Saturday, 26 January 2013

भ्रष्टाचार से पैदा हुए आशिष नंदी का जाहीर निषेध !


भ्रष्टाचार से पैदा हुए आशिष नंदी का जाहीर निषेध !

SC, ST, OBC भ्रष्ट नहीं, यहाँ की ब्राम्हणवादी मानसिकतावादी संस्कृति भ्रष्ट है ! आशीष नंदी जैसे ब्राम्हणवादी बार बार अपना जहरीला विष समाज पर उगलते रहते है ! जिनका जन्म ही मंदिर के भगवान और पुजारियों के साथ मिल कर किये हुए भ्रष्टाचार से होता है ! वो लोग बार बार अपना पाप दूसरो पर लादने के लिए दूसरो को भ्रष्टाचार के लिए दोषी ठहराने का घ्रुणास्पद पाप करते रहते है ! आशीष नंदी जो की खुद को समाजशास्त्री कहता है ! वो समाजशास्त्री अगर ऐसे बयान दे की, "यहाँ के SC, ST, OBC भ्रष्ट है और भ्रष्टाचार करते है !" तो मुझे लगता है की इसे समाजशास्त्री किसी पुरोहित, पंडित, या पुजारी ने बनाया होगा !
आशीष नंदी अगर आप ने अपने माँ-बाप को पूछा होता की वो पैदा कैसे हुए ? तो आप को भ्रष्टाचार की जड़ और असली वजह समझ आती ! हजारो सालो से चला आया वर्णवादी/ जातिवादी / धर्मवादी भ्रष्टाचार को इन्ही OBC, SC, ST ने तोडा था ! और आज भी इन्ही लोगो के कारण भ्रष्टाचार करने वाले बड़े अफसर (IS, IAS, POLITICIANS, (All Belongs to OPEN Class) को भ्रष्टाचार करने को मौका नहीं मिल रहा ! आशीष नंदी जी जिस व्यवस्था में आप पले बड़े हो ! और जिस व्यवस्था ने आप को समाजशास्त्री (बिनढोक और बेवकूफ) बनाया वो व्यवस्था खुद भ्रष्टाचार के पैरो पर ही कड़ी है ! जिस समाजव्यवस्था (ब्राम्हणवादी / वर्णवादी) की बुनियाद ही भ्रष्टता हो उस व्यवस्था में आप पीड़ित लोगो को भ्रष्ट बताकर अपने दिवालियापन की मिसाल दे रहे हो ! भ्रष्टाचार यह इतिहास जिसके बलबूते पर आप इतनी हिम्मत दिखा कर दिवालियापन कर रहे हो ! उतनी हिम्मत दिखाकर मंदिर/भगवान के नाम पर हो रहे भ्रष्टाचार की बुनियाद को समझ कर आओ !
जिस देश में पुजारी पैसे लिए बगैर पूजा नहीं करता और तो और जिस देश में भगवान पैसे (चढ़ावा) लिए बगैर प्रसन्न नहीं होता उस देश में भगवान को खुश करने के लिए भ्रष्टाचार तो होगा ही ना ! फिर यहाँ का भगवान् ही भ्रष्ट है पीड़ित और मागास जातीय नहीं ! और इस भगवान के डर से समाज और इन्सान को लुटने वाले भ्रष्टाचारी है !
आशीष नंदी हमारे इन सवालो का जवाब दो ?
1.  भारत के मंदिरों में हर दिन जो चढ़ाव चढ़ाया जाता है वो रोज के आमदनी और खर्चे से भी ज्यादा होता है ! वह पैसा आता कहा से है ?
2.  मंदिरों में लाखो- करोडो रुपयोंका चढ़ाव चढाने वाले लोग कौन है ?
3.  कितने SC, ST, OBC लोग मंदिरों में लाखो-करोडो का चढ़ाव चढाते है ?
4.  भगवान् आज सोने चाँदी के बने हुए है वो कहा से आया है ?
5.  लाखो-करोडो, सोने, चाँदी, हीरे के गहने मंदिरों में किसके पैसो से आते है ?
6.  अमीर करोडपति की लिस्ट में कितने SC, ST, OBC है ?
7.  मंदिरों में दान देने के लिए उच्च वर्ग के पास पैसा कहा से आता है ?
8.  अगर यह सच्चाई है तो आशीष नंदी हमें बताओ की इस देश में भ्रष्टाचारी कौन है ? यहाँ का SC, ST, OBC वर्ग ? या फिर तुम जैसे धर्मवादी / जातिवादी लोग ?
आशीष नंदी का यह बयान बहुसंख्य भारतीय समाज का अपमान है ! हम इसकी घृणित कृत्य की जाहिर निंदा करते है ! आशीष नंदी ने भारतीय समाज की माफ़ी मांगनी चाहिए ! आशीष नंदी को कड़ी से कड़ी शिक्षा होनी चाहिए !
भ्रष्टाचार का सच कड़वा है !  आशीष नंदी भड़वा है !
आशीष नंदी का जाहिर निषेध ! निषेध ! निषेध ! निषेध !

Friday, 25 January 2013

The buddhist society of india



चलो औरंगाबाद ! चलो औरंगाबाद ! चलो औरंगाबाद !
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी साजरी केली जात आहे. भैय्यासाहेब आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर केला. बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी बौद्धाचार्य आणि केंद्रीय शिक्षक/शिक्षिका आणि श्रामणेर इ. ची निर्मिती केली. चैत्याभूमिचे निर्माते व बौद्धाचार्य निर्मितीचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. बाबासाहेबांचे सुपुत्र व बौद्ध धम्माच्या प्रचार/प्रसारातील अग्रगण्य असणा-या 'सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त" त्यांनी धम्माला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 'दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया', महाराष्ट्र शाखा यांच्या वतीने "महाराष्ट्र राज्य शाखेचे महाअधिवेशन" अयोध्या नगरी मैदान, आर. टी. ओ. समोर, औरंगाबाद येथे २३ आणि २४ फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आले आहे. तमाम बौद्धांनी सदर धम्म अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्म प्रचार प्रसारात योगदान द्यावे. हि विनंती.
निमंत्रक :-  १) मा. देवेंद्र मेश्राम, अध्यक्ष, नागपूर जिल्हा.
                २) मा. डॉ. संदीप नंदेश्वर, मार्गदर्शक, नागपूर जिल्हा.  

Monday, 21 January 2013

जाती अंताची लढाई : प्रकाश आंबेडकर विरुद्ध 'जात'




जाती अंताची लढाई : प्रकाश आंबेडकर विरुद्ध 'जात'
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.....८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

कुठलाही क्रांतिकारी विचार समाजव्यवस्थेत रुजवत असतांना वाद-प्रतीवादाच्या कसोटयातूनच जात असतो. क्रांतिकारी विचाराला सुरवातीच्या काळात विरोध केला जातो. परंतु जेव्हा परिस्थिती सापेक्ष बदल येणा-या काळात नवीन पिढीसमोर येतात तेव्हा नाकारला गेलेला तोच क्रांतिकारी विचार ती पिढी स्वीकारायला तयार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत असेच घडले होते. सुरवातीला त्यांच्या क्रांतिकारी विचारांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला. ज्या समाजासाठी/ माणसांच्या उत्थानासाठी ते विचार होते. त्याच माणसांकडून त्यांचे विचार नाकारले जात होते. परंतु शेवटी त्यांच्या विचारांचा स्वीकार करूनच हजारो वर्षे जातीय, वर्णीय, सामाजिक गुलामगिरीत काढलेल्या वर्गाने केला.  आणि समाजात एक आमुलाग्र बदल/परिवर्तन घडून आले. आज 'शाळेच्या दाखल्यावरून जात काढून टाकावी.' असा क्रांतिकारी विचार मांडून बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांनी सामाजिक विरोध पत्करून घेतला आहे. आरक्षण आणि जातीच्या आधारावर मिळणा-या लाभाच्या आहारी गेलेल्या समाजाला या विचाराने बोलते केले आहे. त्यांना विचारप्रवृत्त केले आहे. परंतु हा विचार या समाजात स्वीकाराच्या पातळीपर्यंत येण्यास वेळ जावा लागेल. हा विचार सहज स्वीकारला जाणार नाही. म्हणून तो अमान्य होतो असेही नाही. या विचाराचा पर्याय म्हणून स्वीकार येणा-या काळात परिस्थिती सापेक्ष बदलासवे केला जाईल. हे निश्चित.

बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांनी समाजात एका वैचारिक चर्चेला सुरवात केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. शैक्षणिक दाखल्यावरून जात वगळावी. हा मुद्दा जाती अंताच्या लढाईतील पहिले पाऊल आहे. पण अंतिम नाही. हे आधी लक्षात घ्यावे. आजपर्यंत अनेक प्रयोग आम्ही करून पाहिले परंतु सर्व अपयशी ठरले. मग जर हा प्रयोग केला तर त्यात काय वाईट ? शेवटी बाळासाहेब आंबेडकरांनी हे सुद्धा म्हटले आहे कि हे करीत असतांना आम्हाला पर्याय द्यावे लागतील. त्यावर चर्चाच होत नाही. आमची लढाई जातीअंताची आहे कि जाती टिकवून ठेवण्याची आहे ? हे आधी स्पष्ट होणे गरजेचे आहे. माझ्या मते आपली लढाई जातीअंताची आहे. मग त्यासाठी आम्ही प्रयोगाला तयार असले पाहिजे. व त्यानंतर उद्भवणा-या परिस्थितीला सोडविण्यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपली विद्वत्त शक्ती खर्च केली पाहिजे.

शैक्षणिक दाखल्यावरून जात वगळावी. या मुद्द्यावरून आज भारतीय आंबेडकरी समाजात ३ वर्ग निर्माण झाले आहेत. एक वर्ग १. सुशिक्षित आंबेडकरी वर्ग (चळवळीची जाण असणारा वैचारिक वर्ग) आहे. जो या भूमिकेचे स्वागत करतो आहे. कारण जातीअंताची लढाई कुठून तरी सुरु झाली पाहिजे. हा वर्ग जातीच्या आधारावर मिळणा-या लाभाची पर्व करतांना दिसून येत नाही. तो या वर्गाला नवीन पर्यायी लाभाची व्यवस्था पुरविण्यासाठी काय करता येईल यावर विचारमंथन करायला लागला आहे. दुसरा वर्ग २. सुशिक्षित आंबेडकरी वर्ग (चळवळीपासून अलिप्त असणारा आणि जातीचे लाभ घेऊ पाहणारा वर्ग) जो या भूमिकेचा विरोध करीत आहे. कारण त्याला भीती आहे कि जातीच्या आधारावर मागील ६३ वर्षापासून मिळणारे लाभ हिसकावले जातील अशी त्याला भीती वाटत आहे. हा वर्ग एकीकडे जातीअंताच्या बाबासाहेबांच्या भूमिकेशी स्वतःला चिटकून ठेवू पाहतो पण जाती अंतासाठी पाऊल उचलू पाहत नाही. असा हा संभ्रमावस्थेत असलेला वर्ग आहे. तिसरा वर्ग ३. अशिक्षित व चळवळ, आंबेडकरी विचारांपासून अलिप्त असणारा वर्ग (जातीच्या खाईत जगणारा वर्ग) जो स्वतःची ठाम अशी भूमिकाच घेऊ शकत नाही. जात गेली तर मला मिळणारे लाभही जातील या भीतीने तो या भूमिकेला विरोध करीत आहे. आणि हा वर्ग संखेने मोठा आहे. पण तो वरील २ वर्गाच्या भूमिकेची वाट बघत आहे. अशा परिस्थितीत आज सामाजिक द्विधा मनस्थितीचे विश्लेषण आम्ही केले पाहिजे.

शैक्षणिक दाखल्यावरून जात वगळावी. या भूमिकेने आंबेडकरी समूहाच्या बाहेरही गैर आंबेडकरी समाजात प्रतिक्रिया निर्माण केलेल्या आहेत. त्यातही ३ वर्ग पडलेले आहेत. पहिला वर्ग १. परिवर्तनवादी विचारांनी प्रभावित झालेला सुशिक्षित वर्ग. जो जातीव्यवस्थेने प्रभावित झालेला आहे. तो जात मोडू पाहत आहे. जात संपली पाहिजे व जातीच्या बाहेर जाऊन त्यांची एक ओळख निर्माण झाली पाहिजे असे म्हणतो आहे. मानवतावादी आणि भारतीयत्व आपली ओळख म्हणून स्वीकारू पाहतो आहे. हा वर्ग बाळासाहेबांच्या या भूमिकेला समर्थन करीत आहे. व या भूमिकेचे स्वागत करीत आहे. दुसरा वर्ग २. हिंदू धर्मातील आरक्षण विरोधी वर्ग. जो वर्ग इथल्या संविधानाने मागासवर्ग व अनुसूचित जाती-जमाती ला दिलेले आरक्षण व सवलतीला विरोध करतो आहे. त्याला असे वाटते कि जात दाखल्यावरून नष्ट झाली तर यांना मिळालेले आरक्षण व सवलती पण नष्ट होतील. हा वर्ग दाखल्यावरून जात संपविण्याच्या भूमिकेला समर्थन करीत आहे. तिसरा वर्ग ३. तटस्थ प्रतिगामी मुलतत्ववादी हिंदू वर्ग. हा वर्ग या मुद्द्यावर आपली सावध भूमिका घेत आहे. तो समर्थनही करीत नाही आणि विरोधासाठीही समोर येत नाही. कारण त्याची या भूमिकेने कोंडी होणार आहे. जात संपविण्याच्या मुद्द्याला समर्थन केले तर त्यांचा मुलतत्ववाद संपुष्टात येउन एकूणच हिंदू व्यवस्था व धर्म कोलमडून पडतो. आणि विरोध केला तर जातीच्या आधारावर शोषण करणारे म्हणून चेहरे समोर येतील. व समाजातून एका मोठ्या विरोधाला समोर जावे लागेल. त्यामुळे या वर्गाची परिस्थिती "इकडे आड तिकडे विहीर" अशी झाली आहे. एकूणच या सर्व भूमिकेतून दाखल्यावरील जात संपुष्टात आणण्याच्या भूमिकेला समाजातून स्वागतच आहे. परिस्थितीने समाजाच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणले आहे हे त्याचे प्रतिक आहे असे समजायला हरकत नाही.

 एक गोष्ट आधी आपण लक्षात घेतली पाहिजे. कि जातीचा नष्ट करण्याचा मुद्दा बुद्ध धम्माशी निगडीत नाही. तो पूर्णतः हिंदू धर्माशीच निगडीत आहे. त्यामुळे जातीअंताची सुरवात हि आजही जे हिंदू आहेत त्यांच्यासाठीच आहे. भारतीय संविधानाने बौद्ध धम्माला अल्पसंख्यांक दर्जा दिलेला आहे. त्यांचे अधिकारही वेगळे आहेत. त्यांच्या सवलतीही वेगळ्या आहेत. त्यामुळे जे हिंदू आहेत पण ते जातीच्या विषारी पायाखाली तुडविले जात आहे. त्यांनी निदान आपली जात संपवून मानवतावाद स्वीकारावा. भारतीयत्व स्वीकारावे यासाठीच हा मुद्दा उपस्थित केला गेला आहे. या मुद्द्याला उगाच बौद्ध धम्माशी जोडून आम्ही आपली फसवणूक करून घेऊ नये. हा मुद्दा पूर्णतः हिंदूंशी निगडीत आहे.

जातीच्या दलदलीत सापडलेल्या हिंदूंना किंवा मुलाच्या नागवंशीयांना जातीच्या आधारावर मिळालेले अधिकार हिरावले जाणार नाही यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. पण जाती टिकवून ठेऊन किंवा ते आज न उद्या बौद्ध होणार आहेत या आशेवर राहून जातीअंताच्या या लढ्याला विरोध करणे कुठेही तार्किक नाही. मुळात त्यांची जात नष्ट करून (दाखल्यावरून) त्यांना नवीन पर्याय देणे गरजेचे आहे. हे साधे तर्क आम्ही जातीअंतासाठी लढणा-या माणसांनी लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेबांनी जातीवर आधारित आरक्षण दिलेले नाहीत. तर ज्या कुठल्या पूर्वापार जाती होत्या ज्या विकासाच्या प्रक्रियेपासून हजारो वर्ष दूर ठेवल्या गेल्या होत्या त्यांना अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), भटक्या विमुक्त (NT & VJ), इतर मागासवर्गीय (OBC) अश्या वर्गात टाकण्यात आले आहे. त्यांनी जातींना गोंजारले नाही. जातींचा एक वर्ग तयार केला. परंतु संविधानाच्या ६३ वर्षाच्या अंमलबजावणीनंतरही जर हि बाबासाहेबांची भूमिका आम्ही समजून घेत नसू तर तो बाबासाहेबांचा अपमान होईल. जगातल्या महान घटनाकाराचा अपमान होईल.

बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या "शालेय दाखल्यावरून जात हद्दपार करावी." या मुद्द्यावरून बरेच रणकंदन माजले आहे. पण जातीव्यवस्था मोडकळीस आणण्यासाठी एक वैचारिक चर्चा या अनुषंगाने सुरु झाली आहे. जातीव्यवस्था संपविण्यासाठी टाकलेले हे पहिले पाऊल समजावे. परंतु या भूमिकेवरून (मुद्द्यांवरून) अनेक नवीन तथ्य आणि वास्तव समोर येणार आहे. बाळासाहेबांनी आंबेडकरांनी हा मुद्दा उपस्थित करता बरोबर भारतीय समाजातील ३ घटकांमध्ये हलचल सुरु झाली. वैचारिक आणि सामाजिक रणकंदन माजले आहे. त्यातले पहिला घटक १. आंबेडकरी समाज, दुसरा घटक २. हिंदू समाज आणि तिसरा घटक ३. परिवर्तनवादी समाज. यातला पहिला समाज जो स्वतःला आंबेडकरी समाज संबोधतो. जो मुळात जाती निर्मुलनासाठी इतक्या वर्षापासून लढा देत आहे. त्या समाजातले अनेक वास्तव उघड होत आहेत. ते येणेप्रमाणे- १) आंबेडकरी समाज जो सदैव स्वतःला बौद्ध म्हणवून घेतो तो ख-या अर्थाने बौद्ध आहेत कि नाही ? हे समोर येईल. २) दाखल्यावरून जात नष्ट व्हावी या भूमिकेच्या विरोधात गेलेला आंबेडकरी समाज हा बौद्ध नाही तर तो स्वतःची जात टिकवून ठेऊन हिंदू धर्मातच वास्तव्य करीत आहे हे लक्षात येईल. ३) जे आंबेडकरी बौद्ध झाले आहेत ते या भूमिकेला विरोध करणार नाहीत. कारण बौद्ध धम्माचा आणि जातीचा कुठलाही तिळमात्र संबंध नाही. बौद्ध धम्म अल्पसंख्यांक आहे.  त्यामुळे या भूमिकेमुळे त्याच्यावर कुठलाही परिणाम होणारा नाही. एकूणच बौद्ध कौण ? आणि हिंदू आंबेडकरी कौण ? हे यावरून ओळखता येणार आहे. ४) बौद्धांना अनुसूचित जातीच्या देखील सुविधा मिळत आहेत. (पहा - MPSC च्या भरतीतील आरक्षणाचे कॉलम) तरीही ते स्वतःच्या अधिकाराबद्दल जागृत नाहीत हे सिद्ध होईल. ५) जात हि आंबेडकरी समाजाच्या जिव्हाळ्याचा विषय होऊ शकत नाही. उलट जाती नष्ट करणे हाच त्यांचा एकसूत्री कार्यक्रम आहे. तरीही जे जाती टिकविण्याची धडपड करतात. म्हणजेच ते आंबेडकरी नाहीत हे सिद्ध होईल. एकूणच “एका दगडात अनेक पक्षी मारल्यासारखे” झाले आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाची मानसिकता अभ्यासण्याच्या दृष्टीने जाती अंताचा हा नवीन पवित्रा (भूमिका) कामात येणार आहे.

दाखल्यावरून जात काढल्याने जातीव्यवस्था जाणार नाही. एवढे न समजण्याइतके दुधखुळे बाळासाहेब आंबेडकर नक्कीच नाहीत. आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेला समर्थन करणारे सुद्धा काही दुधखुळे नाहीत. यामागची भूमिका व्यापक आहे. अगदी तुमच्या शैक्षणिक प्रगतीवरही जर तुमची जात तुमचा पिच्छा पुरवीत असेल तर आम्ही त्या जातीला गोंजारत का बसायचे ? नक्कीच मानवी विकास आणि संधीची समानता मानणा-या वर्गाने तरी स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख हि जात विरहीत सिद्ध करावी. अशीच त्यामागची भूमिका असावी. परंतु जातीच्या आधारावर मिळणा-या लाभाच्या हव्यासापोटी आम्ही जात टिकून राहावी असे म्हणत असू तर स्व-चिंतनाची गरज आहे. याच मानसिकतेतून जर हा समाज सतत जात राहिला तर हजारो वर्षे हि जातीव्यवस्था तशीच टिकून राहील. मनुवादी मानसिकतेने शोषणासाठी/ काही वर्गाच्या गुलामिसाठी/ मोजक्या लोकांच्या हातात सत्ता टिकवून ठेवण्यासाठी निर्माण केलेली जातीव्यवस्था आज आधुनिक काळात संविधानातून जातीच्या आधारावर मिळणा-या लाभासाठी टिकवून ठेवली जात आहे. तेही अनेक वर्ष पर्यंत टिकून राहील. कारण कधीही कुठल्याही काळात जातीच्या आधारावर मिळणारे लाभ तसेच मिळत राहावे. यासाठी आरक्षणाचा लाभ घेणारा वर्ग जातीव्यवस्था मोडायला तयार होणार नाही. आणि मग अश्या परिस्थितीत भारतीय समाजाला जातीव्यवस्था हि शाप आहे असे म्हणना-यांचे खरे चेहरे उघड पडतील. त्यांना जातिव्यवस्थेच्या विरुद्ध बोलण्याचा नैतिक अधिकारही राहणार नाही.

हा मुद्दा हाताळतांना खेदाची बाब अशी वाटते कि, जातीव्यवस्था टिकवून ठेवणे हा ज्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे ते ब्राम्हणवादी, मनुवादी, जातीवादी मुग गिळून चूप बसले आहेत. आणि जातिव्यवस्थेच्या विरुद्ध गरळ ओकणारे आंबेडकरी जे स्वतःला बेंबीच्या देठापासून बौद्ध म्हणतात (फक्त भाषणात प्रत्यक्षात नाही) ते दाखल्यावरून जात काढावी या भूमिकेचा विरोध करीत आहेत. जातीव्यवस्था मोडकळीस यावी (डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या Annhilation of Caste चा दाखला देऊन) असे म्हणणारे कुठल्या स्वप्नाळू जगात जगत आहेत ? किती वर्षांनी ते जातीव्यवस्था संपविण्यासाठी पाऊल उचलणार आहेत ? सुरवात कशी करणार आहेत ? या प्रश्नांचे उत्तरही त्यांच्याकडे नाही. एकंदरीतच त्यांचा मुद्दा जातीचे संवैधानिक फायदे लाटण्यापुरताच मर्यादित झाला आहे. डॉ. बाबासाहेबांचे नाव घेऊन भावनिक आंदोलन उभारण्यापुरतेच ते मर्यादित झाले आहेत असे म्हणावे लागेल. प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित व्यवस्था निर्माण करण्यात त्यांना काहीही स्वारस्य वाटत नाही. असे खेदाने म्हणावे लागेल.

बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या दाखल्यावरून जात काढावी या भूमिकेच्या विरोधात जाणारा एक वर्ग हा राजकारण्यांचा आहे. जो प्रत्यक्षात सत्तेच्या बाहेरच आहे. समाजाचा राजकीय सौदा करून राजकीय पक्ष चालविणा-यांचा वर्ग आहे. मुळात स्वतःला आंबेडकरवादी राजकीय पक्ष म्हणविना-यांचा वर्ग आहे. जो सदैव बाळासाहेबांच्या विरोधात उभा राहिला. असा तो वर्ग आहे. आणि हाच वर्ग आज समाजात बाळासाहेबांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी संभ्रम पसरवित आहे. परंतु हे स्पष्ट करावे लागेल कि बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला जाती अंताचा हा मुद्दा कुठेही राजकीय आहे असे दिसून येत नाही. हि भूमिका सामाजिक आहे. वैचारिक आहे. एका नव्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठीची आहे. राजकीय लाभ या भूमिकेतून कुठलाही दिसून येत नाही. उलट जातीचे लाभ घेणा-या एका मोठ्या वर्गाच्या विरोधाला सामोरे जावे लागल्याने राजकीय गणिते बाळासाहेब आंबेडकरांच्या (भारिप बहुजन महासंघाच्या) विरोधात जाऊ शकतात. म्हणून या भूमिकेकडे राजकीय दृष्टीने न बघता, त्याचे राजकारण न बनविता एका नव्या समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी टाकलेले ते पाऊल आहे. या दृष्टीने त्यांच्या भूमिकेकडे बघितले गेले पाहिजे. तेव्हाच हा महत्वाचा मुद्दा हाताळला जाऊ शकतो. 

जाती नष्ट करण्यासाठी, जाती निर्मुलनासाठी टाकलेले पाऊल म्हणजे मनुवाद्यांचे काम करणे असा युक्तिवाद करणे किती हास्यास्पद वाटते. मनुवाद्यांना कसे काय जात नष्ट करण्याचा पुळका येतो ? हेच कळत नाही. संपूर्ण आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जातिव्यवस्थेच्या विरुद्ध लढत राहिले. जातिनिर्मूलन हे उद्धिष्ट घेऊन ज्या जातीव्यवस्थेने आर्थिक, सामाजिक, राजकीय शोषण केले त्या जातीव्यवस्थेला मोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बौद्ध धम्माचा स्वीकार हा जातीनिर्मुलानातलाच एक पर्याय म्हणूनही त्यांनी निवडला. बाबासाहेबांच्या पश्च्यात गेली ५६ वर्षे म्हणण्यासारखे बौद्ध धम्माचा स्वीकार झालेला नाही. त्यामुळे जातीनिर्मुलनाचा मुद्दा तिथेही मागेच पडला. सामाजिक स्तरावर आणि शासकीय स्तरावरही जातीनिर्मुलनासाठी पाहिजे तसे प्रयत्न केले गेले नाही. आज जातिव्यवस्थेच्या विरुद्ध बोलणारा (गैर आंबेडकरी-बुद्धिस्ट) एक मोठा वर्ग तयार झाला आहे. तो वर्ग बुद्धिझमकडे वळू पाहतो. तर त्यातलेच काही अजूनही बुद्धिझम पासून लांबच आहे. त्यामुळे अश्या परिस्थितीत एक वैचारिक, सामाजिक आणि राजकीय नेतृत्व म्हणून प्रकाश आंबेडकर जातीनिर्मूलनाची एक ठिणगी टाकू पाहत आहेत. तर त्याचा विरोध न करता समर्थन केले जाणेच अपेक्षित होते. ज्यांना जात नको पण परिस्थिती सापेक्ष शासकीय लाभ हवे आहेत त्यांनी बुद्धिझम कडे वळावे. आणि ज्यांना तेही नको त्यांनी मानवतावादाची कास धरावी. शेवटी हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेतच.

