Monday 24 September 2018

पक्षीय राजकारणात आंबेडकरी चळवळ अपयशी ठरू नये.


#Once_Again_Ambedkar
पक्षीय राजकारणात आंबेडकरी चळवळ अपयशी ठरू नये.  
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

आंबेडकरी समूह राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आहे असे बरेचदा बोलले जाते. भारतीय राजकारणात आंबेडकरी समूह महत्वाची भूमिका बजावतो. असेही बोलले जाते. राजकारणाविषयी जितकी जागृती आंबेडकरी समूहात आहे तितकी अन्य समूहात दिसून येत नाही असेही अनेकांचे मत आहे. परंतु हे सत्य आहे की, अर्धसत्य ? आतापर्यंतच्या आंबेडकरी समूहाच्या राजकीय वाटचालीला राजकीय जागृततेतून केली गेलेली प्रगल्भ वाटचाल म्हणायची की नाही ? इतिहासासोबत वर्तमान वास्तवाचा अभ्यास व अवलोकन केल्यास यातली कुठलीच कृती आंबेडकरी समूहात दिसून येत नाही. हे खेदाने म्हणावे लागते. गल्लीबोळात नेते निर्माण झाले. गावखेड्यात संघटना उभ्या झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रमाण मानून वेगवेगळे राजकीय पक्ष उभे झाले. म्हणून आंबेडकरी समूह राजकीयदृष्ट्या जागृत आहे किंवा प्रगल्भ आहे असे आम्ही समजत असू तर आंधळ्याने डोळस माणसांप्रमाणे वावरण्याचा प्रयत्न करून स्वतःची फसगत करण्यासारखे होईल.

कालपरवा एका कार्यक्रमात काही माणसांशी राजकीय चर्चा झाली. ती माणसे निश्चितच स्वतःला आंबेडकरी म्हणणारी होती व त्याच परिवेशात समाजात वावरणारी होती. राजकीय चर्चा असल्याकारणाने निश्चितच वर्तमान राजकीय नेते व पक्ष यांच्या भूमिकेवर चर्चा आली. भाजप-आरएसएस ने निर्माण केलेल्या देशातील एकूणच वातावरणामुळे भाजप सरकारच्या विरोधातला सर्वांचा सुरु होता. मग भाजप च्या पर्यायावर चर्चा सुरु झाली. भाजप विरोधकांनी एकत्र यावे व २०१९ ला देशातून भाजप सरकार उलथवून टाकावी अश्या निष्कर्ष्याप्रत चर्चा आली. त्यातही चर्चेतील सर्वच आंबेडकरी असल्याने आंबेडकरी पक्ष, संघटना व नेत्यांवर चर्चा येऊन थांबली. त्यातला एकाने स्पष्ट भूमिका घेतली कि वर्तमान काळात मा. बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका व वाटचाल योग्य आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भारिप महत्वाची भूमिका घेईल. आंबेडकरी समूह प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य करीत चालला आहे. त्यांचा आदेश मान्य करू लागला आहे. प्रकाश आंबेडकर समाजाला देत असेलेले दिशानिर्देश मान्य करू लागला आहे. त्यासाठी त्याने काही उदाहरणे सुद्धा पुढे केली. अट्रोसिटी मोर्चा, मराठा मोर्चे, भीमा कोरेगाव प्रकरण या सर्वच प्रकरणात आंबेडकरी समूहाने प्रकाश आंबेडकरांचा आदेश मान्य करून त्याप्रमाणे भूमिका घेतली. सोबतच त्या गृहस्ताने प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागे असलेल्या ‘आंबेडकर’ या नावाच्या वलयाचा लाभ देखील त्यांना होऊ शकतो अशी पुष्टी जोडली. त्यावरून परत एक गृहस्त बोलला की, कॉंग्रेस ने सुद्धा ‘गांधी’ नावाच्या वलयाचा नाव घेऊन इतके वर्ष देशावर सत्ता केली व राहुल गांधी यांचे उदाहरण पुढे केले. तेवढ्यात एक सेवानिवृत्त (आंबेडकरी) ताडकन बोलला. राहुल गांधी हुशार आहे. राहुल गांधी सारखा नेता आज देशात शोधून सापडणार नाही. ते गांधी नावामुळे नाही. आज सर्वांनी परत एकदा कॉंग्रेस पक्षालाच मदत करावी. असे बरेच काही बोलून गेला. चर्चेचा रंग बदलणार, वाद होणार एवढ्यात सर्वांनीच सामंजस्य दाखवीत चर्चा थांबविली.

