Wednesday 9 January 2019

अ-राजकीय आंबेडकरी लोकांपासून सावध व्हा.


#Once_Again_Ambedkar
अ-राजकीय आंबेडकरी लोकांपासून सावध व्हा.
Non-Political Ambedarites are dangerous for Society.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

कायम स्वतःला अ-राजकीय म्हणवून घेणाऱ्या आंबेडकरवाद्यांनी या समाजाला व पर्यायाने आंबेडकरी चळवळीला रसातळाला नेले आहे. व निवडणूकीच्या काळात याच अ-राजकीय समाजद्रोह्यांनी (व्यक्ती, संस्था, संघटना, मंडळे) इतर राजकीय पक्षांशी सौदेबाजी केली. काहींनी केली नसेल तर राजकीय भूमिकेअभावी व राजकीय भूमिका न घेता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रस्थापित राजकीय पक्षांनाच (कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बिजेपी, मनसे) मदत केली आहे. व समाजाची एकगठ्ठा मते विखूरल्या गेली. त्यामुळे समाज व चळवळ रसातळाला जाऊन राजकीय प्रभावशून्य बनली. अशा सर्व अ-राजकीयांना "आंबेडकरी समाजद्रोही" म्हटले तर तीर काळजात खूपसल्यागत रक्तबंबाळ अवस्था होणे साहजिक आहे. हे वाचून व ऐकून समाजही तडपेल. माझ्यावर टिका करेल. आम्ही समाजद्रोही कसे ? अश्या प्रश्नांची सरबत्ती होईल. परंतु सत्य मांडणे व लिहिणे गरजेचे आहे. असत्याला कवटाळून वाटचाल करीत राहणे मी समाजद्रोह समजतो. त्यामुळे अशा सर्वांना उत्तर देऊन येणाऱ्या पिडीला अ-राजकीय समाजद्रोही होण्यापासून वाचविणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
समाजद्रोही ही संकल्पना सामाजिक द्रोह व समाजविरोधी कृत्य करणारा, सामाजिक अस्थिरता या संबंधाने समकक्ष वापरली जाते. कुणाला हे अभिप्रेत नसेल तरी मी त्या अनुषंगाने ती संकल्पना वापरतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक लोकशाही अभिप्रेत होती. परंतु राजकीय लोकशाही संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नाने संविधान सभेने स्विकारली व या देशातील जनतेने अंगिकृत केली. त्यामुळे देशात राजकीय लोकशाही प्रस्थापित झाली. परंतु सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी राजकीय लोकशाहीचा योग्य वापर झाला तरच सामाजिक लोकशाही प्रस्थापित होईल ही डॉ. बाबासाहेबांसोबतच संविधानकारांचीही अपेक्षा होती. पर्यायाने राजकीय लोकशाहीतूनच सामाजिक लोकशाहीचा मार्ग प्रशस्त करता येईल. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांनीच राजकीय अभावशून्यतेने राजकीय लोकशाही स्विकारली नाही असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आंबेडकरी समाजाचा राजकीय प्रभाव १९७० पासून संपूष्टात आल्यागत झाला आहे.
राजकीय लोकशाही म्हणजे काय हे सुद्धा स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्याची काही मुलभूत अंगे आहे. ती पुढीलप्रमाणे...
१) प्रौढ मताधिकार (मतदानाचा अधिकार) : वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मतदानाचा संविधानिक अधिकार.
२) राजकीय पक्ष : विशिष्ट विचारधारा व विचारसरणी अंगिकृत करून समान हितसंबंध जोपासणाऱ्या लोकांचा समूह जो न्याय हक्कासाठी स्वतःचे राजकीय प्रतिनिधित्व करू ईच्छितो व एक विशिष्ट विचारधारा विचारसरणी हा त्यांच्या राजकीय वाटचालीचा व लढ्याचा स्थायिभाव असतो. सत्तेत प्रतिनिधित्व मिळविणे हा उद्देश सोबत घेऊन सत्ताधाऱ्यांवर राजकीय दबावगट निर्माण करून राजकीय प्रभाव पाडीत असतो.
३) राजकीय नेतृत्व : विशिष्ट विचारधारा व विचारसरणीने वाटचाल करणाऱ्या राजकीय पक्षाला राजकीय नेतृत्व लागते. जे नेतृत्व त्या पक्षाच्या विचारधारेला अनुसरून समाजाच्या न्याय व हक्कासाठी सत्ताधाऱ्यांशी लढत असते. हे नेतृत्व तत्कालिन काळातील जिवंत व्यक्तीच करीत असतो. भूतकाळात होऊन गेलेला नेता नाही.
४) राजकीय सहभागित्व : देशातला प्रत्येक नागरिक ज्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केलीत व कायदेशिर मतदार बनला आहे अशा प्रत्येकच नागरिकांचे राजकीय सहभागित्व. निवडणूकांच्या काळात त्यांची राजकीय सक्रीयता, राजकीय भूमिका व राजकीय ईच्छाशक्ती राजकीय लोकशाहीत महत्वपूर्ण असते.
