Thursday, 28 February 2013

आंबेडकरवाद्यांची राजकीय भूमिका आणि सत्ताधारी मानसिकता




आंबेडकरवाद्यांची राजकीय भूमिका आणि सत्ताधारी मानसिकता
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.  ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५


दि. २४ सप्टेंबर १९४४ च्या मद्रास येथील भाषणात बाबासाहेब म्हणतात, "शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा." बाबासाहेबांच्या या एका वाक्याच्या अवतीभवती संपूर्ण आंबेडकरवाद्यांनी आपली मानसिकता तयार केली. आणि मग सुरु झाला शासनकर्ती जमात बनण्याचा प्रवास. काहींनी याच एका वाक्याचा विपर्यास करून आंबेडकरवाद्यांना विविध गटात तोडले. त्यांच्यात फुट पाडली. तर काहींनी या वाक्याचा वापर करून समाजाचे भावनिक वशीकरण केले. समाजाला आर्थिक साधनांनी लुटले. सत्ताधारी बनले. सत्तेची फळे चाखली. महापुरुषत्व निर्माण केले. समाजानेही त्यांना महापुरुषांच्या रांगेत नेउन बसविले. मात्र बाबासाहेबांच्या संकल्पनेतला शासनकर्ता समाज बनलाच नाही. कारण शासनकर्ती जमात बनण्याची प्रक्रिया, विचार, सिद्धांत सत्तेवर गेलेल्यांनी स्वीकारले नाही. आणि समाजानेही स्वीकारले नाही.
मुळात आजही आंबेडकरवादी शासनकर्ती जमात बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून काहीचे हात मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यांनी सत्तेवर येऊनही समाजाला शासनकर्ती जमात बनविले नाही. त्यांच्याच पाठीशी लागून आंबेडकरी समाज आणखी किती वर्ष स्वप्नात जगत राहणार ? असा प्रश्न आता आधुनिक आंबेडकरी पिढीच्या समोर निर्माण झाला आहे. विशिष्ट माणसे सत्तेवर गेली किंवा विशिष्ट माणसांच्या हातात सत्ता आली अथवा एखाद्या विशिष्ट समाजाचा व्यक्ती मुख्यमंत्री-पंतप्रधान झाला म्हणजे समाजाचे "शासनकर्ती जमात" बनण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. असे सोईचे मांडले गेलेले गृहीतक समाजाच्या उत्थानासाठी-कल्याणासाठी अतिशय धोकादायक आहे. विचार, सिद्धांतावर आधारित सत्तेची प्रक्रिया जोपर्यंत समाजाच्या तळागाळातल्या माणसांमध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक आमुलाग्र बदल घडवून आणीत नाही. तोपर्यंत समाज 'शासनकर्ती जमात' बनू शकत नाही. समाजाच्या स्थितीत सत्तेने कुठलाही बदल घडून येत नसेल. तर त्या सत्तेला आम्ही समाजाची सत्ता म्हणणे सामाजिक विकासाला घातक आहे.
आंबेडकरी समूहाने 'शासनकर्ती जमात' बनण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली तत्वे अंगिकारली नाही. ज्यांनी अंगीकारण्याचा प्रयत्न केला अश्या RPI व तत्सम संस्था व संघटनांना प्रतीक्रांतीवाद्यांच्या हस्तकांनी (BAMSEF & BSP) बदनाम करून सत्ता प्राप्त करणे. हे एकमेव गृहीत 'शासनकर्ती जमात' या संकल्पनेभोवती फिरविले. ज्यामुळे सत्ता हस्तगत केल्याशिवाय समाजाचा कुठलाही विकास घडून येणार नाही. असा चुकीचा पायंडा समाजासमोर पाडला गेला. PM आणि CM बनणे म्हणजेच 'शासनकर्ती जमात' बनणे असे तकलादू विचार-विधान समाजात पेरल्या गेले. आणि पदे उपभोगुन समाजाला आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आले. आंबेडकरवादी वैचारिक सत्ता चालविलीच गेली नाही. समाज मात्र दुभंगत गेला. अस्ताव्यस्त होत गेला. वैचारिक फुट पडली. पराकोटीचा संघर्ष आंबेडकरी विचार शिरोधार्य मानणा-या समाजात निर्माण झाला.  
खरे तर मागील ६० वर्षात आंबेडकरी समूहाने अपेक्षित प्रगती साधली नसली. तरी निर्धारित ध्येय मात्र गाठले. आंबेडकरी समाजाचा स्तर उंचावला गेला. शैक्षणिक प्रगती झाली. आर्थिक स्तर उंचावला. हे सर्व PM/CM झाल्यामुळे साध्य झाले नाही. तर आंबेडकरी विचार अंगीकारल्यामुळे झाले. सत्ताधा-यांवर आंबेडकरी विचारांचे नियंत्रण ठेवल्यामुळे साध्य झाले. याचा विचार आज करण्याची गरज आहे.
राजकीय सत्तेच्या आवर्तनात सापडलेल्या आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, नोकरपेशांनी, चाकरमान्यांनी आणि साहित्यिकांनी त्यांची राजकीय भूमिका घेतलेली आहे का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. सत्तेची समीकरणे फार सोपी आहेत. इथे भूमिकांची कमतरता आहे. राजकीय भूमिका घ्यायला या देशातला कुठलाही कायदा अडवीत नसतांना, उलट कायदाच तुम्हाला राजकीय भूमिका घेण्यास बाध्य करीत असतांना ''मला राजकारणाशी देणेघेणे नाही. राजकारण हे माझे क्षेत्र नाही.'' असे म्हणणा-या माणसांना जोड्यानेच मारले पाहिजे. शोषित-पिडीत, मागास समाजाच्या उत्थानात हि माणसे सर्वात जास्त धोकादायक आहेत. एकदा विचार करून बघा ! नाहीतर मलाच जोड्याने मारा !
आंबेडकरवाद्यांची राजकीय भूमिका दर्शविणारा तक्ता
क्र.
समूह
लोकसंख्येतील प्रमाण 
 राजकीय भूमिका 
1
नेते / कार्यकर्ते 
5 %
दिशाहीन 
2
साहित्यिक / विचारवंत
5 %
नाही.
3
नौकरदारवर्ग
30 %
नाही.
4
तरुण / विद्यार्थी
20 %
अस्पष्ट
5
मजूर / सर्वसामान्य वर्ग 
40 %
नाही.
कुठल्याही पक्षाशी किंवा विचारांशी न जुडलेला माणूस हा कार्यकर्ता आणि सच्चा अनुयायी राहूच शकत नाही. एकाच वेळेस एकाच काळात सर्व पक्ष, सर्व नेते, सर्व विचार, सर्व कृती नाकारण्यासारखे किंवा अमान्य असण्यासारखे राहूच शकत नाही. त्यात कुणीतरी एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक कृती हि निश्चितच श्रेष्ठ आणि मानण्यासारखी असते. समाजाला तो स्वीकारार्ह असतो. समाजासाठी तो लाभदायक असतो. आम्ही त्या विचारापर्यंत किव्हा त्या नेत्यापर्यंत अथवा त्या पक्षापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न कधी केला नसतो. राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष नाकारणारे एक तर स्वतःची फसगत करतात. किंवा समाजाची तरी फसगत करतात. सदासर्वकाळ राजकीय तटस्थ व्यक्ती राहूच शकत नाही. आणि तसा तो राहत असेल; तर तो सामाजिक गुन्हा आहे. सामाजिक द्रोह आहे. आणि अशी व्यक्ती विचारांचा, चळवळीचा आणि क्रांतीचा दावा करू शकत नाही.
नेते, पक्ष एकत्र आले पाहिजे म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडणारे लोक समाजाला किती फसवतील ? चळवळीचा अभ्यास न करता एकतेचा हेका धरणारे कधीही समाजासमोर अभ्यासपूर्ण अश्या एका नेतृत्वाचा पर्याय मांडत नाही. दिवसागणिक नेते आणि पक्ष उभे केले जात आहेत. किती लोकांना एकत्र कराल ? किती पक्ष जोडायचे ? अरे त्यापेक्षा चळवळीतील नेतृत्वाचा अभ्यास करून समाजासमोर एक नेतृत्व उभे करा ! येणा-या काळातील परिस्थिती लक्षात घेता आता आंबेडकरी समाजाने कुठल्याही एका नेतृत्वाचे नेतृत्व स्वीकारणे गरजेचे आहे.
नेते, पक्ष कधीच एकत्र येत नाही. त्यांच्या उगम व जन्म हा एकत्र येण्यासाठी झालेला नसतोच. त्यामुळे त्यांच्या एकत्रीकरणाच्या फाजील गप्पा करणे शुद्ध मूर्खपणा ठरेल. त्यापेक्षा विचारांचे कार्यकर्ते एकत्र आले तर पक्ष, नेता, स्वार्थ या त्रयीला बाजूला सारून आपला पक्ष आणि नेता ठरविणे सोपे जाईल. आणि जेव्हा हे विचारांचे कार्यकर्ते एकत्र येउन आपला पर्यायाने समाजाचा नेता व पक्ष ठरवितात. तेव्हा विचारांसोबत समाज संघटन, पक्ष आणि नेत्यांना एकसुत्रात बांधणे सहज शक्य होते. त्यामुळे जे सत्य आहे ते सत्य मानण्याची हिम्मत निर्माण करा. जो चुकतोय त्याच्या चुका मान्य करा. जे विचारात बसत नाही ते सोडण्याची व त्यासाठी पक्ष-नेतृत्वाची साथ सोडण्याची तयारी दर्शवा. विचाराने एकत्र या ! बसा ! चर्चा करा ! विचार प्रमाण मानून कामाला लागा. स्वतःसोबत समाजाचा पक्ष व नेता ठरवायला विचारांनी एकत्र या ! तुम्ही एकदा का एकत्र आले. तर तुटलेल्या, फुटलेल्या नेत्यांना, पक्षांना जोडणे सोपे जाईल. व एका नव्या परिवर्तन क्रांतीला सुरवात करता येईल. वैचारिक कार्यकर्ते विचाराने एकत्र येतील का ? विचार प्रमाण मानून ठरवतील का त्यांचा नेता आणि त्यांचा पक्ष ? हे ठरवायला तुम्ही एकत्र याल असा आशावाद समाज व्यक्त करतो आहे.
