Thursday, 11 April 2019

दलित आणि मुस्लीम समुदाय महाराष्ट्राच्या निवडणुकांमधील निर्णायक मतदार


#Once_Again_Ambedkar
दलित आणि मुस्लीम समुदाय महाराष्ट्राच्या निवडणुकांमधील निर्णायक मतदार
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
              लोकसभा निवडणूक २०१९ च्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात ७ जागांवर पहिल्या टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. या ७ जागांवर मतदारांचा जो काही कल दिसून आला तो ग्रामीण भागातील कल हा जास्त होता. त्या तुलनेत शहरातील मतदारांचा कल पाहिजे तसा निवडणूक सहभागाचा दिसला नाही. भंडारा-गोंदिया, चिमूर-गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, वर्धा, नागपूर आणि रामटेक या ७ लोकसभा मतदार संघात ११ एप्रिल ला मतदान घेण्यात आले. या पहिल्या टप्प्यात शहरातील मतदानाची टक्केवारी साधारणतः ५५ ते ६० टक्के च्या आसपास राहिली. तर त्या तुलनेत ग्रामीण भागात झालेल्या मतदानाची टक्केवारी ६५ ते ७५ टक्के च्या आसपास राहिली. शहरातील मतदारांचा कल कुणाकडे असेल व ग्रामीण भागातील मतदारांचा कल कुणाकडे असेल यावर या ७ मतदार संघातील निवडणुकांचा निकाल निर्धारित होईल. परंतु येणाऱ्या काळात महाराष्ट्रात तीन टप्प्याचे मतदान होणार आहेत. त्यातला दुसरा टप्पा १८ एप्रिल ला, तिसरा टप्पा २३ एप्रिल ला व चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल ला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कल पाहता आपल्याला पुढील ३ टप्प्यातील मतदानाकडे वळावे लागणार आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे.
सद्यकालीन राजकारणाने कूस बदलली आहे. राजकीय प्रचाराचे रंग बदलले आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांना सामोरे जात असतांना ज्या गोष्टी निदर्शनात आल्यात त्यावरून हे लक्षात येते कि दलित आणि मुस्लीम मतदार हा या निवडणुकांमध्ये महत्वाची निर्णायक भूमिका बजावू शकतो. दलित मतदार हा ग्रामीण भागात विसावलेला आहे. शहरी भागाच्या तुलनेत तो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे. इतकेच नव्हे तर मागच्या अनेक निवडणुकांचे विश्लेषण केले तर असेही लक्षात येते कि ग्रामीण भागातील दलित मतदारांचे मतदानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रत्येक निवडणुकीत ९० टक्केच्या वर मतदान करणारा हा वर्ग आहे. मग तो शहरातील दलित वर्ग असो किंवा ग्रामीण भागातील मतदार वर्ग असो. मतदानात सक्रीय सहभाग घेणारा हा वर्ग आहे. त्यामुळे या वर्गाचा कल ज्याच्याकडे असेल तो निवडणुकीत जिंकेल असे सूत्र कायमचे झालेले आहे. त्यासोबतच अल्पसंख्यांक मुस्लीम समुदाय हा ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात अधिक विसावलेला आहे. या समुदायाची मतदानाची टक्केवारी ही देखील कायम ८० टक्केच्या वरची राहिलेली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान आता झाले आहे. त्यावरून कोण जिंकेल व कोण हरणार याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु या सर्व तर्कवितर्कात कोण जिंकेल याचा आढावा घेतांना दलित व मुस्लीम समुदायाने कुणाच्या बाजूने मतदान केले यावरच जिंकणाराचे गणित मांडली जात आहेत. त्याच आधारावर आज महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत भाजप विरोधी कल दिसून येत होता. दलित व मुस्लीम समुदायात तो कल मोठ्या प्रमाणात असणे हे नैसर्गिकच आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील दलित व मुस्लीम समुदायाचा कल मोठ्या प्रमाणात कॉंगेस च्या बाजूने पाहायला मिळालेला आहे. भाजप सरकार नको, मोदी सरकार नको म्हणून दलित व मुस्लीम समुदायाने मोठ्या प्रमाणात कॉंग्रेस ला पसंती दिल्याचे चित्र पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत पाहायला मिळाले. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राच्या ४१ मतदार संघात दलित व मुस्लीम समुदाय कुणाच्या बाजूने उभा राहतो त्यावर भविष्यातील सरकारची गणिते निघू शकतील.
या सर्वात महत्वाचे आहे ते असे की, दलित आणि मुस्लीम समुदायाची घट्ट मोट बांधून आंबेडकर आणि ओवेसी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा तिसरा पर्याय घेऊन उभे आहेत. असे असतांनाही पहिल्या टप्प्यातील मतदानात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ-वाशीम हे मतदार संघ वगळले तर दलित आणि मुस्लीम समुदाय वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडे पाठ फिरवून कॉंग्रेसकडे झुकलेला दिसला. वंचित बहुजन आघाडीची उर्वरित ४ मतदार संघातील उमेदवारांची निवड, उमेदवारांनी चालविलेली प्रचार यंत्रणा, इतर पक्षांच्या कच्छपी लागून आर्थिक स्वार्थ साधून घेण्याची उमेदवारांची राहिलेली भूमिका हे सुद्धा त्यातले एक कारण आहे असे समजता येईल. परंतु या ४ मतदार संघात (ज्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, वर्धा) दलित आणि मुस्लीम समुदाय वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा झालेला दिसत नाही. त्यामुळे आज या ४ ही जागांवर निवडून येण्याची दावेदारी कॉंग्रेस करीत आहे. पूर्व विदर्भाचा हा भाग वगळला तर उर्वरित महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची प्रचार यंत्रणा योग्य रीतीने काम करतांना दिसून येत आहे. त्यामुळे तिथल्या युती व महाआघाडीच्या उमेदवारांच्या ही निवडणूक जिव्हारी लागलेली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत ज्यात प्रामुख्याने अमरावती, अकोला, हिंगोली, बुलढाणा, नांदेड, परभणी या वंचित बहुजन आघाडीसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या मतदार संघात निवडणुका होणार आहेत. या सहाही मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिंकून येण्याच्या परिस्थितीत आहेत. तेव्हा या मतदार संघातील दलित आणि मुस्लीम समुदायाने इमाने इतबारे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले तर वंचित बहुजन आघाडीचे या मतदार संघातील उमेदवारांना कुणीही पराजित करू शकणार नाही. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती अशी की, वंचित बहुजन आघाडीच्या निर्मितीने, आंबेडकर-ओवेसी यांच्या युतीने, दलित – मुस्लीम समुदायाच्या गठबंधनाने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातील प्रयोगावर लागलेली आहे. दोन्ही समुदाय जे इतरांच्या तुलनेत सर्वाधिक मतदान नोंदवितात त्या दलित आणि मुस्लीम समुदायाची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे. याच टप्प्यातील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला माळी व धनगर मतदारांची देखील मोठी साथ असणार आहे. जी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत पाहिजे तशी भेटलेली दिसत नाही. त्यामुळे या टप्प्यातील निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. सोबतच महाराष्ट्राच्या पुढील राजकीय समीकरणावर प्रभाव टाकणारी असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील दलित-मुस्लीम समुदाय आपल्या सोबत येणाऱ्या माळी व धनगर समूहाला सोबत घेऊन ज्यांनी दलित व मुस्लीम समुदायाची कायम मते घेऊन सत्ता केली ती कॉंग्रेस – राष्ट्रवादी व मागच्या २०१४ च्या निवडणुकीतील भाजपा या दोन्ही पक्षांना धूळ चारून एका नव्या परिवर्तनाच्या युगाची सुरवात करण्याची संधी या दोन्ही समूहाकडे असणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मतदानात औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, सांगली, माढा, लातूर, उस्मानाबाद, जालना या प्रमुख मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे भाजप आणि कॉंग्रेस आघाडीला परास्त करण्यासाठी सज्ज आहेत. या मतदार संघात दलित-मुस्लीम समुदाय हा वंचित बहुजन आघाडीसोबत राहील अशी अपेक्षा केली तर माळी आणि धनगर समूहाची जबाबदारी या टप्प्यातील मतदानात महत्वपूर्ण असणार आहे. सोलापूर मधून खुद्द बाळासाहेब आंबेडकर, औरंगाबाद मधून इम्तियाज जलील, सांगली मधून गोपीचंद पडळकर, माढा मधून विजय मोरे आणि नाशिक मधून प्रशांत पवार हे प्रमुख उमेदवार असणार आहेत. या टप्प्यातील मतदानात वंचित बहुजन आघाडीचे सर्वात अधिक उमेदवार निवडून येण्याच्या परिस्थितीत आहेत. त्यामुळे या चौथ्या टप्प्यातील निवडणुकांचा केंद्रबिंदू हा दलित-मुस्लीम समुदायासोबतच धनगर-माळी हा देखील असणार आहे. हे या समुदायांनी लक्षात घेतले तर वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा परिणाम चौथ्या टप्प्यातील निवडणुकीवर व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर निश्चित पडणार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यावरच चौथ्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना किती यश मिळणार हे निश्चित होईल. चौथ्या टप्प्यातील मतदानात कोळी समुदायाची महत्वाची भूमिका असणार आहे. दलित-मुस्लीम, धनगर-माळी आणि कोळी हा समुदाय चौथ्या टप्प्यात एकत्र आला तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. त्यावरच चौथ्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना किती यश मिळणार हे निश्चित होईल.
आज महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती अशी आहे की, मतविभाजन हा मतदारांना संभ्रमित करणारा मुद्दा समोर केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन होईल व त्यामुळे भाजपा परत जिंकेल अशी भीती मतदारांच्या मनावर बिंबविल्या जात आहे. मुळात हि कॉंग्रेस महाआघाडीने स्वतःच्या फायद्यासाठी अवलंबिलेली नीती आहे. दलित-मुस्लीम समुदाय इतर पक्षाकडे झुकला जाऊ नये कारण हाच समुदाय कुठल्याही पक्षाला सत्तेची दारे खुली करून देणारा समुदाय आहे. त्यामुळे हा समुदाय ज्याच्या पाठीशी उभा झाला तो पक्ष सत्तेच्या खुर्चीवर बसतो हा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे कुठलाच पक्ष या समुदायाला सोडण्याची हिम्मत करीत नाही. मुळात आपण मतविभाजनाचे तर्क समजून घेतले पाहिजे. दलित आणि मुस्लीम समूहाने तर ते समजून घेणे अत्यावश्यकच आहे. कारण त्याशिवाय हा समूह आपली पुढची राजकीय वाटचाल करू शकणार नाही.
खरे तर मतविभाजन हे भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामध्येच होत असते. आजचे प्रस्थापित पक्ष मग ते भाजप-सेना असो किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादी असो हे दलित आणि मुस्लीम समुदायाचे नैसर्गिक पक्ष होऊ शकत नाही. परंतु राजकीय पर्यायाविना आजपर्यंत हा समूह कॉंग्रेस सोबत जोडला गेला. मागच्या निवडणुकीत मोदीच्या फसव्या नीतीला भाळून भाजप च्या जवळ गेला. परंतु आज ती परिस्थिती महाराष्ट्रात राहिलेली नाही. आज वंचित बहुजन आघाडीचा सक्षम पर्याय या समूहाजवळ आहे. एक वास्तव आपण याठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे, भाजप-सेना असो किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांचा मतदार कोण आहे तर ओबीसी मध्ये जो स्वतःला उच्चवर्णीय समजतो तो कुणबी आणि तेली समूह व त्याच्या सोबत इथला मनुस्मृतीप्रनीत उच्चवर्णीय वर्ग हा या प्रस्थापित पक्षांचा मतदार आहे. या सर्व मतदारांची गोळाबेरीज केली तरी एकूण मतदारांच्या ४० ते ४५ टक्के च्या वर याची आकडेवारी जात नाही. मग या ४० ते ४५ टक्के मतदारांचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष मग भाजप-सेना असो किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादी असो हे या ४० ते ४५ टक्के मतदारांचे विभाजन करून घेतात. व स्वतःच्या पदरात खूप झाले तर १० ते १५ टक्के मतदान पाडून घेतात. परंतु या १० ते १५ टक्के मतदानावर हे पक्ष निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे दलित व मुस्लीम समुदायाला एकदुसऱ्याची भीती दाखवून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात व याच समूहाच्या बळावर आपल्या जिंकण्याचे व सत्तेचे गणिते बसवीत असतात. हे इथल्या दलित व मुस्लीम समुदायाने लक्षात घेतले पाहिजे.
आज महाराष्ट्रात दलित-मुस्लीम, धनगर-माळी, आदिवासी-भटका विमुक्त, कोळी-होलार असा जवळपास ५५ ते ६० टक्के समूहात राजकीय प्रेरणा निर्माण करण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केलेले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमुळे मतांचे विभाजन न होता समदु:खी समूहांच्या मतदारांचे एकत्रीकरण होत आहे. हे या समूहातील सुज्ञ मतदारांनी समजून घ्यावे. तुमच्या मतांचे एकत्रीकरण होऊ नये व यांची सत्तेची खुर्ची सुटू नये. यासाठी मतविभाजनाचा संभ्रमी प्रयोग प्रस्थापितांकडून कायम केला जातो हे आपण लक्षात घ्यावे. कारण तुमच्या मतांचे एकत्रीकरण हे वंचितांना सत्तेवर बसविणारे आहे जे कि प्रस्थापित पक्षांना कायमचे नको आहे. पुन्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, दलित आणि मुस्लीम समुदाय हा कॉंग्रेस – राष्ट्रवादी ला सत्तेवर बसविणारा आहे तर धनगर-माळी हा समुदाय भाजप-सेनेला सत्तेवर बसविणारा समुदाय आहे. दोन्ही प्रस्थापित युती-महाआघाडी कडून हा समूह जो त्यांना कायम सत्तेवर बसवितो तोच समुदाय त्यांच्यापासून दूर गेला तर मतविभाजनाचा खरा फटका भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी या प्रस्थापित पक्षांना बसेल व वंचित बहुजन आघाडी ही देशाच्या संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. या वास्तवाकडे आपण डोळेझाक करून चालणार नाही.
त्यामुळे आज महाराष्ट्रात दलित-मुस्लीम, आदिवासी-भटका विमुक्त, कोळी-माळी-धनगर, या समूहाला चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. मतदारांच्या मतविभाजनाची नव्हे तर मतदानाच्या एकत्रीकरणाची ती संधी आहे. मतदारांच्या एकत्रीकरणातून सत्तेची दारे वंचित समूहाला खुले करून देण्याची ती संधी आहे. मागच्या ७० वर्षात या समूहाच्या पदरी पडलेली सत्तेची निराशा कायमची दूर करून सामाजिक सत्ताधाऱ्यांवर राजकीय सत्तेच्या माध्यमातून वंचितांची सत्ता गाजविण्याची संधी आलेली आहे. वंचितांची सत्ता आणण्यापासून आपण फक्त २ पाऊले दूर आहोत. आज एकदुसऱ्याच्या सहकार्याने, विश्वासाने, आपुलकीने, बंधुभावाने हा समूह हातात हात घेऊन पुढे चालत राहिला व निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे राहिला तर नक्कीच वंचितांची वंचीतता संपून या देशात संविधानिक अधिकाराने प्रस्थापित होण्याची संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. फक्त विश्वास ठेवा. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा. विभाजन नव्हे तर या सर्व वंचित समूहाचे एकत्रीकरण करून सत्तेची दारे, खिडक्या उघडुया. व उद्याच्या सत्तेचे सत्ताधारी बनुयात.

