Sunday 11 March 2018

"आंबेडकरवाद" : एक जागतिक तत्वज्ञान


Repost 

#once_again_ambedkar
"आंबेडकरवाद" : एक जागतिक तत्वज्ञान
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर

आजकाल एका नव्या विचारमंथनाला  सुरवात झाली आहे. आंबेडकरवाद हा ‘वाद’(इझम) म्हणून संपूर्ण जगाने मान्य केला आहे. तरीही असे दिसून येते कि काही लोकांना अजूनही तो पचनी पडलेला दिसत नाही. आंबेडकरवाद हा इझम आहे कि नाही ?  हे मागील ९० वर्षाच्या काळात स्पष्ट झाला आहे. त्याची आज  नव्याने चर्चा करण्याची गरज नाही. हि चर्चा घडवून आणण्याचे प्रयोजन काहीही असो.  परंतु आंबेडकरवाद याला ‘इझम’ मानण्यात ज्यांना शंका येते. त्यांना त्याचे उत्तर देणे आमचे कर्तव्यच  आहे.

कुठल्याही विचारात “इझम” बनण्याची क्षमता असते असे नाही. किंवा कोणताही विचार ‘इझम’ होतो/होईल असेही नाही. विचार हे तत्कालीन परिस्थितीचे आकलन करणारे असतात.  आणि त्यावरील प्रतिक्रियेच्या रुपात ते प्रकट होत असतात.  मुळात विचाराला ‘इझम’ बनायचे असेल तर ते विचार तत्कालीन परिस्थितीचे निदर्शक असलेच पाहिजे. परंतु त्याचबरोबर भविष्यकालीन परिस्थितीचा आढावा घेऊन भविष्यातील भेडसावणा-या समस्यांच्या सोडवणुकीसाठी ते विचार मार्गदर्शक असले पाहिजे. विचारांचे त्रिकालाबाधीत्व त्या विचारांना ‘इझम’ पर्यंत घेऊन जात असतात.

एकंदरीत "आजच्या परिस्थितीचे अवलोकन करून;  भविष्यातल्या समस्यांचा आढावा घेऊन; त्या सोडविण्यासाठी लाभदायक मार्गदर्शक म्हणून जे विचार अस्तित्वात येतात त्या विचारांना  ‘वाद’ किंवा ‘इझम’ म्हणता येईल." अश्याच विचारांना ‘वाद’ किंवा ‘इझम’ चे स्वरूप प्राप्त होते.  आंबेडकरी विचार या सर्व निकषावर तंतोतंत बसतात. भारतातील समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, धर्मव्यवस्था, इथले सामाजीकरण, संस्कृतीकरण, राजकीय सामाजीकरण इ. चा विचार करून त्यावर उपाय सुचविणारे, भविष्यातील उद्भवणा-या समस्यांच्या निराकरणासाठी आंबेडकरी विचार सदैव मार्गदर्शक राहिले आहे. बाबासाहेबांनी शेतकरी-मजूर-अस्पृश्य-पिडीत-मागास वर्गाच्या उद्धारासाठी दिलेला लढा, ते सोडविण्यासाठी सांगितलेले मार्ग, इतकेच नव्हे तर त्याची प्रत्यक्ष सोडवणूक कायद्याच्या माध्यमातून आणि सामाजिक व्यवस्थेतून कशी केली जाऊ शकते;  हे त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष कारकीर्दीतच दाखवून दिले आहे.

