएसपी आणि एम्बस चे विद्वान बौद्ध धम्माला इतिहासाचे दुषणे देत राजाश्रय मिळवून देण्याच्या वल्गना करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची ही प्रताडणा आहे. सत्ता प्राप्त केल्याशिवाय बौद्ध धम्माला राजाश्रय मिळणार नाही. आणि बौद्ध धम्म फलद्रूप होणार नाही. अशी या विद्वानांची मांडणी किती हास्यास्पद वाटते ! सत्ता मिळाल्यावरच बौद्ध धम्माचा स्वीकार करणार असे म्हणणारे मादक विद्वान नेते आणि त्यांचे मेंढपाळ कार्यकर्ते नेमक्या कुठल्या धर्माकडे वाटचाल करीत आहेत ? हे तरी आता आधुनिक पिढीने समजून घ्यावे. सत्तेसाठी धम्माचा स्वीकार केला जात नाही ही बाब बौद्ध धम्मासाठी अतिशय लांच्छनास्पद आहे.

धम्म हा जीवनमार्ग आहे. तो जीवनमार्ग न स्वीकारता राजकारणासाठी धम्माला वेठीस धरणे म्हणजे देशद्रोहच नाही तर समाजद्रोह सुद्धा आहे. आम्ही धम्मानुसार वागतो. धम्म चालवितो. मात्र धम्माचा स्वीकार करीत नाही. हिंदू धर्माला शिव्या देतो. पण त्याच हिंदू धर्मात राहून स्वतःला वेगळे भासवितात. किंवा ते परिवर्तनवादी आंबेडकरी असण्याचा होरा मिरवितात. ही कुठली राजनीती आहे ? हे आता तरुण पिढीने ओळखणे गरजेचे आहे. अश्या वल्गना जेव्हा या (बुद्धी नसलेल्या) विचारवंतांकडून ऐकायला येतात. तेव्हा हा समाज आणखी किती काळ फसविला जाणार आहे ? बौद्ध धम्माला या बहुरूपी सत्तावाद्यांकडून आलेली ग्लानी आम्ही केव्हा दूर करणार आहोत. किती दिवस ताटकळत राहायचे.? धम्माच्या नावाने यांचे राजकारण किती दिवस सहन करायचे ? धम्माच्या नावाने राजकारण करणा-या देशद्रोही समाजद्रोह्यांना आम्ही केव्हा उघडे पाडणार आहोत ? यांना केव्हा धडा शिकविणार आहोत ? बर्मा, मलेशिया, थायलंड, चीन, जपान इ. देशांमध्ये बौद्ध धम्माला राजाश्रय नाही.  तरी तिथे बौद्ध धम्म फलद्रूप होतो आहे. भारतातच या विद्वान नेत्यांना धम्मासाठी सत्तेची काय गरज आहे ? धम्माचे करण्यात येणारे हे राजकारण आंबेडकरी चळवळीला अतिशय घातक असेच आहे.

या सर्व परिस्थितीत धम्म तुटत चालला आहे. जगातील बुद्ध धम्माकडे आकर्षित होणा-यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र राजकारणाच्या बुरख्याखाली भारतात धम्माला ग्लानी चढत आहे. पंतप्रधान बनल्यानंतर धम्माचा स्वीकार करू ! सत्ता मिळाल्यानंतर लाखो करोडोंच्या संख्येत धम्मपरिवर्तन करू ! २००४ ला करू ! २००६ ला करू ! कुणी म्हणतो ५ वर्षांनी करणार ! कुणी म्हणतात १० वर्षांनी करणार ! काय सुरु आहे ? या देशात बौद्ध धम्माच्या अनुषंगाने !  काहीच कळायला मार्ग नाही. बौद्ध धम्मातील तत्वे अंगीकारण्याचा ढोंग करणारी, धम्माची ओढ दाखविणारी असंख्य माणसे आढळून येतील. पण बुद्ध धम्माचा स्वीकार करणार नाही. मग अशी माणसे बुद्धिस्ट म्हणायची का ? 