§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275


महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची विजयाच्या दिशेने वाटचाल


#Once_Again_Ambedkar
महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची विजयाच्या दिशेने वाटचाल.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
           
२०१९ ची निवडणूक खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची निवडणूक ठरू पाहते आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. भाजप आणि कॉंग्रेस असे दोन दिग्गज पक्ष मैदानात असतांना महाराष्ट्र दोन्ही दिग्गज पक्षांना लाथाडून वंचित बहुजन आघाडीमध्ये एकत्रित होतांना पाहून अनेक राजकीय विश्लेषकांची भंबेरी उडलेली आहे. २०१४ ची मोदी लाट आणि आजची महाराष्ट्रातील वंचितांची लाट दोन्ही सारख्याच दिसतात असे अनेकांच्या तोंडून निघतांना भाजप आणि कॉंग्रेस चे शिपेसालर घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत. देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. वंचित घटकांचा, समूहाचा पक्ष व आंबेडकरी नितृत्व हे ऐतिहासिक समिकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. त्याच अर्थाने ही निवडणूक ऐतिहासिक महत्व निर्माण करणारी आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणारे बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोलापूर आणि अकोला अशा दोन मतदार संघातून लढत देत आहेत. त्यामुळे अनेकांचे लक्ष या दोन मतदारसंघाकडे लागलेले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांना २०१९ च्या निवडणुकीत संसदेत जाण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. हे आता जवळपास निश्चित झाले आहे. सोलापूरकर यांनी दाखविलेली दिलेरी, बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर दाखविलेला विश्वास, त्यांच्यासाठी राजकीय लोभांचा व पदांचा केलेला त्याग संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारा आहे. विरोधक सुद्धा आजच छातीठोकपणे बाळासाहेब आंबेडकर हे सोलापूर मधून नक्कीच निवडून येणार असे सांगत आहेत. अकोला मतदारसंघातील चित्र अद्याप महाराष्ट्राच्या मनात अस्पष्ट आहे. परंतु सोलापूरचा निकाल आजच लागल्याची धडकी सुद्धा विरोधकांनी घेतलेली आहे. त्यामुळे सामान्य चर्चेत भाजप आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते वंचित, दलित, बहुजन कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना जाणीवपूर्वक चर्चा या दोन मतदार संघावर घेऊन जातात व त्याआडून महाराष्ट्रातील इतर मतदार संघांना मगरीसारखे गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात आहेत.

बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रती चित्र स्पष्ट असले तरी वंचित बहुजन आघाडीने काही धोके ओळखून पुढील वाटचाल या निवडणूक काळात करणे गरजेचे आहे. विरोधक जाणीवपूर्वक काही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये पेरून लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातल्या त्यात बी. जी. कोळसे पाटील हा सध्याचा विरोधकांनी आणि त्यातही काँग्रेसी विरोधकांनी वंचित, बहुजन, दलित समूहात चर्चेला आणलेला मुद्दा आहे. यामागचा उद्देश एकच आहे की, लक्ष विचलित करणे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे. सोबतच वंचित आघाडीमुळे भाजप ला फायदा होईल, मत वाया जाईल, पुन्हा भाजप निवडून येईल, अश्या प्रकारच्या संभ्रम निर्माण करणाऱ्या चर्चा पेरणे हे आता विरोधकांनी लक्ष केलेले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना योग्य ते उत्तर देता आले तर चर्चेत सहभागी होण्यास हरकत नाही. परंतु उत्तर देता येत नसेल तर चर्चेतून माघार घेऊन परत आपल्या प्रचारकार्याला लागणे जास्त गरजेचे आहे. निवडणुकांच्या काळात हे हातखंडे वापरून विरोधी गोटात असमंजस व अविश्वासी वातावरण निर्माण करून एकत्र आलेल्या समूहाला सैरावैरा करणे हा परंपरागत निवडणूक प्रचाराचा एक भाग झालेला आहे. त्यामुळे शक्य झाले तर अशा चर्चेत न रंगता, सामान्य मतदारांच्या संपर्कात जाने हेच योग्य राहील.

