Monday, 11 February 2019


#Once_Again_Ambedkar
मनुवादी अर्थव्यवस्था लादु पाहणारी शेखचिल्ली सरकार.
                                         ---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.                       

          कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशाचा कणा असते. अर्थव्यवस्थेच्या सुचारू संचालनावर देशाचे भविष्य निर्भर असते. त्यासाठी प्रत्येक अर्थव्यवस्था दीर्घकालीन व अल्पकालीन विकासाचे धोरण निश्चित करीत असते. भारतातही पंचवर्षीय योजना (धोरण) बनविण्याचा हेतू हा दीर्घकालीन विकासाचे धोरण निर्धारित करण्यासाठी भारतीय संविधानाने आखलेला आहे. तर अल्पकालीन विकास धोरणांसाठी दरवर्षीचा आर्थिक अर्थसंकल्प तयार केला जातो. परंतु आज देशात कुठल्याही स्वरूपात पंचवार्षिक धोरण बासनात गुंडाळून ठेवला गेला आहे. आणि दुसरीकडे दर वर्षीचा आर्थिक अर्थसंकल्प फक्त शेखचिल्लीच्या स्वप्नागत गृहीतक बनून राहिलेला आहे. भाजप सरकारच्या मागच्या ४ अर्थसंकल्पात कुठेही शाश्वत अर्थसंकल्प आलेला या देशाने पाहिलेला नाही. विकासाच्या नावाने फसव्या घोषणा, फक्त काही धनदांडग्या व्यापारी श्रेष्ठीजन वर्गाला लाभदायक होईल असे अर्थसंकल्पीय नियोजन एवढेच मागच्या ४ वर्षाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. 

चाणक्य-कौटिल्याचे वंशज समजणाऱ्या भाजप/आरएसएस सरकारला या देशाची संविधानिक शाश्वत अर्थव्यवस्था कळली कि नाही ? हा आज देशातील नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. कि यांना या देशातून समान वितरणाची, सर्वांना आर्थिक विकासाची समान संधी देणारी, घरेलू उत्पादक क्षमतेला वाढवून रोजगार निर्मिती करणारी, कृषीव्यवस्थेला चालना देऊन कच्च्या मालाची बाजारपेठ समृद्ध करणारी संविधानिक शाश्वत अर्थव्यवस्था नष्ट करून यांना मनुस्फृती पुरस्कृत अन्यायकारक, लुटारू, शोषण करणारी अर्थव्यवस्था या देशावर लादायची आहे. याचा जोरकस प्रयत्न भाजप सरकारने मागच्या ४ वर्षांपासून सातत्याने केला आहे. देशाची अर्थव्यवस्था, त्या अर्थव्यवस्थेचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामान्य नागरिकांवर होणारे परिणाम, वार्षिक अर्थसंकल्प व पंचवार्षिक योजना या प्रत्यक्ष नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जुडलेल्या आहेत इ. गोष्टींची नागरिकांमध्ये असलेली अनभिज्ञता याचा वापर करून भाजप सरकारने देशाचा कणाच मोडीत काढला आहे. देशातील अर्थव्यवस्थेच्या संदर्भात नागरिकांमध्ये असलेले अज्ञान याचा फायदा घेऊन भाजप सरकारने देशाला फसविण्याचाच प्रयत्न केला आहे.

मुख्यतः भारतीय अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान अर्थव्यवस्था म्हणून गौरविली जाते. पण मुळात देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथम पंचवार्षिक योजना वगळता नंतरच्या कुठल्याही पंचवार्षिक योजना कृषीक्षेत्राला चालना देणाऱ्या तयार झाल्याच नाहीत. देशात वाढत जाणारी लोकसंख्या, वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा, वाढलेल्या गरजेनुसार वाढलेली कच्च्या व पक्क्या मालाची मागणी, कच्या मालाच्या मागणीच्या पूर्ततेसाठी करावे लागणारे आवश्यक ते नियोजन न केल्याने परकीय वस्तूंवर देशाची वाढलेली निर्भरता या देशाला अंतर्बाह्य पोखरून गेली. देशातील नागरिकांच्या मागणीला अनुसरून वाढलेल्या बाजारपेठा व भारतीय बाजारपेठांनी ग्राहककेन्द्री बाजारपेठ म्हणून घेतलेली भरारी, आजपर्यंत या देशाच्या कुठल्याच सरकारला व कुठल्याच अर्थमंत्र्याला दिसून आली नाही याची अजूनही खंत वाटते. भारत देश हा ग्राहककेन्द्री बाजारपेठ म्हणून विकसित होत असतांना पाश्चात्य देशांनी भारतीय बाजारपेठेवर मारलेला विळखा खऱ्या अर्थाने या देशाच्या उद्ध्वस्तीकरणाला कारणीभूत ठरलेला आहे. हे सर्व होत असतांना देशातले बेगडी अर्थतज्ञ राजकीय सत्तेचे गुलाम बनल्याने देशाच्या सत्तेला आर्थिक समृद्धीचा विचार बहाल करू शकले नाही. लुटारू राजकीय अर्थकारण देशाच्या अर्थसंकल्पाचे व पंचवार्षिक योजनांचे माहेरघर ठरल्याने विकासाचा उद्देशच सफल होऊ शकला नाही. संसदेच्या सभागृहात अर्थशास्त्राची बाराखडी माहिती नसलेल्या जनप्रतिनिधींनी (मग ते सत्तेतले असोत कि विरोधी पक्षातले असोत) कधी यावर मंथन न करता आपल्या मतदार संघात अर्थसंकल्पातील लुट कशी करता येईल याचाच विचार झाल्याने भारतीय अर्थव्यवस्था उर्ध्वगामी न बनता सातत्याने अधोगामी होत राहिली. व सामान्य माणसाचा विकास खुंटत गेला.

मध्यंतरी देशाचा आर्थिक वृद्धी दर ८% करण्याचा व तो कायम ठेवण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला होता. त्यासाठी FDI च्या भूलथापा देऊन भाजप सरकार सामान्य लोकांना निव्वळ मुर्ख बनविले होते. भारताचे प्रवासी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विदेशात जाऊन मोठमोठ्या उद्योगपती व त्यांच्या सिईओ यांना भेटून जणूकाही भारत देशालाच विकायला निघालेत कि काय असे वाटायला लागले होते. कॉंग्रेस सरकारच्या काळात FDI ला कडाडून विरोध करणारी भाजपा स्वतःचे सरकार आल्यावर त्याच FDI च्या माध्यमातून देशाला विकायला निघालेत. FDI च्या नावाखाली येणारी गुंतवणूक कुणासाठी आहे ? शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करून त्यांना भूमिहीन बनवून कुठली आर्थिक प्रगती होणार ? कृषिपूरक व कृषीला चालना देणारी व्यवस्था मोडीत काढून आम्ही कुठला विकास सध्या करणार आहोत ? देशातील ७० टक्के श्रमिक व मजूर कृषी रोजगारावर अवलंबून असतांना शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावून आम्ही कुठल्या दिशेने वाटचाल करायला लागलो आहोत ? ७० टक्के कृषक श्रमिक मजुरांना बेरोजगार बनवून त्यांना भूखबळीने मारून आम्ही कुठला शाश्वत विकास करणार आहोत ? हे आकलनापलिकडचे झालेले आहे. भारताची गौरवपूर्ण कृषीअर्थव्यवस्था मोडकळीस काढून व्यापारी अर्थव्यवस्था FDI च्या माध्यमातून लादली जात आहे. देशाची स्थावर मालमत्ता कृषी, कोयला, खनिज संपत्ती, सोने, कुशल कामगार इ. विदेशी व्यापाऱ्यांच्या घशात घालून देश विकसीत होण्याची स्वप्ने पाहणे म्हणजे "ईस्ट इंडीया कंपनीची" पुनर्स्थापना करणेच होय. याला "शेखचिल्ली" ची सरकार असेच म्हणावे लागेल.