धम्माला किंवा या ठिकाणी आपण त्याला धर्म या अनुषंगाने जरी घेतले तरी धर्म ही जीवनप्रणाली असते. जीवन जगण्याची आचारसंहिता धर्म प्रदान करीत असते. माणूस धर्माशिवाय जगू शकत नाही. म्हणूनच जगातला प्रत्येक माणूस कुठल्या न कुठल्या धर्माचा धर्माभिमानी आहे. जीवनाची नितीमुल्ये ही धर्मातूनच प्राप्त होत असतात. असे अनेक विद्वान समाजशास्त्रज्ञांनी मांडले आहे. परंतु अलीकडच्या काळात सर्वधर्मसमभावाचे निधर्मी बांडगुळ उभे करून स्वतःला जगावेगळी करणारी माणसे गल्लीबोळात पाहायला मिळत आहेत. यांचा सर्वधर्मसमभाव हा फक्त यांच्या बुद्धीच्या पोकळ वल्गना आहेत. प्रत्यक्षात मात्र कुठेतरी हीच माणसे कट्टर धर्माभिमानी असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वधर्मसमभाव ही कायद्याच्या समोरील बाब आहे जी माणसाला स्वतःच्या धर्मातील अस्तित्व टिकवून ठेऊन इतर धर्माविषयी आदरभाव बाळगायला शिकविते. जरी त्या धर्मातील तत्वे आणि सिद्धांत मनाला पटत नसली तरी ती मानायला भाग पाडते. अश्या यांच्या सर्वधर्मसमभावात यांनी स्वतःचा धर्म टिकवून ठेऊन बौद्ध धम्मातील माणसांना भावनिक बनविले आहे. ज्यामुळे भारतात बौद्ध धम्म फलद्रूप न होता रसातळाला जात आहे.

आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत ! अशी पांढरपेशी ओळख तयार करून काहींनी राजकारण केले. तर काहींनी या धर्मनिरपेक्षतेला कट्टर धार्मिकतेचा साज चढविला. मुळात व्यक्ती धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही. व्यवस्था धर्मनिरपेक्ष असते. धर्मनिरपेक्षता हा व्यवस्थेचा गुणधर्म आहे. व्यक्तीचा नाही. ज्यात शासनस्तरावरून आणि कायद्याच्या चौकटीत कुठल्याही धर्माला विशेष महत्व प्राप्त होत नाही. व्यवस्था प्रत्येकच धर्माचा पुरस्कार करते. प्रत्येक धर्मियांच्या भावनांचा आदर व सन्मान शासनस्तरावरून केला जातो. प्रत्येक नागरिक हा कुठल्यातरी धर्माचा पाईक आहे हे वास्तव स्वीकारून त्याला त्याच्या धार्मिक भावनांचा आदरसन्मान करण्याची मुभा प्राप्त होते. व्यक्तीसाठी सर्वधर्मसमभाव आणि व्यवस्थेसाठी धर्मनिरपेक्षता अशी स्पष्ट विभागणी आहे. तरीही काहींनी त्यात भेसळयुक्त बुद्धीची सरमिसळ करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'भारत बौद्धमय करण्याच्या' स्वप्नाला पद्धतशीरपणे बाजूला सारले आहे. 

बाबासाहेबांनी "हा देश बुद्धमय करेन" अशी घोषणा करून प्रस्थापित व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे केले होते. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वावर आधारित भारतीय संवैधानिक व्यवस्था बुद्ध धम्माच्या तत्वावर जेव्हा उभी राहते तेव्हा समाजातील विषमता आणि भेदाभेद नाहीसे होऊन मानवतावादाच्या प्रस्थापनेला सुरवात होते. ही खरी बाबासाहेबांची कल्पना असावी. कायद्याच्या चौकटीत मानवी द्वेषाला बांधून भारतीय समाजाच्या मनामनात असलेल्या धार्मिक कट्टरवादाला बाबासाहेबांनी चाबकाचे फटके मारून 'भारतीय' अशी समानतेची, जाज्वल्य राष्ट्राभिमानाची ओळख प्राप्त करून दिली. या देशातील प्रत्येक माणसांचे जाती व धर्माच्या आधारावर केलेले हजारो वर्षातील विभाजन 'संविधान' या नव्या प्रारुपात मोडकळीस आणले. जे बुद्ध धम्माशिवाय शक्य नव्हते. हेच बाबासाहेबांना सूचित करायचे असेल. पण आज त्यांच्या या संकल्पनेला तडा जातांना पाहून प्रत्येक मानवतावादी माणसाला वेदना होत आहेत.