त्याचप्रमाणे अनेक प्रश्न आज उपस्थित केले जात आहेत. प्रश्नांची एक मालिकाच निर्माण केली गेली आहे असेही म्हणता येईल. वंचित बहुजन आघाडी जितकी भक्कम होत आहे तितकाच प्रश्नांचा भडीमार वाढतांना दिसून येत आहे. यात सामान्य मनोविज्ञान दडलेले आहे. वंचित बहुजन आघाडीला भाजप ने ५०० करोड रु. निवडणुकीसाठी दिले त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर हे हेलिकॉप्टर ने महाराष्ट्रात प्रचार दौरे सुरु केले आहेत. व महाराष्ट्रात ४८ लोकसभेच्या जागा लढत आहेत.  हा हल्ली आपल्याभोवती निर्माण केला गेलेला प्रश्न आहे. संशय निर्माण करण्याखेरीज यामागे दुसरा कुठलाही हेतू नाही. ज्या समूहाने भाजप च्या मागच्या ५ वर्षाच्या सत्ताकाळात हालअपेष्ठा सहन केल्या, वेळप्रसंगी अन्याय अत्याचाराला बळी पडला, ज्या समूहाने धार्मिकतेच्या अतिरेकामुळे मार खाल्ला, जो समूह व नेता सातत्याने मागच्या ५ वर्षाच्या काळात भाजप च्या अन्यायकारी धोरणाविरोधात लढत राहिला. व देशाला आरएसएस ने निर्माण केलेला देशापुढील धोका अधोरेखित करीत राहिला तो समूह व नेता भाजपला परत सत्तेवर बसविणार नाही. सत्तेच्या या मृगजळात सापडलेल्या प्रस्थापित पक्षांनी स्वतःचा पराभव डोळ्यासमोर पाहून आजच मैदानातून माघार घेतल्याचे हे निदर्शक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपले लक्ष विचलित न करता ज्या ध्येयाने वंचित समूह पेटून उठला आहे त्या ध्येयाप्रती समर्पित होऊन कार्य करणे तितकेच गरजेचे आहे. जितक्या प्रश्नांचे वलय विरोधकांकडून उभे केले जाईल तितका आपला विजय आणखीच दृष्टीपथात येईल. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

कुठलाही समूह १०० % कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही. प्रत्येकच समूहात काही टक्के लोक स्वार्थी, खिसेभरू, व समाजद्रोही असतातच. कारण त्यावर त्यांची उपजीविका अवलंबून असते. काहीच इतिहास तर काहींचा वर्तमान त्यांना हे करण्यास भाग पाडतो. एकंदरीतच वंचीतातील अशा वर्गाची ती अपरिहार्यता असते. त्यामुळे आपल्यातील अस्थिनीतले साप आपण वेळीच ओळखून घेऊन समाजाला यांच्यापासून सजग कसे करून घेता येईल यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आज महाराष्ट्रात भाजप - सेना युती आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी दोन्ही पक्ष आपसात मतांच्या विभाजनासाठी लढतांना, भांडतांना, झगडतांना दिसून येत आहेत. आपआपले कधीकाळीचे यांनी निर्माण केलेले बालेकिल्ले वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी भांडत आहेत. एकंदरीतच यांचे भांडण वंचित बहुजन आघाडीने एकवटलेल्या ६० टक्के मतांसाठी नसून उर्वरित ४० टक्के मतांसाठी दोन्ही युती आघाडी लढत आहे. त्या ४० टक्के मतांमधून जास्तीत जास्त मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी भांडणे चाललेली आहेत. आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील ६० टक्के मतांना सोबत घेऊन आगेकूच करीत आहे. त्यामुळे या ६० टक्के मतांमध्ये काही वाटा मिळतो का याची चाचपणी घेण्यासाठी दोन्हीकडून वंचित बहुजन आघाडीवर टीकांचा भडीमार सुरु झालेला आहे. हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे. मुळात इथल्या पारिवारिक राजकारणावर वंचित बहुजन आघाडीने केलेला घणाघात प्रस्थापित राजकीय पक्षांना स्वस्थ बसू देत नाही. येनकेनप्रकारे सत्ता ही ठराविक कुटुंबाच्या हातात राहील यासाठी चाललेली ही तजवीज आहे.

एकेकाळी देशाच्या सत्तेवर कायम अधिराज्य गाजविणारी कॉंग्रेस आज स्वतःच्या कार्यकर्त्यांना भाजप मध्ये जाण्यापासून रोखू शकत नाही. तर दुसरीकडे स्थानिक पक्षांच्या एकजुटीने भाजप ला आपला पराभव दृष्टीपथात दिसत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला ला ‘बी’ टीम म्हणून हिणविण्याचा प्रकारही जोरात सुरु झालेला आहे. निवडणूक काळात धर्मनिरपेक्ष मतांचा जोगवा मागायचा आणि निवडणुका संपल्या कि धर्मनिरपेक्षतेला बासनात गुंडाळून असंहीष्णूतावादी बनायचे हे इथल्या प्रस्थापितांचे कायमचे सोंग झालेले आहे. जनतेने व मतदारांनी हे आता ओळखून घेतले आहे.

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून कॉंग्रेस - राष्ट्रवादी एकत्र आल्याचे सोंग घेते. आणि तिकडे राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा सुजय विखे पाटील भाजप मध्ये प्रवेश घेऊन भाजप ची उमेदवारी मिळवितो व त्याला राष्ट्रवादी पाठींबा देते. मराठ्यांच्या जीवावर राजकारण करणारे मराठ्यांनाच पायदळी तुडवून सत्तेसाठी तडजोडी करतात. महाराष्ट्रात मतांचे ध्रुवीकरण होऊ नये. धर्मनिरपेक्ष मते विभागली जाऊ नये म्हणून कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी बनते आणि तिकडे गुजरात सारख्या राज्यात, ज्या राज्याला असंहीष्णूतेच्या वातावरण निर्मितीचे माहेरघर समजले जाते त्याच्या गुजरातेत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस ला सोडून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेते. यातच यांच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटतो. गुजरातेत धर्मनिरपेक्ष मते नाहीत का ? गुजरातेत धर्मनिरपेक्षतेला मानणारा समूह नाही का ? गुजरातेत धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होण्याचा धोका नाही का ? गुजरातेत राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर लढल्याने भाजप ला फायदा होणार नाही का ? या प्रश्नांची उत्तरे राष्ट्रवादीच्या मराठ्यांनी आता स्वतःच्या पारिवारिक पक्षाला विचारायचा कि नाही ? वरून धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घेऊन मतदारांना फसवायचे आणि आतून भाजप - आरएसएस ला सहाय्य करून देशात असंहीष्णूता निर्माण करणाऱ्यांना सत्तेवर बसविण्यासाठी धडपडायचे. या नीतीला महाराष्ट्रातील जनतेने लक्षात घेतले पाहिजे.

२०१९ ला दिल्लीच्या तख्तावर बिगर भाजप, बिगर कॉंग्रेस ची सरकार बसण्याच्या दिशेने वाटचाल चाललेली आहे. महाराष्ट्रात देखील वंचित बहुजन आघाडी या शक्यतेला अधिकच बळ देत आहे. त्यामुळे उद्याच्या दिल्लीच्या तख्तावर वंचितांची सरकार बसण्याचीही शक्यता बळावते आहे. पण यासाठी प्रत्येकच कार्यकर्त्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. एकटे बाळासाहेब आंबेडकर संसदेत जावून होणार नाही तर सोबत २० - २५ खासदार घेऊन संसदेत गेले तर या देशाला बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात स्थिर सरकार मिळू शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील अन्य मतदारसंघाकडे देखील वंचित बहुजन समाजाने लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. आपले मत हे कुणाला सत्तेवर बसविण्यासाठी किंवा कुणाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी नसून आपले मत दिल्लीची सत्ताच आपल्या हातात घेण्यासाठी आहे. दलित, आदिवासी, मुस्लीम, वंचित, बहुजन समाजाला सत्तेचा एक मंच उभा करून देण्यासाठी आहे. व संविधानाने या समूहाला दिलेले अधिकार कुणाच्या कृपेवर नाही तर स्वतःच स्वतःच्या प्रतिनिधी मार्फत मिळविण्यासाठी आम्ही वाटचाल करीत आहोत यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.

आज महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येकच उमेदवार १ लाख मताच्या पुढे आहे. काही ठिकाणी हा आकडा ५ लाख मतांच्या पुढे जाणारा आहे. ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा आकडा ५ लाख मतांच्या पुढे आहे त्या मतदार संघात तो आकडा वाढविण्यासाठी प्रयत्न झाले नाही तरी चालेल परंतु तो कमी होणार नाही याची खबरदारी प्रत्येक कार्यकर्त्यांना घेणे गरजेचे आहे. लक्षात असू द्या कि आपली लढाई बलाढ्य शत्रूशी आहे. आणि बलाढ्य शत्रूशी लढतांना मनाची पक्की तयारी, जिद्दीची कसोटी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यासाठी निर्धार बलाढ्य ठेवणे गरजेचे आहे. ज्या मतदार संघात २ ते ३ लाखांच्या घरात मतदान वंचित बहुजन आघाडी घेणार आहे त्या मतदार संघात आम्ही तो आकडा जिंकण्याच्या आकड्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने मेहनत घेणे गरजेचे आहे. तेव्हाच आम्ही महाराष्ट्रातून निदान २० ते २५ खासदार वंचित बहुजन आघाडीचे निवडून आणू शकू. त्यासाठी उमेद्वारांसोबतच कार्यकर्त्यांनाही त्यादृष्टीने तयार करणे गरजेचे आहे. २१ व्या शतकातील राजकारण झपाट्याने बदलत आहे. परंपरागत राजकारणाचे सर्व गृहीतके मोडीत काढून नव्या व्यवस्थापिकीय संकल्पनांनी राजकारणाचा ठाव घेतलेला आहे. निवडणुकांचे व्यवस्थापन पेलून धरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सज्ज होणे गरजेचे आहे. सोबतच कार्यकर्त्यांनी देखील त्या व्यवस्थापिकीय मुद्द्यांना लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण आजचे हेच व्यवस्थापन आम्हाला सत्तेपर्यंत घेऊन जाणारे आहे. सत्तेचा घास आज तोंडापुढे येऊन थांबलेला आहे. तो पुन्हा हिरावला जाणार नाही यासाठी सर्वांनीच दक्ष राहणे गरजेचे आहे.