जगातले अनेक विचारवंतांचे विचार इझम बनले आहेत. परंतु प्रत्यक्ष ते विचारवंत अस्तित्वात असतांना त्यांच्या विचारांना इझम चे स्वरूप प्राप्त होऊ शकले नाही. त्यांच्या विचारांना व्यवस्थेचे स्वरूप त्यांच्या मृत्यू नंतरच प्राप्त झाले.  परंतु बाबासाहेबांच्या बाबतीत असे घडले नाही.  बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांच्या विचारांना इझम चे स्वरूप प्राप्त केले होते. भारतीय घटना समितीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भासलेली उणीव. हे त्याचेच निदर्शक आहे. भारतीय सविधानातून ‘राज्य समाजवादाची’ मांडणी करू पाहणारे बाबासाहेब हे स्वतःच एक ‘इझम’ म्हणून जगले आहेत. हजारो वर्षांपासून हिंदू धर्मवादी आणि मनुवादी व्यवस्थेला उलथवून गुलामगिरीत खितपत पडलेल्या व्यवस्थेला त्यातून अलगद बाहेर काढून समानतावादाची पेरणी करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे एक जिवंत ‘इझम’ होते. हे कुणी नाकारणार आहे का ? त्यांच्या महापरीनिर्वानानंतर त्यांच्या विचारांना धरून त्यांच्या अनुयायांनी दिलेला आजपर्यंतचा या जातीयवादी मानसिकतेविरुद्धचा लढा आंबेडकरवादाशिवाय (इझम शिवाय) दिला गेला नाही. हे वास्तव आम्हाला स्वीकारावे लागेल.

भारतात पराकोटीला गेलेली जातीची मानसिकता आणि जातीची उतरंड नाकारून  मानवाला समानतेच्या सूत्रात बांधणे इतके सहज सोपे नव्हते.  आणि तेही अश्या परिस्थितीत  जिथे समाजाच्या चहुबाजूला धार्मिक, जातीय आणि ब्राम्हणी उच्च-नीच तेने ग्रासलेली  परंपरावादी, प्रतिगामी गुंडांची टोळी तुमच्यावर हल्ले करण्यास सदैव तत्पर आहे. परंतु बाबासाहेबांनी आपल्या तल्लख-कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि विचारांच्या लढाईतून;   जिकिरीच्या परिस्थितीतून  भारतीय समाजाला बाहेर काढले आहे. त्यामुळेच आजही समाजाला आंबेडकरवादाची गरज भासत आहे.

 भारतीय संविधान  संविधानसभेच्या सुपूर्द करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली  भाषणे, तसेच संविधान सभेतील विविध विषयावरील त्यांनी प्रकट केलेली मते लक्षात घेतली. तर आंबेडकरवाद हा ‘इझम’ आहे कि नाही  हे सहज लक्षात येईल. "भारतातील लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर या राजकीय लोकशाहीचे रूपांतरण  सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत करणे गरजेचे आहे. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात."

"भारतीय व्यवस्थेचे यशापयश हि व्यवस्था चालविणाऱ्या लोकांवर अवलंबून राहील."   "जनतेच्या हिताचे आणि कल्याणाचे निर्णय हि व्यवस्था ज्या लोकांच्या माध्यमातून चालविली जाणार आहे. त्यांच्यावर निर्भर असणार आहे. त्यात जर व्यवस्था अपयशी ठरली तर या व्यवस्थेला इथली जनताच मूठमाती देईल." "सर्वांना समानतेच्या तत्वावर वागविले जाणे हि व्यवस्थेची जबाबदारी आहे. परंतु राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास ज्या समाजाचा झालेला नाही. किंवा इथल्या जातीवादी व्यवस्थेने होऊ दिला नाही. त्या लोकांच्या उत्थानासाठी व्यवस्थेने काही निर्णय घेणे आवश्यक राहणार आहे. सर्व समाजाला समतेच्या पातळीवर आणण्यासाठी; पिळल्या गेलेल्या मागास वर्गासाठी काही विशेष सवलती शासनाच्या माध्यमातून देण्यात याव्या.  जेणेकरून त्या समाजाला त्यांचा विकास घडवून आणता येईल. हि शासनाची जबाबदारी आहे. यात इतर समाजाने समानतेच्या तत्वाची ढाल करून मागास वर्गाच्या विकासात रोडा आणू नये.  विषमता घालवून समानता प्रस्थापित करायची असेल तर असमान वर्गातील मागास वर्गाला विशेष संधी उपलब्ध करून देऊन लवकरात लवकर त्यांच्या विकास घडवून आणावा. जेणेकरून विषमता नष्ट होऊन समानता प्रस्थापित होईल." असे बाबासाहेब म्हणतात.
   