शाळेच्या दाखल्यावरून जात गेल्याने आरक्षण संपुष्टात येईल किंवा मिळणारे शासकीय लाभ बंद होतील हे म्हणणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे. आज अस्तित्वात असलेले नियम जरी लक्षात घेतले तरी हे दिसून येईल कि आरक्षणाच्या लाभार्थी असलेल्या परिवारातील मुलांना आरक्षण मिळतेच. फक्त त्यात ज्यांचे आर्थिक उत्पन्न ५ लाख रुपयापेक्षा अधिक आहे अश्या कुटुंबातील सदस्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. याचाच अर्थ असा कि आरक्षण हे ज्या कुटुंबात जन्म झाला त्यातून पुढे सुरु ठेवता येईल. दाखल्यावर जात असली काय आणि नसली काय ? जो समाज अनेक वर्षापासून वंचित आहे त्या वर्गाला आरक्षणाचा व अन्य लाभाचा फायदा झाला पाहिजे असे वाटते तर ते सद्यकाळात आरक्षणाच्या कक्षेत असणा-या कुटुंबासाठी पुढील आणखी काही वर्षे आपल्याला सुरु ठेवता येऊ शकते. त्यासाठी दाखल्यावर जात असलीच पाहिजे हे जरुरीचे नाही. आरक्षित वर्गाचे कौटुंबिक रेकार्ड तयार करून आम्ही त्यांना आज मिळत असलेले अधिकार पुढील काळातही मिळवून देऊ शकतो. हासुद्धा एक पर्याय दाखल्यावरून जात काढल्यानंतर उद्भवणा-या परिस्थितीला सोडविण्यासाठी होऊ शकतो यावरही विचार होणे गरजेचे आहे. पण जात टिकून राहील तरच आरक्षण मिळेल किंवा टिकून राहील असे म्हणणे म्हणजे मानवतावादी समाजाला पुन्हा एका प्रतिगामी अवस्थेकडे घेऊन जाणे आहे.  

जाती अंताची हि भूमिका म्हणजे परिपूर्ण जातीव्यवस्थेचे उच्चाटन आहे असे समजून घेण्याचे काहीच कारण नाही. जातीव्यवस्था हा हिंदू धर्माचा श्वास आहे. हिंदू धर्माचा तो प्राण आहे. त्यामुळे जातींचे संपूर्ण उच्चाटन होणे शक्य नाही. आणि त्यामुळे हिंदू धर्म पण संपुष्टात येणार नाही. जगातला कुठलाच धर्म संपुष्टात येणार नाही. अश्या परिस्थितीत जातीव्यवस्थेतून बाहेर पडून जातीव्यवस्था कमकुवत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निदान तशी संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. किंवा जातीव्यवस्थेचे चटके सहन करणा-यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी इतर धर्माचा स्वीकार किंवा स्वतःपासून सुरवात असे दोनच मार्ग आहेत. ज्यांना जातीव्यवस्थेने छळले आहे त्यांना इतर धर्मात जाऊ द्या ! व ज्यांना इतर धर्माचा स्वीकार करायचा नाही पण जातीव्यवस्थेला नाकारायचे आहे. त्यांना तसेही करू द्या ! मग त्यांच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला पर्याय योग्यच ठरतो. व्यक्ती जेव्हा स्वतःपासून एखादा क्रांतिकारी निर्णय घ्यायला बाध्य होतो तेव्हा ते क्रांतिकारी पाऊल समाज परिवर्तनात महत्वाची भूमिका बजावते. शेवटी जातीव्यवस्थेला कंटाळून अन्य धर्माचा स्वीकार करा किंवा जातीचा उल्लेख करणे / जातीचा रकाना भरने बंद करा. दोन्ही पर्याय मानवतावादी आणि परिवर्तनवादी विचाराला पूरक आहेत.          

Friday, 28 December 2012

महारांचा आणि महार बटालियनचा शौर्य इतिहास




महारांचा आणि महार बटालियनचा शौर्य इतिहास
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर... ९२२६७३४०९१ 

कुठलीही तमा न बाळगता शत्रूंवर तुटून पडणारा...आपले साहस, शौर्य, प्रामाणिकपणा, धाडस आणि देशभक्तीने इतिहास गाजविणारा...युद्धकौशल्य आणि निडरता या अंगभूत गुणकौशल्याने ओतप्रोत भरलेला...स्वतःसोबत इतरांच्या सुरक्षेसाठी धडपडणारा...व्यवस्थेने उपेक्षित ठरवूनही सदैव लढवैय्या म्हणून जगलेला...चातुर्वर्ण्यांच्या विषारी अस्पृश्यतेच्या जखमा माथ्यावर कोरून समतेच्या प्रवाहाला गती देणारा...उथळ माथ्याने स्वाभिमानाने जगणारा...बाबासाहेबांच्या एका हाकेने लाचारीच्या चीरेबंदीला चिरून टाकणारा...भारतीय सैन्यात मानाचा तुरा रोवणारा...युद्धभूमीवर विजयाच्या पताका फडकाविणारा...बाबासाहेबांच्या भिमगर्जनेने विषमतेच्या विरुद्ध पेटून उठणारा...बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धाच्या शांती, समता, बंधुता, प्रज्ञा, शिल, करुणेला प्राणापलीकडे जपणारा...भीमा कोरेगावच्या लढाईत ब्राम्हणशाहीचे प्रतिक पेशव्यांच्या हजारो सैनिकांचा निप्पात करणारा...१ जानेवारी १८१८ ला भीमा कोरेगाव च्या स्तंभावर जागतिक शौर्याचा इतिहास कोरणा-या महारांचा इतिहास अतिशय विलक्षण आहे. त्या महारांच्या विलक्षण शौर्य इतिहासाला शतशः नमन करणे इथल्या प्रत्येकाचे इतिकर्तव्य आहे. आजही देशाची सुरक्षा करण्यात सदैव तत्पर असलेल्या त्या महार बटालियन च्या प्रत्येक शूर सैनिकाला इथला प्रत्येक देशवासीयांच्या माध्यमातून दिलेली ही सलामी...