ही चर्चा प्रासंगिक, उत्स्फूर्त व अव्यावहारिक असली तरी आंबेडकरी समूहाचे प्रातिनिधिक चित्र स्पष्ट करणारी आहे. वर्तमानात प्रकाश आंबेडकर हे एकमेव आंबेडकरी नेतृत्व भारतीय राजकारणात सर्वमान्यतेच्या निकषावर पोहचले आहेत. त्यामुळे निश्चितच सर्वांच्याच नजरा प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे लागलेल्या आहेत. वर्तमानात प्रकाश आंबेडकर घेत असलेल्या भूमिकेवर समाजात चर्चा व्हायला लागली आहे. त्यावर मंथन व्हायला लागले आहे. कुणी म्हणतो प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला मागितलेल्या १२ जागा कॉंग्रेस नी त्यांना द्याव्यात. तर कुणी म्हणतो प्रकाश आंबेडकर यांनी सर्वच जागा स्वबळावर लढाव्यात. तर काही म्हणतात कि प्रकाश आंबेडकर यांनी अवास्तव मागणीवर अडून न बसता कॉंग्रेस सोबत आघाडी करून पुढील निवडणुका लढवाव्यात. भाजपा ला सत्तेवर येण्यापासून थांबविणे हे एकमेव लक्ष पुढे ठेवून. नेमके कुठल्या भूमिकेला सहमती दर्शवून प्रकाश आंबेडकर यांनी पुढे जावे हा प्रश्न खुद्द प्रकाश आंबेडकर यांनाही पडत असावाच. अशाही परिस्थितीत त्यांनी त्यांची भूमिका सर्वांपुढे ठेवलेली आहे. प्रश्न हा आहे कि आंबेडकरी समूहात स्वतःतच ४ वेगवेगळ्या भूमिका पुढे येत असतील तर आंबेडकरी समूहाला राजकारण कळले आहे का ? राजकीय परिस्थितीचे गांभीर्य आहे का ?

भारतीय राजकारणाचे केंद्रबिंदू हे भारतीय संविधान आहे. कारण सत्तेवर किंवा विरोधी पक्षात कुठेही बसले तरी भारतीय संविधान व त्याअनुरूप देशाची वाटचाल हीच केंद्रस्थानी आहे किंवा असायला पाहिजे. या देशातल्या आंबेडकरी समूहाचा देखील केंद्रबिंदू या देशाचे संविधान आहे. या देशाच्या संविधानावर आंबेडकरी समूहाचे प्रेम निर्विवाद आहे. त्यामुळे भारतीय राजकारण व आंबेडकरी समूह यांचा समान केंद्रबिंदू भारतीय संविधान हेच आहे. त्यामुळे आंबेडकरी समूहाने भारतीय राजकारणाकडे आंबेडकरी विचारांच्या परीदृश्यात बघणे अपेक्षित आहे. आंबेडकरी विचार देशाच्या संसदेत असल्याशिवाय भारतीय संविधानाचे अभिप्रेत संचालन होऊ शकत नाही. पण हे अजूनही आंबेडकरी समूहाने लक्षात घेतलेले दिसून येत नाही हेच दुर्दैव आहे. कायम पराभूत मानसिकतेत राहून इतरांना सत्तेवर बसविण्यात आंबेडकरी समूहाने धन्यता मानली आहे याचेही दुर्दैवच म्हणावे लागेल. आजही मनुवादी व्यवस्थेची चाचणी सुरु असतांना आंबेडकरी समूह एका निश्चित राजकीय भूमिकेपर्यंत व निर्णयापर्यंत येऊ शकत नाही याची खंत आहे.