भारताला स्वातंत्र्य मिळून आज ६४ वर्षाचा काळ लोटत चालला आहे. संविधानाची अंमलबजावणी होऊन ६८ वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही इथल्या व्यवस्थेने, शासनाने भारतातील मागास वर्गाच्या उत्थानासाठी आवश्यक ती पाऊले उचललेली दिसून येत नाही. आजही पराकोटीची विषमता समाजात टिकून आहे. विषमतेची दरी दिवसेंदिवस रुंदावत आणि खोलावत चालली आहे. विषमता नष्ट न करता ती अजून बळावत जावी. त्यावरच इथल्या प्रथापितांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. अशी जणू काही परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. आंबेडकरवाद भारताला विकासाच्या मार्गावर नेण्यात पूर्णतः यशस्वी सिद्ध होऊ शकत असला.  तरी इथली पुराणमतवादी जळमटे, जातीची कवाडे इथल्या माणसांच्या मेंदूवर इतकी घट्ट चिकटली गेली आहेत,  कि त्यातून हा परंपरावादी, जातीवादी माणूस बाहेर पडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारायला तयार होत नाही. आंबेडकरवादाने प्रभावित होऊन परिवर्तनवादी चळवळीत काम करणारा माणूस या व्यवस्थेवर नियंत्रण ठेऊन आहे म्हणून इथली लोकशाही निदान टिकून असल्याचा भास होतो. अन्यथा इथल्या व्यवस्थेने बहुसंख्य वर्गाला पुन्हा एकदा गुलामगिरीत लोटले असते. हा बाबासाहेबांच्या विचारांचा विजय आहे कि आज थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु समानतेचा मोकळा श्वास इथल्या नागरिकांना घेता येत आहे. व्यवस्थेवरचे नियंत्रण आणि व्यवस्थेला निर्णय घेण्यास भाग पाडणा-या विचारांना ‘इझम’ (वाद) म्हणता येते म्हणून आंबेडकरवाद हा एक ‘इझम’ आहे. यात कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.

  माणसाला माणूस म्हणून ओळख देणा-या बुद्ध तत्वज्ञानाची साथ आंबेडकरवादाला  आहे. जगात भारतीय लोकशाही यशस्वी लोकशाही म्हणून गणल्या जाते. आंबेडकरी विचार आणि संविधानातून झडकणा-या बुद्ध तत्वाज्ञानामुळे इथले संविधान जगातले सर्वोत्कृष्ठ संविधान मानण्यात आले आहे. अखिल विश्वातील मानवाला समान संधी आणि समान न्याय मिळाला तरच मानवतावाद टिकून राहील. मानवी समाज टिकवून ठेवायचा असेल तर मानवामानवात बंधुत्व टिकून राहणे गरजेचे आहे.  आज जागतिक बंधुत्वाची संकल्पना राबविण्यात येते. मात्र भारतात अजूनही त्याच बंधुत्वाला विरोध होतांना पाहून आंबेडकरवादाची प्रकर्षाने गरज भासू लागली आहे. जागतिक युद्ध आणि लोकशाहीची आंदोलने ही आंबेडकरवादाला पुर्नप्रस्थापित करण्याची गरज आहे. हे दाखवून देत आहे. 