आज महाराष्ट्रात चेतना निर्माण झालेली आहे. ही चेतना इतक्या वर्षांच्या काळात पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या मनात आज वंचित बहुजन आघाडीचा झंजावात घर करून बसला आहे. कालपर्यंतचे उपरेही आता स्वकीय झालेले आहेत. कालपर्यंतचे विरोधकही आज समर्थक झालेले आहेत. सत्तेचे भागीदार होण्याची चेतना जागृत झालेली आहे. कालपर्यंत न दिसणारा पर्याय आज जनतेला दिसू लागला आहे. ही वंचित बहुजन आघाडीसाठी जमेची बाजू आहे. कालचा अराजकीय माणूस आजचा राजकीय प्रचारक बनून वंचित बहुजन आघाडीचा प्रचारक बनलेला आहे. कुणाचीही वाट न पाहता तो त्याच्या क्षेत्रात प्रचाराला लागलेला आहे. एकंदरीत राजकीय चेतना निर्माण करणारे वातावरण तयार झालेले आहे. पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुकीने वंचितांच्या राजकीय उठावाचे स्वरूप धारण केलेले आहे. हा राजकीय उठाव क्षमविणे आता अशक्यप्राय झालेले आहे. त्यामुळे याला बळकटी देणे गरजेचे आहे. इथून माघारी फिरायचे नाही. इथून माघार घ्यायची नाही. आता हे राजकीय मैदान सोडून पळ काढायचे नाही. कारण आता महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने विजयाच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. विजयीपथावर आरूढ झालेल्या वंचिताला सत्तेवर बसविल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. हे प्रण घेऊन वंचीतांनो आगेकूच करा. दिल्लीची सत्ता वंचितांच्या स्वागताला सज्ज आहे. हा विश्वास ढळू देऊ नका. विजय नक्कीच होणार आहे.   


§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275


Saturday, 23 March 2019

आता लढूनच जिंकायचे...


#Once_Again_Ambedkar
आता लढूनच जिंकायचे
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
           
२०१९ च्या लोकसभेची आचारसंहिता सुरु झाली. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. राजकीय पक्षांच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. देशात पुन्हा भाजप कि कॉंग्रेस अशीच चर्चा रंगविली जात आहे. काही चर्चा विकत घेऊन चालविल्या जात आहेत तर काही चर्चा जाणीवपूर्वक द्विपक्षीय लोकशाहीकडेच देशाला ठेवण्यासाठी केल्या जात आहेत. नरेंद्र मोदी कि राहुल गांधी असे दोनच चेहरे पुढे ठेवून १३५ करोड जनतेच्या देशाला व ९० करोड मतदारांना हुकुमशहा कि घराणेशाही एवढ्याच परिघात बांधण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. फक्त २ शहाण्यांच्या देशात ९० करोड मतदारांना मूर्ख बनविण्याचे कारस्थान रचले जात आहे. नक्कीच येणाऱ्या काळात देश कुणाच्या हातात जाणार आहे. हे लवकरच कळेल. परंतु त्या दरम्यानच्या काळात देशातला ९० करोड मतदार कुठल्या संम्मोहनाला बळी पडून स्वतःच आत्मघात करून घेईल हे निश्चित सांगता येणार नाही. नाण्याला दोन बाजू असतात तशी गत भारतीय लोकशाहीची झालेली आहे. कॉंग्रेस कि भाजप आणि आता भाजप कि कॉंग्रेस इतक्यातच देशाची लोकशाही संपत असेल तर आम्ही लोकशाहीत राहतो हे विसरलेले बरे. लोकशाही नाण्याच्या दोन बाजूसारखी चालू शकत नाही. लोकशाहीच्या नाण्याला अनेक बाजू असायला हव्यात आणि त्या सर्व बाजू थेट ९० करोड मतदारांच्या पुढे असायला हव्यात. परंतु या देशाचा मिडिया या देशातल्या लोकशाहीच्या अन्य बाजू जनतेपुढे घेऊन जायला तयार नाही. अश्या विपरीत परिस्थितीत २०१९ ची निवडणूक होत आहे. तेव्हा आपण लोकशाही नाण्याच्या तिसऱ्या बाजूने जाऊन या निवडणुकीकडे बघण्याची मानसिकता ९० करोड मतदारांपर्यंत पोहोचवायची आहे.

आज देश द्विपक्षीय राजकारणात अडकू पाहतो आहे. मक्तेदारीच्या राजकारणात विसावतो आहे. परंतु याच राजकारणात बळी जातोय तो म्हणजे या देशाचा सामान्य नागरिक व मतदार जो लोकशाहीत आपली जीवनमूल्ये व सुरक्षितता शोधतो आहे. या सामान्य नागरिकांच्या व मतदारांच्या मनात भीती घालून देण्यात आली आहे कि, घराणेशाहीकडे गेला नाहीत तर हुकुमशहा निवडून येतो व हुकुमशहा कडे गेला नाहीत तर घराणेशाही निवडून येते. दोन्हींचे रंग सारखेच. दोन्हींचा व्यवहार सारखाच. सामान्य नागरिकांची व जनतेची गळचेपी दोन्हींकडे ठरलेलीच आहे. परंतु हुकुमशहा व घराणेशाही दोन्ही नाकारून इथला सामान्य नागरिक व मतदार जो लोकशाहीत आपली जीवनमूल्ये व सुरक्षितता शोधतो त्या माणसाला तिसरा कुठला पर्याय उपलब्ध आहे किंवा निर्माण झाला आहे याची जाणीवही होऊ दिली जात नाही. माध्यमांना तर त्यासाठी मोठी रसदही पोहचली असेल यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे या काळात जाहिरातीतून, माध्यमांतून जे काही पेरले जाईल त्यात महाराष्ट्रात निर्माण झालेला व आज महाराष्ट्राच्या जनमानसात पोहोचलेला वंचित बहुजन आघाडीचा झंजावात कुठेही दिसणार नाही. जनमत चाचण्यात त्याचा उल्लेख केला जाणार नाही. जिंकण्याच्या शर्यतीतून लढाईच्या आधीच आम्हाला बाद ठरविले जाईल. याची जाणीव ठेवून वंचित बहुजन समाजाने पुढच्या निवडणूक काळाला सामोरे जायचे आहे.

 आज महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने निर्णायक आघाडी घेतलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजप व कॉंग्रेस ला मागे टाकून जनमानसात घट्ट स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राची निर्णायक मते वंचित बहुजन आघाडीकडे येऊन भाजप - कॉंग्रेस ला मात खावी लागणार आहे. हे चित्र डोळ्यापुढे ठेवून जाणीवपूर्वक समाजात संभ्रम पसरविला जात आहे. तो एक सत्ताधाऱ्यांच्या कटाचा एक भाग आहे. त्यात प्रामुख्याने १) वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवावी. २) वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर त्याचा फायदा भाजप - शिवसेनेला होईल. ३) वंचित बहुजन आघाडीमुळे मतांची विभागणी होऊन त्याचा लाभ भाजप-सेनेला होईल. ४) वंचित बहुजन आघाडीच्या सभांना लाखोंची गर्दी होते परंतु त्याचे मतात रुपांतर होणार नाही. ५) भाजपला परत सत्तेवर येऊ द्यायचे नसेल तर वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस सोबत समझोता करून / आघाडी करून निवडणूक लढवावी. अशा प्रकारची मानसिकता आज समाजात वायरल केली जात आहे. ज्याला सुशिक्षित माणसांपासून ते अडाणी माणसांपर्यंत सर्वच बळी पडत आहेत. अश्या अवस्थेत जिंकण्याची उम्मीद हरवून बसलेला समाज लढाईत उतरत नाही. आणि लढाईत उतरायचे असेल तर जिंकण्याची मानसिकता बाळगल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हाच आम्ही लढू शकतो व जिंकूही शकतो. न लढताच हरण्याच्या मानसिकतेतून आम्ही जात असू तर लढाईत उतरायचेच कशाला ? हे साधे सूत्र आज वंचितांना त्यांच्या राजकारणात वापरायचे आहे. असे असले तरी आम्हाला प्रस्थापितांनी समाजात निर्माण केलेल्या या संभ्रमाला उत्तर द्यावे लागेल व समाजाचा संभ्रम दूर करावा लागेल.

पहिला संभ्रम असा पसरविला जातो कि वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवावी. वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडीत सहभागी होऊन निवडणूक का लढवावी ? असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर कुणाकडेही सापडत नाही. जे काही उत्तरे येतात ते असेच कि भाजप ला थांबवायचे असेल तर आपण कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी करून भाजप ला हरविले पाहिजे. म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी ला फक्त जिंकविण्यासाठी आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी करायची का ? वंचित समूहाची आजची बांधलेली मोट ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी ला जिंकविण्यासाठी आहे कि वंचित समूहाचे हिरावले गेलेले अधिकार परत मिळविण्यासाठी आहे ? मग वंचित बहुजन समाजाचे अधिकार मिळवून देण्यासाठी निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी व त्यासाठी एकत्र आलेला अठरापगड जात समूह हा स्वाभिमानाने आपल्या अधिकारासाठी का लढू नये. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी करून गेल्याने वंचित समूहाचा काहीच लाभ होणार नसेल तर आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी आघाडीच्या नादात न पडता स्वतंत्र राजकीय मोट निर्माण केल्यास त्याचा वंचित समुहालाच लाभ होणारा आहे. परंतु जाणीवपूर्वक कॉंग्रेस-राष्ट्रवादी ला लाभ व्हावा व त्यांच्याच हातात परत सत्ता जावी म्हणून आज एकत्र आलेल्या वंचित समूहात संभ्रम तयार केला जात आहे. या संभ्रमाला फेकून देऊन आम्ही आमची वंचित बहुजन आघाडीची वाटचाल केली पाहिजे.

दुसरा संभ्रम असा पसरविला जातो कि, वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर त्याचा फायदा भाजप - शिवसेनेला होईल. कसा फायदा होईल असा प्रतिप्रश्न केला तर त्याचेही उत्तर नाही. एक उत्तर थातुरमातुर दिले जाते ते असे कि, आम्ही स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. व वंचित बहुजन आघाडी ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांचेच मते कमी करेल व त्यामुळे भाजप-सेना निवडून येईल. राजकीय अभ्यासाच्या दृष्टीने हे उत्तर निरर्थकच नाही तर तकलादू सुद्धा आहे. आज वंचित बहुजन आघाडीची घट्ट झालेली सामाजिक समूहांची ताकत फक्त कॉंग्रेस-राष्ट्रवादी मधूनच आलेली नाही तर भाजप-सेनेला फाट्यावर मारून त्यांना सोडून देखील आलेली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हि फक्त कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांचीच मते कमी करीत नाही तर भाजप-सेनेची मते सुद्धा कमी करीत आहे. याचे सविस्तर उत्तर मी माझ्या मागच्या लेखात दिलेले आहे. आज देशातल्या व राज्यातल्या परंपरागत युती व आघाडीला फोडून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात उभी झालेली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कुणाचे नुकसान व कुणाचा फायदा वगैरे करणार नसून दोन्ही परंपरागत युती-आघाडीला धोबीपछाड देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आपला स्वतंत्र झेंडा रोवणार आहे. त्यामुळे या संभ्रमातून बाहेर पडावे.