आंबेडकरवाद्यांच्या हातात सत्ता आली नाही. हे निर्विवाद सत्य असले तरी ती येणार नाही. असे गृहीत धरू नये. आधुनिक परिस्थितीत आंबेडकरवाद्यांच्या हातात सत्ता येणे सहज शक्य आहे. फक्त मागील ६० वर्षात आंबेडकरी समूहाने जी राजकीय भूमिका घेणे अभिप्रेत होते ती घेतली गेली नाही. राजकीय भूमिका मागे पडून सत्ता...सत्ता...आणि फक्त सत्ता अश्या डरकाळ्या फोडल्या गेल्या. परंतु विभक्त झालेल्या समाजाला एक निश्चित दिशा देण्यासाठी या समाजाने राजकीय भूमिका स्वीकारलीच नाही. राजकारणात सक्रिय असणारे नेते आणि कार्यकर्ते यांनीच तेवढी एक भूमिका घेतली. ती पण संशयास्पद. निश्चित, विचारपूर्वक आणि समाजाभिमुख ती भूमिका होती असेही म्हणता येत नाही. पण त्यांनी निदान त्या त्या काळात त्यांची राजकीय भूमिका बजावली. परंतु आंबेडकरी समूहातला मोठा वर्ग आहे जो राजकीय अलिप्तता हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवून जगला. तोच समूह ख-या अर्थाने आंबेडकरी समाजात राजकीय नैराश्य आणि राजकीय असमंजसपणा निर्माण करण्यास कारणीभूत ठरला.
            ज्या समाजात राजकीय भूमिकाच स्वीकारली गेली नाही. तो समाज बाबासाहेबांच्या 'शासनकर्ती जमात' या संकल्पनेला प्रत्यक्षात कसा उतरवू शकेल. वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे आंबेडकरी समाजातील एकाही समूहाने स्पष्ट अशी राजकीय भूमिका स्वीकारली नाही. जिथे नेते व कार्यकर्ते यांचीच राजकीय भूमिका दिशाहीन होती. अश्या परिस्थितीत अन्य समूहाकडून किती अपेक्षा करायच्या ? हा खरा प्रश्न निर्माण होतो. तरीही बाबासाहेबांच्या प्रेरणेने राजकारण करणा-या नेते व कार्यकर्त्यांचा समूह हा एकूण लोकसंख्येत फक्त ५ % एवढाच आहे. या समूहाने भूमिका घेतल्या पण स्पष्ट अशी राजकीय भूमिका घेतली नाही. उलट आपले राजकीय अस्तित्व टिकून राहावे म्हणून आपल्या भूमिकेला यांनी स्वतःच पायदळी तुडविले. समाजाने ज्यांच्या भूमिकेचा स्वीकार करून त्यांचे नायकत्व स्वीकारावे अशी परिस्थिती निर्माण केली गेली नाही. नेते व कार्यकर्ते यांनी स्पष्ट राजकीय भूमिका घेतली नाही. याचे कारण सामाजिक मतभेद आणि गटबाजी हे सुद्धा आहे. कारण त्यांच्या भूमिकेला छेद देणारी व्यवस्था अन्य संस्था संघटनांनी समाजात निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेच्या पाठीशी समाजाचा किती समूह आहे ? हे त्यांना निर्धारित करता आले नाही. किंवा सामाजिक पाठिंब्याचा विश्वास त्यांना नव्हता. म्हणून कदाचित त्यांच्या राजकीय भूमिका स्वअस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दिशाहीन होत गेल्या.
जो समाज स्वतःचा नेता, स्वतःचा पक्ष निश्चित करू शकत नाही तो समूह सत्ताधारी बनणे दुरापास्त तर आहेच पण पूर्णतः अशक्यच म्हणावे लागेल. आंबेडकरी समाजात नेमके हेच घडले. बाबासाहेबानंतर समाजाने एक नेतृत्व स्वीकारलेच नाही. त्यामुळे दोष नेते व कार्यकर्ते यांचा जितका आहे. तितकाच दोष साहित्यिक, विचारवंत आणि नौकरदार वर्गाचा देखील आहे. कारण एकूण लोकसंख्येत ४० % असणा-या या वर्गाने राजकीय उदासीनता दाखविली. त्यामुळे ६० टक्के समाज जो या ४० टक्के समूहाच्या भूमिकेवर आपली भूमिका निर्धारित करीत असतो तो भरकटला गेला. ज्याचा लाभ प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात इतर सत्ताधारी पक्षांनी घेऊन या वर्गाची मते साम, दाम, दंड, भेद या आधारावर विकत घेतली.  एकंदरीत आंबेडकरी समाजाची वाटचाल राजकारणाच्या अनुषंगाने दिशाहीन झाली. तर दुसरीकडे सत्तेचे तुकडे टाकून काहींनी या समाजात राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणानंतर समाजाची धुरा सांभाळणारे जर कुठल्याही आमिषांना व स्वार्थाला बळी पडले नसते. तर आज आंबेडकरवाद्यांच्या हातात सत्तेची गुरुकिल्ली राहिली असती.
समाजातला साहित्यिक, विचारवंत, नेते, कार्यकर्ते, नौकरदारवर्ग असा सन्माननिय समूह ज्या दिशेने  मार्गक्रमण करतो त्याच दिशेने सर्वसामान्य समाज समूह, मजूर, तरुण, विद्यार्थीही मार्गक्रमण करीत असतो. परंतु समाजातला हा सन्माननीय वर्ग राजकीय उदासीनतेने ग्रासला तर समाजाच्या अन्य वर्गाकडून योग्य त्या भूमिकेची अपेक्षाच करता येत नाही. आज आंबेडकरी समूहातील साहित्यिक, विचारवंत, लेखक मंडळी स्वतःच इतक्या राजकीय नैराश्य व उदासीनतेने ग्रासले आहेत कि त्यांच्या प्रत्येक साहित्यातून, लिखाणातून आणि कृतीतून राजकारणाविषयीचा तुच्छभाव दिसून येतो. "आम्ही साहित्यिक आम्हाला राजकारणाशी देणेघेणे नाही.'' अशी भूमिका घेतांना समाजातल्या इतर वर्गाने काय बोध घ्यावा ? एक साहित्यिक, विचारवंत, लेखक तत्कालीन परिस्थितीचा सारासार विचार करून जेव्हा स्वतःच पक्ष व नेता निवडतो. व तशी स्पष्ट भूमिका त्यांच्या साहित्यातून, विचारांतून व लेखनातून घेतो. तेव्हा त्यांना वाचणारा, ऐकणारा लाखोंचा समूह स्वतःची राजकीय भूमिका घेण्यास, स्वतःचा पक्ष व नेता निवडण्यास प्रवृत्त होतो. ज्यामुळे समाजातील राजकीय मतभेद, पक्षभेद, नेतृत्वाचे संघर्ष दूर होऊन समाजाचे राजकीयीकरण घडून येते. आणि समाज एका निश्चित राजकीय भूमिकेपर्यंत पोहचायला लागतो. आंबेडकरी समाजातल्या साहित्यिक, विचारवंत, लेखक मंडळींनी अश्या स्पष्ट राजकीय भूमिका अद्याप घेतलेल्या नाहीत. आणि अजूनही घेतांना दिसून येत नाही. त्यांनी तशी स्वतःची राजकीय भूमिका जर घेतली तर निश्चितच आंबेडकरी समाजाला सत्तेपर्यंत जाण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही.
त्याखालोखाल समाजातला एक मोठा वर्ग नौकरदार लोकांचा वर्ग राजकीय भूमिकेपासून अलिप्त आहे. प्रत्यक्ष राजकारण करण्याचे बंधन असले तरी राजकीय भूमिका, राजकीय पक्ष आणि राजकीय नेता निर्धारित करण्याचे बंधन त्यांच्यावर नाही. तरीही हा वर्ग स्वतःला राजकारणापासून अलिप्त ठेवतो. ही आंबेडकरी समाजाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने प्रशासकीय सेवेत-व्यवस्थेत गेलेला वर्गच आज आंबेडकरी भूमिकेशी प्रताडणा करीत आहे. नौकरदार वर्गाला देखील समाजात मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. परंतु हाच वर्ग आज आंबेडकरी समाजाच्या फाटाफुटीला, राजकीय अपयशाला शिव्या मारतांना दिसून येतो. RPI च्या नेत्यांना आणि पक्षाच्या दुरावस्थेला शिव्या मारण्यात हा वर्ग प्रथम क्रमांकावर आहे. जे कधीच समाजासमोर आपली एक राजकीय भूमिका घेऊन गेले नाही. ज्यांनी कधी आंबेडकरी समाजाचा हा पक्ष व हा नेताच असू शकतो. असे स्पष्टपणे सांगितले नाही. ज्यांनी कधीही आंबेडकरी चळवळीत व आंबेडकरी राजकारणात योगदान दिलेले नाही. आंबेडकरी पक्ष, उमेदवारांना मत न देता स्वतःची मते विकणारा हाच वर्ग समाजात आंबेडकरी नेते व पक्ष यांच्याविषयी द्वेष निर्माण करतांना दिसतो.     यातला एक मोठा वर्ग असाही आहे ज्यांनी बाबासाहेबांचे काम करणा-या पक्ष, संघटना व नेत्यांना आर्थिक मदत न करता प्रतीक्रांतीवादी हस्तकांना मोठे केले. महिन्याकाठी त्यांना पैसा पुरविला. परंतु त्यांच्या भूमिका, निष्ठा तपासून पहिल्या नाही. समाजात असणा-या या ३० % वर्गाने तरी आता आपली राजकीय भूमिका निर्धारित करावी. आपला राजकीय पक्ष कोणता ? आणि आपला नेता कोण ? हे ठरवावे. आणि समाजासमोर ते उघडपणे मांडावे. जेणेकरून समाजात त्यांच्या अवतीभवती असणारा वर्ग, त्यांचा सन्मान करणारा वर्ग स्वतःची एक निश्चित अशी राजकीय भूमिका घ्यायला बाध्य होईल.
 समाजातला तरुण व विध्यार्थी वर्ग हा सुद्धा कुठल्याही समाजासाठी मैलाचा दगड ठरीत असतो. त्या समाजाच्या वर्तमानापासून तर भविष्यापर्यंतची जबाबदारी पेलून धरणारा व समाजावर येणा-या आक्रमणांचा सामना करणारा हा वर्ग असतो. तरुण, सुशिक्षित व विद्यार्थी वर्ग हा त्या समाजाच्या उद्याच्या भविष्याचा वाहक असतो. या वर्गावर सामाजिक संस्कार ज्याप्रमाणे होतील त्याप्रमाणे तो वर्ग घडत जातो. आधीच्या पिढीचे अनुकरण करणारा हा वर्ग असतो जो वर्तमान आणि भविष्याची सांगड घालणारा मध्यस्तीची भूमिका बजावीत असतो. आंबेडकरी समाजातील मध्यंतरीची पिढी भरकटली. त्याला कारणीभूत तत्कालीन साहित्यिक आणि नौकरदार वर्ग होता. त्याचा परिणाम वर्तमानातील पिढीवर आहे. वर्तमानातील पिढी संभ्रमावस्थेत आहे. सामाजिक हितापेक्षा व्यक्तिगत हिताला महत्व देणारी आहे. या पिढीच्या खांद्यावरच नवी पिढीही उदयाला येत आहे. जी पहिल्या दोन पिढ्यांच्या भरकटलेपणामुळे आणि वर्तमानातील पिढीच्या संभ्रमावस्थेमुळे हवालदिल होऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु काय खरे आणि काय खोटे ? समाजकारण करावे कि राजकारण करावे ? या पक्षात जावे कि त्या पक्षात जावे ? याला नेता मानावे कि त्याला नेता मानावे ? हे ठरवितांना त्यांचा गोंधळ उडतो आहे. एकंदरीतच सामाजिक गोंधळ त्यांच्या दृष्टीक्षेपात असतांना जर या पिढीला सावरता आले नाही. तर आंबेडकरी चळवळीला येणा-या काळात समर्थ खांद्यावर पेलून धरणारी पिढी मिळणार नाही. हा अतिशय गांभीर्याचा मुद्दा आज आंबेडकरी समाजासमोर उभा झाला आहे.
निदान याचा विचार करून पहिल्या पिढीपासून तर वर्तमान पिढीपर्यंत साहित्यिक, विचारवंत, लेखक, नौकरदार, अधिकारी म्हणून समाजात वावरणा-या मंडळींनी स्वतःच्या राजकीय भूमिकेला निश्चित करावे. अधिकारी म्हणून, साहित्यिक-विचारवंत म्हणून व लेखक म्हणून समाजाचे वैचारिक नायकत्व करणा-यांनी आपला राजकीय नायक निवडावा. राजकीय नायकाविना समाज विस्कळीत होतो. हे आतापर्यंतच्या ५७ वर्षांच्या कालखंडात अनुभवायला आलेले आहे. त्यामुळे आमचेच नायकत्व या समाजाने स्वीकारावे या तो-यात मिरविण्यापेक्षा समाजाला तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून, तत्कालीन नेतृत्वाचा अभ्यास करून, राजकीय नायकाचा पर्याय मांडावा. तेव्हाच नव्या पिढीसमोर काहीतरी आदर्श निर्माण करता येईल. व नव्या पिढीला कणखर, स्वाभिमानी व आंबेडकरी विचारांचा राजकीय नायक देता येईल. ज्या राजकीय नायकाचे नायकत्व स्वीकारून नवी पिढी आंबेडकरी समाजाची धुरा भविष्यकाळात वाहून नेईल. व स्वतःतूनच काळानुरूप नवे राजकीय नायक निर्माण करतील.
समाजव्यवस्था कुठलीही एक भूमिका घेऊन उभी राहू शकत नाही. किंवा कुठलीही व्यक्ती समाजव्यवस्थेत जगत असतांना एक भूमिका घेऊन जगू शकत नाही. कारण समाजव्यवस्थेशी निगडीत असणा-या प्रत्येक क्षेत्राची भूमिका घेणे ही व्यक्तीसाठी आवश्यकच ठरते. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि राजकीय असे हे समाजव्यवस्थेशी निगडीत क्षेत्र आहेत. त्या प्रत्येक क्षेत्राशी प्रत्येक माणूस त्याच्या संपूर्ण आयुष्यात जुडलेला आहे. त्यामुळे कुणीही फक्त असे म्हणणे कि 'मी फक्त एका विशिष्ट क्षेत्राशी जुडलेला आहे. त्यामुळे मी तीच भूमिका घेणार. इतर भूमिकांशी माझे काही घेणे देणे नाही.' हा समाजव्यवस्थेशी केलेला द्रोह आहे. ती समाजव्यवस्थेची प्रताडना होय. आंबेडकरी समाजाने याचा गांभीर्याने विचार करावा. समर्पक व सर्वकष भूमिका न घेता एकेरी भूमिका घेणारे प्रत्येकच व्यक्ती व समूह आंबेडकरी चळवळीच्या आजच्या दुरवस्थेला आणि आंबेडकरी राजकारणाच्या अपयशाला जबाबदार आहेत.
फक्त राजकीय नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांना दोष देऊन चालणार नाही. तर आपली जबाबदारी, आपले अपयश आणि आतापर्यंत आपण केलेल्या चुका आपल्याला स्वीकाराव्या लागतील. आणि प्रत्येक क्षेत्राशी निगडीत विशिष्ट एक भूमिका घेऊन समाजासमोर त्या भूमिकेला मांडावे लागेल. ही भूमिका घेण्याची व मांडण्याची सुरवात जरी आज आम्ही करू शकलो. तर बाबासाहेबांच्या 'शासनकर्ती जमात' या संकल्पनेला वास्तवात उतरायला वेळ लागणार नाही. आंबेडकरी समाजाला सत्ताधारी बनायला वेळ लागणार नाही. कारण भारतीय समाजातील अन्य वर्गापेक्षा आंबेडकरी समाज समूह कल्याणाला अधिक चांगला न्याय देऊ शकतो. फक्त त्यावर आम्ही स्वतःच स्वतःवर विश्वास निर्माण करून भूमिका घेतल्या पाहिजेत.
फक्त एक गोष्ट याठिकाणी कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे. ती ही कि, आंबेडकरी समाजाने राजकीय भूमिका घेत असतांना भावनिक, श्रद्धाळू न होता तत्कालीन व्यवस्थेचा अभ्यास करून ती व्यवस्था कुठल्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. याचा सारासार विचार करावा. आधुनिक पिढीची मानसिकता लक्षात घ्यावी. सामाजिक गतिशीलता आणि वैचारिक प्रगल्भता लक्षात घ्यावी. एकंदरीतच भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक व्यवस्थेचा कल लक्षात घेऊन आंबेडकरी विचारांचा अभ्यास करून व्यावहारिक आंबेडकरवाद (Applied Ambedkarism) समाजव्यवस्थेसमोर ठेवावा. आणि त्यावर आधारित आंबेडकरी विचारांच्या कार्यक्षेत्रात येणारे आंबेडकरी पक्ष व त्या पक्षाच्या नेतृत्वाचा अभ्यास करावा. त्या पक्षाची ध्येयधोरणे व नेतृत्व वर्तमानकाळात आणि भविष्यकाळात आंबेडकरी समाजाला दिशा देऊ शकतात कि नाही ? याचा अभ्यास करावा. फक्त PM / CM किंवा सत्ता त्या पक्षाच्या हातात येणार कि नाही ? एवढेच पाहू नये. तर तो पक्ष व नेतृत्व आंबेडकरी विचारांना अभिप्रेत सामाजिक कल्याणाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी सक्षम आहे कि नाही ? हे तपासून पाहावे. बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित व्यवस्था निर्माण करण्यास सक्षम आहे कि नाही ? हेही पाहावे लागेल. 
इ. सर्व गोष्टी काटेकोर पाळून जर आंबेडकरी समाजाने राजकीय भूमिका घेतली तर आंबेडकरवाद भारतीय जनमानसात आणि व्यवस्थेत सत्तेच्या माध्यमातून रुजवायला वेळ लागणार नाही. राजकीय भूमिकेच्या अभावी खितपत पडलेली आंबेडकरी चळवळ पुनःश्च गतिमान करण्यासाठी आता आपल्या वर्तमानातील निष्ठा, श्रद्धा, भावनिकता, आपुलकी बाजूला सारून याच आधारावर खंबीर अशी राजकीय भूमिका घेऊन एक पक्ष, एक नेतृत्व स्वीकाराची भूमिका घ्यावी. त्या पक्षाभोवती आणि पक्षाच्या नेतृत्वाभोवती आपल्या निष्ठा, श्रद्धा, भावनिकता, आपुलकी निर्माण करावी लागेल. आता आंबेडकरी समाजाची राजकीय भूमिका ही फक्त एक पक्ष, एक नेतृत्व मानणारी आणि स्वीकारणारी तयार होणे यातच आंबेडकरी राजकारणाचे भवितव्य आहे.

ôôôôôôô
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.  ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५

Saturday, 26 January 2013

भ्रष्टाचार से पैदा हुए आशिष नंदी का जाहीर निषेध !


भ्रष्टाचार से पैदा हुए आशिष नंदी का जाहीर निषेध !

SC, ST, OBC भ्रष्ट नहीं, यहाँ की ब्राम्हणवादी मानसिकतावादी संस्कृति भ्रष्ट है ! आशीष नंदी जैसे ब्राम्हणवादी बार बार अपना जहरीला विष समाज पर उगलते रहते है ! जिनका जन्म ही मंदिर के भगवान और पुजारियों के साथ मिल कर किये हुए भ्रष्टाचार से होता है ! वो लोग बार बार अपना पाप दूसरो पर लादने के लिए दूसरो को भ्रष्टाचार के लिए दोषी ठहराने का घ्रुणास्पद पाप करते रहते है ! आशीष नंदी जो की खुद को समाजशास्त्री कहता है ! वो समाजशास्त्री अगर ऐसे बयान दे की, "यहाँ के SC, ST, OBC भ्रष्ट है और भ्रष्टाचार करते है !" तो मुझे लगता है की इसे समाजशास्त्री किसी पुरोहित, पंडित, या पुजारी ने बनाया होगा !
आशीष नंदी अगर आप ने अपने माँ-बाप को पूछा होता की वो पैदा कैसे हुए ? तो आप को भ्रष्टाचार की जड़ और असली वजह समझ आती ! हजारो सालो से चला आया वर्णवादी/ जातिवादी / धर्मवादी भ्रष्टाचार को इन्ही OBC, SC, ST ने तोडा था ! और आज भी इन्ही लोगो के कारण भ्रष्टाचार करने वाले बड़े अफसर (IS, IAS, POLITICIANS, (All Belongs to OPEN Class) को भ्रष्टाचार करने को मौका नहीं मिल रहा ! आशीष नंदी जी जिस व्यवस्था में आप पले बड़े हो ! और जिस व्यवस्था ने आप को समाजशास्त्री (बिनढोक और बेवकूफ) बनाया वो व्यवस्था खुद भ्रष्टाचार के पैरो पर ही कड़ी है ! जिस समाजव्यवस्था (ब्राम्हणवादी / वर्णवादी) की बुनियाद ही भ्रष्टता हो उस व्यवस्था में आप पीड़ित लोगो को भ्रष्ट बताकर अपने दिवालियापन की मिसाल दे रहे हो ! भ्रष्टाचार यह इतिहास जिसके बलबूते पर आप इतनी हिम्मत दिखा कर दिवालियापन कर रहे हो ! उतनी हिम्मत दिखाकर मंदिर/भगवान के नाम पर हो रहे भ्रष्टाचार की बुनियाद को समझ कर आओ !
जिस देश में पुजारी पैसे लिए बगैर पूजा नहीं करता और तो और जिस देश में भगवान पैसे (चढ़ावा) लिए बगैर प्रसन्न नहीं होता उस देश में भगवान को खुश करने के लिए भ्रष्टाचार तो होगा ही ना ! फिर यहाँ का भगवान् ही भ्रष्ट है पीड़ित और मागास जातीय नहीं ! और इस भगवान के डर से समाज और इन्सान को लुटने वाले भ्रष्टाचारी है !
आशीष नंदी हमारे इन सवालो का जवाब दो ?
1.  भारत के मंदिरों में हर दिन जो चढ़ाव चढ़ाया जाता है वो रोज के आमदनी और खर्चे से भी ज्यादा होता है ! वह पैसा आता कहा से है ?
2.  मंदिरों में लाखो- करोडो रुपयोंका चढ़ाव चढाने वाले लोग कौन है ?
3.  कितने SC, ST, OBC लोग मंदिरों में लाखो-करोडो का चढ़ाव चढाते है ?
4.  भगवान् आज सोने चाँदी के बने हुए है वो कहा से आया है ?
5.  लाखो-करोडो, सोने, चाँदी, हीरे के गहने मंदिरों में किसके पैसो से आते है ?
6.  अमीर करोडपति की लिस्ट में कितने SC, ST, OBC है ?
7.  मंदिरों में दान देने के लिए उच्च वर्ग के पास पैसा कहा से आता है ?
8.  अगर यह सच्चाई है तो आशीष नंदी हमें बताओ की इस देश में भ्रष्टाचारी कौन है ? यहाँ का SC, ST, OBC वर्ग ? या फिर तुम जैसे धर्मवादी / जातिवादी लोग ?
आशीष नंदी का यह बयान बहुसंख्य भारतीय समाज का अपमान है ! हम इसकी घृणित कृत्य की जाहिर निंदा करते है ! आशीष नंदी ने भारतीय समाज की माफ़ी मांगनी चाहिए ! आशीष नंदी को कड़ी से कड़ी शिक्षा होनी चाहिए !
भ्रष्टाचार का सच कड़वा है !  आशीष नंदी भड़वा है !
आशीष नंदी का जाहिर निषेध ! निषेध ! निषेध ! निषेध !

Friday, 25 January 2013

The buddhist society of india



चलो औरंगाबाद ! चलो औरंगाबाद ! चलो औरंगाबाद !
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी साजरी केली जात आहे. भैय्यासाहेब आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर केला. बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी बौद्धाचार्य आणि केंद्रीय शिक्षक/शिक्षिका आणि श्रामणेर इ. ची निर्मिती केली. चैत्याभूमिचे निर्माते व बौद्धाचार्य निर्मितीचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. बाबासाहेबांचे सुपुत्र व बौद्ध धम्माच्या प्रचार/प्रसारातील अग्रगण्य असणा-या 'सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त" त्यांनी धम्माला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 'दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया', महाराष्ट्र शाखा यांच्या वतीने "महाराष्ट्र राज्य शाखेचे महाअधिवेशन" अयोध्या नगरी मैदान, आर. टी. ओ. समोर, औरंगाबाद येथे २३ आणि २४ फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आले आहे. तमाम बौद्धांनी सदर धम्म अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्म प्रचार प्रसारात योगदान द्यावे. हि विनंती.
निमंत्रक :-  १) मा. देवेंद्र मेश्राम, अध्यक्ष, नागपूर जिल्हा.
                २) मा. डॉ. संदीप नंदेश्वर, मार्गदर्शक, नागपूर जिल्हा.  

Monday, 21 January 2013

जाती अंताची लढाई : प्रकाश आंबेडकर विरुद्ध 'जात'




जाती अंताची लढाई : प्रकाश आंबेडकर विरुद्ध 'जात'
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.....८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

कुठलाही क्रांतिकारी विचार समाजव्यवस्थेत रुजवत असतांना वाद-प्रतीवादाच्या कसोटयातूनच जात असतो. क्रांतिकारी विचाराला सुरवातीच्या काळात विरोध केला जातो. परंतु जेव्हा परिस्थिती सापेक्ष बदल येणा-या काळात नवीन पिढीसमोर येतात तेव्हा नाकारला गेलेला तोच क्रांतिकारी विचार ती पिढी स्वीकारायला तयार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत असेच घडले होते. सुरवातीला त्यांच्या क्रांतिकारी विचारांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला. ज्या समाजासाठी/ माणसांच्या उत्थानासाठी ते विचार होते. त्याच माणसांकडून त्यांचे विचार नाकारले जात होते. परंतु शेवटी त्यांच्या विचारांचा स्वीकार करूनच हजारो वर्षे जातीय, वर्णीय, सामाजिक गुलामगिरीत काढलेल्या वर्गाने केला.  आणि समाजात एक आमुलाग्र बदल/परिवर्तन घडून आले. आज 'शाळेच्या दाखल्यावरून जात काढून टाकावी.' असा क्रांतिकारी विचार मांडून बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांनी सामाजिक विरोध पत्करून घेतला आहे. आरक्षण आणि जातीच्या आधारावर मिळणा-या लाभाच्या आहारी गेलेल्या समाजाला या विचाराने बोलते केले आहे. त्यांना विचारप्रवृत्त केले आहे. परंतु हा विचार या समाजात स्वीकाराच्या पातळीपर्यंत येण्यास वेळ जावा लागेल. हा विचार सहज स्वीकारला जाणार नाही. म्हणून तो अमान्य होतो असेही नाही. या विचाराचा पर्याय म्हणून स्वीकार येणा-या काळात परिस्थिती सापेक्ष बदलासवे केला जाईल. हे निश्चित.

बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांनी समाजात एका वैचारिक चर्चेला सुरवात केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. शैक्षणिक दाखल्यावरून जात वगळावी. हा मुद्दा जाती अंताच्या लढाईतील पहिले पाऊल आहे. पण अंतिम नाही. हे आधी लक्षात घ्यावे. आजपर्यंत अनेक प्रयोग आम्ही करून पाहिले परंतु सर्व अपयशी ठरले. मग जर हा प्रयोग केला तर त्यात काय वाईट ? शेवटी बाळासाहेब आंबेडकरांनी हे सुद्धा म्हटले आहे कि हे करीत असतांना आम्हाला पर्याय द्यावे लागतील. त्यावर चर्चाच होत नाही. आमची लढाई जातीअंताची आहे कि जाती टिकवून ठेवण्याची आहे ? हे आधी स्पष्ट होणे गरजेचे आहे. माझ्या मते आपली लढाई जातीअंताची आहे. मग त्यासाठी आम्ही प्रयोगाला तयार असले पाहिजे. व त्यानंतर उद्भवणा-या परिस्थितीला सोडविण्यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपली विद्वत्त शक्ती खर्च केली पाहिजे.

शैक्षणिक दाखल्यावरून जात वगळावी. या मुद्द्यावरून आज भारतीय आंबेडकरी समाजात ३ वर्ग निर्माण झाले आहेत. एक वर्ग १. सुशिक्षित आंबेडकरी वर्ग (चळवळीची जाण असणारा वैचारिक वर्ग) आहे. जो या भूमिकेचे स्वागत करतो आहे. कारण जातीअंताची लढाई कुठून तरी सुरु झाली पाहिजे. हा वर्ग जातीच्या आधारावर मिळणा-या लाभाची पर्व करतांना दिसून येत नाही. तो या वर्गाला नवीन पर्यायी लाभाची व्यवस्था पुरविण्यासाठी काय करता येईल यावर विचारमंथन करायला लागला आहे. दुसरा वर्ग २. सुशिक्षित आंबेडकरी वर्ग (चळवळीपासून अलिप्त असणारा आणि जातीचे लाभ घेऊ पाहणारा वर्ग) जो या भूमिकेचा विरोध करीत आहे. कारण त्याला भीती आहे कि जातीच्या आधारावर मागील ६३ वर्षापासून मिळणारे लाभ हिसकावले जातील अशी त्याला भीती वाटत आहे. हा वर्ग एकीकडे जातीअंताच्या बाबासाहेबांच्या भूमिकेशी स्वतःला चिटकून ठेवू पाहतो पण जाती अंतासाठी पाऊल उचलू पाहत नाही. असा हा संभ्रमावस्थेत असलेला वर्ग आहे. तिसरा वर्ग ३. अशिक्षित व चळवळ, आंबेडकरी विचारांपासून अलिप्त असणारा वर्ग (जातीच्या खाईत जगणारा वर्ग) जो स्वतःची ठाम अशी भूमिकाच घेऊ शकत नाही. जात गेली तर मला मिळणारे लाभही जातील या भीतीने तो या भूमिकेला विरोध करीत आहे. आणि हा वर्ग संखेने मोठा आहे. पण तो वरील २ वर्गाच्या भूमिकेची वाट बघत आहे. अशा परिस्थितीत आज सामाजिक द्विधा मनस्थितीचे विश्लेषण आम्ही केले पाहिजे.

शैक्षणिक दाखल्यावरून जात वगळावी. या भूमिकेने आंबेडकरी समूहाच्या बाहेरही गैर आंबेडकरी समाजात प्रतिक्रिया निर्माण केलेल्या आहेत. त्यातही ३ वर्ग पडलेले आहेत. पहिला वर्ग १. परिवर्तनवादी विचारांनी प्रभावित झालेला सुशिक्षित वर्ग. जो जातीव्यवस्थेने प्रभावित झालेला आहे. तो जात मोडू पाहत आहे. जात संपली पाहिजे व जातीच्या बाहेर जाऊन त्यांची एक ओळख निर्माण झाली पाहिजे असे म्हणतो आहे. मानवतावादी आणि भारतीयत्व आपली ओळख म्हणून स्वीकारू पाहतो आहे. हा वर्ग बाळासाहेबांच्या या भूमिकेला समर्थन करीत आहे. व या भूमिकेचे स्वागत करीत आहे. दुसरा वर्ग २. हिंदू धर्मातील आरक्षण विरोधी वर्ग. जो वर्ग इथल्या संविधानाने मागासवर्ग व अनुसूचित जाती-जमाती ला दिलेले आरक्षण व सवलतीला विरोध करतो आहे. त्याला असे वाटते कि जात दाखल्यावरून नष्ट झाली तर यांना मिळालेले आरक्षण व सवलती पण नष्ट होतील. हा वर्ग दाखल्यावरून जात संपविण्याच्या भूमिकेला समर्थन करीत आहे. तिसरा वर्ग ३. तटस्थ प्रतिगामी मुलतत्ववादी हिंदू वर्ग. हा वर्ग या मुद्द्यावर आपली सावध भूमिका घेत आहे. तो समर्थनही करीत नाही आणि विरोधासाठीही समोर येत नाही. कारण त्याची या भूमिकेने कोंडी होणार आहे. जात संपविण्याच्या मुद्द्याला समर्थन केले तर त्यांचा मुलतत्ववाद संपुष्टात येउन एकूणच हिंदू व्यवस्था व धर्म कोलमडून पडतो. आणि विरोध केला तर जातीच्या आधारावर शोषण करणारे म्हणून चेहरे समोर येतील. व समाजातून एका मोठ्या विरोधाला समोर जावे लागेल. त्यामुळे या वर्गाची परिस्थिती "इकडे आड तिकडे विहीर" अशी झाली आहे. एकूणच या सर्व भूमिकेतून दाखल्यावरील जात संपुष्टात आणण्याच्या भूमिकेला समाजातून स्वागतच आहे. परिस्थितीने समाजाच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणले आहे हे त्याचे प्रतिक आहे असे समजायला हरकत नाही.

 एक गोष्ट आधी आपण लक्षात घेतली पाहिजे. कि जातीचा नष्ट करण्याचा मुद्दा बुद्ध धम्माशी निगडीत नाही. तो पूर्णतः हिंदू धर्माशीच निगडीत आहे. त्यामुळे जातीअंताची सुरवात हि आजही जे हिंदू आहेत त्यांच्यासाठीच आहे. भारतीय संविधानाने बौद्ध धम्माला अल्पसंख्यांक दर्जा दिलेला आहे. त्यांचे अधिकारही वेगळे आहेत. त्यांच्या सवलतीही वेगळ्या आहेत. त्यामुळे जे हिंदू आहेत पण ते जातीच्या विषारी पायाखाली तुडविले जात आहे. त्यांनी निदान आपली जात संपवून मानवतावाद स्वीकारावा. भारतीयत्व स्वीकारावे यासाठीच हा मुद्दा उपस्थित केला गेला आहे. या मुद्द्याला उगाच बौद्ध धम्माशी जोडून आम्ही आपली फसवणूक करून घेऊ नये. हा मुद्दा पूर्णतः हिंदूंशी निगडीत आहे.

जातीच्या दलदलीत सापडलेल्या हिंदूंना किंवा मुलाच्या नागवंशीयांना जातीच्या आधारावर मिळालेले अधिकार हिरावले जाणार नाही यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. पण जाती टिकवून ठेऊन किंवा ते आज न उद्या बौद्ध होणार आहेत या आशेवर राहून जातीअंताच्या या लढ्याला विरोध करणे कुठेही तार्किक नाही. मुळात त्यांची जात नष्ट करून (दाखल्यावरून) त्यांना नवीन पर्याय देणे गरजेचे आहे. हे साधे तर्क आम्ही जातीअंतासाठी लढणा-या माणसांनी लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेबांनी जातीवर आधारित आरक्षण दिलेले नाहीत. तर ज्या कुठल्या पूर्वापार जाती होत्या ज्या विकासाच्या प्रक्रियेपासून हजारो वर्ष दूर ठेवल्या गेल्या होत्या त्यांना अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), भटक्या विमुक्त (NT & VJ), इतर मागासवर्गीय (OBC) अश्या वर्गात टाकण्यात आले आहे. त्यांनी जातींना गोंजारले नाही. जातींचा एक वर्ग तयार केला. परंतु संविधानाच्या ६३ वर्षाच्या अंमलबजावणीनंतरही जर हि बाबासाहेबांची भूमिका आम्ही समजून घेत नसू तर तो बाबासाहेबांचा अपमान होईल. जगातल्या महान घटनाकाराचा अपमान होईल.

बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या "शालेय दाखल्यावरून जात हद्दपार करावी." या मुद्द्यावरून बरेच रणकंदन माजले आहे. पण जातीव्यवस्था मोडकळीस आणण्यासाठी एक वैचारिक चर्चा या अनुषंगाने सुरु झाली आहे. जातीव्यवस्था संपविण्यासाठी टाकलेले हे पहिले पाऊल समजावे. परंतु या भूमिकेवरून (मुद्द्यांवरून) अनेक नवीन तथ्य आणि वास्तव समोर येणार आहे. बाळासाहेबांनी आंबेडकरांनी हा मुद्दा उपस्थित करता बरोबर भारतीय समाजातील ३ घटकांमध्ये हलचल सुरु झाली. वैचारिक आणि सामाजिक रणकंदन माजले आहे. त्यातले पहिला घटक १. आंबेडकरी समाज, दुसरा घटक २. हिंदू समाज आणि तिसरा घटक ३. परिवर्तनवादी समाज. यातला पहिला समाज जो स्वतःला आंबेडकरी समाज संबोधतो. जो मुळात जाती निर्मुलनासाठी इतक्या वर्षापासून लढा देत आहे. त्या समाजातले अनेक वास्तव उघड होत आहेत. ते येणेप्रमाणे- १) आंबेडकरी समाज जो सदैव स्वतःला बौद्ध म्हणवून घेतो तो ख-या अर्थाने बौद्ध आहेत कि नाही ? हे समोर येईल. २) दाखल्यावरून जात नष्ट व्हावी या भूमिकेच्या विरोधात गेलेला आंबेडकरी समाज हा बौद्ध नाही तर तो स्वतःची जात टिकवून ठेऊन हिंदू धर्मातच वास्तव्य करीत आहे हे लक्षात येईल. ३) जे आंबेडकरी बौद्ध झाले आहेत ते या भूमिकेला विरोध करणार नाहीत. कारण बौद्ध धम्माचा आणि जातीचा कुठलाही तिळमात्र संबंध नाही. बौद्ध धम्म अल्पसंख्यांक आहे.  त्यामुळे या भूमिकेमुळे त्याच्यावर कुठलाही परिणाम होणारा नाही. एकूणच बौद्ध कौण ? आणि हिंदू आंबेडकरी कौण ? हे यावरून ओळखता येणार आहे. ४) बौद्धांना अनुसूचित जातीच्या देखील सुविधा मिळत आहेत. (पहा - MPSC च्या भरतीतील आरक्षणाचे कॉलम) तरीही ते स्वतःच्या अधिकाराबद्दल जागृत नाहीत हे सिद्ध होईल. ५) जात हि आंबेडकरी समाजाच्या जिव्हाळ्याचा विषय होऊ शकत नाही. उलट जाती नष्ट करणे हाच त्यांचा एकसूत्री कार्यक्रम आहे. तरीही जे जाती टिकविण्याची धडपड करतात. म्हणजेच ते आंबेडकरी नाहीत हे सिद्ध होईल. एकूणच “एका दगडात अनेक पक्षी मारल्यासारखे” झाले आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाची मानसिकता अभ्यासण्याच्या दृष्टीने जाती अंताचा हा नवीन पवित्रा (भूमिका) कामात येणार आहे.

दाखल्यावरून जात काढल्याने जातीव्यवस्था जाणार नाही. एवढे न समजण्याइतके दुधखुळे बाळासाहेब आंबेडकर नक्कीच नाहीत. आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेला समर्थन करणारे सुद्धा काही दुधखुळे नाहीत. यामागची भूमिका व्यापक आहे. अगदी तुमच्या शैक्षणिक प्रगतीवरही जर तुमची जात तुमचा पिच्छा पुरवीत असेल तर आम्ही त्या जातीला गोंजारत का बसायचे ? नक्कीच मानवी विकास आणि संधीची समानता मानणा-या वर्गाने तरी स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख हि जात विरहीत सिद्ध करावी. अशीच त्यामागची भूमिका असावी. परंतु जातीच्या आधारावर मिळणा-या लाभाच्या हव्यासापोटी आम्ही जात टिकून राहावी असे म्हणत असू तर स्व-चिंतनाची गरज आहे. याच मानसिकतेतून जर हा समाज सतत जात राहिला तर हजारो वर्षे हि जातीव्यवस्था तशीच टिकून राहील. मनुवादी मानसिकतेने शोषणासाठी/ काही वर्गाच्या गुलामिसाठी/ मोजक्या लोकांच्या हातात सत्ता टिकवून ठेवण्यासाठी निर्माण केलेली जातीव्यवस्था आज आधुनिक काळात संविधानातून जातीच्या आधारावर मिळणा-या लाभासाठी टिकवून ठेवली जात आहे. तेही अनेक वर्ष पर्यंत टिकून राहील. कारण कधीही कुठल्याही काळात जातीच्या आधारावर मिळणारे लाभ तसेच मिळत राहावे. यासाठी आरक्षणाचा लाभ घेणारा वर्ग जातीव्यवस्था मोडायला तयार होणार नाही. आणि मग अश्या परिस्थितीत भारतीय समाजाला जातीव्यवस्था हि शाप आहे असे म्हणना-यांचे खरे चेहरे उघड पडतील. त्यांना जातिव्यवस्थेच्या विरुद्ध बोलण्याचा नैतिक अधिकारही राहणार नाही.

हा मुद्दा हाताळतांना खेदाची बाब अशी वाटते कि, जातीव्यवस्था टिकवून ठेवणे हा ज्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे ते ब्राम्हणवादी, मनुवादी, जातीवादी मुग गिळून चूप बसले आहेत. आणि जातिव्यवस्थेच्या विरुद्ध गरळ ओकणारे आंबेडकरी जे स्वतःला बेंबीच्या देठापासून बौद्ध म्हणतात (फक्त भाषणात प्रत्यक्षात नाही) ते दाखल्यावरून जात काढावी या भूमिकेचा विरोध करीत आहेत. जातीव्यवस्था मोडकळीस यावी (डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या Annhilation of Caste चा दाखला देऊन) असे म्हणणारे कुठल्या स्वप्नाळू जगात जगत आहेत ? किती वर्षांनी ते जातीव्यवस्था संपविण्यासाठी पाऊल उचलणार आहेत ? सुरवात कशी करणार आहेत ? या प्रश्नांचे उत्तरही त्यांच्याकडे नाही. एकंदरीतच त्यांचा मुद्दा जातीचे संवैधानिक फायदे लाटण्यापुरताच मर्यादित झाला आहे. डॉ. बाबासाहेबांचे नाव घेऊन भावनिक आंदोलन उभारण्यापुरतेच ते मर्यादित झाले आहेत असे म्हणावे लागेल. प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित व्यवस्था निर्माण करण्यात त्यांना काहीही स्वारस्य वाटत नाही. असे खेदाने म्हणावे लागेल.

बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या दाखल्यावरून जात काढावी या भूमिकेच्या विरोधात जाणारा एक वर्ग हा राजकारण्यांचा आहे. जो प्रत्यक्षात सत्तेच्या बाहेरच आहे. समाजाचा राजकीय सौदा करून राजकीय पक्ष चालविणा-यांचा वर्ग आहे. मुळात स्वतःला आंबेडकरवादी राजकीय पक्ष म्हणविना-यांचा वर्ग आहे. जो सदैव बाळासाहेबांच्या विरोधात उभा राहिला. असा तो वर्ग आहे. आणि हाच वर्ग आज समाजात बाळासाहेबांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी संभ्रम पसरवित आहे. परंतु हे स्पष्ट करावे लागेल कि बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला जाती अंताचा हा मुद्दा कुठेही राजकीय आहे असे दिसून येत नाही. हि भूमिका सामाजिक आहे. वैचारिक आहे. एका नव्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठीची आहे. राजकीय लाभ या भूमिकेतून कुठलाही दिसून येत नाही. उलट जातीचे लाभ घेणा-या एका मोठ्या वर्गाच्या विरोधाला सामोरे जावे लागल्याने राजकीय गणिते बाळासाहेब आंबेडकरांच्या (भारिप बहुजन महासंघाच्या) विरोधात जाऊ शकतात. म्हणून या भूमिकेकडे राजकीय दृष्टीने न बघता, त्याचे राजकारण न बनविता एका नव्या समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी टाकलेले ते पाऊल आहे. या दृष्टीने त्यांच्या भूमिकेकडे बघितले गेले पाहिजे. तेव्हाच हा महत्वाचा मुद्दा हाताळला जाऊ शकतो. 

जाती नष्ट करण्यासाठी, जाती निर्मुलनासाठी टाकलेले पाऊल म्हणजे मनुवाद्यांचे काम करणे असा युक्तिवाद करणे किती हास्यास्पद वाटते. मनुवाद्यांना कसे काय जात नष्ट करण्याचा पुळका येतो ? हेच कळत नाही. संपूर्ण आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जातिव्यवस्थेच्या विरुद्ध लढत राहिले. जातिनिर्मूलन हे उद्धिष्ट घेऊन ज्या जातीव्यवस्थेने आर्थिक, सामाजिक, राजकीय शोषण केले त्या जातीव्यवस्थेला मोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बौद्ध धम्माचा स्वीकार हा जातीनिर्मुलानातलाच एक पर्याय म्हणूनही त्यांनी निवडला. बाबासाहेबांच्या पश्च्यात गेली ५६ वर्षे म्हणण्यासारखे बौद्ध धम्माचा स्वीकार झालेला नाही. त्यामुळे जातीनिर्मुलनाचा मुद्दा तिथेही मागेच पडला. सामाजिक स्तरावर आणि शासकीय स्तरावरही जातीनिर्मुलनासाठी पाहिजे तसे प्रयत्न केले गेले नाही. आज जातिव्यवस्थेच्या विरुद्ध बोलणारा (गैर आंबेडकरी-बुद्धिस्ट) एक मोठा वर्ग तयार झाला आहे. तो वर्ग बुद्धिझमकडे वळू पाहतो. तर त्यातलेच काही अजूनही बुद्धिझम पासून लांबच आहे. त्यामुळे अश्या परिस्थितीत एक वैचारिक, सामाजिक आणि राजकीय नेतृत्व म्हणून प्रकाश आंबेडकर जातीनिर्मूलनाची एक ठिणगी टाकू पाहत आहेत. तर त्याचा विरोध न करता समर्थन केले जाणेच अपेक्षित होते. ज्यांना जात नको पण परिस्थिती सापेक्ष शासकीय लाभ हवे आहेत त्यांनी बुद्धिझम कडे वळावे. आणि ज्यांना तेही नको त्यांनी मानवतावादाची कास धरावी. शेवटी हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेतच.

शाळेच्या दाखल्यावरून जात गेल्याने आरक्षण संपुष्टात येईल किंवा मिळणारे शासकीय लाभ बंद होतील हे म्हणणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे. आज अस्तित्वात असलेले नियम जरी लक्षात घेतले तरी हे दिसून येईल कि आरक्षणाच्या लाभार्थी असलेल्या परिवारातील मुलांना आरक्षण मिळतेच. फक्त त्यात ज्यांचे आर्थिक उत्पन्न ५ लाख रुपयापेक्षा अधिक आहे अश्या कुटुंबातील सदस्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. याचाच अर्थ असा कि आरक्षण हे ज्या कुटुंबात जन्म झाला त्यातून पुढे सुरु ठेवता येईल. दाखल्यावर जात असली काय आणि नसली काय ? जो समाज अनेक वर्षापासून वंचित आहे त्या वर्गाला आरक्षणाचा व अन्य लाभाचा फायदा झाला पाहिजे असे वाटते तर ते सद्यकाळात आरक्षणाच्या कक्षेत असणा-या कुटुंबासाठी पुढील आणखी काही वर्षे आपल्याला सुरु ठेवता येऊ शकते. त्यासाठी दाखल्यावर जात असलीच पाहिजे हे जरुरीचे नाही. आरक्षित वर्गाचे कौटुंबिक रेकार्ड तयार करून आम्ही त्यांना आज मिळत असलेले अधिकार पुढील काळातही मिळवून देऊ शकतो. हासुद्धा एक पर्याय दाखल्यावरून जात काढल्यानंतर उद्भवणा-या परिस्थितीला सोडविण्यासाठी होऊ शकतो यावरही विचार होणे गरजेचे आहे. पण जात टिकून राहील तरच आरक्षण मिळेल किंवा टिकून राहील असे म्हणणे म्हणजे मानवतावादी समाजाला पुन्हा एका प्रतिगामी अवस्थेकडे घेऊन जाणे आहे.  

जाती अंताची हि भूमिका म्हणजे परिपूर्ण जातीव्यवस्थेचे उच्चाटन आहे असे समजून घेण्याचे काहीच कारण नाही. जातीव्यवस्था हा हिंदू धर्माचा श्वास आहे. हिंदू धर्माचा तो प्राण आहे. त्यामुळे जातींचे संपूर्ण उच्चाटन होणे शक्य नाही. आणि त्यामुळे हिंदू धर्म पण संपुष्टात येणार नाही. जगातला कुठलाच धर्म संपुष्टात येणार नाही. अश्या परिस्थितीत जातीव्यवस्थेतून बाहेर पडून जातीव्यवस्था कमकुवत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निदान तशी संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. किंवा जातीव्यवस्थेचे चटके सहन करणा-यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी इतर धर्माचा स्वीकार किंवा स्वतःपासून सुरवात असे दोनच मार्ग आहेत. ज्यांना जातीव्यवस्थेने छळले आहे त्यांना इतर धर्मात जाऊ द्या ! व ज्यांना इतर धर्माचा स्वीकार करायचा नाही पण जातीव्यवस्थेला नाकारायचे आहे. त्यांना तसेही करू द्या ! मग त्यांच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला पर्याय योग्यच ठरतो. व्यक्ती जेव्हा स्वतःपासून एखादा क्रांतिकारी निर्णय घ्यायला बाध्य होतो तेव्हा ते क्रांतिकारी पाऊल समाज परिवर्तनात महत्वाची भूमिका बजावते. शेवटी जातीव्यवस्थेला कंटाळून अन्य धर्माचा स्वीकार करा किंवा जातीचा उल्लेख करणे / जातीचा रकाना भरने बंद करा. दोन्ही पर्याय मानवतावादी आणि परिवर्तनवादी विचाराला पूरक आहेत.          

Friday, 28 December 2012

महारांचा आणि महार बटालियनचा शौर्य इतिहास




महारांचा आणि महार बटालियनचा शौर्य इतिहास
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर... ९२२६७३४०९१ 

कुठलीही तमा न बाळगता शत्रूंवर तुटून पडणारा...आपले साहस, शौर्य, प्रामाणिकपणा, धाडस आणि देशभक्तीने इतिहास गाजविणारा...युद्धकौशल्य आणि निडरता या अंगभूत गुणकौशल्याने ओतप्रोत भरलेला...स्वतःसोबत इतरांच्या सुरक्षेसाठी धडपडणारा...व्यवस्थेने उपेक्षित ठरवूनही सदैव लढवैय्या म्हणून जगलेला...चातुर्वर्ण्यांच्या विषारी अस्पृश्यतेच्या जखमा माथ्यावर कोरून समतेच्या प्रवाहाला गती देणारा...उथळ माथ्याने स्वाभिमानाने जगणारा...बाबासाहेबांच्या एका हाकेने लाचारीच्या चीरेबंदीला चिरून टाकणारा...भारतीय सैन्यात मानाचा तुरा रोवणारा...युद्धभूमीवर विजयाच्या पताका फडकाविणारा...बाबासाहेबांच्या भिमगर्जनेने विषमतेच्या विरुद्ध पेटून उठणारा...बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धाच्या शांती, समता, बंधुता, प्रज्ञा, शिल, करुणेला प्राणापलीकडे जपणारा...भीमा कोरेगावच्या लढाईत ब्राम्हणशाहीचे प्रतिक पेशव्यांच्या हजारो सैनिकांचा निप्पात करणारा...१ जानेवारी १८१८ ला भीमा कोरेगाव च्या स्तंभावर जागतिक शौर्याचा इतिहास कोरणा-या महारांचा इतिहास अतिशय विलक्षण आहे. त्या महारांच्या विलक्षण शौर्य इतिहासाला शतशः नमन करणे इथल्या प्रत्येकाचे इतिकर्तव्य आहे. आजही देशाची सुरक्षा करण्यात सदैव तत्पर असलेल्या त्या महार बटालियन च्या प्रत्येक शूर सैनिकाला इथला प्रत्येक देशवासीयांच्या माध्यमातून दिलेली ही सलामी...

१६ व्या शतकात शिवाजी महाराजांनी इथल्या महारांमधील शौर्य व धाडस पाहून सैन्यामध्ये महत्वाच्या स्थानावर त्यांना रुजू केले. शिवाजी महाराजांच्या सैन्यापासून ख-या अर्थाने महार सैनिकाला ओळख प्राप्त झाली. शिवाजी महाराजांच्या सुरक्षेत, राज्य विस्तारात, राज्याच्या सुरक्षेत महार सैनिकांनी मोठी भूमिका बजावल्याचे इतिहासाच्या पानापानातून दिसून येते. शिवाजी महाराजांचे प्राण वाचविणारा 'जीवा' महाले इतिहासात प्रसिद्ध झाला. "होता जीवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण या सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष देते. महार जात शूर, पराक्रमी, लढवैय्यी असतांनाही चातुर्वर्ण्यांच्या अतिशुद्र वर्गवारीत टाकण्यात आल्याने सदैव दुर्लक्षित केली गेली. परंतु याची तमा न बाळगता महारांनी सदैव आपल्यातील शौर्याच्या बळावर या देशावर अधिराज्य गाजविले आहे. शिवाजी महाराजानंतर अनेकांनी महार सैन्यांच्या बळावर युद्ध जिंकली आहेत.
१८ व्या शतकात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने महारांमधील या पराक्रमाला लक्षात घेऊन सर्वप्रथम बॉम्बे रेजिमेंट महार बटालियन ची स्थापना करण्यात आली. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ ला पहिल्या महार रेजिमेंट च्या द्वितीय बटालियनच्या ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या २० हजार घोड्स्वार आणि ८ हजार पायदळी सैनिकांना निकराची झुंज देऊन पेशवाईचा निप्पात केला. ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांच्या सैनिकांना नामोहरण करून आपल्या एकमेवाद्वितीय शौर्याचा इतिहास रचला. त्या इतिहासाची साक्ष आजही भीमा कोरेगाव चा विजय स्तंभ देतो आहे. तो विजय स्तंभ हा महारांच्या शौर्याचा प्रतिक आहे. आजही आंबेडकरी समाजाला तो विजय स्तंभ आपल्या पूर्वजांच्या शौर्य इतिहासाची जाणीव देऊन देशभक्तीसाठी प्रवृत्त करतो आहे.
 १८५८ च्या युद्धात २१ वी आणि २७ वी महार रेजिमेंट ची तुकडी प्राणपणाने लढली. १८९२ पर्यंत ब्रिटीश भारतात सैन्यामध्ये महार बटालियन आपले वेगळे महत्व टिकवून होती. परंतु १८९२ ला महार बटालियन संपुष्टात आणून सैन्य भरतीत नवीन धोरण ब्रिटीश सरकारने अंगिकारले. 'क्लास रेजिमेंट' नावाने सैन्यामध्ये नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात आली. प्राचीन महार रेजिमेंट च्या ऐवजी 'क्लास रेजिमेंट' ची १८८२ ला झालेली भरतीने महार सैन्यांना बेदखल करण्यात आले. १८८५ मध्ये तत्कलीन भारतीय सैन्याचे कमांडर-इन-चीफ जनरल लॉर्ड रॉबर्ट यांनी "मार्शल रेस' नावाची थेरी अंगीकारली. व त्या माध्यमातून भारतीय समाजातील जन्मजात आणि नैसर्गिक युद्ध कौशल्य असणा-या जाती जमातीच्या लोकांना सैन्यामध्ये भारती करण्यात आले. ज्यामुळे शेकडो वर्षे आपल्या साहस आणि धाडसाचे कौशल्य पणाला लावून सैन्याची धुरा वाहून नेली त्या महार बटालियन ला ब्रिटीश सैन्यातून बेदखल करण्यात आले. ज्यामुळे महार बटालियन च्या सैन्यात आणि महार समाजात ब्रिटीश सरकार विरोधात असंतोष निर्माण झाला होता.
महार बटालियन बरखास्त करण्यात आल्यानंतर १८९४ मध्ये गोपाल बाबा वलंगकर यांनी ब्रिटीश सरकारला निवेदन केले. आणि त्या निवेदनात महार बटालियन ची पुन्हा निर्मिती करून महार सैनिकांना सैन्यात भरती करण्यात यावी अशी विनंती केली. १९०४ मध्ये शिवराम जानबा कांबळे यांनीसुद्धा महार बटालियन च्या पुर्नगठनासाठी ब्रिटीश सरकारला विनंती केली. आणि ब्रिटीश सरकारने अंगिकारलेल्या तत्कालीन सैन्य भरती धोरणाचा विरोध केला. ज्या महार बटालियनच्या महार सैन्यांनी इतिहासात आपल्या शौर्याचे आणि पराक्रमाचे पुरावे दिले त्याच महार बटालियनला बरखास्त करण्याचे सरकारचे धोरण एक न उलगडणारे कोडेच होते. कदाचित महार बटालियन बरखास्त करावी यासाठी बाह्य परिस्थितीचा दबाव आणला गेला असावा याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेने महारांना अतिशुद्रचा दर्जा देऊन समाजव्यवस्थेतून बेदखल केले होते. त्याच महार समाजाने सैन्यामध्ये येउन पराक्रमाचे अनेक विक्रम गाजविणे म्हणजे चातुर्वर्णनाने स्वतःच्या बाजूला गोंजारत ठेवलेल्या क्षत्रियांचा आणि संपूर्णच जातिव्यवस्थेचा इतिहास अमान्य ठरविणे असेच होते. त्यामुळे महार बटालियन च्या बरखास्तीचा खरा इतिहास दडवून ठेवला गेल्याची पूर्ण शक्यता नाकारता येत नाही.
महार बटालियनच्या पराक्रमाची आणि शौर्याची उणीव ब्रिटीश सैन्याला जाणवणार हे सिद्धच होते. महार बटालियन सैन्यापासून फार काळ लांब ठेवता येणार नाही अशीच परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली. पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याची जी दारूण परिस्थिती उद्भवली हे लक्षात घेता पहिल्या महायुद्धाच्या परिस्थितीने ब्रिटीश सरकारला महार बटालियन सैन्यात पुन्हा निर्माण करणे भाग पडले. १९१७ ला पुन्हा १११ सैनिकांची महार बटालियनच्या सैन्यात भरती करण्यात आली. १९२० ला महार बटालियन ७१ व्या पंजाब रेजिमेंट मध्ये सामावून घेण्यात आली. व पुन्हा १९२१ ला महार बटालियन बरखास्त करण्यात आली. १८१८ च्या आधीचा एक काळ असा होता की ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या बाम्बे आर्मीमध्ये १/६ सदस्य हे महार बटालियनचे होते. परंतु १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात महार बटालियनच्या संदर्भाने ब्रिटीश सरकारने वेळोवेळी घेतलेले निर्णय हे शंकेस पात्र ठरतात. कदाचित पडद्यामागील इतिहास लपवून ठेवण्यात आल्याने भारतातील प्रस्थापित जातीव्यवस्थेचे शिकार महार बटालियनला करण्यात आले असावे. अशी शंका घेण्यास वाव मिळतो. कदाचित महार बटालियनचा इतिहास दडवून ठेवण्यात आले हा सुद्धा एका षडयंत्राचाच भाग असावा. भीमा कोरेगाव चे स्तंभ विजयस्तंभ म्हणून ब्रिटिशांनी उभारले नसते तर महार बटालियन चा आज उपलब्ध असलेला इतिहासही पडद्याआड गेला असता हे तेवढेच सत्य वाटते.
जुलै १९४१ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व्हाईसरॉय एक्सिक्युव कॉन्सिलच्या डिफेन्स अड्व्हाय्झरी कमिटी वर नियुक्ती करण्यात आली. या पदाचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षापासून सैन्यातून बरखास्त करण्यात आलेली महार बटालियन / रेजिमेंट सैन्यात पुन्हा स्थापन करण्यात यावी यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव आणला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रयत्नांना यश आले. १ आक्टोम्बर १९४१ ला लेफ्टीनंट जनरल कर्नल जोह्नसन यांच्या १३ व्या Frontier Force Rifles च्या तुकडीत महार रेजिमेंट बटालियन ची स्थापना बेळगाव, कर्नाटक येथे स्थापन करण्यात आली. तसेच महार बटालियन ची दुसरी महार रेजिमेंट बटालियन लेफ्टीनंट जनरल कर्नल किरवान आणि मेजर भोलाजी रांजणे यांच्या नेतृत्वात कामठी, नागपूर येथे स्थापन करण्यात आली. त्यावेळेस महार रेजिमेंट च्या टोपीवरील बिल्ल्यावर भीमा कोरेगाव चे पिल्लर असणारे चिन्ह व त्यावर "World Mahar" कोरण्यात आले. हे चिन्ह दुस-या महार बटालियनचे कॅप्टन मोर्टलेमांस यांनी तयार केले होते. जे प्रत्येक महार बटालियनच्या सैनिकांच्या डोक्यावर पराक्रमी विजय चिन्ह म्हणून शोभून दिसत होते.
तिसरी महार रेजिमेंट बटालियन बेळगाव, कर्नाटक येथेच १९४२ ला लेफ्टीनंट जनरल कर्नल कम्बिएर आणि मेजर सरदार बहादूर लाडकोजीराव भोसले यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आली. द्वितीय महायुद्धाच्या वेळी पहिली व तिसरी महार रेजिमेंट North-West Frontier Province च्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली. तर दुसरी आणि २५ वी बटालियन देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली होती. द्वितीय महायुद्धाच्या काळात महार बटालियन बर्मा campaign मध्ये ब्रिटीशांच्या बाजूने प्राणपणाने लढली. जी मोहीम अतिशय धोकादायक आणि शौर्य पणाला लावून लढायची होती त्या मोहिमेत महार बटालियन चा वापर केला गेला. यावरून सैन्यातील महार बटालियन चे महत्व लक्षात घेण्यासारखे आहे. या मोहिमेत ५ महार बटालियनचे सैनिक शहीद झाले. व त्याच बटालियन च्या एका ऑफिसर ला त्याच्या शौर्यासाठी गौरविण्यात सुद्धा आले होते.
१ ऑक्टोबर १९४६ ला महार रेजिमेंट मशीनगन रेजिमेंट म्हणून नावारूपास आली. 'महार रेजिमेंट' चे 'महार मशीनगन रेजिमेंट' असे नवीन नाव देण्यात आले. 'महार मशीनगन रेजिमेंट' चे केंद्र कामठी, नागपूर येथेच स्थापन करण्यात आले. मात्र यावेळी 'महार रेजिमेंट' च्या टोपीवरील बिल्ल्यावरील चिन्हात बदल करण्यात आले. बदललेल्या चिन्हात भीमा कोरेगावच्या स्तंभावर Cross Wicker मशीनगन चे चिन्ह कोरण्यात आले.  'महार मशीनगन रेजिमेंट'च्या ३ बटालियननी पंजाब च्या सीमावर्ती प्रदेशात पंजाब सीमा सैनिक दलात काम केले. १९४७ ला भारताच्या फाळणीच्या वेळी संरक्षण शरणार्थी म्हणूनही  'महार मशीनगन रेजिमेंट' बटालियनने काम केले. पंजाब प्रांतात सीमा सुरक्षा दल म्हणून काम करतांना 'महार मशीनगन रेजिमेंट' ने आपले शौर्य पणाला लावून हरयाणा आणि हिमाचल प्रदेशातील अनेक गावांना सुरक्षा प्रदान केली होती. महार रेजिमेंट / बटालियन पासून तर  'महार मशीनगन रेजिमेंट' पर्यंतचा हा प्रवास अनेक शौर्य इतिहासांना प्रस्थापित करून गेला. परंतु त्याची नोंद भारतीय जातीय मानसिकतेतून लिहिल्या गेलेल्या इतिहासाने कधी घेतली नाही हेच दिसून येते.
महार बटालियन मधील १, २, ३, ७, ८ आणि १३ या बटालियन या पूर्णपणे महार बटालियन होत्या. ज्यात प्रामुख्याने महार सैनिकांचा समावेश होता. ४, ५ आणि ६ या तीन बटालियन तुकड्यांनी सीमा सुरक्षा दल म्हणून काम केले. ज्या तीन तुकड्या पंजाब प्रांतात सीमावर्ती प्रदेशात तैनात करण्यात आल्या होत्या. महार बटालियन च्या १६ व्या तुकडीला ८ व्या पराशुट बटालियन मध्ये बदलण्यात आले होते. व १९८१ ला हीच बटालियन यांत्रिक पायदळाच्या १२ व्या तुकडीत समाविष्ट करण्यात आली. महार बटालियन चे शौर्य सैन्याच्या प्रत्येक विभागात आपे पराक्रम गाजवून गेले. ज्यामुळे महार बटालियन ला ब्रिटीशकालीन भारतीय सैन्यातच नव्हे तर स्वतंत्र भारताच्या सैनिक दलामध्येसुद्धा मानाने-सन्मानाने गौरविण्यात आले. आजही भारतीय सैन्यात महार बटालियनचे नाव सन्मानाने घेतले जाते. शूरवीर आणि लढवैय्या महारांनी भारतीय सैन्याची मान सदैव उंच ठेवली. सैन्यातील शौर्याला एका सन्मान पातळीवर नेउन पोहचविले. जाज्वल्य देशभक्ती आणि देशाचे संरक्षण यात महार बटालियन सदैव अग्रेसर राहिलेली आहे. महार समाजात जन्म घेणा-या प्रत्येक माणसाला त्यांच्या पूर्वजांनी गाजविलेल्या इतिहासाचा गर्व आहे. आणि तो असायलाच पाहिजे. अश्या शूर, पराक्रमी आणि लढवैय्या पूर्वजांचे वारस म्हणून महार समाजाने अभिमान बाळगला तर त्यात काहीही गैर ठरणारे नाही.
महार बटालियनने स्वातंत्र्यपूर्व काळातच आपले शौर्य गाजविलेले नसून स्वतंत्र भारतातही महार बटालियनच्या शौर्याचा इतिहास दिसून येतो. महार सैन्यांनी आणि महार बटालियनने कांगो आणि सोमालियाच्या मोहिमेमध्ये सुद्धा पराक्रम गाजविलेले आहेत. इतकेच नव्हे तर पोलो, पवन, मेघदूत आणि विजय या मोहिमेवरही महार सैन्याचे व महार बटालियनचे मोठे योगदान राहिलेले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही संस्थानांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यास असमर्थता दर्शविली होती. जी अखंड भारताच्या दृष्टीने आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक होती. त्यात हैद्राबाद येथील संस्थानाचा उल्लेख करावा लागेल. त्यावेळेस सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद संस्थानाचे निजाम / प्रमुख उस्मान अली खान आणि आसिफ झा VII यांच्या विरोधात Hydrabad Police-Military Operation भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आले होते. ज्या मोहिमेचे Code नाव 'POLO' असे ठेवण्यात आले होते. या पोलो मोहिमेमध्ये सुद्धा महार सैनिकांनी आणि महार बटालियननी पराक्रम दाखविल्याचा इतिहास आहे.
१९८७ ला दक्षिण भारतात LTTE लिट्टे या संघटनेविरुद्ध भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या "Operation पवन" या मोहिमेत महार बटालियन ने महत्वाची भूमिका बजावली होती. १३ एप्रिल १९८४ ला काश्मीर मधील सियाचीन संघर्षात भारत सरकारने राबविलेल्या 'Operation मेघदूत' या मोहिमेतही महार बटालियन आणि महार सैनिकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आणि सरतेशेवटी १९९९ ला झालेल्या भारत पाकीस्थान यांच्यातील कारगील युद्धामध्येसुद्धा महार बटालियन पराक्रम गाजवून गेली आहे. म्हणजेच स्वातंत्र्यानंतरही देशाच्या संरक्षणासाठी महार बटालियन आणि महार सैनिक सदैव समोर राहिलेले दिसून येतात. अतिशय अल्प पुराव्यांच्या आधारावर मिळालेला हा महार बटालियन आणि महार सैनिकांच्या योगदानाचा इतिहास इतका जाज्वल्य आहे की प्रत्येक भारतीयात महार सैनिकात असलेले धाडस आणि साहस निर्माण झाले. तर या देशावर आक्रमण करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. इतकेच काय तर देशांतर्गत चालना-या आतंकवादी कारवाया संपुष्टात आणता येईल. गरज आहे ती महार बटालियन च्या सैन्याकडून प्रेरणा घेण्याची...
असे म्हटले जाते की अंगभूत नैसर्गिक गुण हे त्या व्यक्तीला, समाजाला त्यांच्या पूर्वजांकडून लाभलेले असते. इथल्या महारांना आणि महार समाजाला त्यांच्या पराक्रमी आणि साहसी पूर्वजांचे नैसर्गिक गुण लाभलेले आहेत. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या रूपाने त्याचे प्रात्यक्षिक या देशाने अनुभवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरही वेळोवेळी देशहीतासाठी या समाजाने घेतलेली भूमिका हे त्यांच्या पूर्वजांच्या इतिहासाला पुनरुज्जीवित करणारी ठरली आहे. परंतु पूर्वजांच्या शौर्य आणि पराक्रमी इतिहासाचे जप करीत बसण्यापेक्षा त्या इतिहासाला भविष्यकाळात टिकवून ठेवण्याची जबाबदारी इथल्या महारांची किंवा धर्मांतरित झालेल्या आधुनिक बौद्ध समाजाची आहे. इथल्या प्रतीक्रांतीवाद्यांना महारांच्या इतिहासाला पुसू न देता तो इतिहास जिवंत ठेऊन पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करण्याची जबाबदारी येणाऱ्या पिढ्यांची असणार आहे. हे लक्षात असू द्या... तेव्हाच या समाजाला आपल्या पूर्वजांच्या पावलांवर पाऊल ठेवून नव इतिहासाची निर्मिती करता येईल...  

**************************
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर... ९२२६७३४०९१