१६ व्या शतकात शिवाजी महाराजांनी इथल्या महारांमधील शौर्य व धाडस पाहून सैन्यामध्ये महत्वाच्या स्थानावर त्यांना रुजू केले. शिवाजी महाराजांच्या सैन्यापासून ख-या अर्थाने महार सैनिकाला ओळख प्राप्त झाली. शिवाजी महाराजांच्या सुरक्षेत, राज्य विस्तारात, राज्याच्या सुरक्षेत महार सैनिकांनी मोठी भूमिका बजावल्याचे इतिहासाच्या पानापानातून दिसून येते. शिवाजी महाराजांचे प्राण वाचविणारा 'जीवा' महाले इतिहासात प्रसिद्ध झाला. "होता जीवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण या सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष देते. महार जात शूर, पराक्रमी, लढवैय्यी असतांनाही चातुर्वर्ण्यांच्या अतिशुद्र वर्गवारीत टाकण्यात आल्याने सदैव दुर्लक्षित केली गेली. परंतु याची तमा न बाळगता महारांनी सदैव आपल्यातील शौर्याच्या बळावर या देशावर अधिराज्य गाजविले आहे. शिवाजी महाराजानंतर अनेकांनी महार सैन्यांच्या बळावर युद्ध जिंकली आहेत.
१८ व्या शतकात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने महारांमधील या पराक्रमाला लक्षात घेऊन सर्वप्रथम बॉम्बे रेजिमेंट महार बटालियन ची स्थापना करण्यात आली. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ ला पहिल्या महार रेजिमेंट च्या द्वितीय बटालियनच्या ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या २० हजार घोड्स्वार आणि ८ हजार पायदळी सैनिकांना निकराची झुंज देऊन पेशवाईचा निप्पात केला. ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांच्या सैनिकांना नामोहरण करून आपल्या एकमेवाद्वितीय शौर्याचा इतिहास रचला. त्या इतिहासाची साक्ष आजही भीमा कोरेगाव चा विजय स्तंभ देतो आहे. तो विजय स्तंभ हा महारांच्या शौर्याचा प्रतिक आहे. आजही आंबेडकरी समाजाला तो विजय स्तंभ आपल्या पूर्वजांच्या शौर्य इतिहासाची जाणीव देऊन देशभक्तीसाठी प्रवृत्त करतो आहे.
 १८५८ च्या युद्धात २१ वी आणि २७ वी महार रेजिमेंट ची तुकडी प्राणपणाने लढली. १८९२ पर्यंत ब्रिटीश भारतात सैन्यामध्ये महार बटालियन आपले वेगळे महत्व टिकवून होती. परंतु १८९२ ला महार बटालियन संपुष्टात आणून सैन्य भरतीत नवीन धोरण ब्रिटीश सरकारने अंगिकारले. 'क्लास रेजिमेंट' नावाने सैन्यामध्ये नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात आली. प्राचीन महार रेजिमेंट च्या ऐवजी 'क्लास रेजिमेंट' ची १८८२ ला झालेली भरतीने महार सैन्यांना बेदखल करण्यात आले. १८८५ मध्ये तत्कलीन भारतीय सैन्याचे कमांडर-इन-चीफ जनरल लॉर्ड रॉबर्ट यांनी "मार्शल रेस' नावाची थेरी अंगीकारली. व त्या माध्यमातून भारतीय समाजातील जन्मजात आणि नैसर्गिक युद्ध कौशल्य असणा-या जाती जमातीच्या लोकांना सैन्यामध्ये भारती करण्यात आले. ज्यामुळे शेकडो वर्षे आपल्या साहस आणि धाडसाचे कौशल्य पणाला लावून सैन्याची धुरा वाहून नेली त्या महार बटालियन ला ब्रिटीश सैन्यातून बेदखल करण्यात आले. ज्यामुळे महार बटालियन च्या सैन्यात आणि महार समाजात ब्रिटीश सरकार विरोधात असंतोष निर्माण झाला होता.
महार बटालियन बरखास्त करण्यात आल्यानंतर १८९४ मध्ये गोपाल बाबा वलंगकर यांनी ब्रिटीश सरकारला निवेदन केले. आणि त्या निवेदनात महार बटालियन ची पुन्हा निर्मिती करून महार सैनिकांना सैन्यात भरती करण्यात यावी अशी विनंती केली. १९०४ मध्ये शिवराम जानबा कांबळे यांनीसुद्धा महार बटालियन च्या पुर्नगठनासाठी ब्रिटीश सरकारला विनंती केली. आणि ब्रिटीश सरकारने अंगिकारलेल्या तत्कालीन सैन्य भरती धोरणाचा विरोध केला. ज्या महार बटालियनच्या महार सैन्यांनी इतिहासात आपल्या शौर्याचे आणि पराक्रमाचे पुरावे दिले त्याच महार बटालियनला बरखास्त करण्याचे सरकारचे धोरण एक न उलगडणारे कोडेच होते. कदाचित महार बटालियन बरखास्त करावी यासाठी बाह्य परिस्थितीचा दबाव आणला गेला असावा याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेने महारांना अतिशुद्रचा दर्जा देऊन समाजव्यवस्थेतून बेदखल केले होते. त्याच महार समाजाने सैन्यामध्ये येउन पराक्रमाचे अनेक विक्रम गाजविणे म्हणजे चातुर्वर्णनाने स्वतःच्या बाजूला गोंजारत ठेवलेल्या क्षत्रियांचा आणि संपूर्णच जातिव्यवस्थेचा इतिहास अमान्य ठरविणे असेच होते. त्यामुळे महार बटालियन च्या बरखास्तीचा खरा इतिहास दडवून ठेवला गेल्याची पूर्ण शक्यता नाकारता येत नाही.
महार बटालियनच्या पराक्रमाची आणि शौर्याची उणीव ब्रिटीश सैन्याला जाणवणार हे सिद्धच होते. महार बटालियन सैन्यापासून फार काळ लांब ठेवता येणार नाही अशीच परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली. पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याची जी दारूण परिस्थिती उद्भवली हे लक्षात घेता पहिल्या महायुद्धाच्या परिस्थितीने ब्रिटीश सरकारला महार बटालियन सैन्यात पुन्हा निर्माण करणे भाग पडले. १९१७ ला पुन्हा १११ सैनिकांची महार बटालियनच्या सैन्यात भरती करण्यात आली. १९२० ला महार बटालियन ७१ व्या पंजाब रेजिमेंट मध्ये सामावून घेण्यात आली. व पुन्हा १९२१ ला महार बटालियन बरखास्त करण्यात आली. १८१८ च्या आधीचा एक काळ असा होता की ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या बाम्बे आर्मीमध्ये १/६ सदस्य हे महार बटालियनचे होते. परंतु १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात महार बटालियनच्या संदर्भाने ब्रिटीश सरकारने वेळोवेळी घेतलेले निर्णय हे शंकेस पात्र ठरतात. कदाचित पडद्यामागील इतिहास लपवून ठेवण्यात आल्याने भारतातील प्रस्थापित जातीव्यवस्थेचे शिकार महार बटालियनला करण्यात आले असावे. अशी शंका घेण्यास वाव मिळतो. कदाचित महार बटालियनचा इतिहास दडवून ठेवण्यात आले हा सुद्धा एका षडयंत्राचाच भाग असावा. भीमा कोरेगाव चे स्तंभ विजयस्तंभ म्हणून ब्रिटिशांनी उभारले नसते तर महार बटालियन चा आज उपलब्ध असलेला इतिहासही पडद्याआड गेला असता हे तेवढेच सत्य वाटते.
जुलै १९४१ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व्हाईसरॉय एक्सिक्युव कॉन्सिलच्या डिफेन्स अड्व्हाय्झरी कमिटी वर नियुक्ती करण्यात आली. या पदाचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षापासून सैन्यातून बरखास्त करण्यात आलेली महार बटालियन / रेजिमेंट सैन्यात पुन्हा स्थापन करण्यात यावी यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव आणला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रयत्नांना यश आले. १ आक्टोम्बर १९४१ ला लेफ्टीनंट जनरल कर्नल जोह्नसन यांच्या १३ व्या Frontier Force Rifles च्या तुकडीत महार रेजिमेंट बटालियन ची स्थापना बेळगाव, कर्नाटक येथे स्थापन करण्यात आली. तसेच महार बटालियन ची दुसरी महार रेजिमेंट बटालियन लेफ्टीनंट जनरल कर्नल किरवान आणि मेजर भोलाजी रांजणे यांच्या नेतृत्वात कामठी, नागपूर येथे स्थापन करण्यात आली. त्यावेळेस महार रेजिमेंट च्या टोपीवरील बिल्ल्यावर भीमा कोरेगाव चे पिल्लर असणारे चिन्ह व त्यावर "World Mahar" कोरण्यात आले. हे चिन्ह दुस-या महार बटालियनचे कॅप्टन मोर्टलेमांस यांनी तयार केले होते. जे प्रत्येक महार बटालियनच्या सैनिकांच्या डोक्यावर पराक्रमी विजय चिन्ह म्हणून शोभून दिसत होते.
तिसरी महार रेजिमेंट बटालियन बेळगाव, कर्नाटक येथेच १९४२ ला लेफ्टीनंट जनरल कर्नल कम्बिएर आणि मेजर सरदार बहादूर लाडकोजीराव भोसले यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आली. द्वितीय महायुद्धाच्या वेळी पहिली व तिसरी महार रेजिमेंट North-West Frontier Province च्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली. तर दुसरी आणि २५ वी बटालियन देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली होती. द्वितीय महायुद्धाच्या काळात महार बटालियन बर्मा campaign मध्ये ब्रिटीशांच्या बाजूने प्राणपणाने लढली. जी मोहीम अतिशय धोकादायक आणि शौर्य पणाला लावून लढायची होती त्या मोहिमेत महार बटालियन चा वापर केला गेला. यावरून सैन्यातील महार बटालियन चे महत्व लक्षात घेण्यासारखे आहे. या मोहिमेत ५ महार बटालियनचे सैनिक शहीद झाले. व त्याच बटालियन च्या एका ऑफिसर ला त्याच्या शौर्यासाठी गौरविण्यात सुद्धा आले होते.
१ ऑक्टोबर १९४६ ला महार रेजिमेंट मशीनगन रेजिमेंट म्हणून नावारूपास आली. 'महार रेजिमेंट' चे 'महार मशीनगन रेजिमेंट' असे नवीन नाव देण्यात आले. 'महार मशीनगन रेजिमेंट' चे केंद्र कामठी, नागपूर येथेच स्थापन करण्यात आले. मात्र यावेळी 'महार रेजिमेंट' च्या टोपीवरील बिल्ल्यावरील चिन्हात बदल करण्यात आले. बदललेल्या चिन्हात भीमा कोरेगावच्या स्तंभावर Cross Wicker मशीनगन चे चिन्ह कोरण्यात आले.  'महार मशीनगन रेजिमेंट'च्या ३ बटालियननी पंजाब च्या सीमावर्ती प्रदेशात पंजाब सीमा सैनिक दलात काम केले. १९४७ ला भारताच्या फाळणीच्या वेळी संरक्षण शरणार्थी म्हणूनही  'महार मशीनगन रेजिमेंट' बटालियनने काम केले. पंजाब प्रांतात सीमा सुरक्षा दल म्हणून काम करतांना 'महार मशीनगन रेजिमेंट' ने आपले शौर्य पणाला लावून हरयाणा आणि हिमाचल प्रदेशातील अनेक गावांना सुरक्षा प्रदान केली होती. महार रेजिमेंट / बटालियन पासून तर  'महार मशीनगन रेजिमेंट' पर्यंतचा हा प्रवास अनेक शौर्य इतिहासांना प्रस्थापित करून गेला. परंतु त्याची नोंद भारतीय जातीय मानसिकतेतून लिहिल्या गेलेल्या इतिहासाने कधी घेतली नाही हेच दिसून येते.
महार बटालियन मधील १, २, ३, ७, ८ आणि १३ या बटालियन या पूर्णपणे महार बटालियन होत्या. ज्यात प्रामुख्याने महार सैनिकांचा समावेश होता. ४, ५ आणि ६ या तीन बटालियन तुकड्यांनी सीमा सुरक्षा दल म्हणून काम केले. ज्या तीन तुकड्या पंजाब प्रांतात सीमावर्ती प्रदेशात तैनात करण्यात आल्या होत्या. महार बटालियन च्या १६ व्या तुकडीला ८ व्या पराशुट बटालियन मध्ये बदलण्यात आले होते. व १९८१ ला हीच बटालियन यांत्रिक पायदळाच्या १२ व्या तुकडीत समाविष्ट करण्यात आली. महार बटालियन चे शौर्य सैन्याच्या प्रत्येक विभागात आपे पराक्रम गाजवून गेले. ज्यामुळे महार बटालियन ला ब्रिटीशकालीन भारतीय सैन्यातच नव्हे तर स्वतंत्र भारताच्या सैनिक दलामध्येसुद्धा मानाने-सन्मानाने गौरविण्यात आले. आजही भारतीय सैन्यात महार बटालियनचे नाव सन्मानाने घेतले जाते. शूरवीर आणि लढवैय्या महारांनी भारतीय सैन्याची मान सदैव उंच ठेवली. सैन्यातील शौर्याला एका सन्मान पातळीवर नेउन पोहचविले. जाज्वल्य देशभक्ती आणि देशाचे संरक्षण यात महार बटालियन सदैव अग्रेसर राहिलेली आहे. महार समाजात जन्म घेणा-या प्रत्येक माणसाला त्यांच्या पूर्वजांनी गाजविलेल्या इतिहासाचा गर्व आहे. आणि तो असायलाच पाहिजे. अश्या शूर, पराक्रमी आणि लढवैय्या पूर्वजांचे वारस म्हणून महार समाजाने अभिमान बाळगला तर त्यात काहीही गैर ठरणारे नाही.
महार बटालियनने स्वातंत्र्यपूर्व काळातच आपले शौर्य गाजविलेले नसून स्वतंत्र भारतातही महार बटालियनच्या शौर्याचा इतिहास दिसून येतो. महार सैन्यांनी आणि महार बटालियनने कांगो आणि सोमालियाच्या मोहिमेमध्ये सुद्धा पराक्रम गाजविलेले आहेत. इतकेच नव्हे तर पोलो, पवन, मेघदूत आणि विजय या मोहिमेवरही महार सैन्याचे व महार बटालियनचे मोठे योगदान राहिलेले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही संस्थानांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यास असमर्थता दर्शविली होती. जी अखंड भारताच्या दृष्टीने आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक होती. त्यात हैद्राबाद येथील संस्थानाचा उल्लेख करावा लागेल. त्यावेळेस सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद संस्थानाचे निजाम / प्रमुख उस्मान अली खान आणि आसिफ झा VII यांच्या विरोधात Hydrabad Police-Military Operation भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आले होते. ज्या मोहिमेचे Code नाव 'POLO' असे ठेवण्यात आले होते. या पोलो मोहिमेमध्ये सुद्धा महार सैनिकांनी आणि महार बटालियननी पराक्रम दाखविल्याचा इतिहास आहे.
१९८७ ला दक्षिण भारतात LTTE लिट्टे या संघटनेविरुद्ध भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या "Operation पवन" या मोहिमेत महार बटालियन ने महत्वाची भूमिका बजावली होती. १३ एप्रिल १९८४ ला काश्मीर मधील सियाचीन संघर्षात भारत सरकारने राबविलेल्या 'Operation मेघदूत' या मोहिमेतही महार बटालियन आणि महार सैनिकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आणि सरतेशेवटी १९९९ ला झालेल्या भारत पाकीस्थान यांच्यातील कारगील युद्धामध्येसुद्धा महार बटालियन पराक्रम गाजवून गेली आहे. म्हणजेच स्वातंत्र्यानंतरही देशाच्या संरक्षणासाठी महार बटालियन आणि महार सैनिक सदैव समोर राहिलेले दिसून येतात. अतिशय अल्प पुराव्यांच्या आधारावर मिळालेला हा महार बटालियन आणि महार सैनिकांच्या योगदानाचा इतिहास इतका जाज्वल्य आहे की प्रत्येक भारतीयात महार सैनिकात असलेले धाडस आणि साहस निर्माण झाले. तर या देशावर आक्रमण करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. इतकेच काय तर देशांतर्गत चालना-या आतंकवादी कारवाया संपुष्टात आणता येईल. गरज आहे ती महार बटालियन च्या सैन्याकडून प्रेरणा घेण्याची...
असे म्हटले जाते की अंगभूत नैसर्गिक गुण हे त्या व्यक्तीला, समाजाला त्यांच्या पूर्वजांकडून लाभलेले असते. इथल्या महारांना आणि महार समाजाला त्यांच्या पराक्रमी आणि साहसी पूर्वजांचे नैसर्गिक गुण लाभलेले आहेत. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या रूपाने त्याचे प्रात्यक्षिक या देशाने अनुभवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरही वेळोवेळी देशहीतासाठी या समाजाने घेतलेली भूमिका हे त्यांच्या पूर्वजांच्या इतिहासाला पुनरुज्जीवित करणारी ठरली आहे. परंतु पूर्वजांच्या शौर्य आणि पराक्रमी इतिहासाचे जप करीत बसण्यापेक्षा त्या इतिहासाला भविष्यकाळात टिकवून ठेवण्याची जबाबदारी इथल्या महारांची किंवा धर्मांतरित झालेल्या आधुनिक बौद्ध समाजाची आहे. इथल्या प्रतीक्रांतीवाद्यांना महारांच्या इतिहासाला पुसू न देता तो इतिहास जिवंत ठेऊन पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करण्याची जबाबदारी येणाऱ्या पिढ्यांची असणार आहे. हे लक्षात असू द्या... तेव्हाच या समाजाला आपल्या पूर्वजांच्या पावलांवर पाऊल ठेवून नव इतिहासाची निर्मिती करता येईल...  

**************************
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर... ९२२६७३४०९१ 

Wednesday, 28 November 2012

सूर्यमालिकेतील निखळ तारा सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर




सूर्यमालिकेतील निखळ तारा सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर
....डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१
*************

दिनांक १२-१२-१९१२ ला बाबासाहेब नावाच्या महासुर्य आणि रमाई नावाच्या त्यागमुर्तीच्या पोटी जन्माला आलेले भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर...बाबासाहेबांच्या अपेक्ष्यांच्या भाराने दबून राहिलेले...परीस्थितीतीने दिलेल्या चटक्यांनी जीवघेण्या आजाराशी अहोरात्र लढणारे...बापाचे महापुरुषत्व पेलतांना स्वतःमधल्या सामान्यत्वाला बळी पडलेले...बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानानंतर स्वतःसोबत संपूर्ण परिवाराला समाजासाठी, धम्मकार्यासाठी  झोकून देणारे...पण सदैव समाजातून दुर्लक्षित झालेले...त्यागाचा बळी ठरलेले...महापुरुषाचा वारसा लाभला असतांना उपेक्षिताचे जीवन जगणारे...समाजाच्या रोषाचे बळी ठरलेले भैय्यासाहेब आंबेडकर सूर्यमालिकेत चमकूनही काळाच्या पडद्याआड लुप्त झालेला निखळ तारा म्हणून फार कमी लोकांनी ओळखला...त्यांचा जन्मशताब्दी वर्ष १२-१२-२०१२ भारतीय बौद्ध महासभा ( दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ) च्या वतीने साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने भैय्यासाहेबांच्या जीवनाला, त्यांच्या कर्तुत्वाला, नेतृत्वाला आणि व्यक्तिमत्वाला समर्पित केलेली ही आदरांजली...

महापुरुषाच्या पोटी जन्म घेऊन स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किती कठोर परिस्थितीचा सामना करावा लागतो. याचा प्रत्यय भैय्यासाहेब आंबेडकरांना निश्चितच आला होता. नव्हे संपूर्ण आयुष्यात ते ओझे घेऊन जगावे लागले असावे. जगाने ज्या महानावाच्या क्रांतीचा, विचारांचा आणि बुद्धीचा गौरव केला तो महामानव व्यक्तिमत्वाच्या पडताळणीचा आधार बनत असेल. अश्या परिस्थितीत स्वतंत्र व्यक्तिमत्व कसे उभारायचे. याचे दडपण निश्चितच भैय्यासाहेबांना होते. मोठ्या वृक्षाखाली पालव्या कोमेजून जातात तशीच परिस्थिती भैय्यासाहेबांवर ओढवली असेल. हे समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा वारस म्हणून किती दडपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला. याचा विचार करून भैय्यासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितले गेले नाही. हीच खरी शोकांतिका ठरली. याच गृहीतकांवर आधारित भैय्यासाहेबांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू सापडू शकतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श व्यक्तिमत्व होते. सामाजिक जाणीवेने त्यांच्या व्यक्तीमत्वात निर्माण केलेला वैचारिक हिमालय सामाजिक विषमता आणि अन्यायावर तुटून पडतांना सहजच त्यांच्या स्वभावात काही वैशिष्ट्ये निर्माण होत गेली. त्यांचा स्वभाव तापट होता. पण तितकाच तो मृदूही होता. निश्चितच बाबासाहेबांना आपल्या मुलाकडूनही काही अपेक्षा होत्या. त्या लादलेल्या नसल्या तरी व्यावहारिकतेच्या परिपेक्षात परीस्थितीतीय बदलाच्या होत्या. या अपेक्षांच्या दडपणामुळे बाबासाहेबांच्या तापटपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला असेल हे निश्चितच. त्यामुळे भैय्यासाहेबांच्या व्यक्तीमत्वावर त्याचाही प्रभाव जाणवायचा. भैय्यासाहेब कधीही प्रखर नव्हते. भैय्यासाहेबांचा स्वभाव शांत होता. शिवाय शारीरिक व्याधीमुळेसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकला होता. संधिवाताचा सामना करतांना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधी सामाजिक जीवनात उतरू दिले नाही. परंतु काही समाजकंठकांनी त्यांच्या या आजाराचे भांडवल करून भैय्यासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांनी बाबासाहेबांच्या परिवाराची केलेली ही प्रताडना आहे. बाबासाहेबांनी या समाजासाठी आणि देशासाठी दिलेल्या योगदानाची परतफेड अश्याप्रकारे बाबासाहेबांच्या परिवाराची (मुलाची) प्रताडना करून जर आम्ही करीत असू तर आम्हाला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार राहतो का ? 

हजारो शोषित-पिडीत-मागास वर्गाच्या उत्थानासाठी जगतांना बाबासाहेबांनी कधी मुलांच्या आजाराकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी समाजासाठी दिलेल्या या बलिदानाचे बळी त्यांची इतर मुलेही ठरली. भैय्यासाहेब हे बाबासाहेबांचे एकमेव वारस होते जे जगले. हे दडपण पेलून धरतांना भैय्यासाहेबांनी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण केले. कदाचित ते असामान्य नसेलही परंतु शांत, चिंतनशील, सहनशील, वैचारिक असे गुणवैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तीमत्वात निश्चितच होते. बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानानंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडतांना त्यांच्या शांत व्यक्तिमत्वाचा निश्चितच लाभ झाला. ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेचा त्यांच्या कार्यकाळात अनेक राज्यांमध्ये व्याप वाढू लागला.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून अनेकांनी बाबासाहेबांचे भांडवल केलेले आहे. बाबासाहेबांचे भांडवल करून अनेकांनी स्वतःचा स्वार्थ साधून घेतला आहे. बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून लोकसभा, राज्यसभा सदस्य ते मुख्यमंत्री पदापर्यंत काहींनी मजल मारली आहे. अश्या सर्व परिस्थितीत भैय्यासाहेब आंबेडकर हे तर बाबासाहेबांचे एकमेव वारस होते. त्यांनी म्हटले असते तर ही सर्व पदे सर्वात आधी त्यांच्याकडे धावून आली असती.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जगप्रसिद्ध महामानवाचा वारस म्हणून भैय्यासाहेबांना पाहिजे ते यश सहज मिळविता आले असते. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे भांडवल करून त्यांना व्यक्तिगत स्वार्थ साधता आला असता. परंतु त्यांनी याचा साधा गर्व सुद्धा कधी बाळगला नाही. ज्या काळात बाबासाहेब करोडो माणसांचे हृदयसम्राट होते. त्या काळात त्यांचे वारस भैय्यासाहेब हे अतिशय सामान्य जीवन जगले. यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या महानतेची दुसरी पावती देण्याची गरज भासत नाही.

राजकीय स्वार्थ, राजकीय पद, सत्ता या सर्वाचा त्याग करण्याची प्रवृत्ती आजपर्यंत कुणामध्ये दिसून आली नाही. संधी मिळाली तर प्रत्येकच माणूस यासाठी नको ते प्रकार / नको तो व्यवहार / नको ती पातळी गाठायला तयार असतो. परंतु बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानानंतर भैय्यासाहेब आंबेडकरांनी यासाठी कधी हट्ट धरला नाही. किंवा कुठलेही पद घेतले नाही. बाबासाहेबांचा राजकीय वारस म्हणून स्वतःला कधी समोर केले नाही. सदैव इतरांना पुढे करून त्यांना समर्थन देऊन स्वतः मात्र आयुष्यभर धम्माचे काम करीत राहिले. धम्म कार्यात स्वतःला वाहून घेतले. आजच्या आधुनिक पिढीला आणि जे स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेतात त्यांच्यासाठी भैय्यासाहेबांचे व्यक्तिमत्व आदर्श ठरावे असेच होते.

स्वातंत्र्याच्या उद्घोषात मिळालेले राजकीय स्वातंत्र्य व राजकीय पदे भूषविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणा-यांच्या पिढीत भैय्यासाहेब धम्मासाठी काम करतात.  आणि राजकीय भूमिका घेण्याची जबाबदारी दादासाहेब गायकवाडांसारख्या माणसांवर सोडून देतात. यापेक्षा मोठा त्याग बाबासाहेबानंतर या समाजात इतर कुठल्याही नेत्याने केलेला नाही. बाबासाहेबांनी पाहिलेले भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व त्यासाठी धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भैय्यासाहेबांनी स्वतःला झोकून दिले. त्याचाच परिणाम आहे कि आज भारतीय बौद्ध महासभा देशातल्या २२ राज्यांमध्ये अस्तित्व टिकवून आहे.

भैय्यासाहेबांनी राजकीय स्वार्थाचा त्याग केला. धम्मकार्य केले तरीही काहींनी त्यांना बदनाम करण्याचे सोडले नाही. ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेला अपेक्षित यश मिळविता आले नसले, तरी जे काही आज भारतात बौद्धांची संख्या वाढलेली आहे. ती भैय्यासाहेबांनी केलेल्या प्रयत्नांचाच परिपाक आहे. हे निश्चितच म्हणावे लागेल. समाज भैय्यासाहेबांना बदनाम करणा-यांना बळी पडला. आणि त्यामुळे भैय्यासाहेबांना धम्मकार्यात अपेक्षित सहकार्य केले गेले नाही. तरीही भैय्यासाहेबांनी धम्माचा किल्ला एकहाती लढला. कुठल्याही स्वार्थाविना. भैय्यासाहेबांनी बाबासाहेबांना दिलेली हि खरी आदरांजलीच होती. बाबासाहेबांनी समाजासाठी केलेल्या पारिवारिक त्यागाचा वारसा भैय्यासाहेबांनी जिवंत ठेवला. हे मोठे ऋण बौद्ध व आंबेडकरी समाजाला फेडता येणे शक्य नाही.

भैय्यासाहेब दादासाहेब गायकवाडांच्या खांद्याला खांदा लावून सदैव त्यांच्या पाठीशी राहिले. १९६२ ला भैय्यासाहेबांचा ५० वा वाढदिवस साजरा केला गेला होता. तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ दादासाहेब गायकवाडांनी काढलेले गौरवोद्गार अतिशय बोलके आहे. दादासाहेब गायकवाड म्हणाले होते, " भैय्यासाहेब माझ्यासारख्या आंधळ्यांची काठी आहेत ". डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसत्व लाभलेले भैय्यासाहेब चळवळीत इतरांचे काठी बनले. चळवळीत इतरांना सहकार्य केले. चळवळीला दिशा देण्याचे काम केले. पण कधीही स्वतःचे नेतृत्व समाजावर लादले नाही. नेतृत्व संघर्षापासून सदैव स्वतःला अलिप्त ठेवले. आधुनिक काळात नेतृत्व स्पर्धेत उतरलेल्या नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे.

तत्कालीन समाजात भैय्यासाहेबांना सन्मान होता. याचा प्रत्यय दलित पँथर च्या काळात मुंबईतील एका महारवाड्यात आला होता. त्या ठिकाणी कुठल्याही आंबेडकरी नेत्यांना येण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. दलित पँथरच्या नेत्यांनाही मज्जाव करण्यात आला होता. संपूर्ण समाज अन्याय व दहशतीत जगत होता. अश्या परिस्थितीत फक्त भैय्यासाहेब आंबेडकरांनी त्या इलाख्यात जाण्याची तयारी दर्शविली. अनेकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तरीही भैय्यासाहेब आपल्या निर्णयावर खंबीर राहून त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. ज्या ठिकाणी आंबेडकरी नेत्यांना आणि दलित पँथरच्या नेत्यांना मज्जाव केला गेला होता. त्या ठिकाणी भैय्यासाहेबांना विरोध करण्यासाठी कुणीही समोर आले नाही. हा संदर्भ ज. वि. पवार यांनी लिहिलेल्या आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ खंड - ४ यात सापडतो.  यावरून भैय्यासाहेबांचे खंबीर व्यक्तिमत्व आणि परिस्थितीला हाताळून नेण्याचे मनोधैर्य या त्यांच्या व्यक्तिमत्वातील गुणांचेही दर्शन होते.

सदैव सामान्य माणसाचे जीवन जगणारे भैय्यासाहेब शेवटपर्यंत सामान्य माणूस म्हणूनच जगले. भैय्यासाहेब अहंकारशून्य, गर्व नसलेले, मदतीला धावून जाणारे, चळवळीत काम करणा-यांचे मनोधैर्य वाढविणारे होते. धम्मकार्यात मग्न असणारे भैय्यासाहेब बाबासाहेबांनी दिलेल्या वारस्यात नाही तर बाबासाहेबांनी दिलेल्या संदेश वहनातच संदेशवाहक म्हणून जगले. धम्माचे प्रचारक म्हणून जगले. त्यांच्या हयातीतच अनेकांनी त्यांच्या विषयी समाजात पेरून ठेवलेले बदनामीचे विष पचवून ते जगले. कधीही त्यांनी कुणावर टीका केली असेल असे ऐकिवात नाही. आपल्या शत्रूंनाही त्यांनी आपल्या धम्मकार्यातून चोख प्रत्युत्तर दिले. त्यांच्यावर होणा-या टीकेकडे दुर्लक्ष करून धम्माचा प्रचार व प्रसार केला. व्यक्तिमत्वाचा प्रचारकी व बडेजाव आणणारा थाट त्यांनी कधी बाळगला नाही. त्यांच्या टीकाकारांना त्यांनी कधीही उत्तरे देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्यांचे टीकाकारही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे चाहते व्हावे. असेच व्यक्तिमत्व घेऊन भैय्यासाहेब जगले.

बाबासाहेबांच्या पश्चात बाबासाहेबांच्या परिवाराकडे ज्या समाजासाठी बाबासाहेबांनी आपले सर्वस्व अर्पण केले, त्याच समाजाने दुर्लक्ष केले. कुठल्या न कुठल्या प्रकारे बाबासाहेबांच्या परिवाराला बदनाम करण्यातच काहींनी आपले आयुष्य घालविले. भैय्यासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न विविध पातळ्यांवर झाला. खास करून १९८० नंतर बीएसपी आणि बामसेफ सारख्या संघटनांनी तर बाबासाहेबांच्या परिवाराला आणि त्या परिवारातील प्रत्येक सदस्याने या समाजाला दिलेल्या योगदानाला झाकून टाकण्यासाठी प्रतीक्रांतीवादी शक्तींशी हातमिळवणी करून बदनामी केली. त्यामुळे समाजातल्या सर्वसामान्य माणसांना बाबासाहेबानंतर त्यांच्या परिवाराने या समाजाला दिलेल्या योगदानाची माहितीच मिळू शकली नाही. आणि ज्यांनी या परिवाराला बदनाम केले त्यांनी मात्र प्रतीक्रांतीवादी शक्तींशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री ते राज्यपाल पदापर्यंत मजल मारली.

भैय्यासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबानंतरचे एकमेव नेते होते, जे समाजासाठी व धम्मकार्यासाठी जगले. ज्यांनी स्वतःचा स्वार्थ कधीच बघितला नाही. राजकीय लालसा कधी बाळगली नाही. सत्तेच्या मोहजाळातून अलिप्त राहिले. टीकाकारांना उत्तरे न देता शांत राहून अप्रत्यक्ष उत्तरे देत राहिले. कुणाच्याही विरुद्ध भूमिका न घेता, कुणावर टीका करीत न बसता भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्माची जबाबदारी पार पाडत राहिले. भैय्यासाहेबांनी स्वतःसोबत मीराताई आंबेडकरांनाही धम्मकार्यात वाहून घेतले. इतकेच नाही तर भैय्यासाहेबांनी त्यांच्या मुलांवर केलेल्या संस्काराचाच परिणाम म्हणून आजही त्यांची मुले बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर व आनंदराज आंबेडकर स्वतःच्या कर्तुत्वाने या समाजात स्वतःचे स्थान निर्माण करीत आहेत. पण कधीही त्यांनी बाबासाहेबांचे वारस म्हणून संपूर्ण समाजाचे आम्हीच नेते असा आव आणला नाही. हा भैय्यासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मुलांवर केलेल्या संस्काराचाच परिणाम म्हणावा लागेल. भैय्यासाहेबांचे या समाजासाठी, आंबेडकरी चळवळीसाठी त्यागाचे हे प्रतिक आहे.

आधुनिक पिढीला, आधुनिक आंबेडकरी चळवळीत काम करणा-या कार्यकर्त्यांना, समाजाची धुरा पेलून धरण्याची इच्छा असलेल्या समाज सुधारकांना, राजकीय नेतृत्व मिळविण्याची घाई झालेल्या नेत्यांना, आंबेडकरी चळवळीचे ऋण फेडू पाहणा-या अनुयायांना, आंबेडकरी समाजाला आणि या जगात बौद्ध म्हणवून घेणा-या प्रत्येकच माणसाला भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांच्या त्यागाचा, व्यक्तिमत्वाचा व त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा लागेल. आंबेडकरी चळवळ राजकीय स्वार्थाने सत्तालोलुप बंधनात अडकली असतांना भैय्यासाहेबांचा आदर्श समाजासमोर निर्माण करणे आज काळाची गरज आहे. नव्हे ती आंबेडकरी चळवळीचीच गरज आहे.

भैय्यासाहेबांसारखे नेतृत्व पुन्हा या चळवळीला लाभणार नाही. भैय्यासाहेब हे या चळवळीसाठी आदर्श म्हणून जगले होते. आणि यानंतरच्या पिढीसाठीही आदर्श राहतील. बदनामीचे कितीही मोठे वादळ भैय्यासाहेबांच्या व्यक्तीमत्वाभोवती उभे केले गेले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची ते कमी करू शकणार नाही. आमच्यासारखे आंबेडकरी चळवळीचा निस्वार्थ व डोळस अभ्यास करणारे कार्यकर्ते सदैव भैय्यासाहेबांचे ऋणी राहतील. व त्यांच्या व्यक्तिमत्वातील उंचीला ढासळू देणार नाही. आंबेडकरी चळवळीत डॉ. बाबासाहेबांच्या पोटी जन्मलेल्या सुर्यपुत्राचा, धीरगंभीर व्यक्तिमत्वाचा, प्रत्यक्ष त्यागमूर्तीचा, आदर्श अश्या सामान्य कार्यकर्त्याचा, आदर्श धम्म संदेशवाहकाचा हा समाज, ही चळवळ सदैव ऋणी राहील. आज १२-१२-२०१२ ला भैय्यासाहेब नावाच्या त्यागमूर्तीच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचा आदर्श समाजाने घेतला तर ख-या अर्थाने ती त्यांच्या कार्याला, व्यक्तिमत्वाला अर्पण केलेली आदरांजली ठरेल.

भैय्यासाहेब...
तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यागाचा वारसा लाभलेली 
"लोखंडाचे चणे चावणारी आंबेडकरी चळवळ" उभारायला आम्ही निघालो आहोत.
भैय्यासाहेब...
फेकलेल्या तुकड्यातून उभारलेल्या राजकीय महालाचा निरोप घेऊन
आम्ही निघालो आहोत विजयस्तंभाच्या शिळेवर माथा टेकून
प्रतीक्रांतीवाद्यांचा बुरुज उध्वस्त करायला.
भैय्यासाहेब...
धम्म प्रचार आणि प्रसाराचा तुम्ही घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेऊन 
धम्माच्या रोपट्याचा बोधिवृक्ष करायचा भारतीय बौद्ध महासभा निर्धार करीत आहे.
भैय्यासाहेब...
आता तुमचा प्रत्येक शिलेदार  इथे उभा झाला आहे 
रिपब्लिकन पक्षाच्या ध्येय आणि उद्दिष्टांची पूर्ती करणे
हा एकमेव जाहीरनामा घेऊन...

....डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१

********************