देशाचा विकास हा देशांतर्गत स्थावर संपत्तीवर निर्भर असतो. ती टीकवून ठेऊन स्थानिक कुशलता वृद्धिंगत करून नव्या निर्मितीला चालना देणे गरजेचे असते. इथे स्थानिक कुशलता देशोधडीला लागून बेरोजगारी देशाच्या तरुणाईला शेवटच्या घटका मोजायला भाग पाडतेय. FDI ने बेरोजगारी कमी होईल की नव्याने सरकारने लादलेली बेरोजगारी निर्माण होईल. याचा विचार या देशाची सरकार करणार की नाही. जग भारताकडे निश्चित बाजारपेठ म्हणूनच बघते. तुम्ही जगाकडे तुमच्या देशी वस्तुंची बाजारपेठ म्हणून केव्हा बघणार ? आज ग्रामिण अर्थव्यवस्था संपुष्टात आली. शहरी अर्थव्यवस्था गरिबांचे रक्त पित आहे. खेडे ओसाड पडून, शहरे फोफावत आहेत. समाजाचा आर्थिक समतोल साधणारे कृषी प्रक्रीया उद्योग संपुष्टात आलेत. ग्रामीण कुशल कारागिर रिकामे पडलेत. व देशाच्या टांकसाळीतील हक्काचे तारणाचे सोने मंदीरातून लुटले जाऊ लागलेत. कुशलता मंदीराची घंटा वाजवून "घोकपट्टीचे मेरीट" शिक्षणसंस्थेतून बाहेर काढू लागली. व खरी कुशल विद्वत्ता आत्महत्या करीत आहे.  हा असमतोलपणा संतुलित करण्यात FDI कामात येणार का ? की, स्थानिक उद्योगांना मोडून आम्ही विदेशी पाहुण्यांना आमच्या डोक्यावर आणून बसविणार आहोत ? देशातल्या तरुण, सुशिक्षित वर्गाला विश्वासात घेऊन आम्ही अर्थव्यवस्थेची वाट चोखाळणार आहोत ? की, फक्त नरेंद्र मोदी विकास म्हणतो, भाजप विकास म्हणते म्हणून वाट्टेल तो खेळ भारतीयांसोबत करणार आहोत ? याचे उत्तर आम्हाला या मनुवादी अर्थव्यवस्थेच्या शेखचिल्ली सरकार कडून घ्यावे लागणार आहे.

विदेशी व्यापारी, कारखानदार, उद्योगपतींच्या भेटी घेणारे प्रवासी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जरा निवासी प्रधानमंत्री बनून देशी शेतकरी, कामगार, बेरोजगारांच्या भेटी घ्या. व शेती व्यापार, शेती उद्योग व शेती कारखाने निर्माण करण्याकडे लक्ष द्या. आपल्या मनुवादी अर्थशास्त्रात थोडासा भर घालून ज्यांनी देशाची अमुल्य अशी स्थावर खनिज मालमत्ता (जल, जंगल, जमिन) सुरक्षित करून ठेवली आहे त्यांचे आभार माना. तुमची पिढी त्यांचे आभार मानणार नाही. परंतु भविष्याच्या अनेक पिढ्या त्यांचे आभार मानतील. प्रवासी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जरा देशातल्या नागरिकांच्या विनंतीला मान देऊन निवासी प्रधानमंत्री बनून देशांतर्गत अर्थव्यवस्थेला सुदृढ बनविण्यासाठी मोलाचे योगदान द्या. परदेशी अर्थव्यवस्थेची काळजी करू नका. परदेशी व्यापारी अर्थव्यवस्था देशात आणून देशातल्या युवकांना रोजगार मिळणार नाही. देशातल्या युवकांना रोजगाराच्या संधी विदेशात उपलब्ध होतात परंतु स्व:देशात त्यांना रोजगार मिळत नाही हे आजच्या युवकांपुढील मोठे आव्हान आहे. या आव्हानाला हा देश व ही अर्थव्यवस्था स्वीकारणार कि नाही ? यावर देशाचे भविष्य निर्भर राहील.

आंररराष्ट्रीय अलिप्ततावाद हा सुरवातीच्या काळात भारतासाठी योग्यच होता कारण भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. पण आज अलिप्ततावाद योग्य नाही. खंबीर भूमिका घेणे गरजेचे आहे. भारतीय अर्थव्यवस्था आज आंतरराष्ट्रीय संबंधाला आपल्याकडे आकर्षित करते आहे. अशा परिस्थितीत भारतीय प्रवासी प्रधानमंत्री विदेश दौऱ्यावर जाऊन काय साध्य करतात हेच कळायला मार्ग नाही. अलिप्ततावादाचे दुसरे एक कारण असे होते की, भारताचे सिमावर्ती देश व त्या देशातली कट्टरवादी मानसिकता, सोबतच बंडखोर प्रवृत्ती. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षा व सुव्यवस्थेला आव्हाण होते. पण आज तशी परिस्थिती राहीलेली नाही. सिमावर्ती भागात चाललेली घुसपेठ व शक्तीप्रदर्शन वगळता अंतर्गत सुव्यवस्थेला कुठलाही धोका नाही. परंतु परदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली भारताचे प्रवासी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेला पोकळ करीत आहेत. याचे परिणाम तात्कालिन परिस्थीतीत दिसत नसले, तरी भारताच्या अर्थव्यवस्थेवर दुरगामी परिणाम करणारे ठरतील. देशाचा सामाजिक व आर्थिक ढाचा कोसळून पडेल एवढे मात्र निश्चीत. अंतर्गत अर्थव्यवस्था परकिय गुंतवणुकीने मोडकळीस निघेल व देशात आर्थिक विषमतेची दरी आणखीच रुंदावत जाईल. शेतकरी देशोधडीला लागेल. लघुउद्योग संपल्यात जमा होतील. चिंतेचा खरा विषय हा आहे की, देशाचे प्रवासी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी सततच्या विदेश यात्रा गुंतवणूकीच्या नावावर करीत असतांना या देशातले निवासी अर्थशास्त्रज्ञ, अभ्यासक, आर्थिक विश्लेषक गाळ झोपेत आहेत. यांना गाळ झोपेत ठेवल्या गेले आहे की झोपवल्या गेले आहेत. हाच खरा चिंतेचा विषय आहे. परंतु दुसरीकडे विदेशी गुंतवणूक आणण्याच्या नादात नरेंद्र मोदी विदेशात फिरत असतांना मल्या, मोदी, चौकसी सारखे देशातले गुंतवणूकदार देशातली संपत्ती घेऊन विदेशात पळून गेले. देशाची गंगाजळी खाली करून विदेशात पळणाऱ्या या देशी पाहुण्यांची व्यवस्था करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विदेशात फिरत होते कि त्यांची विदेशात व्यवस्था करून देण्यासाठी जात होते ? हे आता देशातल्या जनतेने वेळीच ओळखून घेतले पाहिजे.

देशाचा आर्थिक ढाचा कोसळू द्यायचा नसेल, तर भारताच्या प्रवासी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांना निवासी प्रधानमंत्री बनविण्याचा सल्ला कुठल्यातरी अर्थशास्त्रज्ञांनी देणे गरजेचे आहे. देशाचे प्रवासी प्रधानमंत्री लवकरच निवासी प्रधानमंत्री बनतील यासाठी हवाई ट्राफीक जाम करणारा संशोधक आम्हाला शोधावा लागेल. परंतु तो शोधूनही सापडत नाही अशा परिस्थिती प्रवासी प्रधानमंत्री म्हणून २०१४ ला सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी व भाजप सरकारला कायमचे प्रवासी बनविल्याशिवाय व देशात निवासी सरकार सत्तेवर बसविल्याशिवाय शाश्वत अर्थव्यवस्था स्थिरस्थावर होणार नाही. आज देशात जे काही चाललेले आहे ते फक्त एक स्वप्नवत दिवास्वप्नच आहे. जनतेला वेठीस धरून जनतेचे रक्त शोषून घेतले जात आहे. योजनांच्या नावाखाली लुबाडणूक चालविली जात आहे. एका कुटुंबाची अर्थव्यवस्था ज्याला चालविता आली नाही तो देशाची अर्थव्यवस्था चालवायला लागलेला आहे. भाजीपाला कुठल्या भावात मिळतो ? धान्याचा काय भाव आहे ? किराणा घ्यायला किती पैसे लागतात ? एकंदरीत सामान्य माणसाच्या रोजच्या जेवणाला किती पैसे लागतात ? हे ज्याला माहित नाही अशी व्यक्ती विकास नावाची जादूची कांडी फिरवून रोज सामान्य माणसांना मारून देशाचे पोट भरायचे स्वप्न दाखवायला निघालेला आहे. व अशा शेखचिल्ली माणसाच्या हातात जनतेने देश सोपवून स्वतःच्या जगण्या-मरण्याचाच डाव खेळला आहे. हा डाव आम्हाला परत खेळता येणार नाही.

मुळात मनुवादाच्या कुशीत वाढलेल्या नरेंद्र मोदी यांना व मनुस्मृतीच्या कुंडीत वाढलेल्या भाजप ला इथल्या शाश्वत अर्थव्यवस्थेला संपवून मनुवादी अर्थव्यवस्था निर्माण करायची आहे. जी सामान्य माणसांचा विचार करणारी नसेल तर समाजातील काही उच्चपदस्थ माणसांसाठी सामान्य माणसांना पायदळी तुडवून वर्णवर्चस्ववादी व्यवस्था निर्माण करायची आहे. काहींना मालक बनवून काहींना गुलाम बनवायचे आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरी अर्थशास्त्रच या देशाला शाश्वत विकासाकडे घेऊन जाणारे आहे. सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाचा विचार करणारे, सामान्य माणसांमध्ये समान आर्थिक वितरणाची व्यवस्था निर्माण करणारे, खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचा समतोल साधणारे, देशाच्या साधन संपत्तीवर सामान्य माणसांचा हक्क व अधिकार सांगणारे, मानवी जीवनाची आर्थिक मूल्य संविधानात निर्धारित करणारे आंबेडकरी अर्थशास्त्र या देशाला मनुवादी अर्थशास्त्र लाडू पाहणाऱ्या नरेंद्र मोदी/भाजप सरकारच्या तावडीतून सोडवू शकते. त्यासाठी मनुवादी अर्थव्यवस्थेला लाथाडून आंबेडकरी संविधानिक अर्थव्यवस्था परत स्वीकारण्याची गरज आहे. आणि म्हणूनच मनुवादी अर्थव्यवस्था लादू पाहणाऱ्या या शेखचिल्ली सरकारच्या हातात या देशाची सत्ता परत जाणार नाही याची काळजी आम्हा सर्वांना घ्यायची आहे. तेव्हाच देशात शाश्वत विकासाचे वारे वाहू लागतील हे भारतीयांनी लक्षात घ्यावे.
                 adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.