गाडीचे इंजिन हे गाडीच्या गतीशिलतेचे एक महत्वाचे अंग आहे. हे इंजन स्वतः कार्यप्रवृत्त, कार्यप्रवण होत नाही. इंजनाला कार्यप्रवण, कार्यप्रवृत्त व्हायचे असेल तर त्यात रॉकेल, पेट्रोल, डिझेल अश्याप्रकारचे कुठलेतरी इंधन त्यात भरून त्यानंतरच गाडीचे इंजन सुरु होते. परंतु या सर्वात आपण इंजिनाला कुठल्या गोष्टीचा पुरवठा करावा त्यावर त्या इंजिनाचे भवितव्य व त्याची उपयोगिता ठरत असते. रॉकेल वर गाडीचे इंजिन चालू शकते. तितक्याच कार्यक्षमतेने ते कार्यप्रवणही असते पण रॉकेल वर चालविल्या जाणाऱ्या इंजिनाचे भविष्य फार थोडे असते. तसेच डिझेल वर देखील गाडीच्या इंजिनाला चालविता येते परंतु डिझेल वर चालणाऱ्या इंजिनाचे भविष्यदेखील रॉकेल पेक्षा जास्त असले तरीही थोडेच असते. पेट्रोल वर चालणारे इंजिन हे त्या तुलनेत जास्त काळ कार्यक्षम असते. म्हणजेच इंजिनाची कार्यक्षमता सारखी असली तरी त्या इंजिनाला कार्यप्रवण करणारे इंधन त्या इंजिनाची भविष्यातील कार्यक्षमता किती काळ टिकून राहील हे निर्धारित करीत असते. त्याचप्रमाणे भारतीय संविधान हे देशाचे इंजिन आहे. संसद ही इंजिनाला इंधन पुरवठा करण्यारी टाकी आहे. या टाकीत कुठले वैचारिक इंधन भरले जाते त्यावर देशाचे संविधान कशाप्रकारे कार्यप्रवण राहील व त्याचे भविष्य किती असेल हे निर्भर करेल. आज पर्यंत या टाकीत कॉंग्रेस किंवा भाजपा सारख्या इंधनाचाच साठा साठविला गेला त्यामुळे भारतीय संविधान या देशाच्या इंजिनाला पूर्ण कार्यक्षमतेने कार्यच करता आलेले नाही. भारतीय संविधानाची कमकुवत होत चाललेली कार्यक्षमता थांबवून परत त्याला कार्यक्षम बनवायचे असेल तर आज संसदेच्या टाकीत आंबेडकरी विचाराचे इंधन भरावे लागेल हा विचारच आंबेडकरी समूहातून केला जाऊ नये यापेक्षा मोठे दुर्भाग्य काय असणार आहे.