तिसरा संभ्रम असा पसरविला जातो कि, वंचित बहुजन आघाडीमुळे मतांची विभागणी होऊन त्याचा लाभ भाजप-सेनेला होईल. आता हा लाभ फक्त भाजप-सेनेलाच कसा होईल याचे उत्तर देतांना काही म्हणतात कि धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होईल. असे उत्तर देणाऱ्यांना मला वाटते कि राजकारणाची बाराखडी माहित नसावी. धर्मनिरपेक्ष मते कुठली ? हे निश्चित असे कुणीच सांगू शकत नाही. तसेच कुणी असाही दावा करू शकत नाही कि धर्मनिरपेक्ष मते भाजप-सेनेला पडत नाही. मुळात वंचित बहुजन आघाडीमुळे धर्मनिरपेक्ष मतांचे ध्रुवीकरण वंचित बहुजन आघाडीत झालेले आहे. इथला दलित, आदिवासी, मुस्लीम आणि मागासवर्गीय समूहातला वंचित घटक आज वंचित बहुजन आघाडीत सहभागी झाला आहे. व त्याचा प्रत्यय वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रात झालेल्या सभांमधून आलेला आहे. असे असतांना आज भाजप-सेनेकडे व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कडे जो उरला आहे तो इथला प्रतिगामीच आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी किती धर्मनिरपेक्ष आहे याचा प्रत्यय त्यांच्या सत्ताकाळात डोकावून पाहिल्यास नक्कीच कळेल. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष मतांचे एकत्रीकरण कुठे झाले असेल तर ते वंचित बहुजन आघाडीत मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात झालेले आहे. तेव्हा धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आज मतांची विभागणी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांच्यात होऊन भाजप-सेनेची मते शाबूत आहेत असे कुणी म्हणत असेल तर माझ्या दृष्टीने तो एक तर मूर्ख असेल किंवा राजकीय नर्सरीत वावरणारा बाळ तरी असेल. आज खरी मतांची विभागणी भाजप-सेना युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात होत आहे. व त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होणार आहे. हे आपण सर्व धर्मनिरपेक्ष मतदारांनी व वंचित समूहातील सदस्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. तेव्हाच हा पेरला गेलेला संभ्रम दूर होईल.

चौथा संभ्रम असा पसरविला जातो कि, वंचित बहुजन आघाडीच्या सभांना लाखोंची गर्दी होते परंतु त्याचे मतात रुपांतर होणार नाही. यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती ही कि, महाराष्ट्रात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभांचा प्रचार आणि प्रसार खूप झाला होता असे नाही. किंवा या सभांवर खूप खर्च केला गेला असेही नाही. गाड्या भरून रोजंदारीवर माणसे सभेला आणली गेली असेही नाही. मग तरी सभांची मैदाने लाखोंच्या गर्दीने भरून अपुरी का पडली ? तर याचे थेट उत्तर आहे कि आज वंचित बहुजन आघाडी ही एक फक्त राजकीय लढाई पुरती मर्यादित राहिलेली नसून वंचित बहुजन आघाडीने आज जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले आहे. व ज्या जनआंदोलनात माणसे, समाज, समूह स्वयंस्फूर्तीने एकत्र व्हायला लागतात ते जनआंदोलन आपले इप्सित ध्येय सध्या केल्याशिवाय थांबत नाही असा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या या जनआंदोलनाला आता कुणीही रोखू शकणार नाही. या गर्दीचे रुपांतर दुपटीने मतदानात होणार आहे. कारण आजचा वंचित समूह त्याचे अधिकार मिळविण्यासाठी ध्येयाने झपाटलेला आहे. व प्रस्थापित भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी च्या राजकारणाला कंटाळून पेटून उठला आहे. मतपेट्यामधून ते लवकरच दिसून येईल.

तसेच पाचवा संभ्रम असा आहे कि, भाजपला परत सत्तेवर येऊ द्यायचे नसेल तर वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस सोबत समझोता करून / आघाडी करून निवडणूक लढवावी. वंचित बहुजन आघाडीचा उद्देश फक्त आणि फक्त भाजप ला सत्तेवरून खाली खेचणे एवढाच नसून तो फक्त एक उद्देश आहे. परंतु वंचितांचे राजकीय सह्भागीत्व वाढवून त्यांचे हिरावले गेलेले अधिकार परत मिळवून देणे हा देखील एक उद्देश आहे. नेहमीच भाजप सत्तेवर येण्याची भीती दाखवून कॉंग्रेस-राष्ट्रवादीने वंचित समूहाला आपला राजकीय सालगडी बनवून ठेवले. व अश्याप्रकारचा संभ्रम तयार करून वंचित समूहाच्या मतदानाच्या बळावर सत्ता उपभोगली आहे. परंतु त्यांच्या या संभ्रम पसरविणाऱ्या दुष्प्रचाराला बळी पडून आपलाही माणूस कॉंग्रेस च्या दिशेने जातांना पाहून वेदनाच नाही तर आंतरिक चीढ निर्माण होते. जे जे असे म्हणतात कि भाजप सत्तेवर येऊ नये म्हणून कॉंग्रेस सोबत आम्ही जायला पाहिजे त्या त्या सर्व महाभागांना माझा एकच प्रश्न आहे कि मग अश्या अवस्थेत जिथे भाजप ला सत्तेपासून थांबविण्यासाठी आपल्याला कॉंग्रेस सोबत जावे लागते तेव्हा आपण निवडणुका न लढलेल्याच बरे नाही का ? आपण निवडणुकच लढू नये व कॉंग्रेस ला समर्थन जाहीर करून टाकावे ? “गळा कापला आणि खोकला गेला.” या म्हणीप्रमाणे कायमचे कॉंग्रेस चे मांडलिकत्व पत्करून घेऊन वंचित बहुजनांच्या स्वतंत्र राजकारणाला तिलांजली देऊन राजकीय श्रद्धांजली चा कार्यक्रम घेऊन राजकीय सन्यास घेण्यास काय हरकत आहे ? मिळेल का या प्रश्नाचे उत्तर आपल्याला. नक्कीच मिळणार नाही. हे सर्व सुडो राजकारण्यांचा प्रकार आहे. ज्यांना स्वतंत्र राजकारणाच्या ऐवजी पोटभरू मांडलिकत्वाचे राजकारण प्रिय आहे अश्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला प्रचार आहे हे आपण लक्षात घेऊन समाजात त्या संदर्भाने जागरूकता निर्माण करावी.

आज महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्या परंपरागत युती-आघाडीला छेद देऊन स्वतंत्र, मजबूत, व स्वाभिमानी वंचित बहुजनांचे राजकारण उभे करीत आहे. त्यात AIMIM च्या असौउद्दिन ओवेसी यांची मजबूत साथ मिळाल्याने मुस्लीम समुदाय वंचित बहुजनांच्या सोबत आलेला आहे. मागच्या ७० वर्षात कधीच एका नेतृत्वात एकत्र न आलेला आंबेडकरी समूह आज बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ९० % टक्के एकत्र होऊन वंचित बहुजन आघाडीत वंचित बहुजन व मुस्लीम समुदाय यांच्यात सहभागी झालेला आहे. म्हणजेच आज वंचित बहुजन आघाडीत एकत्र आलेला समूह यापूर्वी असा कधी एकत्र आलेला नव्हताच. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आपल्या जिंकण्यासाठी लागणाऱ्या निर्णायक मतदानाकडे वाटचाल करीत आहे. तर दुसरीकडे भाजप-सेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्या कडील मतदार फुटून वंचित बहुजन आघाडीत आल्याने दोन्ही युती-आघाड्यांचे निर्णायक मतदान कमी झालेले आहे. म्हणजेच आज महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील थेट लढाई ही वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजप-सेना युती, किंवा वंचित बहुजन आघाडी विरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशीच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन समूहाला आव्हान आहे कि, प्रस्थापितांनी व विकाऊ मिडीयाने पेरलेल्या संभ्रमातून बाहेर पडून आज वंचित बहुजन आघाडीने घेतलेली निर्णायक आघाडी आणखी वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून वंचित बहुजन आघाडीच्या जिंकण्याचा रेशो हा आणखी वाढेल व वंचितांचे कायम खच्चीकरण करणाऱ्या भाजप-सेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र निर्माण होईल. यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने जबाबदारी घेऊन काम करावे. येणाऱ्या काळात अनेक संभ्रम वंचित बहुजन आघाडीत सहभागी झालेल्या समूहात निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या प्रयत्नांना हाणून पाडून सत्तेच्या दिशेने वंचित बहुजन आघाडीने टाकलेले पाऊल सत्ता स्थापन करेपर्यंत थांबू द्यायचे नाही. व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. असा प्रण घेऊन वंचीतांनो कामाला लागा. उद्या महाराष्ट्राची सत्ता तुमची आहे. हा विश्वास मी तुम्हाला देतो. हे कायम आपल्या काळजावर कोरून ठेवा.

§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275


Tuesday, 5 March 2019

आंबेडकरी चळवळीची लिटमस टेस्ट.


#Once_Again_Ambedkar
आंबेडकरी चळवळीची लिटमस टेस्ट.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

स्वजातीय, स्वपंथीय चळवळ सत्तेपर्यंत जाऊ शकत नाही. एकजूट, एकसंघता, खंबीर नेतृत्व व नैसर्गिक मित्रांची साथ या आधारशिलेवरच आम्हाला सत्तेची सुत्र मांडता येतील. समाजाचा सौदा करून मिळालेली सत्ता अल्पकालीन असतेच पण अल्पसमाधानी व समाजाच्या विनाशाकडे वाटचाल करणारी ठरते. मा. प्रकाश आंबेडकर या चक्रव्युहातून बाहेर पडून चळवळ उभारीत आहेत. त्याचे स्वागत झाले पाहीजे. अगदी दोन्ही बाजूने. आंबेडकरी चळवळीच्या बाजूने व नैसर्गिक मित्रांच्याही बाजूने.