#Once_Again_Ambedkar
आधुनिक अलिबाबा आणि चाळीस चोरांच्या राज्यात
२०१९ च्या निवडणुका (वंचित) जनता विरुद्ध आरएसएस, भाजप, मोदी.
                                         ---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.                       

अलिबाबा आणि चाळीस चोरांची कहाणी आपण सर्वांनी पाहिली, वाचली व ऐकली आहे. पण आधुनिक भारतातही हल्ली अलिबाबा आणि चाळीस चोरांची आधुनिक कहाणी पुन्हा आपल्यासमोर येत आहे. संविधानाने प्रत्येक भारतीयांना दिलेल्या संविधानिक हक्क, अधिकार, समान वितरणाची व्यवस्था हिसकावून भारतीयांच्या संपत्तीवरच डाका टाकलेला आहे. चाळीस चोरांची टोळी तर आपल्यात जागोजागी दिसून पडेल परंतु आधुनिक अलिबाबा शोधूनही सापडत नाही. देशात एकीकडे संविधानिक संपत्तीचा खजिना आहे तर दुसरीकडे भारतीय राजकारणी व त्यांच्या माध्यमातून चाळीस चोरांनी लुटून ठेवलेल्या संपत्तीचा खजिना आहे. या संपत्तीचा वाटा भारतीयांना अजून प्राप्त करायचा आहे. आज चाळीस चोरांच्या राज्यात वावरणारी जनतेला अलिबाबा बनून आपला वाटा प्राप्त करण्यासाठी या चाळीस चोरांच्या टोळीने निर्माण केलेल्या गुहेत घुसून २०१९ ला ‘खुल जा सीम सीम’ म्हणण्याची वेळ आली आहे.

परंतु असा संकल्प करतांनाच अलिबाबा च्या भावाच्या रुपात असलेले कासिम सारखे स्वार्थी आपल्या आजूबाजूला सभोवताल दिसून येतील. जे स्वतःच्या स्वार्थासाठी या चाळीस चोरांच्या संपत्तीवर एकटाच डल्ला मारण्याचा प्रयत्न करतील. या आधुनिक कासिमांनाही आम्हाला ओळखावे लागेल. या कासीम च्या औलादिंना आधुनिक चाळीस चोरांची टोळी अभय देईल अशा भ्रमात ते समाजाला भ्रमित करीत आहेत. पण कहाणीतील कासीमचा चाळीस चोरांच्या टोळीने ज्याप्रमाणे वध केला व मुंडके वस्तीतल्या चौकात लटकावून जनतेमध्ये धाक निर्माण केला. तशीच परिस्थिती आज आधुनिक चाळीस चोरांच्या राजकीय टोळीने भारतीयांची केलेली आहे. ही आधुनिक राजकीय उद्योजक चाळीस चोरांची टोळी २०१४ पासून भारतीयांना घाबरविण्याचाच प्रयत्न करीत आहेत. जनता घाबरलेली असावी व ही घाबरलेली जनता आधुनिक चाळीस चोरांनी जमा केलेल्या संपत्तीवर आपला हक्क सांगू नये व मुकाट्याने स्वतःला यांच्यावर लुटून द्यावे याच दिशेने आज पाऊले टाकली जात आहेत. या पावलांना तोडल्याशिवाय भारतीयांना, देशातल्या वंचितांना, मागास घटकांना त्यांचा वाटा मिळणार नाही.

२०१४ च्या दिव्यप्रतापी घोषणा, जुमले, लबाडी सारेच काही अद्यापही आम्ही विसरलेलो नाहीत. कोंबडी मारून खायची असेल तर दाणे टाकून जवळ बोलावून तिचा घात केला जातो. तसेच निवडणुकांच्या काळात मतदारांना दाणे टाकून आपल्या बाजूने मते वळविण्याचा प्रयत्न केला जातो. व एकदा का हा मतदार यांनी टाकलेल्या जाळ्यात अडकला कि पुढचे ५ वर्ष त्याच जनेतेला / मतदारांना मारून ही प्रस्थापित राजकीय चाळीस चोरांची टोळी जगत असते. २०१४ पासून देशात निर्माण झालेले वातावरण, धार्मिक उन्माद, देशात तयार झालेली असहिष्णुता, वंचित आणि मागास घटकांचे घेतले गेलेले बळी व झालेले हल्ले, नागरिकांना दिल्या गेलेल्या सामाजिक, आर्थिक जखमा इ. सर्व बघितले तर नागरिकांचा घात केला गेला हे निर्विवाद सत्य ठरते. या अनुभवातून आम्ही काय धडा घेऊन २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांना पुढे जातो त्यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

२०१९ च्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. परत एकदा मोदी टोळीने जनतेसमोर दाणे टाकायला सुरवात केलेली आहे. त्या संदर्भाने मिडियातून बातम्या पेरल्या जात आहेत. काही निर्णय घेतले जात आहेत. उद्देश एकच आहे तो म्हणजे काही दिवसांसाठी मतदारांना पिंजऱ्यात कैद करायचे व निवडणुका संपल्या व सत्ता हाती आली कि, मतदारांची तंदुरी बनवून पुढचे ५ वर्ष खात राहायचे. केव्हापर्यंत आम्ही यांच्या ताटातली तंदुरी बनून लोकशाहीचे गीत गात राहायचे कि या चोरांच्या टोळीकडून लोकशाहीच हिसकावून घेऊन जनतेच्या हातात द्यायची याचा विचार आम्हाला पुढच्या काळात करायचा आहे.

अलीकडे ४ हजार रुपये शेतकऱ्यांना महिन्याकाठी दिले जातील. १० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशा स्वरूपाच्या बातम्या पेरल्या गेल्या. कसे दिले जातील ? कशाचे दिले जातील ? मानधन असेल कि कर्ज असेल ? पेन्शन असेल कि अनुदान असेल ? सगळे काही गुलदस्त्यात. पण त्यासोबतच तसा निर्णय होईल कि नाही ? कि तो सुद्धा एक जुमलाच असेल हे निश्चित कुणालाच सांगता येणार नाही. असे निर्णय धोरणात्मक होतांना कधीच दिसून आले नाही. निवडणुकांच्या तोंडावर पैशाचे आमिष म्हणजे पैसे देऊन मत मिळविणे यापेक्षा दुसरी काय अपेक्षा आम्हाला मोदींसारख्या राजकीय चोरांच्या टोळीकडून करता येण्यासारखी आहे.

दुसरीकडे आर्थिक दुर्बल सवर्णांना १० % आरक्षणाची घोषणा मोदींनी केली. या घोषणेला १ दिवस लोटत नाही, तोच लोकसभेत आर्थिक दुर्बल सवर्णांना १० % आरक्षण देणारे विधेयक पारित होते. देशाच्या लोकसंख्येत जेमतेम १० ते १२ टक्के प्रमाण असलेल्या सवर्णांना थेट १० % आरक्षण आर्थिक आधारावर दिल्या जाते. सवर्णांच्या लोकसंख्येत जेमतेम २ ते ३ टक्के आर्थिक दुर्बल घटक असतील असे गृहीत धरले तरीही १० % आरक्षण म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात ३ ते ५ पट आरक्षणाचा लाभ त्यांना घेता येईल. याचाच अर्थ असा होतो कि परत कुठल्या तरी दुर्बल आरक्षित वर्गाचे गळे कापून सवर्ण हित साधून घेता येईल. भारताच्या संविधानात आरक्षण आर्थिक आधारावर दिले जाऊ शकत नाही. आरक्षणाचा आधार सामाजिक दुर्बलता हा आहे. असे असतांना देखील आर्थिक आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचा केला जाणारा हा प्रयत्न म्हणजे सामाजिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण घेणाऱ्या समाजाचा सामुहीक वध करण्याच्या षड्यंत्राचाच हा एक भाग आहे. आर्थिक दुर्बलता ठरविण्याचे एकमेव साधन म्हणजे त्या व्यक्तीचा किंवा कुटुंबप्रमुखाचा ‘उत्पन्न दाखला’. आता हा ‘उत्पन्न दाखला’ बाजारात १०० ते ५०० रु. च्या भावाने सर्रास विकला जातो. प्रत्येक तहसील कार्यालयाच्या आवारात १०० ते ५०० रु. भावात पाहिजे तेवढा ‘उत्पन्न दाखला’ मिळवून देणारे दुकाने थाटलेली दिसतील. व आर्थिक निकषावर आरक्षण घेणाऱ्यांच्या स्पर्धेत सर्वच लाभार्थी होतील. तेव्हा संविधानिक आरक्षणावर असंवैधानिक सवर्ण आरक्षणाने केलेला कब्जा कसा दूर होईल ? वारंवार आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करणारी आरएसएस मानसिकतेची टोळी आमच्या या प्रश्नाचे उत्तर देईल का ?