आज भारतात बौद्ध धर्म असा उल्लेख आमची धार्मिक ओळख निर्माण करण्यासाठी करण्यात येत असला तरी धर्म आणि धम्म यातला फरक आम्ही ओळखला पाहिजे. बौद्ध धर्म हा आमचे संवैधानिक संघटन प्रदर्शित करण्यासाठी आहे. आमचे धार्मिक अस्तित्व मिळवून देण्यासाठी आहे. पण मुळात आमच्या जीवनप्रणालीत तो धर्म नसून धम्म आहे. बौद्ध धर्म ही आमची कायदेशीर ओळख आहे. तर धम्म ही आमची जीवनप्रणाली. दोन्ही एकदुस-याला पूरक आहेत. पण त्यामुळे धर्म आणि धम्म यात साम्यता वा साधर्म्य साधता येणार नाही. धर्म ही चौकटीबद्ध संहिता असते. ज्या चौकटीला तोडून बाहेर पडता येत नाही. मानवी विकासाची गुंफणही चौकटीतच केली जाते व त्यासाठी मानवी बुद्धी स्वातंत्र्यालाही कैद करून टाकले जाते. धम्म ही चौकटविरहित मानवी विकासाला पूरक अश्या परिस्थितीच्या निर्मितीसाठी नितीवादी स्वातंत्र्य बहाल करणारी जीवनप्रणाली आहे. जी बुद्धीवरील झापडे दूर करून कल्याणाचा मार्ग प्रदर्शित करते. ज्यामुळे धम्म ही एक संहिताच बनत नसून तो एक मानवी जीवनमार्ग बनतो.

आमच्या पराक्रमाची धार कमी झाल्यामुळे आम्ही धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी इतरांवर निर्भर राहायला लागलो आहोत का ? धम्म ही एक जीवनप्रणाली व जीवनमार्ग म्हणून आम्ही काही आदर्श निर्माण करू शकलो का ? बौद्ध धर्मीय म्हणून स्वाभिमानाने व्यवस्थेत शिरकाव करू शकलो का ? स्वतःची ओळख आम्ही स्वतः निर्माण करू शकलो का ? ज्याआधारे इतरांनी त्याचा आदर्श घेऊन आपल्यात समाविष्ट होण्यासाठी प्रवृत्त झाले आहेत. बाबासाहेबांनी दिलेल्या तत्वज्ञानी चेह-याला आम्ही कुरूप का बनविले ? का आम्ही लाचार झालोत की, कुणीतरी येईल आणि बुद्ध धम्मावर भरभरून बोलेल. स्वतःसोबत तो त्याच्या जातीच्या माणसांना घेऊन येईल. मग बौद्धांची संख्या वाढेल. आणि भारत बौद्धमय होईल. ही लाचारी आतातरी आम्ही फेकून दिली पाहिजे. अन्यथा यापुढेही माणसे येतील. धम्म स्वीकारण्याचा ढोंग करतील. राजकारणासाठी तुमचा वापर करून घेतील. आणि सत्ता मिळाली कि तुम्हाला लाथाडून देऊन पुन्हा ते दलित वा हिंदू म्हणूनच जगतील.

सावधान रहा ! जे धम्म स्वीकाराची घोषणा करतात त्यांच्यापासून ! ते धम्माचे राजकारण करतात. हे ओळखा ! आजपर्यंत धम्माचे राजकारण असेच केले गेले. यापुढेही असेल केले जाईल. आमची नालायकी जागतिक तत्वज्ञानाला बदनाम करीत आहे. याचा विचार आम्ही कधी तरी केला आहे का ? धम्माच्या होणा-या राजकारणापासून सावध होऊन स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करा ! धम्माचा जीवनमार्ग इतरांसाठी आदर्श असा जगून दाखवा ! तेव्हा इतरांना धम्मात येण्याची विनवणी करावी लागणार नाही. धम्माचे नैतिक आचरण इतरांना धम्माकडे आकर्षित करून घेईल. मग धम्मस्वीकाराच्या पोकळ घोषणा होणार नाहीत. प्रत्यक्ष धम्म प्रवर्तन घडून येतील. आणि बाजारभुंग्यांनी चालविलेले धम्माचे राजकारण मोडीत निघून भारत बौद्धमय बनेल.

"सम्यक जय भीम"
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

2 comments:

  1. MAZYA MITRA JYA BUDDHA DHRMACHI MAHATI TU

    SANGAT AHES TO DHARMA EKA KSHATRIYANE

    (MHANJECH MARATHYANE) BAHUJANANSATHI NIRMAN

    KELA HE WIASARU NAKO.SAMBHAJI BRRIGAD CHE

    NETRUTW SURWA BC/OBC/SC/ST SWIKARUN EKA

    CHATRAKHALI YETIL TEVHA APOAPCH MARATHE

    WA ITAR SURWA HINDU BOUDH DHARMA SWIKARATIL.

    GHAI KARUN GOSHTI BIGHDUN JATAT.

    ReplyDelete
  2. mitra tujha jara abhyas kami aahe...tu tujhe nav dile asate tar mi tula savistar mahiti puravu shakalo asato.

    ReplyDelete