मतदानाला जातांना त्याचे हितसंबंध जोपासणारा विचार, त्या विचारांवर चालणारा / असणारा व निर्माण झालेला पक्ष, व त्या पक्षाचे नेतृत्व करणारा नेता व त्या पक्ष नेतृत्वाने दिलेला उमेदवार हा विचार त्याच्या मनात असतो. राजकीय लोकशाहीत बिनडो, अविवेकी, अविचारी मतदार हा कधीही धोकादायकच असतो. कारण लोकशाहीत सत्ता व सत्तेची ध्येयधोरणे व्यक्तीच्या हातात राहत नसून पक्षाच्या हातात असतात. पर्यायाने त्या पक्षाच्या मुळाशी असणारी विचारधारा सत्ता व सत्तेच्या ध्येयधोरणाला प्रभावित करीत असतात. (उदा. २०१४ ला भारतात स्थापन झालेली मोदी, भाजप, संघ, हिंदुत्ववादी सत्ता)
या किमान राजकिय लोकशाहीच्या परिमाणाच्या चौकटीत आंबेडकरी विचार, आंबेडकरी संस्था, संघटना, मंडळे व आंबेडकरी समाज यांच्या राजकीय सहभागित्वाचा विचार करून आपल्याला उत्तरे मिळू शकतील. सांसदीय लोकशाहीत देशातील नागरीक हा अ-राजकीय राहू शकतो का ? तो अ-राजकीय भूमिका घेऊ शकतो का ? याचे उत्तर आम्हाला शोधावे लागेल.-राजकीयत्व हे लोकशाहीला लागलेली किड आहे. नव्हे तो लोकशाहीत केलेला द्रोह आहे. असेच म्हणावे लागेल. फार काळ समाजाला राजकीय अंधारात ठेऊन चळवळीचे ध्येय गाठता येणे शक्य नाही. अ-राजकीयत्व म्हणजे संविधानद्रोह नव्हे का ? याच्या स्पष्टीकरणातूनच पुढे आंबेडकरी अ-राजकीय समाजद्रोही समोर येतील. स्पष्टही होतील.
हल्ली आंबेडकरी समाजात अ-राजकीय म्हणवून घेणे भूषणावह बनले आहे. नव्हे "अ-राजकीय" असणे एखाद्या पुरस्कारस्वरूप बिरूद बनले आहे. "आम्ही अ-राजकीय", "आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही.", "आम्ही कुठल्याही गटाचे नाही.", "आम्ही राजकीय नाही.", "अमके-तमके काम राजकीय नाही; सामाजिक आहे. म्हणून तुम्ही आमच्या सोबत या, सहकार्य करा, मदत करा." हे हल्ली मोठ्या गर्वाने सांगितले जाते. इतकेच नाही तर अशा लोकांना निष्ठावंत, सच्चे व हाडाचे आंबेडकरी समजले जाते. इतकेच नव्हे तर समाजात अशा अ-राजकीय माणसांना राजकीय माणसांपेक्षा मान, सन्मानही जास्त मिळतो. व समाज राजकीय प्रवाहापासून दूर फेकला जातो. ज्याचा प्रत्यक्ष लाभ प्रस्तापित राजकीय पक्ष घेतांना दिसून येतात. या देशातला उर्जावान आंबेडकरी समाज अतिय महत्वाच्या राजकीय लक्ष्यापासून दूर जाणे; हेच सत्तेवर येण्याचे सुत्र इतर राजकीय पक्षांनी तयार केले आहे. हे इतर पक्ष या अ-राजकीयांना उर्जा (पैसा) पुरवितात. इतकेच काय तर या स्वतःला अ-राजकीय म्हणविणाऱ्या आंबेडकरी लोकांना सामाजिक कार्याच्या नावाखाली कार्यक्रम घ्यायला पैसाही सत्ताधारी व प्रस्तापित पक्ष पुरवित असतात. "जितका अ-राजकीय आंबेडकरी व्यक्ती, संघटन, संस्था, मंडळ इ. तितका इतर राजकीय पक्षांत त्याचा भाव (किंमत = चळवळीला व समाजाला विकण्याची) जास्त." हे जणू वास्तवागत चित्र कोरलेले आहे. आमचे अनुभव तर असे की, कुठल्याच अ-राजकीय संस्था, संघटना व मंडळाचा किंवा व्यक्तीचा सो-कॉल्ड सामाजिक कार्यक्रम इतर पक्षांच्या पैशाशिवाय होतच नाही. किंवा इतर प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांना आपल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून (पैसे घेऊन) बोलाविल्याशिवाय कार्यक्रमच होत नाही. इतर पक्षांकडून तो पैसा घेता यावा म्हणूनच हे सामाजिक कार्यक्रम होतात अन्यथा एकही कार्यक्रम होतांना दिसला नसता. बरं, याची परतफेड काय तर निवडणूक आली की भाऊ, दादा, साहेब आमची मतं तुम्हालाच. मत देतात कि देत नाही ? हा भाग वेगळाच. कारण पैसा सगळ्यांकडून घ्यायचा असतो.
दुसरे असे की या सर्व अ-राजकीय माणसांची, संस्था, संघटना, मंडळांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच. पण समाजकार्याचा आव इतका की यांनी यांची अख्खी संपत्तीच समाजाच्या उत्थानासाठी घालविली. वास्तवात काय तर साध्या बाजूच्या माणसाचे राशन कार्ड पण कधी काढून दिलेले नसेल व नाही कधी एखाद्या सरकारी दप्तरामध्ये जाऊन त्याला न्याय मिळवून दिला असेल. समाज तर दूरच राहीला. पण हेच सारे अ-राजकीय लोक प्रबोधनाच्या नावाने बोंबा ठोकून आंबेडकरी राजकीय नेत्यांवर व आंबेडकरी पक्षांवर आगपाखड करतील. नेतृत्वाविषयी व आंबेडकरी पक्षांविषयी तिरस्कार व द्वेष निर्माण करण्यात ही सर्व अ-राजकीय मंडळी पटाईत असतात. "आम्हीच तेवढी आंबेडकरी चळवळ (मुळातली वळवळ) चालवतो." "आमच्यामुळेच आंबेडकरी चळवळ टिकून आहे." "राजकारण्यांनी घात केला. गटातटात विभागले." "हा पक्ष असा, तो पक्ष तसा, हा नेता असा, तो नेता तसा." हे यांचे नेहमीचे प्रवचन. मात्र समाजावर किंवा समाजातल्या एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर यांना भाजला पापडही मोडता येत नाही. तेव्हा मात्र राजकीय नेत्यांची आठवण येते. कारण प्रशासनावर व सत्तेवर या अ-राजकीयांचा प्रभाव शून्य. जेमतेम आर्थिक परिस्थिती असणारे हे तमाम अ-राजकीय अल्पावधीतच अ-राजकीय समाजसेवेतून मालदार कसे होतात ? याची उदाहरणे तुमच्या आजूबाजूलाच सापडतील. मग समाजाला राजकीय प्रभावशून्य बनविणाऱ्या या अशा बेगडी अ-राजकीय आंबेडकवाद्यांना समाजद्रोही नाही तर काय म्हणायचे ?
या अ-राजकीय माणसांना आम्ही कधी विचारले आहे का की त्याने निवडणूकांमध्ये कुणाला मदत केली ? कुणाला मतदान केले ? कुठली भूमिका वठविली ? कुठल्या पक्षाचा प्रचार केला ? किमान हे अ-राजकीय माणसे स्वतः चालवित असलेल्या संघटनांच्या सदस्यांना कुठल्या पक्षाला मतदान करायला लावले ? त्यांनी स्वतःहा कोणत्या पक्षाला मतदान केले ? ज्या पक्षाला मतदान केले तो पक्ष आंबेडकरी विचारांचा होता का ? तो पक्ष आंबेडकरी होता का ? याचे उत्तर १००% शंभर टक्के नकारार्थी येतील. मग हे अ-राजकीय माणसे कसले आंबेडकरवादी आहेत असे म्हणता येईल का ? शत्रुपक्षांना देशाच्या सत्तेवर येण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे हे आंबेडकरी असू शकतात का ? हे कसले आंबेडकरी ? हे तर समाजात अराजकता माजविणारे अ-राजकीय आंबेडकरी समाजद्रोहीच. या अ-राजकीय आतंकवाद्यांपासून आंबेडकरी चळवळीने सावध होणे गरजेचे नव्हे काळाची गरज आहे.
आज आंबेडकरी चळवळ व्यापक होत चालली आहे. देशातल्या सत्ताधारी विचारसरणीने जी परिस्थिती देशांतर्गत निर्माण केली त्या परिस्थितीला तोंड देत असतांना भारतातील लोकशाही व या लोकशाहीने सर्व नागरिकांना दिलेली संविधानिक सुरक्षीतता कायम ठेवण्यासाठी देशातला तरूण वर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पर्याय म्हणून पाहतो आहे. कन्हैय्या असो की मॉर्क्सवादी विद्यार्थि संघटना आपल्या भूतकाळातील अपयशाचे शल्य झूगारून आंबेडकरी विचारांना हाताशी घेऊन सत्ताधारी विचारसरणीच्या (हिंदूत्ववादी) विरूद्ध रस्त्यावर येऊन लढतो आहे. सह्रदयाने त्यांचे स्वागत आंबेडकरी चळवळीने करणे अपेक्षीत आहे. मिडीया ट्रायल, आताच का पुळका इ. प्रश्नार्थक विसरून विचार करावा लागेल. या आंबेडकरी लढ्याचे व चळवळीचे नेतृत्व शिफ्ट होतेय का ? की नाही ? ही भिती न बाळगता.
कारण अॅड. प्रकाश आंबेडकर अगदी २०१२ पासून बदलणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेऊन आरएसएस व हिंदूत्ववाद्यांविरूद्ध लढत आहेत. अगदी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणविस यांच्या सरकारी (हिंदूत्वप्रणीत) ध्येयधोरणाच्या विरोधात प्रकाश आंबेडकर लढत होते. ईतक्यात हैद्राबादचे रोहीत वेमुला प्रकरण घडले व त्याचबरोबर दिल्लीचे जेएनयु प्रकरण घडले. याही प्रकरणात अगदी सुरवातीलाच उडी घेऊन प्रकाश आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना आश्वस्थ केले. कॉग्रेस असो वा अन्य पक्ष असो किंवा सो कॉल्ड आंबेडकरी नेते व पक्ष सरकारी बिळात दडून बसले असतांना प्रकाश आंबेडकरांनी एकहाती मोर्चा सांभाळला. मुंबई व दिल्लीतील तरूणाईच्या मोर्चाने त्यांचे नेतृत्व सिद्धही केले. परंतू तरूणाईचा बदलता चेहरा लक्षात घेऊन स्वतःचे नेतृत्व पूढे न करता नव्या तरूणांना या सरकार विरोधातल्या लढाईचे नेतृत्व करायची संधी प्रकाश आंबेडकरांनी दिली. परंतू इतक्या व्यापक होत जाणाऱ्या लढ्यात व आंबेडकरी चळवळीची व्यापकता वाढत असतांनादेखील काही अ-राजकीय आंबेडकरवाद्यांनी सत्ताधारी मानसिकतेचे (हिंदूत्ववादी) बळी पडून कन्हैय्याच्या आंदोलनाला व एकूणच त्याला पाठींबा देणाऱ्यांच्या विरोधात संशयकल्लोळ निर्माण केला.
विरोध करणाऱ्यांत सारेचे सारे स्वतःला अ-राजकीय म्हणविणारेच होते व आहेत. ज्यांना राजकीय भूमिका नाही, ज्यांना राजकीय समज नाही अशांनीच हा संशयकल्लोळ निर्माण केला. कुठलाही राजकीय कार्यकर्ता कन्हैय्याला पाठींबा देणाऱ्यांच्या विरोधात नव्हता. विरोधात होता व आहे तो बिजेपी आरएसएस व त्यांच्या समर्थनातील पक्ष संघटना व हा सो कॉल्ड अ-राजकीय आंबेडकरी. ज्याला देशांतर्गत राजकीय घडामोडीची जाण नाही. सर्व राजकीय पक्ष एकजूट होऊन बिजेपी आरएसएस शासनाच्या विरोधात उभे होत असतांना हेच अ-राजकीय आंबेडकरी बिजेपी आरएसएस व तत्सम संघटनांनी जो मोर्चा उघडायला पाहीजे होता तो यांनीच उघडला. मग हे आंबेडकरी चळवळीच्या विरोधात जाऊन विद्वत्ता व संशयकल्लोळ माजवून आंबेडकरी मांडलिकत्व स्विकारणारे अ-राजकीय आंबेडकरी समाजद्रोही नाहीत का ?
परिस्थितीला हेरून चळवळ चालविली गेली तर ती सर्वव्यापक होईल. विचारांचे मांडलिकत्व स्वतःकडेच ठेऊन विचाराची व चळवळीची सर्वव्यापकता संपविणारे हे सारेच अ-राजकीय का दिसून येतात ? याचे कारण राजकीय अज्ञान हेच आहे. अ-राजकीय म्हणून बुद्धीभेद करणारे यांना कुठल्या व्याख्येत बसवायचे ? हा विचार आपणच करायचा आहे. माझ्या दृष्टीने हे समाजद्रोह्यापेक्षा कमी नाहीत.
आंबेडकरी माणसाला स्वतःला अ-राजकीय म्हणविण्यात गर्व व अभिमान का वाटावा ? हा चिंतनाचा विषय आहे. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथल्या राजकीय व्यवस्थेला मार्गदर्शक ठरतात. आंबेडकरी विचार सत्तेला पर्यायी व मार्गदर्शक वाटतात. भारतीय नागरिकांना राजकीय बदलाचा व शासकीय ध्येयधोरणाचा पर्याय म्हणून आंबेडकरी विचार पर्यायी व जवळचे वाटतात. तिथे आंबेडकरी अनु़यायी म्हणविणारे अ-राजकीय माणसे, संस्था, संघटना, मंडळे आंबेडकरी कसे असू शकतात. कुठेतरी, काहीतरी आमचे चुकतेय. राजकीय निर्णयक्षमता पंगू झालीय याचेच हे द्योतक नाही का ? ही परिस्थिती कुणी निर्माण केली असेल तर ती इथल्या स्वतःला आंबेडकरी म्हणविणाऱ्या भाषणकार, प्रबोधनकार, गायक, नोकरदार, लेखक, कवी व सो कॉल्ड समाजसेवकांनी व संस्था, संघटना, मंडळे चालविणाऱ्या तमाम अ-राजकीयांनीच केली आहे. कधीच कुठलीही ठाम राजकीय भूमिका न घेणाऱ्यांनी ही परिस्थिती निर्माण केली. असे म्हणणे यात काहीही गैर नाही. यावर निरपेक्ष भावनेतून विचार व्हावा.
राजकीय भूमिका घेणे म्हणजे राजकीय पक्षात काम करणे किंवा त्या पक्षाचा सदस्य असणेच असे नव्हे. तर कुठल्यातरी राजकीय विचारांची व त्या विचारधारेवर चालणाऱ्या पक्षाची बांधिलकी स्विकारून ती विचारधारा व तो पक्ष जनमानसात प्रसारित व प्रचारीत करून मतदार व लोकशाहीतील नागरिक या नात्याने मतदान पेटीतून त्या विचाराची राजकीय ताकद निर्माण करणे होय. एखादा पक्ष स्विकारत असतांना त्या पक्षाच्या उत्पत्तीमागे असणारी विचारधारा आपण स्विकारीत असतो. व तीच आपली राजकीय भूमिका म्हणुन पुढे येते. याच परिमाण सुत्राचा आधारे लोकशाहीचे बळकटीकरण होऊ शकते.
आम्ही त्या प्रत्येकच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करतो ज्यांनी एखादा राजकीय पक्ष, नेतृत्व व विचारधारा स्विकारली आहे. निदान लोकशाहीतील नागरिक असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. मग ते भाजपचे कार्यकर्ते असोत वा कॉग्रेसचे कार्यकर्ते असोत. त्यांची राजकीय भूमिका ते सिद्ध करीत आहेत. व जनमानसात पोहचवित आहेत. स्वतःला आंबेडकरी म्हणविणाऱ्या परंतु बिजेपी, शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी व अन्य राजकीय पक्षात काम करणाऱ्यांचे व त्यांच्या हितसंबंधीयांचेही आम्ही स्वागत करतो. परंतु त्यांनी समाजाला गफलतमध्ये न ठेवता स्पष्टपणे समाजासमोर मांडावे; की आम्ही त्या पक्षाच्या विचारधारेला स्विकारले आहे. फक्त तो पक्ष स्विकारला. विचारधारा स्विकारली नाही. असे आठवले स्टॉईलने समाजाला फसवू नये. अ-राजकीय व अपक्षीय लोकांपेक्षा इतर पक्षीयांसोबत काम करणारे कधीही चांगले. कारण त्यांचे राजकीय शिक्षण त्यातून होत जाते. व राजकीय प्रगल्भता आली की समाजाला कधीतरी ते उपयोगी ठरतातच. परंतू अ-राजकीय व अपक्षीय हे समाजाला नेहमीसाठीच धोकादायक असतात. हे लोकशाहीत वावरणाऱ्या समाजाला तर जास्तच धोकादायक आहे.
आंबेडकरी चळवळीतील राजकारणाचे तिनतेरा वाजले. फाटाफूट झाली. गटबाजी झाली. अशा सबबी पुढे करणारे अ-राजकीय नेमके विरोधी पक्षांच्या हातातील बाहूले आहेत हे ओळखावे. समाजाला भ्रमित करून विरोधी पक्षाला लाभ पोहचविणारे आहेत हे समजावे. जो व्यक्ती स्वतःला आंबेडकरी म्हणवितो त्या प्रत्येकच व्यक्तीचा राजकीय अंग असायलाच पाहीचे. राजकीय अंग नसलेला आंबेडकरी असूच शकत नाही. तो आंबेडकरी मुखवटा घेतलेला बहूरूपी आहे हे लक्षात घ्यावे. या देशाला लोकशाही शासनव्यवस्था व सांसदीय स्वरूप देणाऱ्या बाबासाहेबांना मानणारा माणूस (मतदार) अ-राजकीय कसा राहू शकतो ? परंतु असा बुद्धीभेद करणाऱ्यांना आंबेडकरी तरुणांनी वेळीच ओळखले पाहीजे. व यांचा बुद्धीभेद संपवून चळवळीची होणारी हानी थांबविली पाहीजे.
आंबेडकरी समाज गटातटात का विभागला ? असा प्रश्न करून काही लोक बुद्धीची दिवाळे काढतात. या लोकांनी चळवळीचा अभ्यास करावा. संपूर्ण आंबेडकरी समाज गटातटात विभागला हे साफ खोटे आहे. गटातटात विभागलेला समाज १०% असेल तर इतर विरोधी पक्षीयांसोबत काम करणारा ९०% आहे. हे तपासायचा सोपा मार्ग आहे. या महाराष्ट्रात ३ करोड च्या जवळपास आंबेडकरी मतदान आहे. सर्व आंबेडकरी गट-तट-पक्ष यांना मिळणाऱ्या मतदानाची बेरीज केली तरी ती १० ते १५ लाखाच्या वर जात नाही. मग उरलेले आंबेडकरी मतदान कुठे गेले ? याचे स्वतःला अ-राजकीय म्हणविणारे समाजापूढे उत्तर देतील का ? की यांनीच हे उर्वरित मतदान आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना व नेतृत्वांना शिव्या देऊन अन्य पक्षांकडे वळते केले ? हे तरी सांगतील का ? हे विचारण्याची वेळ आता समाजापुढे आली आहे.
ही इतकी मोठी तफावत असण्याला जबाबदार कोण ? तर हा स्वतःला अ-राजकीय म्हणणारा व राजकीय भूमिका न घेणारा नोकरदार, प्रबोधनकार, लेखक, कवि, गायक, भाषणकार आहे. कारण हा समाजात आपली भूमिका मांडत असतांना आंबेडकरी राजकीय पक्षाची वा नेतृत्वाची भूमिका न मांडता शेखचिल्लीसारखे स्वप्नवत राजकीय पक्षाची भूमिका मांडतो. जसेकाही राजकीय पक्ष कसा असावा ? त्याने काय करावे ? कुठली भूमिका घ्यावी ? नेता कसा असावा ? त्याने काय करावे ? कसे वागावे ? इ. त्यादी प्रश्नांची उत्तरे हेच समाजाला देतात. जणू खुद्द बाबासाहेब रोज यांच्या कानात येऊन सांगतात. असेच यांचे वर्तन असते. ही शेखचिल्लीची स्वप्न रंगविणारे व स्वतःला अ-राजकीय म्हणविणारे समाजद्रोह्यांपेक्षा कमी नाहीत. ज्यांनी अख्खा समाज वेठीस धरला. व समाजाला राजकीय प्रभावशून्य बनविले. तेव्हा अधिक काळ गप्प राहीलात तर सत्तेवर बसलेली विचारधारा तुम्हाला कायमची संपवून टाकेल. याचा गांभिर्याने विचार व्हावा.
अ-राजकीय असणाऱ्यांत मोठी संख्या ही शिक्षित वर्ग, नौकरदार, भाषणकार, साहित्यकार, प्रबोधनकार, लेखक, कवी, व पोटभरू समाजसेवक यांची आहे. काही अपवाद वगळता या सर्व वर्गाने कधीही राजकीय भूमिका घेतली नाही व समाजासमोर ती भूमिका मांडली नाही. प्रत्येकजण आपापल्या पोटापाण्याची सोय पाहू लागला. हाच वर्ग आहे, जो स्वतःला प्रति-आंबेडकर समजून समाजाला विचलीत करीत राहीला. सातत्याने समाजात संभ्रमावस्था निर्माण करीत राहीला. व समाजात राजकीय नैराश्य पसरवून आपली भूक भागवू लागला. त्यातले काही आपण रोजच आपल्या आजूबाजूला अनुभवत असतो. त्यातले काही उदाहरणादाखल...
१) नौकरदार : हा वर्ग नोकरी पेशात वावरणारा, महिन्याकाठी पगार घेणारा, समाजात मान सन्मानाने जगणारा. ज्यात बाबू पासून अधिकाऱ्यांपर्यंत ते प्रोफेसर पासून ते शिक्षकांपर्यंत तर डॉक्टर, वकील, इंजिनिअर पर्यंत. यांचा आंबेडकरीझम प्रमोशन, बदल्या पर्यंतच. समाजातला क्रिम वर्ग पण स्वतःच्या निश्चित कप्प्यात जगणारा. ठोस सामाजिक व राजकीय भूमिका यांच्या पाचविला कधीच पूजत नाही. समाजात बाबासाहेब आम्हीच वाचला असे दाखवून लोकांकडून मानसन्मान मिळवून घेणे. हाच यांचा परमोधर्म. परंतू सत्ताधारी, राजकीय पक्षांत अतिय जूगाळू म्हणून प्रसिद्ध. यांना बाबासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या पक्षात काम करा ! असे म्हटले की, आम्हाला राजकारण करता येत नाही. पक्षाचे काम करता येत नाही. हे ठेवलेले पाठांतरित उत्तर. कुठल्या कायद्याने तुम्हाला राजकीय काम करता येत नाही ? हे विचारले, तर निरूत्तर. या देशाच्या संविधानाने राजकीय अधिकार दिले असतांना यांना राजकीय भूमिका न घेणे, ही पळवाट आहे. कुठल्याही नौकरदार माणसाला कुठलाही कायदा राजकीय भूमिका घेण्यापासून रोखू शकत नाही. फक्त निवडणूक काळात प्रचार सभेतून राजकीय प्रचार प्रतिनिधित्व कायद्याने करता येत नाही. अन्य काळात समाजात तुम्ही तुमची राजकीय भूमिका घेऊन समाजाला मार्गदर्शन करू शकता. पण आजपर्यंत हे असे कधी करतांना दिसले नाही. निवृत्त झाले की लगेच यांना चळवळीचा कळवळा येतो.नंतर हेच आपले विचार समाजावर थोपू पाहतात. हे अ-राजकीय नौकारदार या आंबेडकरी चळवळीची पिछेहाट होण्यात कारणीभूत नाहीत का ? मग यांना आम्ही अ-राजकीय आंबेडकरी समाजद्रोही का म्हणू नये.
२) प्रबोधनकार : हा एक विचित्र वर्ग. यांची स्वतःची काही भूमिकाच नाही. सरड्यासारखा रंग बदलणारा वर्ग. जिथे बोलवाल, तिथे जाऊन त्या पक्षाचे व नेतृत्वाचे गूणगाण करेल. यांना ६०-७० ते १ लाख रुपयापर्यंतच्या मानधनाशी तेवढे देणेघेणे आहे. यातले काही ५ हजार ते १० हजार घेणारेही आहेत. काही १० हजार ते ५० हजार घेणारेही आहेत. पैसे घेऊन प्रबोधन हाच यांचा धंदा. आम्ही आंबेडकरी आहोत व आमची काही निश्चित राजकीय भूमिका असावी. असे यांना कधी वाटलेच नाही. पोटापाण्यासाठी सर्वच पक्षांशी जवळीक साधून असलेला हा वर्ग. यांनी बाबासाहेबांची राजकीय भूमिका तत्कालिन परिस्थितीत कधी मांडलिच नाही. नको त्या गोष्टी समाजात मांडून चळवळीची अब्रु चव्हाट्यावर मांडण्यात यांना असूरी आनंद मिळाला. टाळ्यांचा गजरात यांनी तो आनंद घेतला. पण समाज चळवळीपासून व राजकारणापासून निराश बनत चालला याचे यांना देणेघेणेच राहिले नाही.
कालपरवाची गोष्ट भद्रावतीला सभा होती व सभेनंतर प्रकाशनाथ पाटणकरांचा प्रबोधनाचा कार्यक्रम. स्टेजवर प्रकाशनाथ माझ्या बाजूला येऊन बसलेत. मी त्यांना सहज म्हटले साहेब ते, "घे न् लेका अध्यक्ष पदाचा फायदा" व "भिम के लकते जिगर, आधे इधर, आधे उधर" हे गाणे बंद पाडलेत आम्ही. या गाण्यावर मुले तुफान नाचतात व समाजाची, चळवळी अब्रु चव्हाट्यावर येते. त्यापेक्षा समाजाला एक पक्ष, एक नेतृत्वाची भूमिका देणारे एखादे गाणे लिहा." आमचे साहेब लगेच चिडले व म्हणाले, "कुणी बंद पाडले ते गाणे. माझ्या बापाने लिहीले होते ते." हे सांगतांना किती गर्व व अभिमान. पण त्या गाण्यांनी चळवळीचे किती मोठे नुकसान केले याची तिळमात्र चिंता नाही. हीच परिस्थिती जवळपास सर्वच प्रबोधनकारांची. काय धडा घेतोय आजचा आंबेडकरी समाज व आंबेडकरी तरुण; या अ-राजकीय प्रबोधनकारांकडून ? आहेत का हे आंबेडकरी ? यांना विचारांशी व समाजाच्या राजकीय खच्चिकरणाशी काही संबंध नाही. कुठे स्विकारली यांनी लोकशाही, संविधान व बाबासाहेब ? फक्त यांनी स्वीकारला तेवढा तो पैसा आणि मान-सन्मान. या सर्व अ-राजकीय प्रबोधनकारांना राजकीय बनविणे गरजेचे नाही का ? निदान या सर्व प्रबोधनकारांनी आम्ही राजकीय कधी बनणार ? याचा जरी विचार करण्यास सुरवात केली, तर आंबेडकरी चळवळ राजकीय क्षेत्रात अग्रगण्य स्थान निर्माण करेल.  
३) लेखक, कवि, साहीत्यकार, भाषणकार : समाजाचे दुःख, वेदना शब्दांकीत करणारा हा वर्ग. नावलौकीक मिळविण्यासाठी हपापलेला. पण राजकीयदृष्ट्या शून्य. यांच्या साहीत्यात आंबेडकरी राजकारण कुठेच नाही. नव्हे आंबेडकरी राजकारण हा याच्या साहीत्याचा विषयच बनला नाही. स्वतःला अ-राजकीय म्हणवून घेण्यात धन्यता मानणारा. समाजावर आपली मते लादणारा. फक्त यांनीच बाबासाहेब वाचला व हेच बाबासाहेब मांडू शकतात, लिहू शकतात या मक्तेदारीत वावरणारा. बाबासाहेबांना जे कळले नाही ते फक्त यांनाच कळले. अशा आविर्भावात जगणारा. राजकारण आमचे क्षेत्र नाही. आम्ही साहित्यिक. असे म्हणून राजकीय जबाबदारीपासून स्वतः दूर पळणारा व समाजातही राजकीय नैराश्य निर्माण करणारा. आंबेडकरी नेत्यांवर टीका करण्यात पटाईत असलेला हा वर्ग. मात्र पुरस्कारांसाठी राजकारणी व सत्ताधाऱ्यांच्या पायघड्या पडणारा. आंबेडकरी माणसांना व समाजाला अराजकीय बनविण्यात यांचा मोठा हात राहीलेला आहे.
या सर्व वर्गाने आपआपली जबाबदारी निश्चित पार पाडली असती. व राजकीय भूमिका घेऊन काम केले असते, तर आंबेडकरी राजकारण सत्तास्थानावर दिसले असते. समाजकारण, अर्थकारण, साहित्यकारण या सोबतच राजकारण घेऊन चालले असते, तर आंबेडकरी राजकारणाला एक वेगळे वळण प्राप्त झाले असते. पण यांनी राजकीय अस्पृश्यता पाळली. तेही फक्त आंबेडकरी पक्ष व नेतृत्वांच्या राजकारणाच्या बाबतीत. एकंदरीच आंबेडकरी राजकारणाच्या बाबतीतच. परंतू इतर प्रस्तापित राजकीय पक्षांशी यांनी आपली मैत्री मात्र घट्ट ठेवली. अशा बेगळी आंबेडकरवाद्यांचे बुरखे फाडूनच आंबेडकरी राजकारणाला मजबूत करता येईल. अन्यथा हीच माणसे समाजाच्या दुःखाचे, अन्याय, अत्याचाराचे भांडवल करून चळवळीला संपवतील. अशाप्रकारे समाजाला, चळवळीला व विचारांना संपविणाऱ्यांना अ-राजकीय समाजद्रोही नाही तर काय म्हणायचे ? आजच्या तरूण पिढीला हे चळवळीचे बुजगावणे ओळखून मार्ग काढावा लागेल. एवढे लक्षात घ्या.
आंबेडकरी समाजाचे राजकीय शिक्षण झालेले नाही. असा आरोप करणे चुकीचे नाही. आंबेडकरी चळवळ सामाजिकतेच्या नादात मुख्य प्रवाहापासून भरकटत गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक लढा १९३५ च्या नंतर राजकीय लढ्यात रूपांतरीत झाला हे अनेकांना अजूनही कळलेले दिसत नाही. संविधाननिर्मितीनंतर तर बाबासाहेबांनी सर्व लढे हे राजकीय पातळीवरूनच लढलेले दिसून येतात. सामाजिक लढ्यालाही त्यांनी राजकीय पटलावर नेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याला कारण होते, कायद्यांचा वापर व लोकशाही व्यवस्था. त्यांच्यानंतर १९७० पर्यंत आंबेडकरी चळवळीचे सामाजिक लढे राजकीय पटलावर राजकीय नेतृत्वांच्या माध्यमातून लढले गेले. परंतू त्यानंतर कांशीराम, बामसेफ आणि आरएसएस च्या प्रादू्र्भावाने आंबेडकरी चळवळीला राजकीय मरगळ येण्यास सुरवात झाली. आरएसएस च्या कार्यप्रणालीचे दाखले देऊन राजकीय आंबेडकरी चळवळीला सामाजिकतेच्या नावाखाली संपविण्यात आले. सामाजिकतेचा प्रादूर्भाव १५ वर्षात इतका वाढला की आरएसएस ने १९८४ च्या आसपास भाजप व बिएसपी (बसपा) या दोन राजकीय पक्षांची एकाचवेळी निर्मिती केली. व कांशीरामला उत्तरप्रदेशात सहकार्य करून, मोठे करून, सत्तेपर्यंत नेले. बामसेफ कि बसपा, सामाजिक कि राजकीय असा बनावटी संघर्ष उभा झाला. व ईथेच आंबेडकरी चळवळ सामाजिक व राजकीय अशा दोन भागात स्पष्टपणे विभागली गेली. राजकीय नैराश्य पराकोटीला गेले. व आंबेडकरी चळवळीत अ-राजकीय आंबेडकरी समाजद्रोही तयार होण्यास सुरवात झाली.
आजही सामाजिकतेचा हूंदका मारणारे सारेच अ-राजकीय त्याच्या सामाजिकतेला न्याय्य ठरविण्यासाठी आरएसएस ची उदाहरणे देतांना दिसतात. आरएसएस सारखे आंबेडकरी चळवळीने काम करावे; असे म्हणणारे आंबेडकरी नसून आरएसएसने प्रभावित आहेत. हे लक्षात घ्यावे लागेल. कारण आरएसएस ज्यांच्यासाठी काम करते त्या प्रस्तापीत समाजाची सर्वांगिण परिस्थिती व आंबेडकरी समाजाची सर्वांगीण परिस्थिती यात मोठा फरक आहे. एक समाज सर्वसम्पन्न आहे तर दुसरा समाज साधनहीन आहे. हे वास्तव आहे. डॉ. बाबासाहेबांनी सामान्य तळागाळातल्या बहूजन वर्गाला लोकशाही व संविधान हे त्यांच्या उत्थानाचे साधन सांगितले आहे. हे साधन वापरण्याचा एकमेव मार्ग राजकारणातून जातो. हेच या अ-राजकीय माणसांनी जाणिवपूर्वक विसरलेत. व चळवळीतील सामान्य लोकांत संभ्रम निर्माण केला. किती ही या अ-राजकीय माणसांच्या बुद्धीची दिवाळखोरी.
काही अ-राजकीय बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्था संघटनांचे दाखले देतात. मात्र स्वतः-राजकीय राहूनच. रिपब्लिकन पक्ष, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा या संघटनांचे दाखले देऊन गळा काढणारे अनेक आहेत. पण या तिन्ही संस्थांचे संचालन कसे करायचे ? हे कुणीच सांगत नाही. सांगितले तर आम्ही चालवतो (त्यांचा गट) तसे. जे समता सैनिक दल व बौद्ध महासभा राजकीय नेतृत्वात काम करतात त्यांच्याविषयी काहीही म्हणणे नाही. कारण निदान त्यांनी राजकीय नेतृत्व स्विकारले असल्याने ते राजकीय आहेत. पण काही समता सैनिक दल, बौद्ध महासभा व गल्लिबोळातल्या बौद्धपंचायती ज्यांना राजकीय चेहरा नाही; अशा अ-राजकीय संघटना या आंबेडकरी चळवळीतल्या समाजद्रोही संघटनाच आहेत. राजकीय नेतृत्वाशिवाय या संघटनांनी कुठली क्रांती केली ? याचे सोशल ऑडीट केले, तर लक्षात येईल की, हे अजूनही शून्यातच आहेत. परंतू राजकीय नेतृत्वाला मात्र शहाणपण शिकवायला सर्वात पूढे. यातले काही महाभाग तर इतके पुढे गेलेले की यांना समता सैनिक दल म्हणजे दुसरी आरएसएस बनवायची आहे. जी रिपब्लिकन पक्षाला व नेत्यांना आपल्या अधिपत्याखाली ठेवेल. हे सांगतिल तो आदेश रिपब्लिकन नेत्यांनी पाळावा. असाच यांचा फतवा असतो. मात्र निवडणूक काळात या सर्व संघटना कुठे असतात ? हे कुणालाच दिसत नाही. अशा या पंगू संघटना आंबेडकरी चळवळीचे मांडलिकत्व करू शकतात का ? याचा विचार येणाऱ्या तरूण आंबेडकरी पिढीने करावा व ही अ-राजकीय मरगळ दूर करावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरी चळवळ व आंबेडकरी विचारांचा सर्वव्यापी विचार न झाल्याने; संविधान व सांसदीय लोकशाही आंबेडकरी समाजात रूढ होऊ शकली नाही. त्यातून निर्माण होणारी राजकीय भूमिका तयार होऊ शकली नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे सामाजिक, आर्थिक व राजकीय भूमिका व आंदोलने इप्सित ध्येय अद्यापही गाठू शकलेले नाही. राजकारण, राजकीय पक्ष, राजकीय नेतृत्व नाकारून या समाजाला पूढील २०० वर्षही इतरांची बरोबरी करता येणार नाही. हे वास्तव आम्ही विसरू नये. लोकशाही व संविधान यांच्या सिद्धांत व व्यवहारात मोठा फरक आहे. सैद्धांतिक लोकशाही व संविधानाने या समाजाला उद्धीष्ट गाठता येणारे नाही. कायम या समाजाला सत्ताधाऱ्यांवर निर्भर रहावे लागेल. हे मी राज्यशास्त्राचा व कायद्याचा विद्यार्थि व अभ्यासक या नात्याने हमखास सांगू शकतो. त्यामुळे व्यावहारीक लोकशाही व संविधानाशिवाय या समाजाला विकास साध्य करता येणार नाही. व्यावहारिक लोकशाही व संविधानाचा वापर समाजोद्धारासाठी करायचा असेल तर राजकारणाशिवाय, एक पक्ष, एक विचार, एक नेतृत्व याशिवाय पर्याय नाही. राजकीय भूमिका घेऊनच आम्ही आपला समाजोद्धार करू शकतो. या निर्णयापर्यंत आम्हाला यावेच लागेल.
आम्ही लोकशाही देशाचे नागरिक आहोत. हे न विसरता, राजकीय भूमिका घ्याविच लागेल. राजकीय भूमिका किंवा राजकारण नाकारणे म्हणजे मतदार असण्याचा व मतदानाचा अधिकार नाकारणे. मताधिकार नाकारणे म्हणजे लोकशाही व संविधान नाकारणे. व हे नाकारणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाकारणे होय. हे स्पष्टपणे तमाम अ-राजकीय माणसे, संस्था, संघटना, मंडळे मान्य करतील का ? राजकीय भूमिका घेतल्याशिवाय आता तरणोपाय नाही. कुठलाही राजकीय पक्ष का असेना, कुठलेही राजकीय नेतृत्व का असेना, कुठलीही राजकीय भूमिका का असेना; पण प्रत्येकाने एक राजकीय भूमिका घेऊन समाजापुढे, आपल्या कार्यक्षेत्रात, आपल्या वलयाभोवती रेटून धरावी. एवढीच एक भाबडी इच्छा एका सच्च्या आंबेडकरी माणसाची असू शकते. एकदिवस आंबेडकरी चळवळ राजकियदृष्ट्या सक्षम दिसेल. फक्त हे करीत असतांना आंबेडकरी विचार, त्या विचारांवर चालणारे वर्तमान नेतृत्व व पक्ष यांचा परिपूर्ण अभ्यास करून. (कुणीच नाही अशी आगीची शेकोटी न पेटविता) कॉग्रेस, बिजेपी निवडली तरी चालेल पण स्वतःच्या निवडीवर समाजात ठाम रहा एवढेच. आंबेडकरी पक्ष व नेतृत्व तुम्हाला नक्की सापडेल. व तुमची राजकीय भूमिका देखील तयार होईल. असा आशावाद आहे. जर एवढे स्पष्ट करूनही आपण राजकीय भूमिका घेण्यात अक्षम ठरत असू, तर आम्ही "अ-राजकीय आंबेडकरी समाजद्रोहीच." व अश्या अ-राजकीय आंबेडकरी समाजद्रोह्यांपासून समाजाने व चळवळीने सावध होणे गरजेचे आहे. अ-राजकीय आंबेडकरी माणसांना राजकीय बनविता आले तर आंबेडकरी चळवळीचा भविष्यकाळ सुरक्षित आहे असे म्हणता येईल. परंतु अ-राजकीय आंबेडकरी माणसे राजकीय बनू शकत नसतील तर यांचा बिमोड करून आंबेडकरी बुरखा फाडणे हे आंबेडकरी चळवळीसमोरील ध्येय ठेवल्याशिवाय आपल्या आजूबाजूला असलेले अ-राजकीय आंबेडकरी समाजद्रोही संपणार नाही.
___टिप : सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असतांना आलेल्या अनुभवातली ही निरिक्षणे आपल्या पूढे मांडलित. सर्वांना लगेच पटणार नाही. पण कालांतराने नक्कीच पटेल. व परिवर्तनाला सुरवात होईल. ही अपेक्षा.
§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275


No comments:

Post a Comment