Tuesday 6 March 2012

चळवळीचे मानसशास्त्र


चळवळीचे मानसशास्त्र
---डॉ. संदीप नंदेश्वर. 8793397275
विचारांची अस्पष्टता आणि बौद्धिक मागासलेपणामुळे माणसाला स्वतःच्या विश्वापेक्षा दुसरे काहीच चांगले दिसत नाही. कुठल्याही कल्याणकारी व मानवतावादी चळवळीसाठी ते धोकादायक आहे. कारण हजारो वर्षाआधी अश्याचप्रकारे बहुसंख्य समाजाला बौद्धिक मागासलेपणाने ग्रासले असल्यामुळे किंवा जाणीवपूर्वक त्यांच्यात बौद्धिक मागासलेपणा निर्माण केल्या गेल्यामुळे शोषणाची व्यवस्था निर्माण झाली होती. आणि त्यातूनच उच्च नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ विभागणी होऊन अस्पृश्यता जन्माला आली. आधुनिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सद्यस्थितीला तशीच परिस्थिती उच्चपदस्त, उच्चशिक्षित लोकांकडून वारंवार होतांना दिसून येत आहे. अश्या माणसांना कितीही समजविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी समजून घेण्याच्या मानसिकतेच्या पलीकडची पातळी गाठली असल्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची खट्याळ उत्तरे देण्याचा त्रास घेतील परंतु विचारांतर्गत आणि मानवी परिक्षेत्रात मांडलेली वर्गवारी (अस्पृश्यता) ही माणसे बाजूला सारू शकत नाही. मानवी जीवन सर्वच पातळ्यांवर (सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक) लढतांना एखाद्या पातळीला कक्षेच्या बाहेर ठेवणे निदान परिवर्तनवादी किंवा मानवतावादाच्या पुरस्कर्त्यांना न शोभणारे लक्षण आहे. अश्या परिस्थितीत या माणसांमध्ये एक तर वैचारिक अस्पष्टता आहे किंवा बौद्धिक मागासलेपणाचे ते लक्षण आहे असेच समजून घ्यावे. जीवन जगत असतांना एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढावे लागत असते. अश्याप्रकारे अनेक पातळ्यांवर लढण्याची कुवत जी व्यक्ती स्वतःजवळ बाळगते ती व्यक्ती उद्याच्या परिवर्तनाची शिलेदार ठरते. स्वतःसोबत इतरांच्या जीवनाला विकासाचा मार्ग प्रदान करते.
आंबेडकरी चळवळ बाबासाहेबांच्या समर्थ खांद्यावर एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढा देत यशस्वी मार्गक्रमण करीत राहिली. कारण तेव्हाचा समाज आपल्या अधिकारासाठी, न्यायासाठी झपाटलेला होता. परंतु त्याचसोबत जातीवाद आणि वर्णवादाने हिरावून घेतलेली मानवतेची ओळख प्राप्त करण्यासाठी तो अधीर झाला होता. सामुहिक कल्याण हाच त्यांचा मूलमंत्र होता. बुद्धाचाही तोच मूलमंत्र होता. परंतु आधुनिक समाज अधिकार आणि न्यायाने पूर्ण झाला आहे असे वाटू लागले आहे. त्यामुळे आताच्या चळवळी ह्या स्वार्थासाठी चालविल्या जात आहेत असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे. चळवळीचे मानसशास्त्र समजून न घेतल्याने कार्यकर्ते आणि समाज चळवळीपासून दूर लोटला जात आहे. निश्चित ध्येयाअभावी चळवळीची एकसूत्रता दुभंगली आहे. समाजासाठी एकोप्याने लढणारी सामुहिक शक्ती क्षीण होऊन त्याची जागा आता व्यक्तिगत शक्तीप्रदर्शनाने घेतलेली आहे. याला समाजाचा आणि चळवळीचा विकास म्हणायचा कि -हास म्हणायचा ? कारण व्यक्तिगत शक्तीप्रदर्शनाने कधीच सामाजिक कल्याणाची पातळी गाठता येत नाही. सामुहिक शक्ती आणि एकोपा हेच कुठल्याही चळवळीचे बलस्थान असते. इतिहासाच्या पानावर बाबासाहेबांच्या हयातीत आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या काही वर्षात आंबेडकरी चळवळीत दिसून आलेली सामुहिक शक्ती आणि एकोपा आधुनिक आंबेडकरी चळवळीत पुनःश्च्य मिळविण्यासाठी व्यक्तिगत शक्तीप्रदर्षनाला मूठमाती द्यावी लागणार आहे.
चळवळ ही समूहाच्या मान्यतेवर समाजाच्या आवश्यकतेनुसार आपली भूमिका बजावीत असते. ज्या समाजाचे प्रश्न सुटलेले आहेत. त्या समाजाला चळवळीचे गांभीर्य राहत नाही. परंतु जो समाज सदैव विकासाच्या मुख्य प्रवाहांपासून दूर ठेवला गेला त्या समाजाला चळवळीपासून फारकत घेणे शक्य नाही. त्यासाठीच चळवळ सदैव समाजाच्या प्रश्नांना घेऊन लढत असते. एकदाचे आंदोलन हे तात्कालिक ठरविता येईल. परंतु चळवळ ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. समाजाच्या अस्तित्वापर्यंत चळवळ टिकून राहते. आंदोलन मात्र इप्सित धेय्य पूर्ण झाले की बंद होते. कारण आंदोलनाला घडणा-या घटनेचा आधार असतो. मात्र चळवळीला विचार आणि तत्वज्ञानाचा मजबूत, खंबीर असा पाया असतो. ही वास्तवता डोळ्यासमोर असतांनादेखील आंबेडकरी चळवळीला गोठविण्यात आले. चळवळीची शक्ती क्षीण करण्यात आली. आंदोलनाचे रूप चळवळीला प्रदान करून चळवळीची व्यापकता कमी करण्यात आली. संपूर्ण समाजाच्या एकसंघतेला छिद्रे पाडून चळवळीचे रुपांतर गटातटातील आंदोलनात करण्यात आले. आणि त्यातूनच जगाच्या पातळीवर शोषित-पिडीत-वंचित समूहाला सम्यक क्रांतीच्या बळावर न्याय मिळवून देणारी आंबेडकरी चळवळ प्रतीद्वद्वात सापडली आहे.
पक्ष, राजकारण, आंदोलने, रस्त्यावरचे संघर्ष इ. पासून आंबेडकरी चळवळ आणि आजचा आंबेडकरी तरुण दूर राहू शकत नाही. तात्कालिक समस्या सोडविण्यात ते लाभदायक ठरते यात दुमत नाही. परंतु समाजाच्या क्रमीत विकासात आजपर्यंत या सर्व गोष्टींचा लाभ होऊ शकलेला नाही. आम्ही शिक्षण घेतले पण इतरांच्या शिक्षणसंस्थेमध्ये आणि आजही घेत आहोत. आम्ही नौक-या केल्या इतरांच्या अधिकारक्षेत्रात आणि आजही करीत आहोत. क्रमीत विकासाची कुठलेही साधने आपल्या समाजाने हातात घेण्याचा प्रयत्न का केला नाही ? आम्ही राजकारण हातात घेण्यासाठी संपूर्ण चळवळीला बरबाद केले. पण राजकारणासाठी लावलेली शक्ती जर आम्ही क्रमीत विकासाची साधने हातात घेण्यासाठी लावली असती. तर आज आंबेडकरी समूह स्वयंपूर्ण बनला असता. जयंती व तत्सम कार्यक्रमासाठी लाचारी पत्करून इतरांपुढे हात पसरण्याची गरज पडली नसती. स्वतःच्या बळावर हा समाज विकासाच्या प्रक्रियेत आघाडीवर असता. इतिहासात हे घडले नाही पण आताच्या आंबेडकरी तरुणांनी तरी शिक्षणसंस्था, उद्योग, कारखानदारी, स्वयंसेवी संस्था, बाजारपेठ, ही क्रमीत विकासाची साधने हातात घेण्यासाठी आपली शक्ती लावावी. तरच भविष्याची उभारणी करता येईल.
शाब्दिक युद्धासाठी माहीर झालेली माणसे वैचारिक संघटनांच्या माध्यमातून इतरांवर मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न करतात. आधुनिक आंबेडकरी चळवळीत युवकांचे असेच काही मानसिक शोषण होत आहे. रस्त्यावरच्या लढाईसाठी यांच्याकडून अपेक्षा करता येणार नाही असेच दिसते आहे. पण देशांतर्गत घडामोडींवर यांचे किती लक्ष आहे यावर सुद्धा प्रश्नचिन्हच आहे. देश्यांतर्गत प्रत्येक घडामोडीवर आंबेडकरी तरुणांचे लक्ष असायला पाहिजे. परंतु बाबासाहेबांच्या नावाने भाजीबाजारात बसलेल्या अश्या तरुणांच्या संघटना आपल्यासोबत इतरांचेही नुकसानच करीत आहेत. समाजाचा अंधार दूर करण्याच्या काळात एकदुसा-यावर फक्त आरोप करीत सुटलेले आहेत. याच कारणांमुळे आतापर्यंत चळवळीचे नुकसान झाले आहे. आणि पुढेही तेच होणार हे दिसत असतांना यांनी डोळे बंद करून घेणे बुद्धीला न पटणारे आहे. कुणाचीही सामंजस्याची भूमिका दिसून येत नाही.  काय भूमिका घेत आहेत ? काय करायला चालले ? याचे उत्तरही त्यांनीच द्यावी.
प्रत्यक्ष व्यक्तीचे मानसशास्त्र हे चळवळीच्या मानसशास्त्रापेक्षा वेगळे असते. तसेच चळवळीचे मानसशास्त्र हे सामाजिक मानसशास्त्रापेक्षा निराळे आहे. जेव्हा व्यक्तीचे मानसशास्त्र हे चळवळीच्या मानसशास्त्रावर वरचढ ठरते तेव्हा चळवळ लयाला जाण्यास सुरुवात होते. आणि जेव्हा चळवळीचे मानसशास्त्र व्यक्तीप्रवृत्त होते तेव्हा सामाजिक मानसशास्त्र विचार, कृती व सिद्धांतापासून परावृत्त होते. सामाजिक पातळ्या सर्वांना समान लक्षाने प्रेरित करणा-या असाव्या. त्यात आम्ही भेद करतो. हा गरीब, हा श्रीमंत, ही विभागणी करून समाजाच्या सामाईक न्यायाच्या लढ्याला दूर सारतो. श्रीमंत असो कि गरीब मानव म्हणून जन्माला येणा-या सर्वच समाज बांधवाला काही सामाईक पातळ्या गाठाव्या लागतातच. आम्ही व्यक्तिवादी विचार न करता जेव्हा सामाजिक पातळीवर येऊन त्याचा विचार करतो तेव्हाच त्याचे उत्तरही सापडते. व्यक्तिवादी गरजा आणि प्रश्न वेगळे असू शकतात परंतु सामाजिक गरजा जोपर्यंत सामाईक स्तरावर येत नाही. तोपर्यंत समाजाचा संघटीत लढा उभा होऊ शकत नाही. म्हणून जोपर्यंत व्यक्तीचे मानसशास्त्र सामाजिक मानसशास्त्रात परिवर्तीत होत नाही तोपर्यंत चळवळीचे निश्चित असे मानसशास्त्र आपल्या उद्देशात सफल होऊ शकत नाही. आजपर्यंत त्याचीच प्रचीती आंबेडकरी चळवळीला आलेली आहे.
व्यक्तीचे मानसशास्त्र हे स्वार्थाने प्रेरित असते. चळवळीचे मानसशास्त्र हे सामुहिक कल्याणाने प्रेरित असते. व्यक्तीचे मानसशास्त्र व्यक्तीला जगण्याची धडपड शिकविते. चळवळीचे मानसशास्त्र व्यक्तीला कसे जगावे याचे मार्गदर्शन करते. सामाजिक क्रांतीतून आंदोलन निर्माण होते. चळवळ निर्माण होत नाही. सातत्यपूर्ण समाजाच्या क्रांतीतून झालेली आंदोलने जेव्हा एका निश्चित विचार व तत्वज्ञानाच्या चौकटीत मानवी कल्याणाचा मार्ग पत्करतात तेव्ह्या त्याला चळवळीचे व्यापक रूप प्राप्त होते. त्यामुळे तात्कालिक सामाजिक क्रांतीतून झालेली आंदोलने चळवळ होत नाही. आज समाजाला एकत्र येण्यासाठी ध्येयाची गरज आहे. विचारांची गरज नाही. कारण आंबेडकरी समूहासाठी बाबासाहेबांचे विचार हेच एकमेव विचारपीठ आहे. मात्र माणसांनी आपापली सामाजिक ध्येय वेगळी निर्धारित केल्याने गोंधळ निर्माण झालेला आहे. 
स्वतःच्या क्षमतेविरुद्ध जाऊन कुठलीही लढाई जिंकता येत नाही. हे सर्वमान्य आहे. परंतु क्षमतेच्या चक्रव्युहात सापडून इतर पातळ्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. इतकेच. जगण्याच्या संघर्षात सर्वच पातळ्या गाठाव्या लागतात मग क्षमता असो अथवा नसो. जर जगायचे असेल तर. लढल्यानंतरच क्षमता सिद्ध होत असते. समाजातील प्रत्येक माणूस हा त्या समाजाचा घटक म्हणून वावरतांना जातीच्या आणि धर्माच्या निकषावर जेव्हा त्याची हेटाळणी होते तेव्हा श्रीमंती व गरिबी असा भेद दिसून येत नाही. कायद्याच्या चौकटीत सर्व समान असतांना कायद्यांची पायमल्ली होताना न्यायासाठी जेव्हा दुटप्पी भूमिका घेतली जाते तेव्हा कुठलीच सीमारेषा आडवी येत नाही. निदान आंबेडकरी समाजासाठी या समान दुव्यांना आम्ही ओळखले पाहिजे. आमच्या समाजाचे प्रश्न समान आहेत. विचार समान आहेत. ध्येय समान आहेत. श्रद्धा समान आहेत. आदर्श समान आहेत. परंतु वर्तमानातील निष्ठा दुभंगल्या असल्याने आम्ही व्यक्तिगत पातळीवर लढत आहोत. सामुदायिक पातळीवर जेव्हा आमचा लढा सुरु होईल तेव्हा चळवळीच्या मानसशास्त्राला बळ प्राप्त होईल.
देशपातळीवर आंबेडकरी समाजाची संघटीत शक्ती भंग झाली असतांना सुद्धा आम्ही श्रेयाचे आणि स्वार्थाने प्रेरित होऊन समाज आणि चळवळीकडे बघणार असू तर चळवळीसाठी हा अत्यंत धोकादायक काळ आहे. आमचे स्वार्थ, निष्ठा बाजूला सारून बाबासाहेबांच्या प्रेरणांना केंद्रीभूत ठेऊन एकत्रित संघर्षाला तयार व्हावे लागणार आहे. आमच्या अवती भवती निर्माण झालेले गट आणि संघटनांचे जाळे बाजूला फेकून समाजाच्या हितासाठी संघटीत निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. मानवी कल्याण या एकाच ध्येयाने प्रेरित आंबेडकरी चळवळीला लागलेले फुटीरतावादाचे काटेरी मुकुट उतरवून संघर्षाच्या मैदानात एकत्र लढावे लागणार आहे. त्यासाठी व्यक्तिवादाच्या फंदात न पडता समाज निर्धारित निर्णय प्रक्रियेचा अंगीकार करावा लागणार आहे. समाजमान्यता या एकाच निकषावर चळवळीचे सरसेनापती ठरवून त्या सरसेनापतीच्या नेतृत्वात आम्हाला सैनिक म्हणून संघर्षाच्या मैदानात उतरावे लागणार आहे. आजपर्यंत नकाराची घंटा वाजवून अनेक चुली मांडल्या गेल्या. आता स्वीकाराची उदारता दाखवून एकाच घरात सुखाने गुण्यागोविंदाने नांदून दाखवावे लागणार आहे. चळवळीचे मानसशास्त्र हे एक नेतृत्व आणि एकसंघ समाज याच सूत्रावर टिकून राहील.
---डॉ. संदीप नंदेश्वर. 8793397275

No comments:

Post a Comment