चळवळीत प्रत्येकाचे योगदान कालसापेक्ष असते. त्या योगदानाला कालातिथ बनविता येणार नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य ती टेस्ट चळवळीला घ्यावीच लागणार आहे. आंबेडकरी चळवळीची शक्ले पाडणारी संपण्याच्या मार्गावर आहेत. शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यांना पुन्हा जिवंत करायचे की नव्याने चळवळीत येणाऱ्यांना (नविन पक्ष, संघटना नाही.) चळवळीत सक्रीय करून त्यांना भविष्यासाठी तयार करायचे हा महत्वाचा प्रश्न आपल्यापुढे आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, पहिले उदाहरण असे की, एका घरात म्हातारा व तरूण दोघेही आहेत. दोघांनाही दुर्धर आजाराने ग्रासले आहे. दोघेही मरणासंन्न अवस्थेत पोहचलेत. परिवाराकडे या दोघांच्याही इलाजासाठी साधने मर्यादीत आहेत. इतके मर्यादीत की दोघांपैकी कुणी तरी एकालाच ते वाचवू शकतात. किंवा त्याच्यावर खर्च करू शकतात. म्हातारा परिवाराला आणखी ५ वर्ष सेवा देऊ शकतो. तर तरूण कुटूंबाला पुढील ५० वर्षे सेवा देऊन सांभाळ करू शकतो. अशा परिस्थितीत कुटूंबाने किंवा कुटूंब प्रमुखाने कुणावर खर्च करायचा. म्हाताऱ्यावर कि तरूणावर ? याचे व्यावहारीत उत्तर हा नक्कीच तरूण असेल. आणि दुसरे उदाहरण असे की, आपण एक गोष्ट नेहमी ऐकली असेल. "नदीला पुर असतो. बंदर व त्याच्या पिलाला तो पुर पार करून पलिकडे जायचे असते. पुराचे पाणी कमी असते तोपर्यंत बंदर (माकड) आपल्या पिलाला खांद्यावर घेऊन चालत असते. परंतु पाण्याची पातळी वाढून माकड बुडायला लागते हे पाहून बंदर आपल्या पिलाला खांद्यावरून खाली खेचते. आणि आपल्याच पिलाला पाण्याखाली ठेऊन त्याच्या डोक्यावर उभे राहून स्वतःचे प्राण वाचविते." आंबेडकरी चळवळीतही काहींनी ही माकडचेष्टा केलेली आहे. समाजाला खाईत लोटून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला या माकडांचे पिल्ले व्हायचे आहे का ? की समाजाने सदैव दुर्लक्ष केले असतांनाही, स्वतःला धोक्यात टाकून, सिद्ध करून, चळवळीला प्राधान्य देऊन, ज्या आंबेडकरांनी व आंबेडकरवाद्यांनी समाजाला व चळवळीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वात तुम्हाला या चळवळीचे भविष्यातील शिलेदार व्हायचे आहे ? याचेही उत्तर आम्हाला शोधावे लागणार आहे.

निवडणूक प्रचारसभेतून आम्ही जोपर्यंत समाजाला वर्तमान व भविष्याची स्वप्ने दिले जात नाही तोपर्यंत निवडणूका जिंकता येणार नाही किंवा उमेदवार निवडूणही आणता येणार नाही. बाबासाहेब वाचून वा सांगून निवडणुका जिंकता येत नाही. समाजाला, कार्यकर्त्यांना राजकीय प्रशिक्षित केल्याशिवाय अपेक्षीत राजकीय यश प्राप्त करता येणार नाही. आंबेडकरी समाज व कार्यकर्ते राजकीय दृष्ट्या अडाणी आहेत हे सत्य पचवायला शिका. आपला उमेदवार किंवा आपण निवडूण येवो अथवा न येवो परंतु आपण आपले मतदान विकू नये हा शहाणपणा जोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये येत नाही तोपर्यंत आपण निवडणुका जिंकू शकत नाही किंवा उमेदवार निवडूणही आणू शकत नाही. पैसे घेऊन मतदान करणाऱ्या सामान्य दलितांपासून ते विहार, स्मारकांच्या नादी लागून प्रस्तापीत पक्षांच्या व सत्ताधाऱ्यांच्या नादी लागलेल्या स्मारकप्रिय कार्यकर्त्यांकडून; थेट "दगडापेक्षा विट मऊ" म्हणून कॉग्रेस, भाजप च्या गळाला लागलेल्या उच्चशिक्षित नोकरदारांच्या कैचीतून आंबेडकरी चळवळीला बाहेर काढल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाही किंवा आपले उमेदवार निवडूण आणता येणार नाही. गावभर चळवळीच्या, बाबासाहेबांच्या चर्चा करीत फिरणाऱ्या व निवडणुकीत मतदान करतांना बिगर आंबेडकरी पक्षांना मतदान करणाऱ्यांना कधी तरी सद्यस्थितीतील आंबेडकरी राजकारण व चळवळीसमोरील आव्हाणे यावर चर्चा करून एक नेतृत्व, एक पक्ष, एक उमेदवार व समाजाची एकगठ्ठा मतदान एकाच पक्षाच्या पाठीशी अशी राजकीय चर्चा करता आली तर निवडणुका जिंकता येतील व उमेदवारही निवडूण आणता येतील. निवडणुकीत आपण उमेदवाराला मतदान करीत नसून, तो ज्या पक्षाच्या तिकीटावर ऩिवडणुक लढवितो; त्या पक्षाच्या विचारधारेला मतदान करीत असतो. सत्तेवर कोणती विचारधारा यावी यासाठी केले गेलेले ते मतदान असते. पक्षाला मिळालेले मतदान म्हणजे त्या पक्षाच्या विचारधारेला मिळालेले मतदान असते. हे जोपर्यंत आम्ही लक्षात घेणार नाही, एवढा शहाणपणा जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपण निवडणुका जिंकु शकणार नाही किंवा उमेदवार निवडूण आणु शकणार नाही.

आंबेडकरी जनतेने आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. शत्रु दारात येऊन रात्री-बेरात्री तुम्हाला उध्वस्त करायला टपून बसला आहे. शत्रुंच्या छावण्या तुमच्या घरावर कब्जा करून बसलेल्या असतांना आम्हाला गाफिल राहून चालणार नाही. आपसातील हेवेदावे, संघर्ष बाजूला सारून आंबेडकरी चळवळीची लिटमस टेस्ट आपल्यावरच वापरून एका नेतृत्वाच्या दिशानिर्देशाने मार्गक्रमण करावे लागणार आहे. तेव्हाच आंबेडकरी चळवळीची लिटमस टेस्ट यशस्वी होईल. व मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी चळवळ अखंड भारतासाठी मार्गक्रमण करू शकेल. सम्राट अशोकाचे अखंड भारताचे स्वप्न वैश्विक करण्यास राहूल कामात आला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखिल भारताचे स्वप्न पुर्ण करण्यास अॅड. प्रकाश आंबेडकर हेच योग्य ठरतील.

आज महाराष्ट्रातला तमाम बहुजन समाज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एकवटत चाललेला आहे. पहिल्यांदा त्यांच्यात राजकीय सत्ता हस्तगत करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. आपला आजपर्यंत निवडणुकांमध्ये वापर केला गेला याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे. आजपर्यंत झालेला मतांचा वापर यापुढे होऊ द्यायचा नाही अशी प्रतिज्ञा घेऊन हा समूह २०१९ च्या निवडणुकांकडे बघतो आहे. आंबेडकरी नेतृवावर विश्वास ठेवून हा समूह मार्गस्त झालेला आहे. या समूहाचा विश्वासघात होणार नाही याची काळजी आंबेडकरी चळवळीला आणि स्वतःला आंबेडकरी म्हणणाऱ्या प्रत्येकाला घ्यायची आहे. अनेक वर्षाच्या वाटचालीनंतर आलेली ही संधी हातून निसटून जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे.  प्रस्थापित पक्षांच्या हाताखाली बाहुले बनून आजपर्यंत राहिलेला समूह आता कॉंग्रेस / भाजप / राष्ट्रवादी / शिवसेना यांच्यापासून दूर जाण्यासाठी सरसावला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या निर्मितीने त्याला वाट मोकळी करून दिली आहे. ती वाट परत रोखली जाणार नाही याची खबरदारी आम्हाला घ्यायची आहे. त्यासाठी आंबेडकरी चळवळीला २०१९ ला मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे.

राजकीय अवसायनात सापडलेली माणसे / समूह आता बंडाचा झेंडा रोवण्यास तयार झाले आहेत. अघोषित आणीबाणी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी हे मोठे कारण त्यामागे आहे. बहुजन समाज सदैव अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून अलिप्त राहिलेला आहे. कारण बहुजन वर्गाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून प्रस्थापितांना प्रश्नांकित केले कि प्रस्थापितांचे साम्राज्यच धोक्यात यायला लागते. आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून व होणाऱ्या सभांमधून बहुजन समाजातील माणसे बोलायला लागली आहेत. अभिव्यक्तीचा वापर करून सत्तेला धारेवर धरीत आहेत. सामाजिक प्रश्नांना जनतेसमोर मांडून सरकारला हादरा देत आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या बाहेर आजही बहुजन वर्गाची मुस्कटदाबी चाललेली आहे. कालपरवाच अभिनेते अमोल पालेकर यांना सरकारविरोधात बोलण्यापासून थांबविण्यात आले. जे जे सरकारविरोधात बोलतील त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या देशात चाललेला आहे. यात बहुजनांची संख्या मोठी आहे. आज हा बहुजन समूह या सरकारी दडपशाही ला कंटाळून भाजप सरकार विरोधात दंड थोपटून उभा झालेला आहे. या सर्व समूहाला आधार देऊन त्यांची वज्रमुठ बांधण्यासाठी आंबेडकरी चळवळीला झटावे लागणार आहे. लढावे लागणार आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यात स्वतःविषयी विश्वास निर्माण करावा लागणार आहे.

आताची लढाई ही विचारधारेची लढाई आहे. जी २०१९ च्या निवडणुकीत त्याच वैचारिक आधारावर लढली जाणार आहे. ज्या लढाईचा केंद्रबिंदू आंबेडकरी विचार, संविधानिक संस्कृती, मानवतावादी परंपरा आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे असणार आहे. अश्या परिस्थितीत आंबेडकरी समूह एकसंघ होऊन वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा होणे अगत्याचेच नाही तर बंधनकारक आहे. आज आलेली परिस्थिती पुन्हा भविष्यात येईल कि नाही हे निश्चित सांगता येणार नाही परंतु आज आलेली संधी घालविली तर परत ही संधी दारात पण उभी राहणार नाही. त्यामुळे आंबेडकरी समूहाने कॉंग्रेसविरहित, भाजपविरहीत विचार करायला शिकले पाहिजे. आंबेडकरी चळवळीने स्वतःच एक राजकीय पर्याय म्हणून कॉंग्रेसविरहित, भाजपविरहित मानसिकतेचे नेतृत्व केले पाहिजे. वंचित बहुजन आघाडी आज तसे नेतृत्व करतांना दिसते तेव्हा किंतुपरंतु चा विचार न करता आंबेडकरी चळवळीने वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाला यशस्वी करण्यासाठी एकदिलाने एकसंघ होऊन कामाला लागले पाहिजे. हीच खरी आज आंबेडकरी चळवळीची लीटमस टेस्ट आहे. आंबेडकरी चळवळ यात यशस्वी होईल कि अपयशी हे येणाऱ्या निवडणुका ठरवतील. यशस्वी झालोत तर पुढच्या अनेक पिढ्यांचे यशस्वी संचालन होऊ शकेल व त्या पिढ्यांचे भविष्य सुकर होईल. अपयशी ठरलोत तर भविष्याच्या पिढ्या आजच आम्ही संपवतो आहोत हे सिद्ध होईल. तेव्हा यशस्वी व्हायचे कि अपयशी व्हायचे हे प्रत्येक आंबेडकरी माणसाला ठरवायचे आहे. आपसातले सारेच मतभेद, हेवेदावे, स्वार्थ, अपेक्षा, हित इ. बाजूला सारून काहीवेळ चळवळीच्या बाजूने उभे राहायचे आहे. जे उभे राहत नसतील त्यांना दुर्लक्षित करून, विरोध पत्करून, बाजूला सारून चळवळीची एकसंघता दाखवून द्यायची आहे.

येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आंबेडकरी समूहाच्या स्वाभिमानाची लिटमस टेस्ट आंबेडकरी चळवळीला यशस्वी करायची आहे. ही टेस्ट चळवळीच्या दृष्टीने, नेतृत्वाच्या दृष्टीने, कार्यकर्त्यांच्या दृष्टीने, आंबेडकरी विचारवंत, नौकरदार व समाजाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. चळवळीने ही टेस्ट पास केली तर चळवळ, नेतृत्व, विचार, समाज, समूह सारेच सिद्ध होणारे आहेत. परंतु थोडीशी चूक जरी झाली तरी ती चूक चळवळीच्या अंगलट येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ज्यामुळे भविष्यात चळवळ, नेतृत्व, विचार, समाज, समूह सारेच निरर्थक होऊन बसण्याची व उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. एक मोठा वैचारिक पराभव आमच्यातील पुढे उभे राहण्याची शक्ती हिसकावून घेण्याची शक्यता आहे. तेव्हा आंबेडकरी समूहाला जो आंबेडकरी चळवळीचा अविभाज्य अंग आहे त्या सर्व समूहाला नम्र विनंती आहे की, एकसंघतेच्या शक्तीने आम्हाला ही लिटमस टेस्ट जिंकायची आहे, यशस्वी करायची आहे. हरण्याच्या मानसिकतेतून नव्हे तर जिंकण्याच्या मानसिकतेतून ही टेस्ट द्यायची आहे. ‘मानवतेच्या शत्रूसंगे, जिंकू किंवा मरू.’ या अभिवचनाला कायमचे ध्यानात ठेवून पुढचे ६ महिने आम्हाला वाटचाल करायची आहे. पुढचा काळ कुणाचा असेल हे त्यावर अवलंबून राहील. मानवतेला जगवायचे कि अमानवीयतेला पोसायचे याचा निर्णय घेण्याचा निर्णयात्मक काळ आपल्यापुढे येणार आहे. तेव्हा आंबेडकरी चळवळीच्या शिलेदारांनो सज्ज व्हा, भविष्य घडविण्यासाठी !

§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275


२०१९ चा रणसंग्राम : परिवर्तनाच्या महाराष्ट्र भूमीत वंचित बहुजन आघाडीच्या नव्या परिवर्तनाची सुरवात


#Once_Again_Ambedkar
२०१९ चा रणसंग्राम :
परिवर्तनाच्या महाराष्ट्र भूमीत वंचित बहुजन आघाडीच्या नव्या परिवर्तनाची सुरवात
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

२०१९ च्या निवडणुका अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरलेल्या आहेत. मागच्या ५ वर्षाचा काळात देशातील मानवनिर्मित अमानवतावादी संघटनेने (आरएसएस) सत्तेच्या माध्यमातून निर्माण केलेली परिस्थिती इतकी भयावह होती की त्यामुळे देशातला तमाम नागरिक ढवळून निघाला. सत्तेच्या विरोधात रोष व्यक्त करू लागला. छळ सहन करून सत्तेच्या नावाने भंडारा फोडू लागला. फसले गेल्याची जाणीव त्याला होऊ लागली. जातीय अन्याय २१ व्या शतकातही होऊ शकतो अशी न केलेली कल्पनाही त्याच्या प्रत्यक्ष निदर्शनास येऊ लागली. धार्मिक असुरक्षितता बळावत गेली. एकंदरीतच फसव्या व गोलमाल नीतीच्या माध्यमातून सत्तेने सामान्य माणसाचे सामाजिक व सांस्कृतिक नुकसान केलेच पण ही सत्ता तिथेच थांबली नाही तर देशातील नागरिकांचे आर्थिक नुकसानही या सत्तेने केले. माणसांचे दैनंदिन जीवन प्रभावित होईपर्यंत या सत्तेने मजल गाठली. इतकेच नव्हे तर माणसांच्या जैविकतेवर या सत्तेने हल्ले केलेत. मॉब लिन्चींग चा प्रकार देशाने पहिल्यांदा मागच्या ५ वर्षात अनुभवला. सत्तेला इतके अपयश आले असतांना व देशातील जनता विरोधात जातांना पाहून भूलभुलय्याचा खेळ याच सत्तेने केला. याच सत्तेने आपल्या बाजूने जनभावना निर्माण करण्यासाठी म्हणून; अनेकांच्या प्राणांची आहुती दिली. माणसांना मारणारी सत्ता जगात एकमेवाद्वितीय सत्ता म्हणून संपूर्ण जगाने पहिली. कुठे दबक्या आवाजात तर कुठे प्रत्यक्षात सत्तेच्या विरोधात आवाज उचलला गेला. परंतु जेव्हा जेव्हा सत्तेच्या विरोधात आवाज उचलला गेला तो जोरकसपणे सत्तेने साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून तो आवाजच चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सहजच परत ही माणसे नकोत. परत ही सत्ता आम्हाला नको. परत ही परिस्थिती नको. असा मतप्रवाह आज संपूर्ण देशात बनू लागला आहे. आणि हा मतप्रवाह स्वतःहून पुढील निवडणुकांच्या सुत्रसंचालनासाठी सज्ज झाला आहे.

२०१९ च्या निवडणुका ह्या सत्ताधारी व सत्ताभोगी विरुद्ध जनता अश्या थेट लढल्या जाणार आहेत. सत्तेने पिळला गेलेला, छळला गेलेला वंचित समूह आज त्या सत्ताधारी विरोधक जनतेचे नेतृत्व करीत आहे. आणि आज ही सुरवात महाराष्ट्रातून झालेली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ६५ वर्ष ज्यांनी या देशावर राज्य केले त्या कॉंग्रेस ला असो; की फक्त ५ वर्षाच्या सत्ताकाळातच देशातला सामन्यातला सामान्य माणूस ज्या सत्तेने त्रस्त झाला त्या भाजप ला असो; परत सत्तेवर येऊ द्यायचे नाही. असा मतप्रवाह देशात निर्माण होऊ लागला आहे. देशात राष्ट्रीय स्तरावरही कॉंग्रेस आणि भाजप मुक्त सरकार निर्माण होऊ शकते. जनतेने ठरविले तर या सत्ताधारी वर्गाला चढलेला सत्तेचा माज उतरविला जाऊ शकतो असा विश्वास आज देशात निर्माण होत आहे. या विश्वासाला जनतेत निर्माण करण्यात महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाचा खारीचा वाटा आहे. जो संदेश आज संपूर्ण देशभर वाऱ्यासमान पसरत चाललेला आहे. देशातच नव्हे तर जगात जिथे जिथे वंचित समूहातील प्रतिनिधी वास्तव्याला आहेत त्या प्रत्येक ठिकाणी या परिवर्तनाच्या लाटा निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात निर्माण झालेले वंचित बहुजन आघाडी नावाचे वादळ इतक्या वेगाने सत्तावंचितांना सोबत घेऊन सत्तेच्या दिशेने आगेकूच करीत आहे कि ज्यामुळे राजकीय धुरंधरापासून ते राजकारणाचे परीवारीकरण करणाऱ्या राज्यकर्त्यांपर्यंत सारेच अचंभित होऊ लागले आहेत.

वंचित बहुजन आघाडीने सामान्य माणसात सत्तेची स्वप्न रंगविली आहेत. सत्तावंचित समाजाला सत्तेचा मार्ग दाखविला आहे. सत्तेपर्यंत पोहचण्यासाठी आजपर्यंत दिसणारी कॉंग्रेस-भाजप या दोन रस्त्याऐवजी सत्तेकडे जाणारा एक नवा रस्ता पण निर्माण केला जाऊ शकतो हा विश्वास आज त्यांच्यात दृढ होत चाललेला आहे. कायम ज्या सत्ताधाऱ्यांनी भितीदायक चित्र रंगविले त्या साऱ्याच चित्रांना काळे फासून वंचितांचे हे वादळ राजकीय मैदानात उतरले आहेत. या वादळाला क्षमविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून आखल्या जात आहेत. हे अपेक्षितही आहे. कारण कुठलाच सत्ताधारी स्वतःच्या राजकीय अंतविधीचे चित्र वा चित्रीकरण स्वतः पाहण्यास इच्छुक नसतो. त्यामुळे त्याच्यासमोर निर्माण झालेला स्पर्धक स्पर्धेतून बाद करण्यासाठी तो सातत्याने धडपडत असतो. आज वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात निर्माण केलेल्या स्पर्धेमुळे नवा स्पर्धक तयार होऊ पाहतो हेच मुळी इथल्या सत्ताधाऱ्यांना नको आहे. असेच एकंदरीत चित्र दिसत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा याला फायदा व त्याला तोटा अशाप्रकारे फायदा तोट्याचे गणित मांडली जात आहेत. यामागे उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे जनतेमध्ये संभ्रम पसरविणे.