एकीकडे राज्याचे आणि शासनाचे अस्तित्व नाकारून समाजवादाची मांडणी करणारा कार्ल मार्क्स पाच्छात्य व्यवस्थांनी स्वीकारला आहे. गुलामीची एक अवस्था (भांडवलशाही) उद्ध्वस्त करून दुसरी गुलामीची अवस्था (श्रमिकांची हुकुमशाही) समाजात निर्माण करू पाहणारा मार्क्सवाद स्वीकारला गेला. श्रमिक धार्जिणी व्यवस्था सत्तेच्या केंद्रस्थानी बसवून समान व न्यायपूर्ण व्यवस्था आणू पाहणारा मार्क्सवाद स्वीकारून पाश्च्छात्य राष्ट्रांनी आपले मार्गक्रमण केले. परंतु अल्पावधीतच मार्क्सवादाच्या व्यवस्थात्मक मर्यादा ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या राज्य समाजवादाची मदत या राष्ट्रांना घ्यावी लागली. मर्यादित राज्यतंत्र आणि समान न्यायाची कास धरावी लागली. “राज्य समाजवादात” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला समान न्यायाचा पुरस्कार, समान शासकीय वितरण प्रणालीचा पुरस्कार, मुलभूत सेवा पुरविणाऱ्या कारखानदारीचे राष्ट्रीयीकरण, समान सुरक्षिततेची हमी आणि कायद्यात्मक शासकीय प्रक्रियेतून विकासाची संकल्पना व शासनाचे (सरकारचे) महत्व आज आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारले जात आहे. याचा गांभीर्यपूर्वक विचार केला तर आंबेडकरवादाला व्यवस्थात्मक दृष्टीकोनातून स्वीकारल्याशिवाय भारतासारख्या देशाला तरी पर्याय नाही.

आंबेडकरवाद हे एक जागतिक तत्वज्ञान आहे असेही आपल्याला म्हणता येईल. आंबेडकरवादाला बुद्ध तत्वज्ञानाची पार्श्वभूमी आहे. आंबेडकरवादाचा गाभा बुद्ध तत्वज्ञान हेच आहे. बुद्ध तत्वज्ञान हे तत्वज्ञान आहे. असे सिद्ध करण्याची गरज नाही.  परंतु त्याचसोबत आंबेडकरवादाला तत्वज्ञान म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. नव्हे ते एक जागतिक तत्वज्ञानच आहे. तत्वज्ञानाचे क्षेत्र अतिशय व्यापक असते. विश्वातील प्रत्येक गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याचा आणि प्रत्येक बाबींचा वेध घेण्याचा प्रयत्न तत्वज्ञान करते. सत्य संशोधनाचे काम तत्वज्ञान करते. काय आहे ? काय असावे ? कोणता मार्ग अनुसरावा ? याचे दिग्दर्शन तत्वज्ञानातून केले जाते. जीवनाचा अर्थ शोधण्याचे कार्य तत्वज्ञान करते. विवेकबुद्धीचा वापर करून; विश्वातील प्रत्येक बाबींचा शोध घेऊन; अंतिम सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न तत्वज्ञानातून केला जातो. या आधारावर आणि निकषावर आंबेडकरवादाला पळताळून पाहिले. तर बुद्ध तत्वज्ञानाबरोबर आंबेडकरी तत्वज्ञानही आपल्याला दिसून येईल.  जागतिक सत्यान्वेषण हे आंबेडकरी तत्वज्ञानाचे परम निष्कर्षरुपी केंद्र आहे. फ़क़्त भारतीय परिस्थितीवरच आंबेडकरी विचार, आंबेडकरवाद भाष्य करीत नाही. तर त्यापलीकडे जाऊन जागतिक संबंधाचे, जागतिक कल्याणाचे, जागतिक मानवतावादाचे, आंतरराष्ट्रीय संबंधाचे सखोल अध्ययन आंबेडकरी तत्वज्ञानात दिसून येते.  "थाट्स आन पाकीस्थान", "प्रोब्लेम आफ रुपीस" आणि "बुद्ध कि कार्ल मार्क्स" हे आंबेडकरी तत्वज्ञान सिद्ध करणारी काही उदाहरणे आहेत. याचा विचार केला तर आंबेडकरी विचार हे तत्वज्ञानाच्या सर्व शाखा पार करून जागतिक समस्यांचे सत्यान्वेषण करतांना दिसून येते. म्हणून आंबेडकरवाद हा फ़क़्त "वाद" किंवा "इझम"च नाही तर त्यापलीकडील ते एक जागतिक तत्वज्ञान आहे. हे आम्हाला मान्य करावे लागेल.
****
adv.sandeepnandeshwar@gmail.com

No comments:

Post a Comment