आज भारतीय संविधानरुपी इंजन सुरक्षित करून त्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या रुपात शुद्ध आंबेडकरी विचारांचे इंधन उपलब्ध झाले असतांना आंबेडकरी समूहाची जबाबदारी वाढलेली आहे. रॉकेल (भाजपा) जास्त धोकादायक म्हणून कमी धोकादायक असलेले डिझेल (कॉंग्रेस) टाकण्याचा आम्ही प्रयत्न करीत असू तर या देशातल्या माणसांचे जीवनमान कार्यप्रवृत्त करणारे भारतीय संविधान आम्ही आमच्याच हाताने अकार्यक्षम बनवीत आहोत. यावर आंबेडकरी समूहाने मंथन करणे गरजेचे आहे. आंबेडकरी विचार, आंबेडकरी पक्ष, आंबेडकरी नेता, आंबेडकरी माणसे संसदेत पोहचावी जेणेकरून आंबेडकरी विचारातून एकदा तरी या देशाचे संविधान कार्यप्रवृत्त होईल यासाठी आंबेडकरी समूहाने आग्रही असावे. रॉकेल (भाजपा) सोबत घेऊन आंबेडकरी माणूस संसदेत पाठवू किंवा डिझेल (कॉंग्रेस) सोबत घेऊन आंबेडकरी माणूस संसदेत पाठवू अशी स्वप्ने आंबेडकरी समूह रंगवीत असेल तर देशाची परिस्थिती बदलणारी नाही हे लक्षात घावे लागेल. देशाची परिस्थिती बदलायची असेल तर शुद्ध आंबेडकरी विचारच रॉकेल-डिझेल (भाजपा-कॉंग्रेस) मिश्रण न करता संसदेत पाठविणे आंबेडकरी समूहासाठी शहाणपणाचे ठरेल.

आजपर्यंत या देशात आंबेडकरी समूहाने स्वतंत्र विचाराचे राजकारण केलेच नाही असा आरोप केला तर ते वावगे ठरणार नाही. पक्षीय विचारधारा महत्वाची असते हेच आंबेडकरी समूहाला आजपर्यंत कळू नये याचेच आश्चर्य वाटते. आंबेडकरी समूहाने वैचारिक राजकारणासाठी आग्रही भूमिका घेतली असती तर नेत्यांचे कडबोळे आणि विविध गटाधीपती पक्षांचे गाजर गवत या समूहात फोफावले नसते. आजही आंबेडकरी माणसांना कॉंग्रेस च्या राहुल गांधी पेक्षा देशात दुसरा कुणीच योग्य नेता नाही असे म्हणण्याची वेळ आली नसती. ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा.’ या प्रसिद्ध म्हणीप्रमाणे आज आंबेडकरी समूहाची परिस्थिती झालेली निदर्शनास येते.  आंबेडकरी विचाराची आग्रही भूमिका घेणारा, कणखर, स्वाभिमानी नेता प्रकाश आंबेडकर यांच्या रुपात आंबेडकरी समूहाजवळ असतांना आम्हाला अन्य पर्यायाला जवळ करण्याची गरजच भासू नये. त्यासाठी देशाच्या संसदेत आंबेडकरी विचार पोहोचविण्यासाठी आंबेडकरी समूह निदान आजतरी आग्रही असला पाहिजे. समूहाचा एक विचार, एक निर्णय, एक नेता, एक पक्ष, एक भूमिका घेऊन या समूहाने वाटचाल करणे गरजेचे आहे.

भारतीय राजकीय वातावरणात पक्षीय विचारधारेला महत्व आहे. ते पक्षीय राजकारण आम्ही लक्षात घेऊन पुढील मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. आंबेडकरी विचारांची चाळणी लावून या समूहाने आंबेडकरी चळवळीचा एक पक्ष व एक नेता निवडणे गरजेचे आहे. बऱ्याच अंशी आज बहुतांश समूह प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून भारिप बहुजन महासंघ (वंचित बहुजन आघाडी) सामिल होऊ पाहत आहे. परंतु दुसरीकडे काँग्रेसी-आंबेडकरी, भाजप-आंबेडकरी अश्या प्रकारचे मिश्रणही या समूहात सातत्याने दिसून येत आहेत. हे मिश्रण आंबेडकरी विचारांची शुद्धता गमावून आंबेडकरी विश्वासार्हता गमावणारे आहे. या संमिश्रणाची सरमिसळ २०१९ च्या निवडणुकांत होणार नाही याची दक्षता आंबेडकरी समूहाला घ्यायची आहे.