वंचित बहुजन आघाडीच्या नव्या राजकीय प्रयोगाने आज चर्चा अशीही रंगली जाते कि वंचित बहुजन आघाडीमुळे कॉंग्रेस मागे पडेल व भाजप ला त्याचा फायदा होईल. तर काही चर्चा अश्याही रंगल्या आहेत कि वंचित बहुजन आघाडीमुळे कॉंग्रेस ला नुकसान होईल. त्या सर्व चर्चांना थांबविण्यासाठी एकच उत्तर पुरेसे ठरेल असे वाटते, ते म्हणजे फायदा किंवा नुकसान अशी चर्चा करण्यासाठी राजकारण हा काही व्यवसाय/धंदा नव्हे. इथे कुठल्या राजकीय पक्षाच्या फायदा किंवा नुकसानीचा प्रश्न नाही तर इथे सत्तेपासून वंचित असलेल्या समूहाला, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी भारतीय संविधानाने दिलेल्या संरक्षणातून इथल्या सत्ताधारी पक्षांनी आजपर्यंत काही केले आहे का ? त्यातून या समाजाचा काही फायदा झालेला आहे का ? झाला नसेल तर त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी, झालेले नुकसान भरून काढण्यासाठी, व संपूर्ण समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय बनू पाहतो आहे. हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.

इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे कि, आज वंचित बहुजन आघाडी सोबत जुळलेला, एकत्र आलेला समूह समूह हा नेमका परंपरागत मतदार कुणाचा होता ? किंवा परिस्थितीनुरूप या समूहाने कुणाला मतदान केले ? याचा भूतकालीन आढावा घेतल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुणाचा फायदा करेल व कुणाचे नुकसान करेल कि स्वतःहा काहीतरी करून दाखवेल हे लक्षात येणार नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये समाविष्ठ झालेल्या काही मुख्यतः २ समूहाचा आपण अभ्यास केला तर दलित आणि मुस्लीम हा समूह कायम कॉंग्रेस चा परंपरागत मतदार राहिलेला आहे असा सर्वमान्य समज आहे. १९९० च्या दशकापर्यंत कॉंग्रेसच्या सोबत राहिलेला दलित आणि मुस्लीम समूह त्यानंतर हळूहळू कॉंग्रेस पासून दूर गेला आहे. मग तो प्रादेशिक पक्षाचा मतदार झाला किंवा अन्य पक्षाचा मतदार झाला. तरीही साधारणतः ५० टक्के दलित मुस्लीम मतदार हा कॉंग्रेस चा मतदार राहिलेला आहे. व ५० टक्के हा अन्य पक्षांचा मतदार राहिलेला आहे. जो वर्तमानात वंचित बहुजन आघाडीमध्ये जवळपास ८० टक्के एकवटत चाललेला आहे. अश्या परिस्थितीत फक्त कॉंग्रेसचाच मतदार नव्हे तर अन्य प्रादेशिक पक्षांचा मतदार असलेला दलित – मुस्लीम समूह आज त्या सर्वच पक्षांना नुकसान करीत आहे.  कॉंग्रेस कडून ५० टक्के मतदार कमी होत आहे तर अन्य पक्षातून ३० टक्के दलित – मुस्लीम मतदार कमी होत आहे. आज हा मतदार बाळासाहेब आंबेडकर आणि असुउद्दिन ओवेसी याच्या नेतृत्वात संघटीत होऊन नव्या राजकीय प्रवाहाला जन्म देत आहे.

दुसरीकडे आपण हेही लक्षात घेऊ कि, वंचित बहुजन आघाडीत समाविष्ट झालेला अन्य वंचित समूह मग तो धनगर असेल, माळी असेल, ढीवर असेल, नाव्ही, लोहार, सुतार, होलार, शिंपी हा ओ.बी.सी. मधील लहान समूह त्यासोबतच आदिवासी, भटका-विमुक्त हा समूह १९९९ पासून कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात समप्रमाणात वाटला गेला होता. २०१४ च्या निवडणुकीत या समूहातील जवळपास ७५ टक्के मतदारांनी मोदीच्या फसव्या विकासलाटेत स्वार होऊन भाजप ला मतदान केले होते. आज या समूहातील जवळपास ५० ते ६० टक्के समूह हा वंचित बहुजन आघाडीत एकत्र झाला आहे. म्हणजेच या समूहातील मतदार हा २०१४ च्या तुलनेत भाजप ला ५० टक्के तर कॉंग्रेस ला जवळपास १० टक्के नुकसान करून वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात आपले मतदान टाकायला निघालेला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या पारड्यात जवळपास ९० टक्के जाणारा मराठा समूह मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मुद्द्यांवर, घराणेशाहीच्या राजकारणावरून आज राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून बाहेर पडून ४० टक्के च्या आसपास वंचित बहुजन आघाडीकडे वळत चाललेला आहे. तर दुसरीकडे मुंबई सारख्या शहरी भागात शिवसेना सारख्या पक्षांचा मतदार असलेला दलित, कोळी, आग्री हा समूह आज शिवसेनेतून जवळपास ६० ते ७० टक्के बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीकडे एकवटत चाललेला आहे. ज्याचा अर्थ असा होतो कि वंचित बहुजन आघाडीकडे शिवसेनेचा मतदार देखील वळत चाललेला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे आज संपूर्ण महाराष्ट्र एक नवा पर्याय म्हणून पाहत आहे. हेच वरील विवेचनावरून सिद्ध होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात कॉंग्रेस ला नुकसान व भाजप ला फायदा असे काहीही करणार नसून वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना या सर्वच प्रमुख पक्षांच्या मतदारांची मते घेऊन सर्वच प्रस्थापित पक्षांना नुकसान करणार आहे. आणि वंचित बहुजन आघाडी जर सर्वच पक्षांकडून त्यांचे मतदार आपल्याकडे आकर्षित करीत असेल तर या महाराष्ट्रातले हे चारही प्रमुख पक्ष माघारी पडून २०१९ ला या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसऱ्या कुठल्याही प्रथापित पक्षाची सरकार निर्माण होऊ शकत नाही. म्हणजेच वंचित बहुजन आघाडी २०१९ च्या महाराष्ट्राच्या सत्तेची प्रमुख दावेदार असल्याचे यावरून सिद्ध होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीवर परोक्ष-अपरोक्ष टीका करणाऱ्या प्रस्थापितांनी हे लक्षात घ्यावे कि महाराष्ट्रातला वंचित समूह आता जागृत होऊन सत्तेच्या दिशेने आगेकूच करण्यास सरसावला आहे व प्रस्थापितांची माती करून आपल्या वंचिततेचा पै पै हिशोब प्रस्थापितांकडून घेणार आहे.

एकंदर परिवर्तनवादी महाराष्ट्राच्या भूमीत एका नव्या परिवर्तनाला सुरवात झालेली आहे. हे परिवर्तन संपूर्ण देशात प्रस्थापित सत्ताधाऱ्यांचे सत्तेचे स्वप्न धुळीत मिळवून देशात एक नवा राजकीय अध्याय निर्माण करू शकते याची पुरेपूर जाणीव इथल्या सत्ताधाऱ्यांना झाल्यामुळे राजकीय अज्ञानापोटी समाजासमोर संभ्रम पसरविला जात आहे. वंचित समूहाची जबाबदारी आहे कि अशा कुठल्याही संभ्रमाला बळी न पडता निर्भयतेने समाजाची वंचितता संपविण्यासाठी उचललेल्या पाऊलावर चालत राहावे. वंचित समूहातील जो जो व्यक्ती अजूनही स्वतःच्या लढ्यात सहभागी झालेला नाही त्या प्रत्येक व्यक्तीला या लढ्यात सहभागी करून घेण्याचे सातत्याने प्रयत्न करावेत. वंचित समूह फक्त काही टक्केच नव्हे तर १०० टक्के वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तेव्हा इथले प्रस्थापित राजकीय पक्ष २ अंकी संख्या सुद्धा गाठू शकणार नाही आणि स्वबळावर महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची सत्ता निर्माण होऊ शकेल.

आज काहींना भाजप सारख्या मनुवादी पक्षाला सत्तेपासून दूर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस सोबत एकत्र येऊन लढावे असे वाटते. याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होईल कि नाही याची खात्री नाही. मात्र याचा फायदा कॉंग्रेस ला १०० टक्के होईल व कॉंग्रेस पासून दुरावत चाललेला दलित-मुस्लीम हा परंपरागत मतदार कायम टिकून राहील. सोबतच वंचित समूहातील मतदार देखील कॉंग्रेसच्या दावणीला बांधला जाईल. त्यापेक्षा वंचित बहुजन आघाडी ही भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे मतदार आपल्या बाजूने वळविण्यात यशस्वी झाली आहे तर अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाने हेच या येऊ घातलेल्या नव्या राजकीय परिवर्तनची नांदी ठरेल. आणि तेच वंचितांच्या लढ्याचा नवा अध्याय बनून वंचितांना न्याय मिळवून देण्यात सक्षम ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील वंचितांची वंचितता संपविण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रस्थापितांनी त्याच वंचितांचा राजकीय लाभ घेऊन वंचितांना त्यांचे संविधानिक अधिकार मिळू दिले नाही. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्च्यात बाळासाहेब आंबेडकर हे त्याच वंचितांचे नेतृत्व करून परत इथल्या वंचित समूहाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रस्थापितांच्या हातात एकवटलेली सत्ता वंचितांच्या हातात मिळवून देण्यासाठी पुढे आले आहेत. तेव्हा वंचीतांनो, साथ द्या. चला उठा, कामाला लागा. परिवर्तनाच्या महाराष्ट्र भूमीत वंचित बहुजन आघाडीच्या नव्या परिवर्तनाची सुरवात तुमच्या नेतृत्वात करण्यासाठी सज्ज व्हा. एका नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीला सज्ज व्हा.

§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275