काय विचित्र अवस्था आहे या देशाची बघा. आर्थिक दुर्बलतेला कंटाळून, कर्जाच्या बोझ्याखाली दररोज इथला शेतकरी आत्महत्या करतो आहे. फाशी घेतो आहे. फासावर लटकाविला जातो आहे. मारल्या जातो आहे. भूमिहीन, अल्पभूधारक, कष्टकरी, शेतमजूर रोज मरतो. परंतु त्याला त्याच्या या दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण भेटू शकत नाही. कारण आर्थिक दुर्बलतेने मरणारा शेतकरी आर्थिक निकषावरच्या आरक्षणात बसत नाही. परंतु पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलेल्या विधानानुसार देशातील सामाजिक आरक्षणाच्या व्यवस्थेमुळे सवर्णांची मुले विदेशात स्थायी होऊ लागली आहेत. ही विदेशात स्थायी होणारी सवर्णांची मुले आर्थिक दुर्बलतेच्या निकषात बसतात व त्यांच्यासाठी सरकारला १० % आर्थिक आरक्षणाची तरतूद करावी लागते.

यावरून हेच लक्षात येते कि, सवर्णांची सत्ता सवर्णांचे हित जपेल कि फाटक्या धोतरात शेताच्या धुऱ्यावर फासावर लटकणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी काम करेल ? फाटक्या धोतराचा विचार करणारा फुले शाहू आंबेडकरांचा देश होता, तर सुट, बूट घालून विदेशात शिक्षण घ्यायला जाणाऱ्या सवर्णांचा मोदीचा देश आहे. या मोदी, भाजप, आरएसएस च्या देशात फाटक्या धोतराच्या अजून चिंध्या केल्या जातील. चिंध्या पांघरून सोने विकणारा माझा शेतकरी कायम दुर्बलतेने मारला जातो आहे. व सोने पांघरून चिंध्या विकणारा सवर्ण विदेशात स्थायी होत आहे. हाच काय तो माझा भारत देश आधुनिक पिढीसमोर उभा केला गेला आहे.

चिंध्या विकणाऱ्यांचे नेतृत्व करणारे मोदी म्हणतात २०१९ च्या निवडणुका या जनता विरुद्ध महाआघाडी अशा होतील. बघा देशाला कसे फसविले जाते. आर्थिक निकषावर सवर्णांना १० % आरक्षण देणारे विधेयक लोकसभेमध्ये ठेवले जाते तेव्हा विधेयकाच्या बाजूने ४१५ मते पडतात. फक्त मोदी हेच सवर्णांचे नेतृत्व करतात असे गृहीत धरले तर भाजप सरकारकडे २७६ जागाच आहेत. त्यातही सवर्णांचे प्रतिनिधी किती ? परंतु त्या सर्वांनी मोदी सरकारच्या सवर्ण बाजूने मतदान केले असेल तरीही (४१५-२७६ = १३९ ) ही १३९ मते सवर्ण आरक्षणाच्या बाजूने कुणी दिले ? कुठल्या कुठल्या पक्षाच्या उमेदवारांनी आर्थिक निकषावर सवर्ण आरक्षणाला मते दिली. लोकसभेतल्या ५४५ सभासदांमध्ये ४१५ सभासद सवर्ण धार्जिणे, सवर्णांचे गुलाम कसे काय बनले ? सामाजिक आरक्षणाचा लाभ घेणारे दलित, आदिवासी, मागासवर्गीय (ओबीसी) लोकसभेमध्ये फक्त (५४५-४१५ = १३०) १३० च्या संख्येतच आहेत का ? याचाच अर्थ बेंबीच्या देठापासून भाजप / आरएसएस / मोदी सरकारच्या विरोधात रान माजविणारे कॉंग्रेस व तत्सम विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा सवर्ण आरक्षणाला होकार दिला. याचाच अर्थ ते सुद्धा सवर्णांचेच प्रतिनिधित्व करतात. दुर्बलांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणारे व स्वतःला परिवर्तनवादी विचारांचे सांगणारे रामदास आठवले, रामविलास पासवान व मायावती सारखे बेगडी नेते व त्यांचे पक्ष हे सवर्ण आरक्षणाच्या बाजूने उभे होत असतील तर या देशातल्या संविधानप्रेमी नागरिकांना मग प्रश्न असा पडतो कि, लोकसभेत दलित, वंचित, मागास, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, महिला, मजुरांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत कि नाही ? यांचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष आहेत कि नाही ? कि या वर्गाने फक्त घाण्याचा बैल बनून दर पंचवार्षिक योजनेप्रमाणे नित्यनेमाने सवर्णांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांच्या उमेदवारांना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फक्त मतदान करायचे ? २०१४ ला केले आता २०१९ ला करायचे ? व आपल्या फाटक्या धोतराच्या चिंध्या बनवून दुर्बलतेची लक्तरे दिवसागणिक वर्षोनिवर्षे वेशीवरच टांगायची ?

बंधुंनो, ही निर्णयात्मक परिस्थिती आहे. हा निर्णयाचा काळ आहे. अनेक वर्षांपासून महिला राजकीय आरक्षणाचा विषय रेंगाळत पडला आहे. अनेकदा संसदेच्या पटलावर आला व आपटला आहे. या विधेयकाच्या बाजूने मतदान करायला सवर्णांच्या पार्ट्या व त्यांचे प्रतिनिधित्व करणारे सभासद पुढे धजावत नाही. परंतु सबळ व हजारो वर्षांपासून सुबत्तेने परिपूर्ण असलेल्या सवर्ण वर्गाला आर्थिक दुर्बल बनवून आरक्षण देण्यासाठी पुढे येतात. तेव्हा या देशातली समानता व न्याय ऑनर किलिंग ने मारली जाते. अश्या परिस्थितीत खरच २०१९ च्या निवडणुका या जनता विरुद्ध महाआघाडी अशा होतील का ? कि आम्हाला फक्त फसविले जात आहे. याचा विचार या दलित, वंचित, मागास, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, महिला व मजुरांनी करावा.

१० % दुर्बल सवर्ण आर्थिक आरक्षणाने देशातील सामाजिक व राजकीय मानसिकतेचे स्पष्टीकरण केलेले आहे. या देशाचे नेतृत्व इथला बहुजन करीत नसून सवर्णच करीत आहेत. बहुजन वर्गातील या पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे गुलाम हे त्याठिकाणी बहुजनांच्या अधिकार व हक्कासाठी व त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जात नसून ते कॉंग्रेस, भाजप सारख्या सवर्ण धार्जिण्या पक्षांची गुलामी करण्यासाठी जातात. हेच सिद्ध होत आहे. अशा परिस्थितीत या चाळीस चोरांच्या टोळीविरुद्ध बंद पुकारून दलित, आदिवासी, वंचित, मागास, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, महिला व मजुरांच्या हक्कासाठी, इतके वर्ष ज्यांनी या वर्गाला लुबाडले त्यांना त्यांचा वाटा परत मिळवून देण्यासाठी आम्हाला वंचितांना न्याय मिळवून देणारा पर्याय निवडावा लागणार आहे. महागटबंधन कि महाआघाडी, भाजप कि कॉंग्रेस, या भूलभुलय्या चक्रव्युहात न सापडता तिसरा पर्याय स्वतःसाठी निर्माण करावा लागणार आहे. पर्याय उपलब्ध असेल तर तो निवडावा लागणार आहे.  व २०१९ च्या निवडणुका दलित, आदिवासी, मागास, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, महिला व मजुर (वंचित) जनता  विरुद्ध आरएसएस, भाजप, मोदी, कॉंग्रेस, सवर्ण अशा लढाव्या लागणार आहे. तेव्हाच देशाचे संविधान व ही लोकशाही फलद्रूप होईल. देशातल्या जनतेला अलिबाबा चा निर्धारित वाटा प्राप्त होईल. व चाळीस चोरांच्या टोळीने जमविलेला संपत्तीचा साठा देशातील नागरिकांमध्ये समप्रमाणात वितरीत होईल. ही झुंज निकराची आहे. ही लढाई अस्तित्वाची आहे. ही वाटचाल स्वाभिमानाची आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, भाजप/आरएसएस (सवर्ण धार्जिणे सर्वच) विरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या आहेत. वंचीतांनो, दुर्बलांनो ही लढाई तुमच्या भवितव्याची आहे याचा विसर पडू देऊ नका. तेव्हाच तुम्हाला तुमचा या देशातून हिरावलेला वाटा परत मिळेल. हे लक्षात ठेवा.
                                                                            adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

Wednesday, 9 January 2019

देशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.


#Once_Again_Ambedkar
देशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.
                                         ---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.                       

देशाचा व व्यवस्थेचा कुठलाही धर्म राहणार नाही हे भारतीय संविधानाने घोषीत केले असले तरी माणसाला धर्म असतो हे त्याच संविधानाने मान्य केले आहे. त्यामुळे "व्यवस्था ही ज्या माणसांच्या हातात येते तेव्हा त्या माणसाचा धर्म त्या व्यवस्थेला येतो." हे निर्विवाद सत्य कुणी नाकारू शकते का ? आज प्रत्येक माणुस धर्मातच जन्मतो. त्यामुळे त्याच्यावर त्याच धर्माचे संस्कार बालपणापासून पडत असतात. मग आयुष्यभर तो त्याच संस्कारांना उराशी बाळगून जगत असतो. त्याच्या संवेदना, बांधीलकी, आपुलकी, न्याय हेसुद्धा त्याच धर्माच्या चौकटीत बंधीस्त असते. (तुरळक अपवाद वगळता.) जातिव्यवस्थेसारखे लांछन ज्या समाजव्यवस्थेत फोफावलेले आहे त्या समाजव्यवस्थेत धर्म हे विषच ठरते. कितीही कायद्याच्या, समानतेच्या व समान न्यायाच्या बाजू उचलून धरल्या तरीही माणुस धर्मसंस्कारानेच संचालित होतो. मग न्यायालयातला न्यायाधीश असो की देशाचा पंतप्रधान किंवा पोलिस असो की अधिकारी, बाबू असो की चपरासी त्याच्या न्यायदानाचे व कार्याचे पहीले मेरीट (प्राधान्य) जात व धर्म हेच असते. कारण त्यांच्या संवेदना जातीत व धर्मात बंधिस्त आहेत. हे जर रोजच्या आकलनातले वास्तव सत्य असेल तर समान न्यायाच्या वल्गना करून आम्ही आपलीच फसगत करीत आहोत. असे वाटत नाही का ?
जाती-धर्म टिकवून आम्ही प्रशासनिक भरती करीत असू तर न्यायाची अपेक्षा माणसांकडून करायची की त्याच्या जाती-धर्माकडून करायची ? हा यक्षप्रश्न माझ्यापुढे पडतो. तो प्रश्न तुमच्यापुढेही असेल असे गृहीत धरण्यास हरकत नाही. कारण न्याय हा देणा-यांच्या जातीय-धार्मिक संवेदनांवरूनच ठरेलेला असेल. एवढे निश्चितच. व्यवस्था बदलाच्या व परिवर्तनाच्या लढाया आम्ही कुठल्या आधारावर लढतोय ? समान न्यायाची अपेक्षा कुठल्या आधारावर करतोय ? माणसांवर विश्वास ठेऊन की त्याच्या जातीय-धार्मिक संवेदनांवर विश्वास ठेऊन ? हे अन्यायाचे उघड पण छुपे प्रतिमान नाही का ?
रोहीत वेमुलाची आत्महत्या नव्हती तर तो एक राजकीय खुनाचा बळी ठरला. तर भीमा कोरेगाव येथे झालेला हल्ला हा देखील पूर्वनियोजित राजकीय षड्यंत्राचाच भाग होता. हे आता निर्विवाद सत्य आहे. तो एका सरकारी/राजकीय खूनाचा व हल्ल्याचा प्रकार होता. काहींना राजकीय भांडवल मिळाले तर काहींना सत्तेचा पुरस्कार रोहीतमुळे मिळाला व पुढे मिळणार. पण या सर्वात दलित समाजाला काय मिळाले ? तर शून्य...आणि फक्त शून्य...असे खून अनेक झालेत व पुढेही होत राहतील. त्यांच्या राजकीय सत्तेचा तो मार्ग आहे. पण दलित समाज मात्र राजकीय अक्कलशून्यतेने ग्रासला असल्याने तो कायम पिडीत राहील. खून करणारे सत्तेत बसतील तर ज्यांचा खून होईल ते कायम जमिनीतच गाडले जातील. राजकीय खून करणारे आज सत्तेत आहेत तर ज्या दलित समाजातल्या माणसांचा खून झाला ते कायम आंदोलनात उतरून निवडणूकांत विकले गेले. कुणी विकले या समाजाला ? कुणी राजकीय सौदा केला खूनाचा ? कोण जबाबदार या राजकीय खूनाला ? अन्यायाचे भांडवल करून कुणी कुणी आपले सामाजिक भांडवल करून घेतले ? व त्या आंदोलनातल्या गर्दीचा सौदा करून निवडणूकीतल्या खाऊचा पैसा कुणी गोळा केला ? कोण कोण आहेत ते समाजकारणी ? कोणकोणत्या आहेत त्या सामाजिक संघटना ? स्वत:ला दलित व दलितांच्या कैवारी म्हणून घेणाऱ्या त्या संघटना कोणत्या ? कोण त्याचे म्होरके ? का केला जातो दलितांवर होणाऱ्या अन्यायाचा सौदा ? कोण जबाबदार दलितांवर होणाऱ्या अन्यायाला व त्यांच्या खूनाला ? उत्तर शोधावेच लागेल.
रमाई हत्याकांड झाले, खैरलांजी झाली, बुद्धगया बॉम्बस्फोट झाले, जवखेडा झाला, शिर्डी झाली, हैद्राबादचा रोहीतचा खून झाला आणि १ जानेवारी २०१७ ला भीमा कोरेगाव येथे जमलेल्या लाखो वंचित समूहावर हल्ला झाला. अजून भविष्यात ही यादी वाढत जाणार. व दलित समाज मुक मोर्चे, शांती मार्च, सर्वपक्षीय / सर्वसंघटनांचे मोर्चे निघत राहणार. या मोर्चांमध्ये राजकीय नेतृत्वावर आगपाखड होणार, निषेध होणार व या मोर्चाचे नेतृत्व करणारे ढोंगी समाजकारणी या मोर्चातल्या गर्दीचा सौदा निवडणुकीत करणार व पून्हा राजकीय पक्षांच्या नेतृत्वाला बदनाम करून पून्हा एक हल्ला होण्याची वाट बघत राहणार. पून्हा सर्वपक्षीय / सर्वसंघटनांचे मोर्चे काढणार, मोर्चाच्या नावावर पैसे गोळा करणार, त्या मोर्चाचे नेतृत्व करू पाहणार व पून्हा नेत्यांना बदनाम करून मोकळा होणार. हे चक्र असेल सुरू राहणार जोपर्यंत दलितांमध्ये राजकीय अक्कलशून्यता आहे. अन्याय - अत्याचाराचे भांडवल करून मोर्चेकरी झालेले समाजकारणी समाजाचा सौदा करतात. आजपर्यंत सामाजिक आंदोलनाचे नेतृत्व केले ते ढीसाळ समाजकारणी ढोंग्यांनी. निकाल काय तर २०१४ च्या निवडणुकांमध्ये हे लाखभर लोकांच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे त्या लाख लोकांच्या मताचा सौदा करून मोकळे झाले व दलितांचे पक्ष व उमेदवार हजाराच्या पुढे गेले नाहीत. व पून्हा सत्तेवर यांनी कुणाला बसविले तर त्याच अन्यायकर्त्यांना.
दलितांवर झालेल्या अन्याय अत्याचाराचे भांडवल जितके रिपब्लिकन नेत्यांनी केले नाही त्यापेक्षा जास्त या बेगडी समाजकारण्यांनी व छोट्या छोट्या संघटनांचे दुकान काढून बसलेल्या समाजकारण्यांनी केले आहे. नेत्यांविरूद्ध द्वेष व आपल्याप्रती सहानुभूती  मिळवून यांनी समाजाच्या भावना विकल्या. सामान्य माणसाने केलेला विद्रोह विकला. दलितांना झालेल्या जखमाही यांनीच विकल्या. अशा समाजद्रोही समाजकारण्यांपासून दलित समाज सावध होणार की नाही ?
चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या संदर्भाने पसरविण्यात येत असलेले आंबेडकरी विचार ख-या अर्थाने आंबेडकरी चळवळीसाठी धोक्याचे ठरले आहे. भाषणातून लोकांनी सांगितलेले बाबासाहेब समाजाने प्रमाण मानले असल्याने खरे बाबासाहेब मांडणा-यांना त्रास होणार आहे. तो त्रास घेण्याची तयारी जर काहींनी आपल्या खांद्यावर घेतली तर दुकानदा-या चालविण्यासाठी आणि आपापसात फाटाफूट पाडण्यासाठी थाटण्यात आलेले संघटनरुपी दुकाने बंद होतील. आणि एक नवीन प्रवाह या चळवळीसाठी तयार करता येईल. अभ्यासू, तरुण आणि तात्त्विक विचारांची बैठक असणारी माणसे एकत्र करून आंबेडकरी चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. काहीच्या भावनिक आंदोलनाला बळी पडलेला तरुण वर्गाला त्या भावनिक संमोहनातून बाहेर काढावे लागणार आहे. आंबेडकरी चळवळीतील तरुणांची कल्पनाशक्ती आणि तार्किक बुद्धी वेठीस धरण्यात आली आहे. त्यामुळे या तरुणांना योग्य काय आणि अयोग्य काय हे आंबेडकरी विचारांच्या आधारे तपासून पाहताच येत नाही. त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या तरुण वर्गाचा विश्वास संपादन करावे लागणार आहे. कधी प्रखर होऊन तर कधी सौम्य मार्गाने. कारण यांनी स्वतः कधी बाबासाहेबाच्या विचारांचे वाचन केलेले नाही. पण कॅडर च्या माध्यमातून ऐकलेल्या बाबासाहेबांना यांनी इतके प्रचलित केले की जणू यांच्या मुखातूनच बाबासाहेब बोलत आहेत. हा प्रतीक्रांतीचा पहिला मजलाच आम्हाला उडवावा लागणार आहे. बाकीचे मजले असेच धराशाही होतील.
दुसरा एक तरुणांचा वर्ग आहे जो आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीपासून अलिप्त आहे. तो आर्थिक व्यवहाराच्या जगात घर आणि नौकरीमध्ये व्यस्त झालेला आहे. ज्याला वाटते की आता कुठे समाजात भेदाभेद आहे. जो स्वतःला सुरक्षित समझतो आहे. जो चळवळीतील आंदोलनाला निरर्थक संबोधतो आहे. जो चळवळीपासून दूर जातो आहे. जो रोजगाराच्या विवंचनेत, आर्थिक परिस्थितीच्या विवंचनेत विचार व चळवळीसोबत जुळत नाही. अश्या तरुण वर्गाला सोबत घेण्यासाठी काही आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्त्रोतांची निर्मिती करण्याची जबाबदारी आपली आहे. या चळवळीतील काहींच्या हातात सद्यस्थितीत ब-यापैकी साधन संसाधने एकवटली आहेत. या संसाधनांचा वापर उद्याच्या पिढीसाठी स्त्रोतांची निर्मिती करण्यासाठी करावा लागणार आहे. तेव्हाच या चळवळीत हा तरुण वर्ग स्वतःला सुरक्षित समजेल. समाजाची एकजूट त्यातून साध्य होईल. अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी ही या चळवळीत काम करणा-या तरुण-सुशिक्षित-विचारवंत-आर्थिक संपन्नता मिळविलेल्या लोकांची आहे. त्यांची एकजूट झाली तर समाजाला एकत्र करायला वेळ लागणार नाही.
आंबेडकरी चळवळीत आमच्या काही जबाबदा-या आहेतविचार आत्मसात करीत असतांना त्याची सत्यासत्यता पळताळून  पाहणे; शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्त्रोतांचे बळकटीकरण करणे; आधुनिक संसाधनांचा वापर कसा करता येईल याचे प्रशिक्षण घेणे व देणे. सोबतच ही आधुनिक संसाधने आपल्या हातात घेता येतील असा प्रयत्न करणे; भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून सरकारी योजना बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचविणे. शासकीय अनुदानाचा वापर करून समाजाचे आर्थिक सबलीकरण करता यावे यासाठी समाजाला मार्गदर्शन करणे; वाढत चाललेली राजकीय उदासीनता घालविण्यासाठी राजकीय प्रशिक्षण संस्था किंवा तत्सम प्रयत्न करणे; धम्मातील वाढती प्रदूषणे आणि प्रतीक्रांतीची छुपी आक्रमणे याच्या जाळ्यात हा समाज मोठ्या प्रमाणात अडकला आहे. त्याला त्यातून बाहेर काढून त्यांच्यात प्रतीक्रांतीची पाऊले ओळखण्याची कुवत निर्माण करण्यासाठी आंबेडकरी विचारातील महत्वाची आचारसंहिता समाजापर्यंत पोहोचविणे. निदान इतक्या काही गोष्टी जरी आम्हाला प्राथमिक स्तरावर करता  आल्या तर निश्चितच सद्यकालीन परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही.
हल्ली चळवळीत नवतरूण उतरतांना पाहून आनंद होतो. जरी ते बोटावर मोजण्याइतके तरूण असतील पण त्यांच्यातील समाजाविषयी व चळवळीविषयी दिसणारी तळमळ वाख्खानण्यासारखी आहे. चळवळ गतिमान राहील याचा विश्वास आहे. परंतू सोबतच चिंतेची बाब ही की, या नवतरूण पिढीचे अतिउत्साही व अतिभावनिक आंदोलनाने समाजाला व चळवळीला दूरगामी परिणाम भोगावे लागू शकते. कारण या नवतरूणांना दिशा देणारा त्यांच्यातलाच थोडा उच्चशिक्षीत किंवा अतिउत्साही नवशिखा नेतृत्वधारी या  नवतरुणांना चुकीच्या मार्गाने आंदोलनास भाग पाडून सामाजिक विद्वेष पसरविण्यास कारणीभूत ठरू शकतो. विवेकाने व भविष्याचा वेध घेऊन केलेले आंदोलन समाजात चैतन्य निर्माण करू शकते तर अविवेकाने केलेले आंदोलन मोठ्या कष्टाने उभ्या केल्या गेलेल्या चळवळीला व समाजाला धोकादायक परिस्थितीत आणू शकते. निदान याची समज आपल्या नवतरूणांत येणे गरजेचे आहे.
विरोधकांच्या कुठल्या कृतीला विरोध करायचा व कुठे करू नये ? किती प्रतिक्रीयावादी व्हायचे की प्रतिक्रीयावादी न बनता आपला  उद्देश व हेतू साध्य करायचा ? याचा विचार करणे आज गरजेचे आहे. फक्त भावनिक विरोधाने समाजहीत सुरक्षित ठेवता येत नाही. तर तत्कालिन परिस्थीतीचा आढावा घेऊन परिस्थितीसापेक्ष व्युहरचना आकारण्यातून चळवळीला सुरक्षित करता येईल. म्हणून सर्व नवतरूण मित्रांना विनंती आहे की, कुठलाही सामाजिक आंदोलनाचा किंवा प्रतिक्रीयावादी आंदोलनाची व्यूहनिती रचतांना चळवळीतील अनुभवसंपन्न कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करूनच निर्णय घ्यावा. कारण त्यांनी केलेल्या चुकासुद्धा तुम्हाला मार्गदर्शक व प्रोरणादायी ठरू शकतात. ज्यामुळे तुम्हाला तुमचे आंदोलन यशस्वी करण्यात मदत होईल. त्यामुळे भावनिकतेतून निर्णय न घेता सारासार विचारानेच आंदोलनाची आखणी करा ! तुमच्या तळमळीत, तुमच्या प्रामाणिक हेतूसोबत, तुमच्या चळवळीच्या गांभिर्यासोबत, शिवाय तुमच्या आंदोलनातही आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. फक्त घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नका हीच विनंती.
१ जानेवारी भीमा कोरेगावच्या जातीय दंगलीला आज १ वर्ष पूर्ण होईल. या संपूर्ण १ वर्षात जातीय राजकारण ढवळून निघाले असणार. परीस्थितीय सामाजिक बदल दिसून येणार. अन्याय-अत्याचार झाल्याची जाणीव जिवंत असणार. झालेल्या जखमाही ताज्या असणार. संघटीत राहिले पाहिजे याची नितांत गरज भासत असणार. न्याय मिळविण्याकडे लक्ष असेल. अन्यायाला वाचा फुटेल याची आस असेल. परंतु अन्याय करणारे राज्यकर्ते आणि सत्ताधारी कायम असतील. त्यांना कायम ठेवून आम्ही परिवर्तनाची अपेक्षा करू शकत नाही. आम्हाला न्याय पाहिजे असेल तर देशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करावा लागेल. देशाच्या व राज्याच्या राजकारणाच्या सातबाऱ्यावर भाजप किंवा कॉंग्रेस या आलटून पालटून नावे येणाऱ्या पक्षांना हद्दपार करून वंचितांच्या नावे या राजकारणाच्या सातबाऱ्याचे फेरफार करावे लागणार आहे. देशाच्या व राज्याच्या सातबाऱ्यावर वंचितांच्या नावाचे फेरफार करून जोपर्यंत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील ‘वंचित बहुजन आघाडी’ला सत्तेत बसवत नाही तोपर्यंत न्यायाची अपेक्षा करता येणार नाही. तेव्हा येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये देशाच्या व राज्याच्या राजकारणाच्या सातबाऱ्याचे फेरफार करण्यास सज्ज व्हा.
                                                                                                                 adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करा.


#Once_Again_Ambedkar
तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करा.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

"वैयक्तिक कर्तबगारी हि आदरणीय असते, पण पुष्कळ वेळा ती अनुकरणीय नसते ; म्हणूनच वैयक्तिक कर्तबगारी सामुदायिक कर्तबगारी यांच्यात तुलना करता सामुदायिक कर्तबगारी शेकडो पटींनी श्रेयस्कर ठरते. वैयक्तिक कर्तबगारी आकाशाएवढी उंच असली तरी साधारण उंचीच्या सामुदायिक कर्तबगारीच्या पासंगालाही ती पुरणार नाही." (अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. फेब्रुवारी १९२९, खंड - २० - पान . ३५) बाबासाहेबांवर होणा-या टीकेला उत्तर देण्यासाठी हा लेख तेव्हाच्या बहिष्कृत भारतात संपादकांनी लिहिला होता. अतिशय बोध घ्यावा अशी काही वाक्य मी इथे दिलेली आहेत. कारण हल्ली इथे मात्र वैयक्तिक कर्तबगारीने रान माजविले आहे. प्रत्येकाला मी किती श्रेष्ठ आणि किती समाजाचा उद्धारक हे सिद्ध करायचे आहे. ज्यांनी साधा दगडही कधी फोडला नाही. त्यांनी समाजाचे आम्हीच उद्धारक म्हणून बुद्धिभेद केला आहे. आणि मेंढरांची जमात त्याला बळी पडून वैयक्तिक कर्तबगारीचा उदोउदो करीत सुटले आहे. १९७२ नंतर ज्यांनी समाजासाठी त्याग केला ते आज समाजापासून तुटले आहेत. आणि ज्यांनी समाजाला विकून (जाती जोडो आणि वैचारिक आंदोलनाच्या नावाखाली) स्वतःची पोळी भाजून घेतली. ते आता महापुरुषांच्या रांगेत बसू लागली आहेत. सायकल वरून फिरायची लायकी नसणारे, बुद्धीने दिवाळखोर असणारे, आणि साध्या मण्याची गाटी घालायची लायकी नव्हती ते हि-याचे दागिने घालणारे समाजालाच वाडीत टाकायला निघालेत. आणि जे समाजासाठी झटले, लढले, मेले, आणि आताही तडपत आहेत ते मेंढरांच्या कळपात कुठेच नाहीत ? हे सर्व आम्ही मेंढरांची जमात बनल्यामुळे झाले आहे. जर आम्ही वैयक्तिक आणि सामुदायिक कर्तबगारी ओळखली असती तर आज ही परिस्थिती पाहायला मिळाली नसतीत्यामूळे सामूदायिक कर्तबगारी लक्षात घेऊन वाटचाल करा.
मानवी जिवनातील व्यक्तीगत मर्यादा ओळखता आल्या की सामाजिक परिस्थितीवर मात करण्याची कला अवगत होते. प्रबोधन/सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या व्यक्तीगत मर्यादांना बलस्थान समजून तेच सामाजिक परिवेशात उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यामूळे सामूहीक उर्जा असूनही या चळवळी सातत्याने अपयशी ठरत आहेत.  व्यवस्थात्मक जिवनात सामाजिक कार्य तळीस न्यायचे असेल तर व्यक्तीला प्राप्त झालेले सामाजिक, राजकिय, धार्मिक, सांस्कृतिक, साहीत्यिक याम स्विकारावे लागते. त्यांचा अंगीकार करून वाटचाल करावी लागते. कारण हे सामाजिक व्यक्तीत्वाचे मूलभूत अंग आहे. जसे शरिराचे सर्व भाग कार्यरत असले तर शरिर सुदृढ राहून व्यक्ती विकासात पोषक ठरतो. शरिराच एक भाग जरी निकामी किंवा अकार्यरत असला तर त्याला अपंगत्व बहाल होते. तसेच समाजिक व्यक्तीत्वाचे आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक यापैकी एकाचा जरी आपण तिटकारा करीत असू किंवा अस्विकार करीत असू तर सामाजिक व्यक्तीत्व अपंग, पंगू बनते. त्यामूळेच समाजही अपंगत्वाकडे वळायला लागते. अपंग समाज चळवळ चालवू शकत नाही.
व्यक्तीवादाच्या आम्ही घातलेल्या मर्यादा बाजूला सारून व्यवस्थात्मक जिवनाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास कूठल्याच गोष्टींचा तिटकारा येत नाही. सामाजिक कार्यसिद्धीला मदत होते. फक्त सामाजिक, फक्त राजकीय, फक्त धार्मिक म्हणणे ही व्यवस्थेपासून पळवाट आहे.  व्यक्तिगत मर्यादा निदर्शक होय. ते सामाजिक अपंगत्वाचे लक्षण होय. हा प्रबोधन/सुधारणावादी चळवळी समोरचा सर्वात महत्वाचा धोका लक्षात घेऊन आपण वाटचाल करूला. विजय नक्कीच मिळेल. जात संपविणे हे आमचे ध्येय असायला हवे होते. पण आपण जात संपविता जातीतच वर्गाची निर्मिती केली. तर दूसरीकडे वर्ग संपविणे ज्यांची जबाबदारी होती त्यांनी वर्ग संपविता वर्गातच जातीची निर्मिती केली. पूरोगामी विचार नेमका इथेच माघारला. एकसंघ समाज निर्मिती हे पहिले ध्येय असावे. तेव्हाच आम्ही सर्व पातळ्यांवर लढू शकतो. अन्यथा सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.
आंबेडकरी चळवळ लयाला जाण्यास परकीय शत्रूंपेक्षा जास्त अंतर्गत शत्रू कारणीभूत आहेत. हवसे गवसे नवस्यांपासून ते थेट जूणे जाणते भाषणबाज, बिनबुडाचे विचारवंत, निवृत्त प्रशासकीय अधिकारी, थोर लेखक-कवी सामा़जिक कार्यकर्ता असण्याचे बोंबा ठोकणारे . सारेच. या लोकांना ना विचार ना आचार, कुणीही बोलवा, कुठेही बोलवा हमखास जाणार. कुठलाही विषय असो छातीठोक बेंबीच्या देठापासून आंबेडकर सांगणार. जसे काही यांच्याच कानात बाबासाहेब सर्व काही सांगून गेलेत. यांना ना राजकीय पक्षाची काळजी, यांना ना सामाजिक भान, यांना ना चळवळीचे गांभिर्य, कशाचीच ना चिंता ना पर्वा, फक्त काळजी स्वतःचे मोठेपण टिकविण्याची मिरविण्याची. हेच सर्व जेव्हा समाजात येतात तेव्हा आंबेडकरी राजकीय पक्षाला नेत्यावर टिका करणार. दुसऱ्या पक्षाच्या स्टेजवर जाऊन त्यांचा ऊदोउदो करणार. समाजातल्या लोकांना हे करा ते करा असे फुकटचे सल्ले देणार स्वतःहा मात्र लाचार होऊन प्रस्थापितांसमोर पायघड्या घालणार. आज या सर्वांची अवस्था नर्तकी नर्तकांसारखी झालेली आहे. पैसे देऊन कुठल्याही गीतावर नाचायला सांगा ते नाचणार. तशीच यांची अवस्था. कुठेही जाऊन ढुंगण हालवून येणार. विचारधारेचे द्वंद्व, मतभेद, अन्याय अत्याचार सामान्य माणसाला सांगण्यासाठी मात्र यांच्या वर्तणुकीत नर्तकीचेच गूण. कुठल्या स्टेज वर जायचे, त्यातून समाजाला काय संदेश द्यायचा, चळवळीवर काय परिणाम होईल, सामान्य माणसे काय बोध घेणार यांच्याकडून कशाचीच पर्वा नाही यांना. राजकीय तडजोडू नेत्यांनी केल्या तर अख्खी मिरची पूडचा कारखाना यांच्या नाका-तोंडात गेल्यासारखे समाजात बोंबलणार नेत्याविषयी समाजात द्वेष पसरविणार. पण हे कुठल्याही संघटनेच्या, विचारांच्या स्टेजवर गेले तर यांना कुणीच काही म्हणायचे नाही ऊलट त्यांचा सन्मान किती वाढला हे दाखवून समाजातून त्याची किंमत वसूल करणार. रेड लॉईट मधल्या देहविक्रय करणाऱ्या  स्त्रियांनाही स्वाभिमान आहे पण यांना नाही. अशा सामाजातल्या किड्यांना किती दिवस पोसायचे हे ठरविणे आता गरजेचे आहे. तुम्ही चढत असलेल्या विविध-विभिन्न स्टेजवरील तुम्ही बसलेल्या जागेच्या खाली फटाके फोडायला समाजाला वेळ लागणार नाही. ती वेळ येण्याआधी सावध होऊन कुठलाही एक मार्ग निवडा, एक निश्चित भूमिका घेऊन ती वठवा. "सारे भारतीय माझे बांधव म्हणा !" पण सारे भारतीय पक्ष, संघटना, विचारधारा माझ्या म्हणू नका ! हीच कळकळीची विनंती.
तूमच्यातल्या आमच्यातल्या घरभेद्यांची ओळख होणे आज गरजेचे आहे. बिजेपी आरएसएस किंवा तत्सम संघटनांशी जूळलेले लोक म्हणतात नेता नको.  नेते कशाला ? नेतृत्व कशाला पाहीजे ? नेत्यांविषयी संभ्रम बदनामीकारक सतत बोलणारे व लिहिणारे. सामाजिक कार्याच्या नावाखाली धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून राजकीय लोकांकडून रसद मागणे व स्व आंबेडकरी राजकारणाविषयी समाजात द्वेष पसरविणारे हे लोक आहेत. हीच माणसे साहीत्यिक धार्मिक प्रदूषण पसरविण्यात पटाईत असतात.
काँग्रेस तत्सम संघटनांशी जूळलेले लोक म्हणतात, आम्ही आमचे प्रतिनिधी निवडून आणू शकत नाही. लोकशाही टिकून ठेवायची असेल तर संविधानविरोधी पक्ष सत्तेवर येऊ नये. हिंदूत्ववादी पक्ष सत्तेत आल्यास देशाला धोका आहे म्हणून तूमच्या मतांचे विभाजन करु नका. म्हणून कॉंग्रेस ला मत द्या असे म्हणतात. मार्क्सवादी तत्सम डाव्या विचाराशी जूळलेले लोक म्हणतात संविधानाने, कायद्याने काही होणार नाही म्हणून शस्त्र घेऊन लढणारे हे लोक कधी कधी जशास तसे ची भाषा बोलतात.  प्रसंगी संविधान काय कामाचे असेही म्हणतात. जातीची ओळख टिकवू पाहणारे. धर्माची ओळख टिकवून ठेवणारे. फक्त भांडवलशाहीविरूद्ध रस्ते रंगविणारे. सत्ताधारी भांडवलदार यांच्याविरोधात सदैव आंदोलन उभारणारे. परंतु संविधानिक लोकशाहीने राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी कुठलीही स्पष्ट भूमिका घेत नाही.
बिएसपी, बामसेफ तत्सम संघटनांशी जूळलेले लोक म्हणतात सत्ता आल्यावर आम्ही सर्व काही करू. सत्ता आवश्यक आहे. दलित पंतप्रधान, मूख्यमंत्री बनल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही. कूठल्याही कार्यक्रमात माणसांपेक्षा सर्व समाजसूधारकांना फोटोरूपी स्थान देणारे. बाबासाहेबांना कमी करून तत्सम महापूरूष उभे करणारे. बाबासाहेबांना प्रश्नांकीत करणारे. जिवंत व्यक्तींचे पूतळे उभारणारे. सामाजिक अन्याय अत्याचार प्रसंगी सत्ता पाहीजेच असा नारा लावणारे. परंतु आंदोलनांवर विश्वास दाखविणारे. रिपब्लिकन विचारांशी जूळलेले लोक मात्र यापेक्षा वेगळे वागतांना दिसतात. socio-politics हे प्रमाण माननारे. सत्तेची वाट बघता सामाजिक कार्यावर विश्वास ठेवणारे. सर्व समदूःखी बहूजन वर्गाला सोबत घेऊन राजकीय प्रतिनिधीत्व देणारे. सामाजिक परिवर्तनावर विश्वास ठेवून सातत्याने त्यासंबंधी कार्यक्रमाची आखणी करणारे. वर्तमानाला अभिप्रेत सामाजिक बदल सत्ताधा-यांपूढे ठेवणारे. वैचारीक नेतृत्वावर विश्वास ठेवणारे. समाजाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे यावर विश्वास असणारे. वैचारिक आंदोलनातून समाजाला प्रत्यक्ष लाभ मिळवून देणारे. संविधानावर विश्वास ठेऊन सरकारच्या असंवैधानिक अकल्याणकारी नितीवर सातत्याने प्रहार करणारे. हे लोक आहेत परंतु इच्छाशक्ती व सामुहिक नियोजनाच्या अभावाने व एक विचार एक नेतृत्व असा वैचारिक अभाव असल्याने पाहिजे तसे राजकीय व सामाजिक यश हे प्राप्त करू शकलेले नाहीत.
हल्ली आंबेडकरी अनुयायी म्हणविणारे काही फक्त जन्माने (दलित) आंबेडकरी ठरलेल्या लोकांमध्ये आंबेडकरी आंदेलने किंवा कुठलाही समकक्ष निगडीत कार्यक्रम हेटाळणीचा टवाळगिरीचा किंवा टिकाटीपणीचा विषय बनला आहे. हे सर्व करतांना आपण बाबासाहेबांचा अपमान करतो याची जाणिव ठेवता हे विद्वान चारचौघात बाबासाहेबांच्या स्मारकाविषयी, किंवा तत्सम आंदोलनाची हेटाळणी करतांना पाहून वाईट वाटते. कुठली गोष्ट चारचौघात करायची कुठली करू नये. हे या सुडो आंबेडकरी लोकांना कळत नाही. आपल्यातले हे विदूषक खरंच या चळवळीचा सत्यानाश करीत आहेत. स्वतःला सुशिक्षितपणाचा शिक्का मारून घेतलेले हे लोक, जेव्हा चळवळीला टप-यांवर नेऊन ठेवतात; तेव्हा -या कार्यकर्त्यांच्या बलिदानाचा त्यागाचा पूढच्या पिढीत विसर पडतो. हा सर्व तमाशा पाहतांना इतर लोक या परिवर्तनवादी न्यायाच्या चळवळीपासून स्वतःला दूर ठेवतात. चळवळीची हानी यामुळेच झाली आहे. या तमाशगिरांना थांबवा.
समाज नेतृत्वाशिवाय चालू शकत नाही ज्यांना नेता नाही, तो समाजाची फसवणूक करतो स्वतःची सूद्धा. वर्तमान समाजाला खंबीर पायावर उभे राहायचे असेल तर राजकीय सामाजिक नेतृत्व करणारा नेता आवश्यक आहे. आजपर्यंतच्या इतिहासात ज्या समाजाकडे राजकीय सामाजिक नेतृत्व करणारा नेता होता त्याच समाजाचे वर्चस्व समाजव्यवस्थेवर होते....आजही हेच आहे... तूम्हाला आम्हाला समाजाला नेत्याची गरज आहे. नेता आहे अस्तीत्वात तो निवडण्याची स्विकारण्याची गरज आहे. ज्या दिवशी एक नेता एक पक्ष स्विकार करू त्या दिवशी समाज चळवळ पूढे जाईल. नेता स्विकारतांना थोडी मेहनत घ्यावी लागेल. आज अस्तीत्वात असलेले सर्व नेते १९८० च्या दशकात त्यानंतर आलेले आहेत.  या सर्वांमध्ये चळवळीला सर्वात जास्त योगदान कूणी दिले ? सामाजिक आंदोलने कूणी केली ? सामाजिक प्रश्नांवर कुणी लढा दिला ? सत्तेची लाचारी पत्करता स्वाभीमान कुणी जपला ? आज व्यवस्थेला, मिडीयाला प्रतिगामी शक्तींना कोणत्या नेत्याची भिती वाटते  ? हे सर्व करतांना कोणत्या नेत्याला सर्वात जास्त बदनाम केल्या जाते ? या प्रश्नांचा शोध घ्या. उत्तर सापडेल. उत्तर नाही सापडले तर मंडल कमिशन कुणाच्या प्रयत्नाने लागू झाले ? संविधान समिक्षेच्या विरोधात संसदेत कोण डरकाळी फोडत होता ? लवासा प्रश्न कूणी मांडला ? खाजगी विज कंपनी एन्रान ला कूणी हाकलले ? शेतकरी आत्महत्येवर सऱकारला कोर्टात कुणी खेचले ? न्याय कुणी मिळवून दिला ? आजही समाजाच्या प्रश्नावर सर्वात जास्त मोर्चांमध्ये कोणत्या नेत्याचा चेहरा दिसतो ? शोध घ्या. नेता निवडायला सोपे जाईल. उत्तर मिळेल. प्रश्न पडणार नाही.
स्वयंकेन्द्री माणसे आणि स्वयंकेन्द्री समाज कधीच परिवर्तन घडवू शकत नाही. २१ व्या शतकाची नाडी आता वेगाने बदलाकडे वळत चालली आहे. त्यामुळे पारंपारिकतेचा त्याग हाच एकमेव पर्याय आधुनिक पिढीसमोर आहे. तर दुसरीकडे नेतृत्वाच्या भुकेचे डोहाळे लागलेले दिल्लीकडे तोंड करून ढेकर देतांना दिसून येत आहेत. दिल्लीतली मेजवानी गल्लीतल्या नेत्यांची भूक भागवेल अशी अपेक्षा असेल तर ते केवळ स्वप्नरंजन ठरेल. अजूनही दिल्लीतल्या साहेबांना गल्लीपर्यंत पोहचविणारी साधने तुमच्याकडे नाहीत हे लक्षात घ्या. आणि जे आहेत ते पोट भरण्यासाठी सर्वच नेतृत्वाची भूक लागलेल्यांना मेजवानी द्यायला निघाले आहेत. परिवर्तनवादी युवक यातून काय बोध घेतो त्यावर निर्भर आहे. शेवटी एकच सांगतो तुमचा उद्धार तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करण्यातच आहे. दिल्लीतले परिवर्तन गल्लीत पाहायला मिळतील हे २१ व्या शतकाची शपथ घेऊन सांगतो.
ओल्या मातीत जेव्हा माझा बाप गाडला गेला.
हिरवळ होती चहूकडे, झाडाची पानेही हिरवीगार होती,
पण त्याच झाडाच्या फांदीला माझा बाप फाशीला लटकला होता.
                                                                                                                   ---संदीप
§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275