भारिप बहुजन महासंघाची व वंचित बहुजन आघाडीत समाविष्ठ झालेल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे. पक्षीय निर्णय व नेतृत्वाची भूमिका निशंक पेलून धरण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे. कालपरवा भारिपच्या बैठकीत नव्याने आलेल्या महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी भंडारा-गोंदिया येथे झालेल्या पोट-निवडणुकीतील पक्षीय निर्णयावर व प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयावर सर्वसामान्य कार्यकर्त्यांसमोर जाहीर चर्चा केली. चर्चेचा सूर हा पक्षीय व नेतृत्वाचा निर्णय अमान्यतेकडे घेऊन जाणारा होता. आंबेडकरी पक्षीय राजकारणासाठी हे अतिशय धोकादायक आहे. वर आंबेडकरी समूहातील सामान्य माणसांनी केलेली चर्चा आणि इथे पक्षाच्या महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी केलेली चर्चा दोन्ही मला सारख्याच वाटतात. जे आंबेडकरी चळवळीसाठी व पक्षीय राजकारणासाठी दोन्हीसाठी घातकच आहेत. निदान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तरी पक्षीय निर्णयाला बांधील राहण्याची भूमिका घेतली तर समाजाची भूमिका बदलायला वेळ लागणार नाही. आजपर्यंत पक्षीय निर्णयाला अमान्य करून आंबेडकरी राजकारण तुकड्यात विभागले गेले. व भारतीय राजकारणात खरेदी-विक्रीचे केंद्र बनले. त्यामुळे आंबेडकरी विचार, आंबेडकरी पक्ष, आंबेडकरी नेतृत्व भारतीय संसदेमध्ये व भारतीय राजकारणात स्थिरस्थावर होऊ शकले नाही. आज देशाच्या इतिहासात पहिल्यांदा प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात भारतीय राजकारणात आंबेडकरी विचार केंद्रबिंदू ठरू पाहत असतांना आंबेडकरी समूहासोबतच आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सर्वसमावेशक पक्षीय भूमिकेसोबत बांधील राहणे गरजेचे आहे. अन्यथा प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या आंबेडकरी नेत्याचे नेतृत्व व समाजासाठी घेत असलेली त्यांची मेहनत कुचकामी ठरेल. याचे गांभीर्य आंबेडकरी समूहाने जाणले पाहिजे.

काळ बदलला आहे. परिस्थिती बदलली आहे. मानसिकता बदलत आहे. आंबेडकरी राजकारण देशाच्या राजकारणात पाय रोऊ पाहत आहे. अश्या परिस्थितीत आजपर्यंत आंबेडकरी चळवळीने जी राजकीय पत गमावली होती ती पत परत मिळविण्याची संधी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंबेडकरी समूहाकडे चालून आलेली आहे. या संधीचे सोने या समूहाने करावे. एकीकडे आंबेडकरी चळवळ या देशाची वंचितांची चळवळ होऊ पाहत असतांना व आंबेडकरी चळवळीला या देशातल्या वंचितांचे राजकीय नेतृत्व करण्याची संधी आली असतांना आम्ही आंबेडकरी चळवळीतील पक्षीय राजकारण समजून घेतले पाहिजे. भारतीय राजकारणात आंबेडकरी चळवळीला आलेले राजकीय अपयश धुवून काढण्याची संधी हाताशी चालून आलेली आहे. गरज आहे ती संपूर्ण समूहाने पक्षीय व नेतृत्वाच्या भूमिकेशी बांधील राहण्याची. तेव्हाच आंबेडकरी समूह राजकीय यश पदरात पाडून घेऊ शकेल. व येणाऱ्या काळात भारतीय संविधानाचे सूत्रसंचालन आंबेडकरी विचाराने, आंबेडकरी नेतृत्वाच्या माध्यमातून होईल. एवढी माफक अपेक्षा आपल्याला बाळगता येईल.


                                                                  adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment